Sunday, September 11, 2011

झिंग...

Office ची कटकट, विचित्र traffic, signals, वळताना signal न देता वळलेले गाडीवाले, मधूनच धडपडत आणि धडपडवत चाललेले सायकल वाले, बुधवार असेल तर जुना बाजार, त्यामुळे रस्त्याच्या एकाच बाजूने वाळवलेली दुहेरी वाहतूक, त्यातच मासे घेऊन बसलेल्या मासेवाल्या बायका, त्याच्याजवळील (आणि त्यावर घोंघावणा-या)  माश्यांमुळे सुटलेला सुगंध, वेड्यावाकड्या चाललेल्या रिक्षा, सगळं सहन करत, या सगळ्यातून वाट काढत, लिखित आणि अ-लिखित नियम मोडून जाणा-यांना मनोमन लाखोल्या वाहत जुना बाजार ओलांडून शनिवार वाड्याकडे येऊन शिवाजी रोड ला लागतो. रोजच येतो, कालही आलो. गेले २ दिवस संध्याकाळी शिवाजी रोड बंद ठेवत आहेत. अजून २ दिवस ठेवणारच. गणेशोत्सव चालू आहे, शेवटचे ३-४ दिवस असताना तर लोकांचा महापूर आलेला, शिवाजी रोड, लक्ष्मी रोड बंद असणारच. मानाच्या ५ गणपतींपैकी ४ गणपती, दगडूशेठ, बाबू गेनू, मंडई शिवाजी रोड लगतच, त्यातून परवा दिल्लीत बॉम्ब-स्फोट झालेला त्या पार्श्वभूमीवर security वाढलेली, मुकाट्याने Corporation Bridge कडे वळलो. तिथे One-Way केलेला असल्याने पटकन जाता आले. लोक इतस्ततः पसरले होते. Traffic भरपूर असल्यावर 2-wheeler, सायकल वाले Footpath वरून जातात ना, त्याचा सूड घेत असल्यासारखे लोक रस्त्यावरून वाहत होते. त्यातच tyapical Activa वगैरे गाडीवाले भर रस्त्यात जागा अडवून सावकाश चालले होते. या सगळ्यांवर मनामध्येच तोंडसुख घेत वळसा मारून corporation ला आलो. परवा तिथून उजवीकडे गाडी मारून बालगंधर्व पुलावरून रूम पर्यन्त पोचलो होतो. पण काल शिवाजी पुलावरून यायची बुद्धी झाली. वाट काढत काढत सरकत होतो. गणपती बघायला आलेले लोक कोणालाही जुमानत नव्हते. गाडीवालेही देखाव्या जवळ गाडी slow करून देखावे बघत-बघत जात होते. गणेशोत्सवात जाऊ दे, मी रोजच अश्या लोकांना ओव्या वाहतच असतो. स्वतःही जात नाहीत आणि "मी पण road-tax भरतो, मी कितीही हळू गाडी चालवीन भर रस्त्यात" अश्या अविर्भावात दुस-याला जाऊ देत नाहीत अशी हजारो लोक माझी स्तुतीसुमने झेलत असतात. पूर्वी मनातल्या मनात उधळायचो हल्ली मुक्तकंठे मोठ्याने उधळतो. पुण्याची हवाच संसर्गजन्य आहे. गुण लागायचाच... :P सरकत सरकत पत्र्या मारुती पर्यंत आलो. रस्त्यात मंडप अर्ध्यापेक्षा जास्त आलेला, त्यात scooty, scooter वर पोरा-टोरांच्या लवाजम्या-सोबत आई-वडील रस्त्यातच गाड्या उभ्या करून मुंजाबाचा बोळ ने उभा केलेला "ऋतासुर राक्षसाचा जन्म व वध" बघत होते. मग रिक्षावाले आधी तोंड आणि मग पृष्ठभाग असे traffic मध्ये घुसवून वाहतूक-कोंडी वाढवत होते. अश्या सगळ्यांवर श्लोक उधळत लक्ष्मी रोड cross केला. नागनाथ पराच्या ऋद्धी-सिद्धी गणपतीला गाडीवरूनच नमस्कार करत रूम पर्यंत आलो. आरती संपत आलेलीच होती, मंत्रपुष्पांजली म्हणून उदरं-भरणं साठी बादशाहीची वाट धरली.
Office मधून निघताना office, त्यातले राजकारण आणि इतर फालतुगिरी डोक्यात असते TL, Offshore PM, Onsite PM ... सहस्त्रनामावली म्हणत नगर रोडला लागलेलो असतो पण एकदा पेठेत शिरलो कि हापीस लांऽऽऽऽब फाट्यावर... त्यातून काल शुक्रवार होता "आता २ दिवस हापीस गेले उंउंउंउंउं" असं म्हणून पेठांच्या मोहजालात घुसलो. ह्या मोहजालाची जादू वेगळीच आहे. त्यातून गणेशोत्सव... केसरी वाडा, कसबा, तांबडी जोगेश्वरी, तुळशीबाग, गुरुजी तालीम हे मनाचे ५ गणपती, मंडई, बाबू गेनू, दगडूशेठ, हिराबाग, नातूबाग, चिमण्या गणपती, खजिना विहीर, हत्ती गणपती, जिलब्या मारुती मंडळ, नागनाथ पार.... असंख्य गणपती मंडळे पुण्याचे नांव वेगळ्याच उंचीवर ठेवतात. प्रबोधनपर देखाव्यापासून धांगडधिंगा type सगळे देखावे असतात. जागोजागी मोठमोठ्याने आरत्या, अथर्वशीर्ष याचे आवाज येत असतात. इथे प्रत्येक सोसायटीचा एक आणि प्रत्येक चौकात किमान २ या संख्येने गणपती मंडळे आहेत. प्रत्येक गणपती मंडळात छत्रपती शिवाजी महाराज आणि लोकमान्य टिळक फोटोतून उपस्थित असतात. सकाळी आणि संध्याकाळी षोडशोपचार पूजा, आरती होत असते. प्रत्येक मूर्ती वेगवेगळी असते. प्रत्येकाची स्वतःची अशी खासियत असते. तरीही अत्यंत मोहक, प्रेमात पडावी अशी लोभस मूर्ती असते. नुसते दर्शन झाल्यावर डोळे मिटून हात जोडले जावे असे रूप असते.
अर्थातच अशा गणेशोत्सवाला लोक सहकुटुंब येत असतात. खडकवासला धरणातून पाणी सोडल्यावर मुठा नामक नाल्याची नदी होते न, तसा लोकांचा महापूर पुण्यात गणेशोत्सवाला येतो. 'एवढी लोकं येतात तरी कुठून' असा प्रश्न पडावा इतके लोक जमतात. गर्दीतून वाहत वाहत पोरा-टोरांना घेऊन सगळे देखावे बघत हिंडत असतात. तुळशीबागेतले रस्ते तर एवढे रुंद आहेत हे फक्त याच वेळेला तिथली दुकाने बंद असल्याने कळतात, एरवी संध्याकाळी फिरायला जागाच नसते तिथे. 
मुंबईतला गणेशोत्सव काही प्रत्यक्ष पहिला नाही. T.V. वर मोठमोठाले गणपती, प्रचंड गर्दी आणि विसर्जनाच्या वेळी निघालेले मूर्तीचे धिंडवडे बघितलेत. त्यामानाने पुणं फारच छोटं पण गणेशोत्सवातले दिवस पेठ फुलून निघतात इथल्यासारखे देखावे कुठेच दिसत नाहीत, उगाचच stage वर लहान मोठ्या पोरांचे record dance नाहीत, काही नाही. इतर कुठले गणपती बघायला लांब-लांबून लोक गेलेले मला माहित नाहीत पण पुण्यातले गणपती बघायला मात्र मुंबईतून लोक येतात, परदेशातूनही येतात. हि पेठांची जादू आहे, पुणेकरांची जादू आहे. बंद रस्ते, बेशिस्त traffic काहीही असो, पेठेत शिरायचे... झिंग चढते शनिवार, नारायण आणि सदाशिव पेठेची.. पुण्याची...