Tuesday, October 25, 2016

पिंपळा आणि धोडप II

धोडपकडे आता कूच करायचे होते. पण आता सगळा संसार वर घेऊन जाणे भाग होते, तंबू सकट. वेळ न घालवता गडाकडे सुरुवात केली. इथेही एक तळं लागलं. धोडप आडवा शंकराच्या पिंडी सारखा छान दिसत होता. पिंपळाची जसं “नेढं” ही खासियत, तशी धोडपची “डाईक”. डाईक म्हणजे लाव्हारसाने तयार झालेली बेसॉल्ट खडकापासुनाची भिंत. त्यात तयार झालेली नैसर्गिक खाच ही तर ह्या डाईकचे सौंदर्य अजूनच वाढवते. तळ्याच्या डावीकडून निघालो. धोडपची वाट पूर्ण मळलेली आहे आणि त्यातून हर्षल, निलेश आणि सुनील या आधी येऊन गेलेले होते. तसंही आम्हाला वर राहायचे होते, पोचायला अंधार होणार होता. वाटाड्या घेण्यात काहीच अर्थ नव्हता. पिंपळाने अर्धा-अधिक जीव शोषून घेतला होता त्यामुळे धोडप दमछाक करत होता. तरी जवळ जवळ पूर्ण सावलीतूनच चढत होतो. वेग चांगला होता तरी पाठीवरचं ओझं दमवत होतं. आज फक्त वर पोचायचं होतं, किल्ला उद्याच बघायचा होता. झपझप पावलं पडत होती. हर्षलचा खुणेचा दगड आला. इथून डावीकडचा रस्ता थोडा चढा आणि जवळचा आहे, तर उजवीकडे जाणारा रस्ता तुलनेने सोपा पण वळसा घालून जाणारा आहे. आम्ही डावीकडून जाणार होतो. दोन्ही रस्ते सोनारमाचीकडेच जातात.

हट्टी गावातून दिसणारा धोडप
५ वाजले होते. मागे हट्टी, धोडांबे गांव आणि परिसर सुंदर दिसत होता. वरती देवीचे दर्शन घ्यायला गेलेले गावकरी परतत होते. धोडप तसा offbeat किल्ला आहे, फक्त ट्रेकर आणि गावकरीच येतात. गावकरी आमची चौकशी करत होते, पुण्याहून खास इथे आलो ह्याचे आश्चर्य ते लपवत नव्हते. आता तशी सवयही झाली आहे, असे आश्चर्य बघायची. थोडा चढ, मग rock patch, परत जरा चढ, परत छोटा rock patch असं करत सोनारमाची वरच्या पहिल्या तळ्याजवळ आलो. इथे गणपतीची शेंदूर लावलेली मूर्तीही आहे. पाणी खळखळत होते. बाटलीत पाणी भरून घेतले. ते थंड पाणी प्यायले. सगळे मागेच होते. थोडं चढून गेल्यावर शासकीय विश्रामगृह आहे, लेबर शेड. हा किल्ला कळवण वनक्षेत्राच्या अखत्यारीत येतो. तिथेच सॅक टाकून उजवीकडे वाट न्याहाळायला गेलो तर चक्क २-४ लोक म्हशी घेऊन होते, धार काढायला तो बसतच होता. चक्क धारोष्ण दूध मिळणार होते, कोजागिरी मसाला दुधाने साजरी होणार होती. फुकट मागतोय की काय असे वाटून तो दुधाला नाही म्हणत होता, पण आम्ही विकत घेणार म्हटल्यावर तयार झाला. परत सॅकजवळ आलो तर पराग पोचतच होता. सगळे आले मग. कॅशियर हर्षल दूध आणायला गेला आणि आम्ही गडाकडे वर निघालो. डावीकडच्या सुदर अश्या दुमजली विहिरीत फोटोही काढले. सूर्य पलीकडे हळू हळू गायब होताना दिसत होता. त्याचा फोटो घ्यायचा मोह आवरला नाही. तर मागच्या बाजूला इखारा सुळक्यामागून कोजागिरीचा चंद्र डोकावू लागला होता. Rock Patch जवळ आलो तेव्हा ६ वाजून गेले होते. आता हा patch सुसह्य करण्यासाठी शिड्या बांधल्या आहेत. सूर्य बऱ्यापैकी गायब झाला होता तर चंद्र लालबुंद होत होता. कोजागिरीच्या चाहुलीने लाजलाही असावा ;)

इखारा सुळक्यामागून कोजागिरीचा चंद्र डोकावू लागला
शिडीकडून उजवीकडे पहिला दरवाजा गाठला. विराग आणि सुनील शिडीजवळ होते, तर हर्षल आणि निलेश दूध आणायला थांबल्याने अजून यायचे होते. मी आणि पराग पुढे चालत राहिलो, रस्ता साफ आणि स्पष्ट होता. पायऱ्या लागल्या, त्या सुंदर कोरीव पायऱ्या चढून गेल्यावर फारसी भाषेतला एक शिलालेख बघायला मिळाला (भाषा काही फारशी कळली नाही! :P) लगेचच “L” आकाराचा दरवाजा लागला, सुरक्षेच्या दृष्टीने अतिशय उत्तम रचना असलेला हा दरवाजा आहे. वर जाऊन बाकीच्यांची वाट बघू लागलो. अंधार झाला, Torch बाहेर काढली पण खालून काहीच हालचाल दिसत नव्हती. १५-२० मिनिटांनी ४ Torch दिसल्या सगळे वर आल्यावर जिथे मुक्काम करायचा होता तिकडे निघालो. आता पूर्ण अंधार झाला होता. चंद्राचा प्रकाश वाट दाखवत होता आणि डोक्यावरच्या torch चा प्रकाशझोत पायाखाली काही येत नाही न याची खात्री करून देत होता. नेहमी जी सुकलेली टाकी असे उल्लेख सापडतात ती सगळीच टाकी पाण्याने भरलेली दिसत होती. वाड्यांचे अवशेषही दिसत होते, पण हे सगळे उद्या बघायचे होते. आता गडाच्या डाव्या बाजूला सुरक्षा railing बांधलेले आहे. तिथून सरळ २-३ गुहा ओलांडून मुख्य गुहेजवळ आलो. तिथे आतमध्ये मंदिर आहे, गावकरी येतात आणि तिथे एक बुवाही राहतात म्हणून स्वच्छताही चांगली आहे. इथे शिव-पिंड, नंदी, पाण्याचे टाके, यज्ञकुंड गुहेबाहेर आहे, तर आतमध्ये देवीचे मंदिर, थोडी भांडी, झोपायची जागा वगैरे आहे. बुवा मात्र गायब होते आज. ८ वाजले असावेत. स्वयंपाक करायचा होता. पण त्यासाठी म्हणून साहित्य काढायला घेतले आणि सगळ्यांनी जे मिळेल ते खायला सुरुवात केली. पिंपळा वरून येताना १० एक भाकऱ्या आणल्या होत्या १-२ वगळता त्यांचा फडशा उडवला. लोणचं-सॉस आमच्याकडे होताच, पण चक्क भाकरी-फरसाणही आम्ही खाल्लं. पोटातली धगधगती आग शांत झाली आणि मग टेंट-चूल ह्या गोष्टींकडे वळलो. गुहेबाहेरच तंबू टाकावेत असे सुंदर वातावरण होते. पौर्णिमेचा चंद्र, मोकळा परिसर दूरवर दिसणारे शहर आणि झगझगणारे दिवे आम्हाला मोहात पडत होते पण या आधी निलेश-हर्षलला गुहेला लागूनच असलेल्या टाक्यांजवळ विंचवांचा अनुभव असल्याने तंबू गुहेमध्ये टाकले, इथेही उंदरांचा त्रास होतो असे ऐकून होतो. जागा ऐस-पैस होती. गुहेत साधारण ३०-४० जण राहू शकतील. त्यात बुवांनी झोपायला मस्त मातीचा पलंग करून ठेवला होता. शेजारीच गोलाकार लाकडं पेटवायला कुंडही केलेले आहे. गुहेतच आणखी एक खोली आहे. पण ह्यात बरीच पडझड झालेली असल्याने राहण्यायोग्य जागा नाही. पण चूल पेटवायला मस्त जागा आहे. देवघर म्हणजे मंदिर व्यवस्थित मोठे आहे. त्यात यथासांग पूजा झालेली देवीची मूर्ती होती आणि समोरच छानसे एक यज्ञकुंड.

एका बाजूला चुलही पेटली होती
गुहेबाहेर आता एका बाजूला चुलही पेटली होती, तीवर तांदूळ शिजत ठेवले. वारा बऱ्यापैकी असला तरी मोठ्या दगडाच्या आडोश्याने आमचा बिरबलाचा भात शिजत होता. तो झाल्यावर पिठल्याची सामुग्री बाहेर आली. पिठलं उत्तम तयार झालं. मध्येच चुलीत ४ कांदे भाजून घेतले. चुलीवरच छानपैकी पापड भाजले आणि सगळ्यांचा जठराग्नी परत पेटला. सगळ्याचा नैवेद्य दाखवला, देवीला नारळ वाढवला. पिठलं-भात, शिलकीतल्या भाकऱ्या, पापड, लोणचं, खवा-पोळी असा नामी बेत बघून त्यावर तुटून पडलो. खरपूस भाजून घेतलेला कांदा तर अप्रतिम. आता जठराग्नी शांत झाला. थोडी विश्रांती घेतली. विराग दादांनी आधीच जरा पडी मारून घेतलेली असल्याने दूध आटवायची धुरा ते सांभाळत होते. बाकी आम्ही पाठ टेकून घेतली. साडे अकराच्या सुमारास दूध तयार झाले. सुनील आणि निलेश तर पाठ टेकायला गेलेले पार साखर झोपेत गेले. बाकी आम्ही मसाला दूध पिऊन गुडूप झालो.

मसाला दूध
सकाळी ५ च्या आधीच जाग आली, पण कोणीच उठले नसल्याने पडून राहिलो. ५ ला दोन गजर वाजले आणि मी बाहेर पडलो. गजर वाजवणारे तो बंद करून परत झोपले पण आता शिकारीची वेळ होती. आधी विको वज्रदंती काढून तोंड खंगाळून घेतले. ताजं पाणी भरून शिकारीला गेलो. सूर्योदयाला वेळ होता, वाघ मारून आरामात परत आलो, कॅमेरा घेऊन इखाराच्या मागून वर येत असलेला तांबूस रंग टिपायला वाड्यांच्या अवशेषांजवळ गेलो. मनसोक्त फोटो काढून परत गुहेजवळ आलो तर सगळे शिकारीच्या मूडमध्ये होते. मी तंबू वगैरे आवरून सॅक तयार करून ठेवली. माझ्या समोरच माकडांनी गुहेबाहेर ठेवलेले कांदे वगैरे पळवलनी. आता पोर्टेबल स्टोव्ह पेटवून दूध गरम करायला ठेवले. सगळ्याच दुधात मसाला टाकलेला असल्याने चहा ऐवजी मसाला दूधच झाले. सगळी आवरा-आवरी करून डाईकच्या प्रसिद्ध खाचेकडे निघालो. सूर्य ढगाआड लपला होता. मनसोक्त फोटोसेशन झाले. आता सुभेदार हर्षल पुढे सरसावले. ॐ केशवाय नाम:, नारायणाय नाम: च्या उत्साहात त्याने सुरुवात केली. हा अचला, पसरलेला अहिवंत, सप्तशृंगी, समोर मार्कंड्या, अलीकडे रवळ्या-जावळ्या, कांचना, राजदेहेर, इंद्राई, कोल्देहेर, चांदवड, इकडे चौल्हेर, मोहनदरी, साल्हेर, सालोटा, कान्हेर, प्रेमागिरी... इखारा तर आमच्या समोरच होता. नाशिकचं ते चौफेर उधळलेलं सौंदर्य डोळ्यात आणि कॅमेरात टिपून उतरवायला सुरुवात केली. अजून सोनारमाची बघायची होती. आणि आलेल्या shortcut ने न उतरता इखारा कडे जाणाऱ्या रस्त्याच्या बाजूने उतरायचे होते. सोनारमाचीवर १५ मिनिटांचा power break घेतला. सॅक तिथेच ठेवली. सुनीलच्या ligament ने दगा दिल्याने तो रखवालदार म्हणून तिथे थांबला. आम्ही रवळ्या-जावळ्या कडे जाणाऱ्या वाटेने गणपती मंदिराकडे निघालो. गणपतीचे छोटेसे मंदिर आहे, त्यात शेंदूर लावलेली मूर्ती आहे. पुढे झाडाखाली विठ्ठल-रखुमाईच्या मूर्ती आहेत, दत्ताचीही मूर्ती आहे, समोरच पादुकाही आहेत. डावीकडेच काही वर्षापूर्वी जीर्णोद्धार केलेल्या शंकराच्या मंदिराची परत पडझड झाली आहे. शंकराची पिंड, नंदी बघितला. त्यामागेच एक पाण्याचे टाकेही आहे, पण पाणी पिण्यायोग्य नाही. आमच्यासमोर चक्क लहान-लहान ओढे वाहत असताना बाटली किंवा टाक्यातलं पाणी का प्या?

१.५-२ फूट डोकं उचलून तो आपला अजस्त्र देह लकबीने नागमोडी वळवत घेऊन जाऊ लागला
आम्हाला पुढे असलेला शेवटचा दरवाजा बघायचा होता. हीच वाट पुढे रवळ्या-जावळ्याकडे जाते. आमचं दैव जोरदार होतं. वाटेच्या उजव्या बाजूला लागूनच ८-९ फुटी “जनावर” संपूर्ण देह उलगडून उन खात पडलं होतं. आम्ही जवळून पुढे जातच होतो. “अजगर”! शब्द माझ्या तोंडून बाहेर पडताक्षणी सगळे थबकले. ते त्याचं रूप कॅमेरात साठवून घेण्याचा मोह कोणाला नाही आवरणार... माझ्या कॅमेराने नेमकी मान टाकली होती. म्हणून मोबाईल वर काम भागवत होतो. विराग आणि हर्षलने सुंदर फोटो टिपले. आमच्या हालचालीने त्याच्या साधनेत व्यत्यय आला. त्याने मान १८० अंशात वळवली, आम्हाला बघून घेतले. शेपटीचं टोक नागमोडी केलं. फोटोच्या नादात मी त्याच्या २-३ फुटांवर आलो होतो. अलगद ४ पावलं मागे आलो. अजगर थोडा शांत असतो, चटकन हल्ला करत नाही. पण तरीही रिस्क घ्यायची नव्हती. त्यानेही हळू हळू पूर्ण शरीर १८० अंशात मागे वळवलं आणि घराकडे जाऊ लागला. १.५-२ फूट डोकं उचलून अजस्त्र देह लकबीने नागमोडी वळवत घेऊन जाऊ लागला. मी मस्त शुटींग घेतलं, पण दुर्दैव (वेंधळेपणा म्हणा किंवा नवीनच असलेल्या मोबाईलबद्दलचे अज्ञान) शुटींग बंद करायला गेलो तेव्हा खरं recording चालू झालं. मोबाईलच कपाळावर मारून घेणे बाकी होते.
८-९ फुटांचा तो अजस्त्र अजगर, Indian Rock Python, आम्ही मोकळ्या जंगलात प्रथमच पहात होतो. धोडपने surprise gift दिले होते. ट्रेक सार्थकी लागला होता.
आता शेवटचा दरवाजा बघितला, बऱ्यापैकी सुस्थितीत आहे. तिथे २ गावकरी भेटले, त्यांना फोटो दाखवल्यावर धन्य झाले, साक्षात देवानेच दर्शन दिले आणि आमच्यामुळे त्यांनाही बघायला मिळाले म्हणून कृतकृत्य भाव त्यांच्या चेहऱ्यावर होते. आता उलट पावली सोनार माचीवर परत आलो. बॅगा घेतल्या आणि इखाराच्या रस्त्याला लागलो. वाटेत १-२ विहिरी लागल्या, त्यात अजून एका लहान सापाने निलेशला दर्शन दिले. पुढे कळवण दरवाज्यापाशी पोचलो. तिथे देवनागरीत शिलालेख कोरलेला आहे. दरवाजापासून पुढे १०० पावलं अंतरावरच उजवीकडे खाली उतरायला वाट आहे. ती लक्षात न येऊन तसेच पुढे गेले तर ही वाट एका आश्रमाकडे आणि इखाराकडे घेऊन जाते. आम्ही उजवीकडच्या वाटेने उतरणीला लागलो. धोपटमार्गच होता तो. झपझप खाली आलो. वाटेत टोमॅटोचं शेत लागलं, त्या काकांकडून काही ताजे टोमॅटो घेतले. ते नाकारत असले तरी त्याच्या हातावर पैसे टेकवले. गोळ्या-बिस्किटं घेऊन मुलांचा चेहरा चांगलाच खुलला. आता गाडीकडे परत आलो.
गावात “परदेशी” आडनावाची वस्ती आहे. सगळे मूळ राजस्थानी. मातृभाषा म्हणून हिंदी, पण पिढ्यान-पिढ्या इथेच स्थाईक म्हणून मराठीही उत्तम. शिवाजी महाराजांच्या काळापासून ह्यांचे पूर्वज इथे स्थिरावले. राजस्थान म्हणजे परदेशातून आलेले म्हणून परदेशी आडनाव लागले. ह्यांची भुईमुग, टोमॅटो, मका अशी बरीच शेती आहे.त्यांनी प्रेमाने दिलेला शेतातला ताजा मेवा नाकारता आला नाही. २ वाजत आले होते, अजून जेवणही बाकी होते. तडक निघून पहिला थांबा ठक्करबाजार, नाशिक. इथे सुनील बस साठी निघून गेला. “हेमंत पोखरणकर” उर्फ “हेम” ह्या वल्लीची इथे भेट झाली. पुढे नाशकातून बाहेर पडता पडता “संजय अमृतकर” उर्फ नाना ह्याही अशाच एका मोठ्या व्यक्तीमत्वाची भेट झाली. नाशिक-पुणे ह्या अत्यंत सुखदायक रस्त्याचा अनुभव घेत नागमोडी रीतीने आम्ही पुण्याकडे निघालो. इथे गडी चालवताना ड्रायव्हरचाही ट्रेक झाला असेल असं म्हणायला हरकत नाही. सगळ्यांना त्यांच्या-त्यांच्या ठिकाणी सोडून हर्षलकडे पोचलो तेव्हा साडे बारा झाले होते. घरी यायला १ वाजला. सगळं समान तसंच ठेऊन झोपी गेलो.
             एक आठवडा कसातरी ढकलल्यावर पुढचा शनी-रवी अलिबाग. खांदेरी-उंदेरी जलदुर्ग माझी वाट बघत होते.

पिंपळा आणि धोडप I

“धोडप”... हा शब्द ऐकून समोरच्यांच्या तोंडून “काय?” असा प्रतिप्रश्न आला नाही तरच नवल! सिंहगड, राजगड ई. ई. प्रसिद्ध आहेत, पण धोडप? मुळात हा शब्दच सुधरत नाही. मग तो किल्ला आहे का गाव की अजून काही हे माहित असणे दूरच. पण हेच नांव इतिहासकारांना १६ व्या शतकात निजामशाहीत घेऊन जाते. मराठ्यांना हा किल्ला शिवाजींच्या कालखंडात घेता आला नव्हता, तो नानासाहेब पेशवे आणि निजाम यांच्या तहात स्वराज्यात मराठ्यांच्या ताब्यात आला. राघोबादादा यांच्यावर राजकीय आणि गृह-कलहातून माधवराव पेशव्यांनी हल्ला केला तो ह्याच किल्ल्याच्या पायथ्याशी. १८१८ साली इंग्रजांनी मराठा साम्राज्य बुडवलं आणि हा किल्ला इंग्रजांच्या ताब्यात गेला.
पण हेच नांव ऐकून ट्रेकर एक तर हळहळतो, “अरे राहिलंय रे अजून तिकडे जायचं, जमलं नाही रे अजून...” किंवा त्यावरच्या जुन्या मोहिमेच्या आठवणीत सुखावतो. “अहाहा, काय दिसतो रे मस्त!” हे आपणहून बाहेर पडतेच आणि मग डोळ्यासमोर अवघा धोडप उभा राहतो, ते त्याचं देखणं रूप, “इखारा” सुळक्याच्यामागून पाहिलेला सूर्योदय किंवा मार्कंड्या (मार्कंडेय), रवळ्या-जावळ्याच्या मागे लुप्त होणारं लालबुंद सूर्यबिंब त्याला परत धोडप वर घेऊन जातं.
गेल्या महिन्यात नाशिकचे सुभेदार (निव्वळ मराठ्यांचं राज्य बुडून सध्या लोकशाही आल्याने हा IT कंपनीत मजुरी करणारा, नाहीतर नाशिकच्या सुभेदारीचा प्रबळ दावेदार), श्री श्री हर्षल कुलकर्णी ह्याने धोडपचा प्लान करतोय म्हणून सांगितलंन आणि मी तारखा मनात पक्क्या केल्या. सध्या मोकळा वळू असल्याने October चा एकही शनी-रवी वाया घालवायचा नाही म्हणून ठरवलंच होतं. १५-१६ October मनात पक्की झाली. असा कोजागिरीचा मुहूर्त वर्षातून एकदाच येतो आणि तो क्षुल्लक कारणासाठी मी फुकट नक्कीच घालवणार नव्हतो. ७ जण ठरले. अगदी निघेपर्यंत धाकधूक असतेच तसंच ४ दिवस आधी एक मेंबर गळाला. पण लगेच दुसऱ्या ट्रेकरने ही संधी साधलीन आणि १४ च्या रात्री धोडपसाठी सज्ज झालो. दसऱ्यापर्यंत पावसाने वेगवेगळ्या ठिकाणी हजेरी लावूनही वेळेवर विश्रांती घेतलेली होती.
नेहमीप्रमाणे ठरलेले समान घेऊन मी रात्री ९ ला हर्षलकडे पोचलो. तवेरा हजर झाल्यावर लगेचच “मोsssरया” चा गजर करून निलेश, विराग, पराग आणि अजय यांना जमवत नाशिककडे मार्गस्थ झालो. नाशिकला सुनील येऊन मिळाला आणि ७ च्या दरम्याने सावरपाडा गावात दाखल झालो. रमेश स्वागतासाठी हजर होताच. त्याच्याकडेच पोहे झाले. ह्यावेळी त्याला यायला जमणार नव्हते पण त्यानेच एका गावकरी मामांची वाटाड्या म्हणून सोय लावून दिली होती. गडावर पिण्यायोग्य पाणी नाही. त्यामुळे बाकीचं समान गाडीतच ठेऊन, पाणी आणि थोडा चकणा घेऊन गडाकडे निघालो. मामा एकदम उत्साहात माहिती देत होते. अवघ्या १० मिनिटातच पिंपळाने नेत्रदीपक दर्शन दिले.

पिंपळाचे पाण्यातले अप्रतिम रूप
तलावाच्या डावीकडून मळलेल्या पायवाटेने लहानसा बंधारा, मग ओढा पार करून आवश्यक थांबे घेत तासाभरात पठारावर येऊन पोचलो. १०-१५ मिनिटांच्या रस्त्यात डोक्यावर घोंघावणाऱ्या माशांनी अक्षरशः वेडं केलं होतं. पिंपळा गावातूनही इथे वाट येते, पण ती मळलेली नाहीये. सावरपाडातून आम्ही आलेली वाट मात्र मळलेली होती. इथपर्यंत वाट चुकण्याची फारशी शक्यता नाही पण पुढे मात्र मळलेली वाट शोधायला लागते, कारण अचानक वाट गायबही होते. २ वाटा नेढ्याकडे नेतात, समोरची वाट सरळ वर नेणारी पण घसरड आहे तर दुसरी थोडासा वळसा घालून मागच्या बाजूने वर नेणारी आहे. आम्ही दुसऱ्या वाटेने चाललो. वाट मधेच लुप्त होत होती, पण वाटाड्या मामा आम्हाला परत जागेवर आणत होते. वाढलेल्या गवतातून, झाडांच्या नैसर्गिक बोगद्यातून वाट काढत वर चढत होतो. वाट घाम काढत होती. Dehydration होऊ नये यासाठी थोडं-थोडं पाणी प्यावं लागत होतं. मागच्या बाजूला आता टकारा, साल्हेर-सालोटा स्पष्ट दिसत होते. मोठ्या किल्ल्याच्या सुरक्षेसाठी आसपास काही किल्ले बांधले जात असत, त्यांना प्रभावळीतले किल्ले म्हणत. पिंपळा हा साल्हेरच्या प्रभावळीतला किल्ला आहे. साल्हेर आपला परशुराम टोकावरून मान ताठ करून आमच्याकडे पाहत होता. आम्ही लक्ष परत पिंपळाकडे वळवलं. ते प्रसिद्ध नेढं दिसलं. गुहाही दिसली. झपाझप नेढ्यात पोचलो. शंभर-सव्वाशे पान सहज उठेल एवढ्या प्रचंड आकाराचं ते नेढं होतं. आणि शेजारी तेवढ्याच आकाराची गुहा. सह्याद्रीतली २ मोठी नेढी नाशिक बाळगून आहे. एक येताना दिसलेलं “मोहनदरीचं” नेढं आणि ज्यात आम्ही उभं होतो ते सह्याद्रीतलं सगळ्यांत मोठं पिंपळावरचं नेढं!

आम्ही उभं होतो ते सह्याद्रीतलं सगळ्यांत मोठं पिंपळावरचं नेढं!

साल्हेरवरचं परशुराम मंदिर अगदी स्पष्ट दिसत होतं. गेल्याच वर्षी साल्हेर वर गेलो होतो तेव्हा ऐकलेली कथा आठवली. साल्हेरवरून भगवान परशुरामांनी जेव्हा समुद्र मागे हटवून जमीन निर्माण करण्यासाठी बाण मारला तेव्हा एका डोंगराला मोठं खिंडार करून तो आरपार गेला. तो डोंगर म्हणजे आम्ही उभे असलेला पिंपळा किल्ला आणि ते खिंडार म्हणजे सह्याद्रीतलं सगळ्यांत मोठं नेढं, ही भगवान परशुरामांची कृपाच!
नेढ्याच्या डावीकडून घळीतून वरती लहानसा Rock Patch पार केला की टाकी असलेल्या टोकावर पोचतो. ह्या टाक्यांना जिवंत झरे नाहीत. बहुतांशी लोकांना कोरडीच बघायला मिळणारी ही टाकी पूर्णपणे भरलेली होती, यंदा पाऊसच जोरदार झाला होता. सभोवार नजर टाकली तर नाशिक आपलं सौंदर्य उधळत होता. मागच्या बाजूने टकारा, साल्हेर-सालोटा, मागे हनुमान डोंगर, आडवाच्या आडवा हरगड, शेजारीच मुल्हेर-मोरा, मांगी-तुंगी ची टोकं, दीर-भावजय (होय, ही नांवं आहेत डोंगरांची, सुभेदार हर्षलची कृपा!), चौल्हेर, कोथमीऱ्या तर दुसऱ्या बाजूला कांचना, हंड्या, लेकुरवाळी, इखारा, धोडप, रवळ्या-जावळ्या, मार्कंड्या, सप्तशृंगी, मोहनदर, अहिवंत, अचला.... हर्षल नुसती नांवं फेकत होता, आम्ही पटापट समोरचा डोंगर आणि नांव घोळवत होतो. त्याच्या बिल्डींग जवळच्या ४ बिल्डींगची नावंही तो सांगू शकणार नाही ह्याची खात्री आहे मला पण नाशिकच्या प्रेमात हा पडला होता आणि आम्हालाही खेचत होता. आम्हीही खेचलो गेलोच होतो. पुण्या-मुंबई जवळचे ४ किल्ले फिरल्यावर ट्रेकर म्हणवून घेणारा नुसती नावंच ऐकून खाली बसेल नाशिकातली.
तर.. फोटो वगैरे झाले. लवकर खाली उतरणे भाग होते म्हणून पटकन गुहा बघायला उतरलो.एके ठिकाणी वरच्या बाजूला ४-५ फूट भुयार खोदलेले आहे, त्याचा उद्देश समजत नाही. ते आरपार नाही. गुहेच्या बाहेरच्या बाजूला एक भुयार आहे, ते मात्र आरपार आहे.

पठार आणि मागे पिंपळा
आता झपाझप खाली उतरू लागलो. वाट चुकण्याची थोडी शक्यता आहेच पठारापर्यंत तरी. वाटेत एक छोटासा ब्रेक झाला तोंडात टाकण्यासाठी, मग खाली उतरलो. १ वाजला होता. रमेश आमची वाटच बघत होता. जेवण तयार होते. त्यांची स्वतःचीच कांद्याची शेती, मिरच्या, बाजरी, भात. सगळं शेतातलं ताजं अन्न आमच्यासमोर होतं. सगळ्यांनीच ताव मारला. रात्रीच्या स्वयंपाकासाठी त्यांच्याकडूनच थोडे कांदे घेऊन “हट्टी” गावाकडे निघालो.
तरी २ वाजून गेले निघायलाच. वाटेत एक छोटे संगमनेर लागते. हे संगमनेर वेगळे. हट्टी गावात पोचायलाच सव्वा ४ झाले. इथल्या गावकऱ्यांशी संपर्क होऊ न शकल्याने दुधाची सोय झाली नव्हती. वाटेतही मिळाले नव्हते, त्यामुळे कोजागिरीला मसाला दूध नाही म्हणून जरा Mood-off झालाच. अगदीच दूध-पावडर होतीच वेळेला-केळं म्हणून.