Tuesday, October 22, 2019

वैदर्भीय भटकंती – किल्ले वारीचा भैरवगड आणि मैलगड

गाविलगड-नरनाळा सारखे रथी-महारथी पाहून झाल्याने मनातून परतीचा प्रवास तसा म्हटला तरी चालू झालेलाच होता. तरी आम्ही अजून मध्यप्रदेश सीमेलगतच होतो. शाहनूर पासून साधारण 60 किलोमीटर अंतरावर वारीला जायचे होते.
“वारी” म्हटले की डोळ्यासमोर येतात ते वारकरी. डोक्यावर तुळशीवृंदावन घेतलेल्या माऊली, हातात झांज घेतलेले माऊली, कटेवरी हात असा चंद्रभागेच्या तिरी विटेवरी उभा विठू माऊली. पण हे वारी प्रकरण वेगळे होते. इथे कटेवरी हात नाही तर चक्क गदाधारी हनुमान. एक वारी म्हणजे शांत सुंदर विठ्ठल तर दुसरीकडे वारी म्हणजे भीमरूपी महारुद्रा आणि बुद्धीमतां वरिष्ठं असा मारुती.

वारी हनुमान मंदिर: फोटो internet वरून साभार
सुमारे साडेचारशे वर्षांपूर्वी समर्थ रामदास स्वामींनी येथे हनुमानाची स्थापना केली. हे मंदिर “वान” नदी आणि एका नदीसदृश ओढ्याच्या संगमावर नितांत सुंदर ठिकाणी आहे. नदी कोरडी पडली तरी बारा महिने वाहणारे गरम पाण्याचे कुंड किनारी आहे. हेच मंदिर होते आमचे मुक्कामाचे नियोजन ठिकाण. शहानुर सोडल्यावर अकोट-हिवरखेड करत वारी गावापर्यंत पोचलो तेव्हा अंधार झाला होता. मुक्कामाचे ठिकाण जरी मनात होते तरी पर्यायी व्यवस्था म्हणून लक्ष इतरत्र ठेवून होतो. वाटेत ज्ञानेश आश्रम लागला. अंधारात मंदिर नीट कुठेसे ते दिसेना. त्यात रस्ता संपलेला दिसला. समोर एक बंद गेट दिसलं. उतरून जागा पाहिली तर कोणी नव्हतं. मग मागे फिरलो आणि थोड्याच अंतरावर मंदिराचं ठिकाण दिसलं. दोघेजण उतरून मंदिरापर्यंत गेलो तर समोर मंदिराचे बंद दार आणि कुलूप. पण आजूबाजूला तंबू टाकता येईल अशी जागा दिसली. शेजारी ओढा होताच. मग सगळा संसार घेऊन तिथे गेलो. थोडा प्रयत्न केल्यावर मंदिरातल्या लोकांना जाग आली. तसे ते जागे होतेच कामं करत. दुसर्‍या दिवशी काही कार्यक्रम होता. अपरात्री किंवा पहाटे अनेक लोक येणार होते. त्यांची व्यवस्था चालली होती. पाणी, राहण्यासाठी जागा, संडास वगैरे चौकशी झाल्यावर चर्चेअंतर्गत केतनने तिथल्या मोठ्या हॉलमध्ये झोपायचे ठरवले जिथे बाकीचे लोक येऊन झोपणार होते, तर आम्ही तंबूत. म्हणजे आम्हाला जवळच्या झाडांवरच्या माकडांचा, बाजूला असलेल्या वटवाघळांचा त्रास होण्याचा धोका, तर हॉलमध्ये झोपायला येणाऱ्या लोकांना केतनच्या कंठसंगीताचा.
असं कुठे बाहेर गेलं तंबूत वगैरे झोपायला, की जागे लवकर येतेच. त्यातून पहाटेस आलेल्या लोकांची लगबग चालू व्हायच्या आधीच आपापली कामे व्हावीत असा सुज्ञ विचार ब्राह्ममुहूर्तावर सुचल्याने पहाटे-पहाटे उठून मंदिराचे दरवाजे उघडायला लावून दंतमार्जन आणि महत्त्वाचे प्रात:र्विधी उरकून घेतले. बिना-अंघोळीचे का होईना, पण त्या प्रातःसमयी हनुमानाचे दर्शन घेतले. समर्थांना आणि हनुमंतालाही आम्ही अशा दर्शन घेण्याने संतोष जाहला असेल.
तर साडेसहाला त्या हनुमंताला टाटा करून गडाकडे जाण्यासाठी सगळा संसार गुंडाळून निघालो. गुगल मॅपवर “वारी भैरवगड” हा वान नदीवरच्या धरणाच्या बॅक वॉटर मध्ये दाखवलेला आहे, तिकडे पाण्यात उडी मारायला जायचं नाही. प्रत्यक्षात तो किल्ला जलदुर्ग नसून वारी गावात आहे. मंदिरात मुक्कामासाठी म्हणून वारी गाव ओलांडून काल रात्री आम्ही पुढे आलो होतो, तसंच आता मागे येऊन उजवीकडे गावात जाणाऱ्या वाटेने पायथ्याशी जाता येणार होते. मंदिरापासून अवघ्या पंधरा वीस मिनिटांवर हा किल्ला आहे. माझा संकष्टीचा उपास असल्यामुळे फक्त चहा पिऊन झाला आणि सकाळी सव्वा सातला गडाचे पायथ्यावरून दर्शन झाले.

भैरवगड दरवाजा
गाडी इथे लावून गडाच्या मागुन दर्शन देणाऱ्या उगवत्या सूर्याचे दृश्य कॅमेरात घेतले. दरवाजा दोन मिनिटात गाठून भाजीव विटांत बांधलेल्या सुबक बांधणीच्या दरवाजेही फोटो घेतले.
गडाचे तसे फारसे काहीच अवशेष शिल्लक नसले, तरी आश्चर्यकारकरित्या आणि सुदैवाने हा उत्तम दरवाजा मात्र अजून उभा आहे. दरवाजाला अनेक लहान-मोठी भगदाडं दिसतात. कदाचित तोफेच्या माऱ्याच्या त्या खुणा असाव्यात. या किल्ल्याचे वैशिष्ट्य म्हणजे याचे फक्त प्रवेशद्वार भाजीव विटांत आहे, तर इतर संपूर्ण किल्ला पांढऱ्या मातीत बांधलेला आहे. दरवाज्याच्या दोन्ही बाजूला पांढऱ्या मातीचेच बुरुज थोडे शिल्लक आहेत. साधारण वीसेक वर्षापूर्वी या कमानीला लाकडी दरवाजाही होता, पण आता तो शिल्लक राहिलेला नाही. याच कमानीतून आतमध्ये गेल्यावर समोरच क्षेत्रपाल भैरवनाथाचे नाविन्याने बांधून काढलेले मंदिर दिसले. दरवाजातून आत शिरल्या शिरल्या उजवीकडच्या बुरूजाजवळून दरवाजावरील नगारखान्याकडे जाता येते. नगारखान्यावरून संपूर्ण किल्ल्याचा भाग पाहता येतो. नगारखान्याच्या जंग्या व तोफांचा मारा करण्यासाठीचे असलेले दोन झरोके दिसतात. इथे विशेष काही शिल्लक राहिलेले नाही.

विहीर
 पायवाटेने जाताना मंदिराच्याआधी डावीकडे नदीलगतच्या बाजूला विहीर दिसते. या विहिरीला संरक्षक कठडा नाही आणि गवत-झुडपेही वाढलेली आहेत, तरी सांभाळूनच ती बघण्यास जावे.
 
भैरवनाथ मंदिर आणि मागचा बुरुज
नव्याने बांधलेल्या भैरवनाथाच्या मंदिराच्या जागी पूर्वी फक्त एक ओटा होता आणि त्यावर भैरवनाथाचा तांदळा होता, नंतर या भैरवनाथाला मंदिर नव्याने बांधून त्यात विराजमान करण्यात आले. मंदिराच्या डावीकडे एक ओटा असून त्यावर देवीचा तांदळा आहे. ओट्यालगत एका लोखंडी पोलवर बांगड्या दिसतात, गावकरी नवस म्हणून त्या वाहतात. या मंदिराच्या मागे एक बुरूज आहे. सगळीकडे पांढरी मातीच आहे. प्रदक्षिणा मार्गाने दरवाजापर्यंत येताना अजुन एक बुरुज दिसला.
 
बुरुजावरून भैरवनाथ मंदिर आणि गडाचे प्रवेशद्वार
निवांत फिरुन फोटो काढत हा किल्ला वीस मिनिटात बघता येतो. या किल्ल्याची उभारणी गौड राजाने केली केली असे मानले जाते. बांधणी पांढऱ्या मातीत करण्याचे कारण म्हणजे दगडांचा अभाव आणि आर्थिक दुर्बलता. पण या मातीचा फायदा असा की शत्रूच्या हल्ल्याच्या वेळी त्याच्या भिंतीवरून पाणी सोडल्यास तोफगोळे त्या चिकणमातीत रुतून बसतात आणि सुरुंग निकामी होतात. (संदर्भ: दुर्ग दौलत महाराष्ट्राची, लेखक – भगवान चिले)
पोळ्याच्या दिवशी पोळा सुटला की घरी जाण्याआधी सगळे बैल भैरवनाथांच्या दर्शनासाठी या किल्ल्यात आणले जातात. या किल्ल्याकडे जाणाऱ्या वाटेवर तीन समाधी आहेत, त्या अप्पाराजा हा गौड राजा, त्याची पत्नी व मुलगी यांच्या “जायरात” असल्याचे गावकरी सांगतात. (संदर्भ: डॉ. जयंत वडतकर)
गड फिरून खाली आलो तेव्हा जेमतेम पावणेआठ झाले होते.
 
मैलगड
पावणे दहाच्या सुमारास आम्ही मैलगडाच्या पायथ्याच्या गावात पोचलो. गावातूनच लांबवर मैलगडाचे दर्शन होते.
वारीतून जळगाव-जामोद, सुनगाव वरून “गोदळा” धरणाच्या बाजूने रस्ता गारपेठ जवळून हनवतखेड जवळ येतो. हनवतखेडचे प्रायमरी स्कूल लागते जिथे उजवीकडे वळल्यावर रायपूर गावात येतो. वस्तीचे हे शेवटचे ठिकाण आहे. इथेच गाडी लावली. लांबूनच सुंदरसा बुरुज आपल्याला दिसतो. त्याच्या बाजूची तटबंदी आणि त्यावरच्या चर्या दिसतात.
किल्ला समोरच दिसत असला तरी रस्ता नेमका कसा असेल ते गावकऱ्यांना विचारून घेतले. किल्ला नजरेसमोर ठेवत उजवीकडच्या वाटेने २-3 टेकाडं चढावी लागतात. वाट तशी मळलेली आहे, ती आपल्याला साधारण समजत जाते. उजवीकडे जाऊन नाकाडावरून सरळ बुरुजाकडे जाणाऱ्या वाटेचा अंदाज काढत रुक्ष भागातून आपण झाडांमधून पायथ्याशी पोहोचतो. ३०-४० मिनिटात किल्ल्याच्या दरवाज्यापाशी आपण येतो. प्रवेशभाग खुपसा ढासळलेला आहे. डावीकडे दरवाजाचे अवशेषही दिसतात. मधून जाणार्‍या पायर्‍यांनी सरळ वर जाता येते तर डावीकडे बुरुजावरही जाता येते. पुढे उजवीकडे भाजीव विटांचे बांधकाम दिसते, हा प्रवेशद्वाराचाच भाग असावा. भग्न अशा दरवाजातून आपण वर पोहोचतो.

प्रवेश भाग आणि भाजीव विटांतील बांधकाम
 आपण लांबून बघत असलेला देखणा बुरुज उजवीकडे ठेवत आपण वर आलेलो असतो. त्या बुरुजावर जायची सगळ्यांनाच ओढ होती, पण संपूर्ण किल्ला बघणे महत्त्वाचे असल्याने प्रदक्षिणा मार्गाने गडफेरीला सुरुवात केली. वाटेत अपेक्षित असे खड्डे लागले जे बऱ्याच किल्ल्यांवर गुप्तधन सापडेल अशा आशेने खणलेले सापडतात. या गडाची विस्तृत अशी माहिती व नकाशा आमच्याकडे नसल्याने जे काही पाहायचे होते ते शोधत शोधतच. गडफेरीला सुरुवात केल्यावर दहा मिनिटातच पाण्याचे जोडटाके दिसले. पुढे अजुन एक टाके दिसले. त्यापुढचे टाके झाडांमध्ये खाली लपलेले होते. त्यापुढे परत दोन खांबी टाके दिसले. साधारण दोन-दोन मिनिटाच्या अंतरावर अशी टाकी दिसली होती गेल्या दहा मिनिटात. त्यापुढचे बांधकाम हे टाके आहे की राहण्यासाठी खोदलेली गुहा हे समजणे कठीण होते. एक तर बर्‍याच गोष्टी या खूपशा प्रमाणात बुजलेल्या आहेत.

गडावरील टाकी
या दोन खांबी टाक्यात मात्र भिंतीवर नावांच्या स्वरूपात इथेही लोक येत असल्याच्या खुणा होत्या. खांबांना तडे गेलेले असले तरी त्यावरची नक्षी मात्र शाबुत होती. हेही टाके कातळकोरीव होते.

अर्धगोलाकार टाके
त्यापुढचे टाके खासच होते होते. अर्धगोलाकार आकारात खोदलेल्या या टाक्यात चार खांब आहेत. बऱ्याच प्रमाणात त्यांची झीज झालेली असून त्यांचे आकारही बदललेले आहेत. हेही टाकं कोरडं होतं. इथे फोटोग्राफी करण्याचा मोह आवरला नाही.
अजून गुप्तधन-खड्डे ओलांडल्यावर तटबंदीचे अवशेषही दिसतात, परंतु ते शोधून काढावे लागतात, गवताखाली ते लपलेले आहेत. पुढे अजून एक लांबच लांब दगडात कोरलेले टाके दिसते परंतु ते गाळाने भरून गेले आहे. आम्ही आधे-इधर आधे-उधर असे अक्षरशः उंडारत एक-एक अवशेष शोधून काढत होतो.

गडावरील अजून टाकी
तीस-चाळीस मिनिटात सात-आठ टाकी तरी दिसली होती, पण सगळी कोरडी आणि गाळाने बुजलेली. अशावेळी एक टाकं सापडलं ते पाण्याने भरलेलं, चार खांबी टाकं, तेही नितळ पाण्याचं, अगदी तळ सहज दिसणारं. त्यानंतर लागला टाक्यांचा समूह, बहुतांशी बुजलेला-कोरडा. पुढे अजून एक खांब टाके बऱ्यापैकी बुजलेले, साधारण 80 टक्के बुजलेल्या टाक्यात खांबाचे अगदी वरचे दिसत असलेले भाग.

तटबंदीचे अवशेष
अजुन टाकी बघत बघत 80 टक्के प्रदक्षिणा पूर्ण झाली होती. कडेकपारीला धरून गडाची काही तटबंदी शिल्लक दिसत होती. तिथेही तटबंदीच्या काही दगडांना भगवा रंग दिलेला दिसत होता. परत टाकी. किल्ला टाके-समृद्ध वाटत होता. पंधरा-एक तरी लहान मोठी टाकी दिसली होती आम्हाला. ह्यातच कुठलंतरी टाकं सासू-सुनेचं म्हणून प्रसिद्ध आहे. हे जोडटाकं असून यातल्या एका कपारीतलं पाणी गरम, तर एकातलं थंड असतं असं गावकरी सांगतात. पण सध्या मधली भिंत पडली असून सगळंच पाणी थंड आहे. या गडावरून पाण्याचा एक उपसर्ग आहे, त्याचं outlet पंधरा किलोमीटर अंतरावरच्या मोहिदपुर इथे आहे. गडावरून पाण्यात लिंबू टाकलं तर ते मोहिदपुरला बाहेर निघायचं. सध्याही इथे पाण्यात नीळ टाकली तर मोहिदपुरला नीळं पाणी येतं असं स्थानिक लोक सांगतात. (संदर्भ: “महान्यूज” विवेक चांदरकर)
हे सर्व बघून झाल्यावर गावातून खालूनच खुणावणारा सुंदर बुरुज समोर आला. संपूर्ण प्रदक्षिणा मारून झाल्यावर तो बुरुज आम्ही बघणार, तोच वाटेत एका गोष्टीने सगळ्यांनाच खिळवून ठेवलेन. आम्ही सगळे आधी तिकडे धावलो. फोटोग्राफी सुरू झाली. त्या गोष्टीचे फोटो, “त्या”च्याबरोबर फोटो, Top-View, Side-View, 360° View सगळं झालं.
काय जबरदस्त गम्मत होती ती म्हणजे... पण थांबा. आधी बुरूज बघू.

बुरुज
इतर संपूर्ण किल्ला टाके गुहा सगळे कातळकोरीव आहे, पण हा बुरुज मात्र काळ्या दगडांनी बांधून काढलेला आहे. तसा हा जोड-बुरुज आहे. खूपसा भाग बुजलेला तर खुपसा ढासळलेलाही आहे. तरी बऱ्यापैकी जंग्या सुरक्षित आहेत. खालून भव्य दिसणाऱ्या बुरुजाचे वरून तसे दर्शन होत नाही, त्यासाठी बुरुजाच्या खाली जावे लागते. तास-सव्वातासात किल्ला आम्ही पिंजून काढला होता.

बुरुज: खाली उतरल्यावर
खाली उतरायला सुरुवात केली तर तोच बुरुज एवढा दिसायला लागला. अवघ्या पाच-सहा मिनिटापूर्वी आम्ही त्या बुरुजावर होतो, आता खालून तो बुरुज भव्य आणि अभेद्य वाटत होता.
अरे हो गंमत राहिलीच की! गाविलगडाची ओळख शार्दुल दरवाजा. नरनाळ्याची महाकाली दरवाजा, अशी भव्य दिव्य ओळख. पण त्या दोन्ही किल्ल्यांवर त्यांची ओळख म्हणून असलेली वास्तू भव्य होती, इथली ही गोष्ट म्हणजे एकदम छोटीशी होती. पण ती छोटीशी गोष्ट या गडाची ओळख बनल्ये किंबहुना इतर कुठेही न आढळणारी हि गोष्ट म्हणजे दगडात कोरलेला किल्ल्याचा नकाशा. आता हा नकाशा याच किल्ल्याचा आहे का दुसऱ्या किल्ल्याचा हे काही सांगता येणार नाही.

किल्ला प्रतिकृती
पण या छोट्याशा प्रतिकृतीला काय नाही? सुंदर कातळकोरीव पायऱ्या आहेत, बुरुज आहे, दरवाजा आहे, टाकीही आहेत. बालेकिल्ला आहे, तटबंदी आहे, एवढेच नाही तर परकोटाची भिंतही आहे.. वा!
एखादी भव्य कलाकृती आपल्याला तिच्या भव्यतेने दिपवून टाकते, तिच्यापुढे आपले खुजेपण आपल्याला दिसू लागते, पण भव्य कशाला, एखादी खूपच छोटीशी गोष्ट आपल्याला प्रेमात पाडते, आपल्याला मोहून टाकते. त्यातलीच ही एक कलाकृती आहे. आपल्याकडे दिवाळीत लहान मुलांनी किल्ले बनवायची एक प्रथा आहे तसेच कदाचित यावेळी गडावर राहणाऱ्या मुलांनी तर हा किल्ला केला नसेल? एवढी अप्रतिम कलाकृती कोणाला नाही भावणार? आणि मला त्यातला आवडलेला भाग म्हणजे ती ज्या दगडात कोरलेली आहे त्या दगडाला चिकटून असलेल्या दगडापासून वेगळासुद्धा केलेला नाही. नाहीतर कदाचित आत्तापर्यंत तो किल्ला कोणाच्या तरी घरी रंग देऊन शोकेस मध्ये बसलेला सापडला असता. दिल खुश झाला होता. आमच्या विदर्भाच्या भटकंतीतला डोंगरी म्हणावा असा हा शेवटचा किल्ला होता.
उतरताना वाटेत थांबून आम्ही थोडा फराळ केला. नाही तर सकाळपासून तसं काहीच खाल्लं नव्हतं. अवघ्या अर्ध्या तासात आम्ही परत गावात आलो. आता खरा परतीचा प्रवास चालू झाला, कारण आमच्या लिस्टमध्ये होते ती फक्त आता एक गढी आणि नगरकोटाची उरली पुरली वेस.
आमच्या वैदर्भिय भटकंतीचा हा भटकंतीचा हा चौथा आणि शेवटचा दिवस होता. आम्ही जवळपास दहा किल्ले पाहिले. विदर्भ खूप काही बाळगून आहे, पण आम्हाला या मर्यादित वेळेत एवढंच बघत आलं होतं. विदर्भाची माझी तरी ही पहिलीच खेप होती.
“रोहिलगड” अशा अपरिचित किल्ल्यांपैकी एक अशाने सुरुवात करून आमची सांगता झाली ती अत्यल्प परिचित आणि एक अतिशय युनिक गोष्ट बाळगून असलेला मैलगड किल्ला याने.
येताना खामगावची शिवाजी वेस (दरवाजा) आणि नागपूरकर भोसल्यांनी गोंधणपूर गढी असे 2 छोटेसे स्टॉप घेऊन आम्ही पुण्याकडे रवाना झालो.


Monday, August 26, 2019

वैदर्भीय भटकंती – किल्ले नरनाळा

नरनाळा किल्ला हा सुद्धा मेळघाट व्याघ्र प्रकल्पात येतो. त्याच्या चालू असण्याच्या वेळाही ठरलेल्या आहेत, तसेच त्यावर आपली SUV असेल तरच घेऊन जाता येते, नाहीतर फॉरेस्ट डिपार्टमेंटची परवानगी असलेली खाजगी जिप्सी गाडी भाड्याने उपलब्धतेनुसार घेऊन जाता येते. त्यासाठी वेगवेगळे शुल्कही आहे.

Own Vehicle Fee: 400, Guide Fee: 300
Gypsy Fee: 1500 to 3000
वेळ: साधारण सकाळी ६ ते १० आणि दुपारी २ ते ६
अधिक माहितीसाठी: http://www.magicalmelghat.com/AccomodationDynamic.aspx

थोडक्यात कधी उठले आणि तोंड घेऊन गेले तर किल्ला पुरता बघायला मिळेल असे नाही. त्यातून बहुसंख्य लोक येथे जंगल सफारीसाठी येतात. आम्ही या सगळ्याची माहिती मिळवून गेलेलो असल्याने दुपारच्या सेशनला किल्ला पाहायचा दृष्टीने नियोजन ठरलेले होते. जिल्पी आमनेर किल्ल्यावरून धारणी गावातून परत मेळघाट प्रकल्पात शिरलो. हा रस्ता धाकणा, कोहा, बेलकुंड, झीरा, खटकाली अशा अगदी पूर्णतः व्याघ्रप्रकल्पात असणाऱ्या गावांमधून जातो. यात फॉरेस्ट डिपार्टमेंट चेकपोस्ट आहेत. आम्ही बहुतेक बाराच्या दरम्यानेच नरनाळा किल्ल्याच्या प्रवेशाजवळ पोचलो. हा किल्ला मेळघाट प्रकल्पाच्या शहानुर भागात येतो. ठरलेली वेळच मुळी २ होती, म्हणजे अजून २ तास होते. मग त्यांच्याशी गप्पा मारत आमच्या येण्याचा उद्देश त्यांना सांगितला. आम्ही जंगल सफारीसाठी आलेलो नसून किल्ला पाहण्यासाठी आलेलो आहे आणि हाच मुख्य उद्देश असल्याचे सांगितले. त्यावर आम्हाला त्या दृष्टीने चांगला गाईड देऊन, किल्ल्याचे सगळे अवशेष दाखवण्याचे त्यालाही सांगितले. अर्थात हे सर्व तोंडदेखले की मनापासून ते अधिकारी जाणोत. पण आमच्या परीने आम्ही प्रयत्न केला नक्कीच. निवांत गप्पा मारून आजूबाजूचे माहिती फलकांचे फोटो काढून झाले. मग सरळ जेवण उरकून घेतले.
दोन वाजता हळूहळू हालचाली चालू झाल्या. गाईडला ४-४ वेळा ताकीद देऊन झाली "की बाबा, आपल्याला सरकारी नियम मोडायचे नाहीयेत, ते न मोडता ज्या ठिकाणी नेता येईल, ती जागा मात्र सोडू नको. किल्ल्याचे अवशेष म्हणून असलेली पडकी भिंत, दगड-गोटे काहीही असले तरी बघायचे आहेत आम्हाला. सफारी आणि वाघ बघायला नंतर सावकाश येऊ परत." आम्ही सज्ज होतोच. कॅमेर्‍याने सुद्धा दहा मिनिटातच क्लिक-क्लिकाट करायला सुरुवात केलीन.

शहानुर दरवाजा

मेहंदी किंवा मेंढा दरवाजा
किल्ल्याचे अवशेष लगेच दिसायला लागतात. तसेही आपण गाडीतूनच फिरत असतो. सगळ्यात पहिल्यांदी लागतो तो शाहनुर दरवाजा. याच्या कमानीवर सिंह असल्याने याला शेर दरवाजा म्हणून ओळखले जाते. तर हा दरवाजा म्हणजे शाहनुर गावातून गडावर येण्याची वाट म्हणून शाहनूर दरवाजा. याला दोन कमानी आहेत आणि डाव्या बाजूला एक छोटेखानी दरवाजा ही दिसतो. मुख्य दरवाजाच्या छतावर अप्रतिम कोरीव काम केलेले आहे,  तर दरवाजाच्या आतील भिंतीत एक वर जाणारी पायर्‍यांची वाटही आहे. दरवाजाच्या पलीकडे गेल्यावर काही अंतरावर एक बुरुजही दिसतो. या बुरुजाला “खूनी” बुरुज असे भयावह नाव आहे. नंतर परतताना मेंढा किंवा मेहंदी असा दरवाजा असून याच्या जवळच्या तटबंदी ढासळलेल्या तर काही ठिकाणी बुजलेल्याही आहेत.

महाकाली दरवाजाचे प्रवेशद्वार
आमचे लक्ष होते पुढे असणारा “महाकाली दरवाजा”. नुकताच गाविलगडाचा अप्रतिम दागिना असा शार्दुल दरवाजा पाहिला होता, त्यामुळे “महाकाली” अशा नावावरूनच भव्यतेची प्रतिमा उभ्या होत असलेल्या त्या दरवाजाला पाहण्यासाठी सगळेच लक्ष तिकडे लागले होते. उजव्या हाताने पाखाडी सारखी असलेली पायर्‍यांची वाट आपल्याला महाकाली अधिकाऱ्याचा PA असावा अशा एका दरवाजात घेऊन जाते. वास्तविकरित्या हा अनामिक दरवाजाही लहान वगैरे नाहीये. तिहेरी कमानींची नक्षी धारण केलेला व अगदी सुस्थितीत असलेल्या देवड्या असलेला हा दरवाजा आहे. यावर फार नक्षीकाम नाही. शरभ - व्याल तर सोडाच, साधी कमळंही कोरलेली नाहीत कमानींवर. पण पुराणकाळातील एखाद्या तपस्व्याने “महाकाली दरवाजा पाहण्यासाठी येणाऱ्यांना माझे दर्शन घेतल्याशिवाय जाता येणार नाही” असा वर प्रदीर्घ तप:श्चर्येनंतर मागून घेतलान असावा. त्यामुळे आपल्यालाही आधी इतर दरवाजांच्या तुलनेत साधा वाटणारा हा दरवाजा पार करूनच पुढे जावे लागते. ह्या दरवाजाच्या डावीकडे असलेल्या पराकोटासंबंधी एक घटना इंग्लिश गॅझेटीअर मध्ये नमूद करून ठेवलेली आहे. नरनाळा किल्ल्याचा स्वामी, नरनाळसिंह याला मुस्लीम शासकांनी फितुरीने ठार मारून लोकांना दहशत बसावी म्हणून त्याचा मृतदेह त्यात भुसा भरून इथेच लटकावून ठेवला होता.
ह्या PAचे दार ओलांडल्यावर एखाद्या वाड्यात आल्यासारखेच वाटते. देवड्या म्हणाव्यात तरी किती असाव्यात? जमिनीलगत आपल्याला मांडी घालून बसता येईल इतपत उंचीच्या जागा, वर कमानी, त्यावर चहूबाजूने चौथरा, त्याखाली तळघर आणि कमानीच कमानी. हे बांधकाम हेमाडपंथी आहे. इथे डावीकडे वळल्यावर दिसतो तोच महाकाली दरवाजा. हा दरवाजा आणि भोवतालची रचना यांचे वर्णन नक्की कुठून सुरु करावे ते कळत नाही इतकी अप्रतिम रचना येथे आहे.

महाकाली दरवाजा
या भव्य दरवाजावर नक्षीच नक्षी आहे. दरवाजाला लागून असलेल्या कमानीवर फारसी भाषेत अत्यंत सुबक आणि सुंदर कॅलिग्राफीत मजकूर कोरलेला आहे. आजूबाजूला कमळे आहेत. त्यावरती एक कमळांची माळ असून सर्वात वरती आधीच्याहून अप्रतिम असा आणि लांबच लांब शिलालेख कोरलेला आहे. कमानीच्या खांबांवर कमळं आहेत. कमळं खूप दरवाजांवर असतात पण ह्या दरवाज्यावरची ही कमळं नुसतीच कोरलेली म्हणणं म्हणजे हा त्या कलाकृतीचा आणि घडवणाऱ्या कलाकारांचा अपमानच होता. ही कमळं अक्षरश: घडवलेली आहेत. १३ कमळं आणि तीही सर्व वेगळ्या पद्धतीने कोरलेली. इतरही नक्षीकाम आहेच या दरवाजावर. हा दरवाजा त्यावरच्या नक्षी आणि कमानींपुरता मर्यादित नसून दोन्ही बाजूला अप्रतिम नक्षीकाम कोरलेले झरोकेही आहेत. ह्या गवाक्षांना सौंध म्हटले जाते. या दरवाजाची कमानच १५ फूट (कि १९ फुट?) असून संपूर्ण प्रवेशद्वार भव्य असे तब्बल ३७ फूट आहे. रूंदीच तब्बल ४० फुट आहे. पण हे झाले नुसते आकडे. प्रत्यक्षात ह्या कलाकृतीला “महाकाली” हे नांव चपखल वाटते नाही?
या कलाकृती समूहाला नुसता दरवाजा म्हणणे योग्य ठरणार नाही. कल्पना केली हा कलाकृती-समूह म्हणजे एक दरबार आहे, दरवाजा म्हणजे श्रीमंत छत्रपतींचे स्थान, तिथे समोर सिंहासन आहे, बाजूच्या झरोक्यातून खासे मंडळी इतर दरबारी मंडळींवर लक्ष ठेवून आहेत, आजूबाजूला असलेल्या देवड्या ही तर मंत्रिमंडळाची मानाची स्थाने आहेत. अहाहा... काय दृश्य असू शकेल ते. वा!

महाकाली दरवाजा कलाकृती समूह
पण तो दरबार नव्हता. या वास्तू समूहाला छप्परही नाहीये. का बनवलानी असेल तो अप्रतिम दरवाजा इतर लवाजम्यासह? आणि कोणी बांधलान आहे हा “महाकाली” दरवाजा माहित्ये? फत्तेउल्ल इमाद उलमुल्क! हाच तो ज्याने गाविलगडाचा अप्रतिम असा शार्दुल दरवाजा बांधलाय. हा इमादशाही घराण्याच्या मूळपुरूष, विजयनगर साम्राज्यातील ब्राह्मणाचा मुलगा. पण त्या अप्रतिम कलाकृतीवर दळभद्री लोकांनी आपली नावे रंगाने लिहून आपले संस्कार दाखवले आहेत. त्यातून त्या मजकुरावर चुना लावून दरवाजावरच “GR यहाँ की कोई भी चीज इधर-उधर ना करे वरना कारवानी की जायेगी GR” असा महत्त्वाचा पण पांढऱ्या रंगाने सरकारी मजकूर तितक्याच घाणेरडेपणाने लिहिलेला आहे. त्याकडे आपण दुर्लक्ष करू, आणि कॅलीग्रफित लिहिलेल्या नक्षीदार शिलालेखाचा अनुवाद पाहू:
विजयदिनी सर्वांच्यावर आणि सर्वात श्रेष्ठ असलेल्या परमेश्वराच्या म्हणण्यानुसार जो कोणी या प्रवेशद्वारातून आत प्रवेश करेल, तो सर्व प्रकारच्या भयापासून मुक्त राहील.
त्याखालचा शिलालेख हा मोहम्मद अब्दुल्लाह याने लिहिलेला असून, त्याचा अर्थ:
ईश्वराशिवाय जीवन उणे आहे. अल्लाहशिवाय दुसरा कोणताही ईश्वर नाही. आणि मोहम्मद हा त्याचा प्रेषित आहे. या जगावर राज्य करणारा ईश्वर, त्याची कृपादृष्टी, त्याचेवर आणि सर्व प्रेषित तसेच धर्माच्या हितचिंतकांवर ठेवो, खऱ्या धर्मोपदेशकावर जे मुस्लीम आहे, ज्यांचा इस्लाम व खुदावर विश्वास आहे असा अबूबकर, ओमर, उस्मान, देवांचा विश्वासू अली, हसन, उल, रजा, उसेन आणि करबला इथे शहीद झालेले सर्व आणि आमच्या अब्बास आणि ते सर्व जे प्रेषिताच्या मदिना प्रवासात प्रेषिताच्या सोबत होती, ते सर्व ज्यांनी त्यास मदत केली अश्या सर्वांवर ईश्वराची मेहेरनजर आहे व ईश्वर या सर्वांचा स्वीकार करो.
या खालील शिलालेख कमालजंग यांने लिहिलेला असून, त्याचा अर्थ:
सर्वात श्रेष्ठ असलेल्या बहामनी सुलतान, गाझी शहाबुद्दीनिया, महमूदशहा, मोहमदशहा, हुमाहूनशहा, अहमदशहा, मोहमदशहाच्या कारकिर्दीला, साम्राज्याला, न्यायदानाला, चिरस्थायी करो.
(भाषांतर संदर्भ: माधव देशमुख)
दरवाजातून पलिकडे गेल्यावर उजव्या बाजूला काही इमारती, वर जाण्यासाठी जिने, एक भग्न दगडी रांजण, असे अवशेष दिसतात. डाव्या हाताने पुढे गेल्यावर दोन घुमटाकृती कबरी दिसतात. ज्या आम्ही फक्त आमच्याकडच्या नकाशात आणि भगवान चीलेंनी लिहिलेल्या वर्णनात बघितल्या. प्रत्यक्षात त्या गाइडने आम्हाला गंडवलेन आणि त्या बघायला मिळाल्या नाहीत.

खुनी बुरुज
परत फिरून महाकाली दरवाजाने गाडी जवळ आलो. थोड्याच अंतरावर एक पायवाट डावीकडे एका बुरुजाकडे होऊन जाते. हा बुरुजही मोठा असून त्याला किमान आठ कमानी आहेत. दोन्ही बाजूने बुरुजावर जायला जिने आहेत तर वरचा भाग ढासळला आहे. त्या वर घेऊन जाणाऱ्या पायर्‍यांच्या वरतीच दोन्ही बाजूला शरभ व चांद-तारा कोरलेला आहे. बुरुजाच्या कमानीतही एक चोरदरवाजा, एका कमानीत तीन-तीन झरोके, असा अवशेषांच्या खजिनाच आहे. हाच तो भयावह “खुनी बुरुज”, येथूनच गुन्हेगारांना शिक्षा म्हणून कडेलोट करून खून केला जात असे.

तोफा

अकोट दरवाजा
गवत बाजूला करत थोडं पुढे गेल्यावर नव्याने चौथरे बांधून ठेवलेल्या दोन तोफा दिसतात. अजस्त्रच आहेत. अजूनही पुढे एकाकी पडलेल्या अवस्थेत एक दरवाजा दिसतो. हा अकोट दरवाजा. याची बरीच पडझड झालेली असून भेगाही पडलेल्या आहेत. पुढे झाडे वाढलेली असून वाट कुठेतरी खाली जाताना दिसते. याच्या छपराला गेलेल्या मोठ्या भेगा तो कधीही पडेल असे अजून ओरडून सांगतात.
आपण पाहिलेला भाग हा गडाचा एक दशांश भाग आहे असे म्हणता येईल. नकाशा पाहिल्यास या गडावर प्रचंड अवशेष असून आपण फक्त चार महत्त्वाचे दरवाजे आणि तटबंदी राहिल्याचे लक्षात येते. या गडाचे सर्व पर्यटक भेट देणारे अवशेष म्हणजे महाकाली दरवाजा, शक्कर तलाव आणि त्याच्या आजूबाजूचे अवशेष.

इतर अवशेष
आम्हाला आमच्याकडच्या नकाशाच असलेले सगळे अवशेष बघायचे होते. आम्ही इतर अवशेष बघायला निघालो. गाईड म्हणत होता तिकडे आम्ही जात होतो. पुढे एक तलाव बघितला, कदाचित तो “चंद्रावती तलाव” असावा. पुढे एक वास्तूही पाहिली, पण ती नक्की कोणती वस्तू हे सांगणे कठीण आहे. कदाचित तोफेचा कारखाना असावा किंवा शिरपूर (कि दिल्ली?) दरवाजाचा काही भाग तर नसावा? वनखात्याने खूप अवशेष गाडीतून उतरण्यास मनाई असे ठेवलेले आहेत. आम्ही गाईड सांगेल तिथेच उतरून पाहत होतो. नियम न तोडता येथे जाणे शक्य आहे ते सगळे भाग मात्र दाखव हे वारंवार त्याला सांगत होतो.

पाणवठा आणि चाटण
एक तर ते जंगलच, त्यात खूप अवशेष झाडीत लुप्त झालेले असल्याने आम्ही नक्की काय काय बघितले ते नावानिशी सांगणे कठीण आहे. पण अनेक चौथरे, पडक्या वास्तू, बुरुज जमेल तसे पाहत होतो. कधी उतरून तर कधी चालत्या गाडीतून फोटो काढत होतो. जागोजागी वन्यप्राण्यांसाठी ठेवलेले पाणवठे होते, खास त्यांना येण्यासाठी केलेले चाटण बघितले. इथूनच पुढे असणारा जाफराबाद किल्ला Core भागात असल्याने तिथे जायला पूर्णतः बंदी आहे. लांबूनच त्याची दिसणारी तटबंदी आम्ही बघितली. पण आमचीच घाई आणि गाईडची अनास्था याच्यामुळे त्याचा फोटोही आम्हाला घेता आला नाही. ती चुटपुट मात्र लागून राहिली.

नौगज तोफ

शक्कर तलाव
जे नशिबात होते तेवढेच अवशेष बघून पॉप्युलर अशा शक्कर तलावापाशी आलो. वाटेत नौगज तोफ बघायला मिळते. ही तोफ अप्रतिम असून नतद्रष्ट लोकांनी त्यात दगड भरून ठेवले आहेत. तोफेच्या तोंडातून मी आंत जाऊ शकेन एवढे तिचे तोंड आहे. नंतर फॉरेस्ट डिपार्टमेंटचे गेस्ट हाऊसही लागते. त्यापुढे शक्कर तलाव. तिथे आजूबाजूला खूप अवशेष पाहण्यासारखे आहेत. घोड्यांच्या पागा, गजशाळा, मशीद, भुयार, राणीमहाल असे बरेच काही या तलावाच्या जवळ असून हा भाग धार्मिक स्थान असल्याने इथे गाडीतून उतरून फिरण्यास परवानगी आहे. हा तलाव खूप मोठा आहे. आजूबाजूच्या कातळात चर खोदून पावसाचे सर्व पाणी तलावात येण्याची सोय केलेली आहे. हे जवळपास रेन वॉटर हार्वेस्टिंग सारखेच आहे

अंबर महाल
आम्ही प्रथम आजूबाजूचे अवशेष पाहिले त्यात अंबरमहाल ही वास्तू शक्कर तलावाच्या उजव्या बाजूस आहे. यास राणीमहाल म्हणूनही ओळखतात. झरोके असलेल्या तीन कमानी याला असून, समोरील पटांगणात एक पाण्याचे कुंड देखील आहे. ते कारंजे असावे. वास्तूच्या आतील बाजूने वरती सुंदर घुमट असून सर्वत्र नक्षीकाम आहे. पूर्वीच्या काळी त्यावर असलेल्या निळ्या रंगाचा लेप आता काहीच ठिकाणी शिल्लक राहिलेला आहे.

मशीद
       याच्या उजवीकडे एक मशीद असून ती अष्टकोनी खांबांवर तोललेली आहे. याला ३ कमानी आणि एक घुमट आहे. मशिदीचा आतील भाग अत्यंत कलाकुसरीने कोरलेला आहे. समोर एक पाण्याचं टाकंही आहे.

तेल-तुपाचे टाके
पुढे तेल-तूपाचे टाके आहे. तीन भाग असलेलं ते मोठं टाकं असून त्यावर तीन कमानी आहेत. त्यामुळे ही वस्तू लांबूनच ओळखता येते. सध्या त्या टाक्यावर लोखंडी जाळ्या लावलेल्या आहेत. याची रचना ही तेल-तूप साठवण्यासाठी नसून धान्य साठवण्यासाठी केल्यासारखी दिसते. इथल्याच एका वाड्याचे अवशेष पाहताना आमची चाहूल लागून त्यात असलेली हरणं आमच्या समोरच पळाली. तिथेच अस्वलाची विष्ठाही दिसली. तरी या भागात वावरताना काळजी घ्यावी.

कुत्तरदेवाचे ठिकाण
मागे फिरून शक्कर तलाव पाहिला. इथे “कुत्तरदेवाचे” ठिकाण आहे. विचित्र नांव असलेलं हे ठिकाण खरंतर बुर्‍हानुद्दीन पीराचे थडगे आहे. त्यावर शिलालेखही कोरलेला आहे. पिसाळलेला कुत्रा, कोल्हा किंवा उंदीर चावल्यास स्थानिक लोक डॉक्टरांकडे न नेता त्याला इथे घेऊन येतात. शक्कर तलावाचे पवित्र पाणी पिऊन या पिराच्या ठाण्याशी काही विधी केल्यावर तो बरा होतो अशी त्यांची श्रद्धा आहे. त्यामुळेच त्याला “कुत्तरदेव” असे म्हणतात.

घोड्यांची पागा

गजशाळा
       शक्कर तलावाच्या एका बाजूला घोड्यांची पागा आहे तर येथे जवळच पैलवान बाबा शाह दर्गा आहे. या पागेच्या साधारण मागील बाजूस गजशाळा आहे. ह्यातील बराचसा भाग बुजून गेला आहे.
हा शक्कर तलाव, त्याच्या जवळची पाणी जाण्याची व्यवस्था, दरवाजे सगळे अभ्यासपूर्ण आहे. काही अवशेष जवळून तर काही लांबूनच बघून झाले.

तटबंदी
तटबंदी

जशी जमेल तशी गडफेरी झाली होती. नक्की कुठून आणि कसे वर्णन करावे असे समजू नयेत इतके आणि असे अनेक अवशेष आम्ही लांबून पाहिले. खूपशी तटबंदी, लपलेले काही दरवाजे, बुरुज पाहिले. गडफेरी पूर्ण झाली असं नक्कीच म्हणणार नाही, कारण एक तर हा किल्ला तब्बल ३९२ एकर मध्ये पसरलेला अजस्त्र किल्ला आहे याची तटबंदी साधारण २४ किलोमीटर आहे. संपूर्ण जाफराबाद किल्ला, तेलीया बुरुज आणि तेलीयागड Core area declare करून पूर्णपणे बंद करण्यात आलेला आहे. खूप अवशेष फिरण्यास बंदी आहे, काही अवशेष गाईड दाखवत नाही. खुपसे अवशेष झाडीत लपल्याने दिसत नाहीत. त्यातून वेळेचे बंधन. अशा परिस्थितीत हा किल्ला धावत-पळत बघावा लागतो. त्यामुळे जमेल तसा आणि नशिबात असेल तेवढाच हा किल्ला पाहून होतो.

तेलीया बुरुज आणि तेलीया गड
पाच वाजून गेले होते. गाईडने हात कधीच वर केले होतेन. किल्ला तसा थोडा घाईतच बघितल्याने वेळ शिल्लक होता. आता मात्र उरलेला वेळ वसूल करायचाच असं ठरवून टाकलं. एक watch tower बांधलेला होता, तिथून तेलिया बुरुज आणि तेलीयागड व्यवस्थित दिसत होता. आम्ही निवांत बसून तेलीयाच्या बाजूला मावळतीचा सूर्य बघत थांबलो. अगदी पावणे सहा होऊन गेले. मुळात आम्ही जंगलात होतो, त्यात त्याच्या उजव्या बाजूला अतिशय दाट जंगल, तिकडून काही आवाज यायला लागले होते. आमच्या जवळच्या watch tower जवळच तयार केलेल्या एक पाणवठा होता, जो वन्य प्राण्यांना बोलावतही असावा. वेळ संध्याकाळची असल्याने तिथे थांबायचा कितीही मोह होत असला तरी तो आवरता घेतला. आम्ही प्राण्यांच्या गल्लीत होतो, त्यांचा वेळ त्यांना द्यायला पाहिजे होता. नाहीतर धोका होता.... आम्हाला!
गाडीत बसलो. योग्य ती बिदागी देऊन त्या गाईडसह नरनाळ्याचा निरोप घेतला. निरोप घेतला तो मेळघाटचा... पाहिलेल्या अवशेषांचे फोटो, जमलेल्या आठवणी, तेलीयामागचा तो निवांत सूर्यास्त आणि जाफराबादची चुटपूट घेऊनच... परत निवांत येण्याचे मनात ठरवूनच!
अरे हो... अजून दुसऱ्या दिवशी शिल्लक होता की, वारीचा भैरवगड आणि मैलगड!


सुखद आठवणींशिवाय काही नेऊ नका... आणि पाऊलखुणांशिवाय काही ठेऊ नका... !!!

Sunday, July 21, 2019

वैदर्भीय भटकंती – किल्ले जिल्पी आमनेर


जिल्पी आमनेर
मेळघाटाच्या त्या घनदाट गर्द जंगलातली सेमाडोह, मांगिया, हरिसल अशी गावं ओलांडून मध्यप्रदेशकडे जाणाऱ्या रस्त्यावरच्या धारणी गावात पोचलो. रहायची सोय झाल्याने तंबू बाहेर पडलेच नाहीत.
लवकर उठून धारणेतून मध्यप्रदेशकडे जाणाऱ्या रस्त्यावरून प्रवास सुरू झाला. हा रस्ता बुऱ्हाणपूर आणि खंडवा या मध्यप्रदेशातल्या शहरांकडे जाणारा सामायिक रस्ता आहे. धारणेतून साधारण १३ किलोमीटर गेल्यावर भोकरबर्डी हे महाराष्ट्रातील सीमा लगतचे गाव आहे. इथून उजवीकडे जाणारा रस्ता साधारण दोन अडीच किलोमीटर नंतर शेतातल्या वाटेने (उजवीकडची बाजू धरून गेल्यावर) तापी नदीपात्रातच घेऊन जातो. हा रस्ता गुगल मॅप मध्ये पूर्णपणे दिसत नाही. आपण उभा असलेला महाराष्ट्र आणि समोर दिसणारा मध्यप्रदेश, यांची सीमारेषा अशीही तापी नदी आहे. डिसेंबर महिना असल्याने नदीचे पात्र बर्‍यापैकी रिकामे होते. अक्षरशः नदीच्या पात्रातच आम्ही उभे होतो. उजवीकडे एका टेकाडावर उभा होता “जिल्पी आमनेर”.

उगवत्या आणि मावळत्या चंद्र-सूर्यबिंबांचा खेळ

हा इंग्रजी वाटावं असं नाव धारण केलेला किल्ला अतिशय म्हणजे अतिशयच सुंदर ठिकाणी उभा आहे. एका बाजूने वाहणारी तापी सारखी मोठी नदी, तर दुसऱ्या बाजूने तिला येऊन मिळणारी गडगा नदी. अगदी दोन्ही नद्या दोन बाजूनी जिथे येऊन एकमेकींच्या खांद्यावर सहज हात टाकून गप्पा मारत पुढे जाव्यात अशा देखण्या संगमाच्या जणू नाक्यावर हा किल्ला त्यांना निरखत उभा आहे. हा किल्ला जवळपास असलेल्या झिल्पी आणि आमनेर या गावांच्या नावावरून पडलेले नाव धारण करून आहे. याला “हासिर”चा किल्ला म्हणुनही ओळखले जाते. नुकतेच सकाळचे सात वाजून गेले होते त्यामुळे गडगा नदीच्या दिशेकडून वर येणारा लालबुंद सूर्य त्या संगमाचे विलोभनीय दृश्य आणखीनच सुशोभित करत होता. तर तापी नदीच्या पात्रापलीकडे मध्यप्रदेश भूमीवर मावळता पांढरा शुभ्र चंद्र जणू उगवत्या सूर्याला “चला आता माझी ड्युटी संपली, तुझे काम सुरु” असे म्हणत निरोप घेत होता. त्या देखाव्याला जसंच्या तसं बंद करून ठेवणं काही माझ्या कॅमेर्‍याला जमलं नाही.



नदीपात्रातल्या रंगछटा
वेळ इतकी मस्त होती की गडगा नदीचं बहुतांशी कोरडं असलेलं पात्र, तरीही अगदी झुळूझुळू म्हणावं असं थोडसं वाहतं पाणी, उगवतं सूर्यबिंब पात्रातल्या दगडांचे एकेक रंग उलगडून दाखवत होतं. किल्ला याच पायावर उभा असल्याने किल्ल्यालाच त्या रंगछटा जणू लाभलेल्या होत्या.

गडगा नदीपात्र आणि किल्ला

सुंदर बांधकाम असलेला पण भग्न बुरुज
नदीपात्र ओलांडताना किल्ल्याच्या बुरुजावर पडलेले प्रकाश-किरण त्या वास्तूचे सौंदर्य दाखवत होते. पूर्वेकडील असलेला बुरुज प्रथमदर्शनी जरी पूर्ण दिसत असला तरी त्याकडे जाणाऱ्या वाटेने गेल्यावर पलीकडच्या बाजूने तो भग्न झालेला दिसतो. किल्ल्यावर जाणारी वाट याच बाजूने जाते. वाट मळलेली आहे परंतु किल्ल्याची ही मूळ वाट नाही. तटबंदीच्या तुटलेल्या भागातून ही वाट किल्ल्यात जाते. हा टप्पा थोडा निसरडा आहे, पण इथे असलेल्या झुडपांचा उपयोग आधारासाठी नक्की होतो. तटबंदी संपूर्णपणे बाहेरून झुडपांनी वेढलेली आहे. ज्या त्या बांधकामास नक्कीच धोकादायक आहेत. तटबंदीतून आत शिरल्यावर आकाराने लहान असलेल्या किल्ल्याचे संपूर्ण आवारच आपल्या दृष्टीक्षेपात येते. या भागातल्या इतर किल्ल्यांप्रमाणे याचेही बांधकाम भाजीव विटांमध्ये केलेले आहे.

हनुमान मंदिर

इंग्रजांनी केलेल्या “किल्ले विध्वंस” उपक्रमांतर्गत याही किल्ल्याचे नुकसान करण्यात आलेले आहे. शिल्लक तटबंदी वगळता मध्यभागी एक हनुमान मंदिर सोडल्यास काहीच अवशेष दिसत नसल्याने प्रदक्षिणा मार्गाने त्या तटबंदीवरुन फेरी चालू केली. प्रथम बाहेरून भक्कम दिसणाऱ्या परंतु दुर्दैवी भग्न अशा पूर्वेकडील बुरुजावर आलो. बुरुजाला पडलेल्या भेगेतून सूर्योदय कॅमेरात टिपण्याचा अयशस्वी प्रयत्न करून गडगा नदीला समांतर पण ढासळलेल्या तटबंदी वरून संगमाच्या कोपऱ्याकडच्या बुरूजाकडे तटबंदी वरूनच निघालो.

तटबंदी आणि काही अवशेष

या बुरुजाच्या अगदी जवळची तटबंदीची भिंत बऱ्यापैकी तुटलेली आहे पण आतील बाजूस चांगलीच झाडी असल्याने सांभाळून ह्यावरूनच बुरुजावर पोहोचावे. किल्ल्याचा हा बुरुज म्हणजे खास तयार केलेला जणू “संगम View Point”च! बुरुजावर तंबू टाकावा अशी प्रशस्त जागा असून तिथे वेगवेगळ्या कोनातून स्वतःचे आणि बुरुजाचेही फोटो घ्यायचे टाळू नये. तापी नदीला थोडे पाणी असले तरी गडगा नदी बहुतांशी कोरडीच होती. तरीही हे संगम दृश्य अप्रतिम होते. पावसाळ्यात दोन्ही नद्या दुथडी भरून वाहत असताना काय बहार येत असेल... वा! गडावर राबता असताना ह्या बुरुजावरची पहारेकरी मिळवण्यासाठी वशिले तर लावले जात नसतील?  असो...

तटबंदी आणि अवशेष
“संगम View” बुरुजाच्या बाहेरून दिसणाऱ्या पाकळ्या
अगदी मनसोक्त फोटो घेऊन तटबंदीवरुन निघालो. काही भागात तटबंदीच्या चर्या, जंग्या आणि झरोके शाबूत आहेत. मध्ये मध्ये काही खोलीला केलेले कोनाडे असावेत अशी रचनाही दिसते. पुढच्या बुरुजाकडे जाताना तटबंदीच्या आतील बाजूस खाली वाटेत एक दरवाजा आणि एक वाटही दिसली. इथून तापी नदीकडच्या बाजूला उतरता येते. परंतु झाडी खूप असल्याने पलीकडे गेलो नाही. बाहेर डोकावून “संगम View” बुरुजाकडे बघितल्यावर त्याच्या पाकळ्याही दिसतात. हा बुरुज अचलपूर किल्ल्याच्या बुरूजाप्रमाणे प्रमाणे किमान तीन-चार पाकळी बुरूज असावा. त्याच्या दोनच पाकळ्या शिल्लक राहिलेल्या दिसतात. पुन्हा आत येऊन तटबंदी पाहताना चर्या, झरोके उत्तम दिसतात. पुढच्या सर्व बुरुजांच्या खालच्या भागात दरवाजे दिसतात जे बहुतेक पूर्णपणे बुजत आलेले आहेत.

समोर तापी नदी आणि पलीकडे मध्यप्रदेश
ऊन खात असलेले पाणपक्षी
ह्या तटबंदीवरून समोर तापी नदी, पलीकडे मध्यप्रदेशची भूमी असे सुंदर दृश्य दिसते. पुढे तटबंदी जोडलेली नसल्याने खाली उतरून उरलेल्या भागाकडे जायचे होते. त्या झाडीतुन वाट काढताना शेंदूर फासलेले हनुमानाचे मंदिर दिसले. जवळील आतील भागात एक भुयार किंवा तळघर आहे, पण ते सुस्थितीत नसल्याने त्यात शिरायचा प्रयत्न करणे धोकादायक आहे.

तळघर/भुयार
या किल्ल्याला सुस्थितीत असलेले, ढासळलेले काही, तर पूर्णपणे नष्ट झालेला एक, असे धरून सात बुरुज आहेत. बहुतांशी वास्तू, बुरुज नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. तर शिल्लक असलेली तटबंदीचा भाग कधी कोसळेल ते सांगता येणार नाही. हा छोटेखानी किल्ला हे सात बुरूज, जंग्या-चर्या युक्त तटबंदी, एके ठिकाणी फांजीवर लहानसा पाण्याचा हौद, तळघर, मंदिर असे अवशेष बाळगून आहे.
आमची गडफेरी पूर्ण झाली होती. उतरताना लक्षात आले की इथे खाजकुयलीचे वेलही आहेत. उतरताना आधार म्हणून झुडपे धरताना योग्य ती काळजी घ्यावी.
भगवान चिले यांनी त्यांच्या पुस्तकात उल्लेख केलेला आहे “गाईड चिखलदा” या नेल्सन संपादित १९२ सालच्या पुस्तकाचा. त्या पुस्तकात या किल्ल्याचा “झिल्पी आमनेर” या नावासकट उल्लेख आहे, तर १५७२ च्या सुमारास असलेला “आमनेर चर्वी” अशा नावाचा उल्लेखही ते उद्धृत करतात. इंग्रजांनी किल्ल्याच्या विध्वंसक कामासाठी १३८२ रुपये आणि ३ आणे खर्च केल्याचा उल्लेखही त्यांनी केला आहे. इतरत्र मिळालेल्या माहितीनुसार १७२७ ला पहिले बाजीराव, तर १८१८ ला दुसरे बाजीराव यांचा या किल्ल्याच्या आसपास येऊन गेल्याचा उल्लेख आढळतो. किल्ले विध्वंसाच्या वेळी या किल्ल्यातील चार तोफा इंग्रजांनी नेलेल्याही लिहिलेले सापडते.
उतरल्यावर नदीच्या पात्रात पुन्हा फोटोग्राफी केली. परतताना वाटेवर डाव्या बाजूला असलेले एक पुरातन हनुमानाचे मंदिर आहे तेही पाहिले. पुढचा टप्पा होता या भटकंतीचा “Most Awaited ” किल्ला, दुर्ग चक्रवर्ती किल्ले नरनाळा!!!

सुखद आठवणींशिवाय काही नेऊ नका... आणि पाऊलखुणांशिवाय काही ठेऊ नका... !!!