Sunday, September 21, 2025

दुर्ग रायाकोत्ताई (तामिळनाडू)

दुर्ग रायाकोत्ताई

आमच्या तामिळनाडू मोहिमेतला भेट दिलेला हा पहिला दुर्ग. साजरा–गोजरामुळे लिहिण्यासाठी म्हणून हा थोडा बाजूला ठेवला गेला. कारण, या गडाचे कर्ते मराठा साम्राज्यपैकी कोणीही नाहीत.

झुकझुक गाडीने सकाळी बंगलोरला पोचलो आणि आमची प्रवासाची साथीदार बदलली. इथून आमचा पूर्ण प्रवास इनोव्हाने होणार होता. बंगलोरवरून तामिळनाडूमध्ये शिरल्यावर आमच्या नियोजनात "रायाकोत्ताई" हा पाहिला दुर्ग होता.

गडदर्शन

साधारण पाऊणच्या सुमारास या गडाचं दर्शन झालं. बंगलोरपासून अवघ्या ७० किलोमीटरच्या आसपास असेल हा, पण तो तामिळनाडूच्या हद्दीत येतो.

सुरुवात - पायरी मार्ग

गाडी गडाच्या पायथ्याला जाते. रस्त्यावरून गाडीतूनच ह्याचा पहिला फोटो घेतला आणि बरोबर आठव्या मिनिटाला गडाच्या अक्षरशः पायरीवर होतो आम्ही. सह्याद्रीतून कर्नाटकच्या खालच्या भागात आलो की भौगोलिक स्थितीत आणि निसर्गात जो बदल होतो, तो अपेक्षित होता. तसेच मोठमोठाले पांढरे खडक, भल्या मोठ्या शिळा, खुरटी झुडपं.

पहिला दरवाजा

पांढऱ्या दगडांच्या पायऱ्यांवरूनच आणि त्या संपल्यावरसुद्धा अशाच प्रकारच्या दगडांवरून अवघ्या पाच मिनिटांत पहिल्या दरवाज्यात पोचलो सुद्धा.

हे बांधकाम अति पुरातन नसणार हे उघड होतं. बहुतांशी इंग्रजांच्या काळातलीच असण्याची शक्यता जास्त होती. कदाचित त्यानंतरही डागडुजी केली गेली असेल, पण आता तेही भग्न झालेलं होतं. दरवाजा जरी लागला असला तरी गडाचे महत्वाचे अवशेष सगळे वरतीच आहेत आणि तिथे पोचायला अजून वेळ लागणार होताच.

गुहा मंदिर

डावीकडे एके ठिकाणी खडकांना पांढरा रंग लावलेला दिसला. विजेचा खांबही त्याला खेटून होता. खडकांवरच्या चिन्हांवरून तिथे मंदिर असणार हे स्पष्ट होतं. खडकाची नैसर्गिक रचना, त्याचा आधार घेऊन केलेले बांधकाम – अश्या मिश्र बांधणीत हे शिवमंदिर आहे. शिवपिंडी आणि त्याच्या दोन्ही बाजूला दोन मूर्ती, समोर नंदी, बाजूलाच एक पिण्याच्या पाण्याचं सुंदर टाकं, थोडं जवळ एक तुळशीवृंदावन – असं सुंदर स्वरूप या मंदिराचं आहे.

मुख्य दरवाजा मार्ग

वाट स्पष्ट होती. मोठाल्या खडकांजवळून, नैसर्गिक गुहांजवळून वरवर जाताना थोड्याच वेळात गडाचा मुख्य दरवाजा दिसला. म्हणजे प्रत्यक्षात दरवाजा जरी दिसला नसला, तरी वाटेवरचं दिसणारं सर्व बांधकाम आणि समोर दिसणारी रचना, हे पुढे दरवाजाच असणार आणि तोही मुख्य, हे स्पष्ट करत होतं.

उजवीकडे असलेली सिमेंटची भिंत सांगत होती की, ह्या भागाचा जिर्णोद्धार अगदी नवथर पण करण्यात आलेला आहे. अर्थात, तीही एका ठराविक लांबी नंतर पूर्णपणे तुटून गेलेली आहे (किंवा तेवढीच बांधली असावी). डाव्या बाजूला असलेल्या मोठ्या खडकाखाली मिळालेल्या नैसर्गिक जागेत मस्त खोली बांधून त्याचा वापर केलेला होता.

सह्याद्री आणि इथला असलेला फरक दरवाज्याच्या बांधणीतपण दिसला. सुरक्षिततेच्या दृष्टीने गोमुखी दरवाजा बांधायला जागा नसली, तरी उपलब्ध भागावर वेगळ्याच पद्धतीची रचना इथे केलेली आहे. खडकांचा उपयोग करून मस्त निमुळता दिसणारा बुरुज आहे.

दरवाजा

दरवाजा अनेक वेळा पुनर्बांधणीतून गेला असेल, आणि त्यात सध्याच्या कमानीवर बरोबर मध्ये "1797" असे स्पष्ट दिसतं. म्हणजे ही कमान १७९७ ह्या वर्षी बांधण्यात आलेली आहे. अर्थातच मूळ नव्हे, तर ही पुनर्बांधणी असणार आणि म्हणजे इंग्रजांकडून याची डागडुजी झालेली आहे.

थोडं इतिहासात डोकावायला गेलं की हे कळतं की, टिपू सुलतानकडून इंग्रजांनी हा गड जिंकून घेतला, त्यानंतर हा दरवाजा पुन्हा बांधलेला आहे. आता शेजारचं बांधकाम जुनं, मग मूळ दरवाजा कुठे गेला? गंमत म्हणजे, १७९१ मध्ये तिसरं अँग्लो–म्हैसूर युद्ध जेव्हा झालं, तेव्हा ह्या बारामहाल प्रदेशात इंग्रजांनी जनरल मिडोजच्या नेतृत्वाखाली या गडावर हल्ला केला. त्यावेळी बहुतेक कोलोनेल मॅक्सवेल हा तुकडी प्रमुख होता. त्यानेच तोफेने हा दरवाजा उडवला होता गड जिंकण्यासाठी आणि मग नंतर गड ताब्यात आल्यानंतर निवांत १७९७ मध्ये त्याची पुनर्बांधणी सुद्धा केलीन.

दगडाखाली खोली

दरवाजामागे गेल्यावर दगडांमध्ये खोल्या दिसल्या. भिंती शाबूत असल्या तरी छत गायब झालेलं आहे. सगळं बांधकाम विटांचं आहे. स्पष्ट असलेल्या वाटेवरून पुढे जाताना परत एका प्रचंड शिळेखाली बांधलेली खोली दिसली. अशाच काही इमारती बघत थोड्या उंचवट्यावर पोचलो. इथेही काही वास्तू होत्या.

टेहळणीसाठी ह्या जागेचा उपयोग केला जात असावा आणि त्यावेळी पहारेकऱ्यांच्या विसाव्याची किंवा राहण्याची ही जागा असावी. जवळच, छत गोलाकार असलेली इमारत आहे, हे दारूगोळा कोठार असावं. हे सर्व बांधकाम इंग्रजांची बांधकामशैली दर्शवत होतं.

दारुगोळा कोठार आणि मागे सर्वोच्च स्थान

ह्या इमारतीपलीकडे, खरंतर अलीकडे, कारण ह्याच बाजूने इथे पोचलो होतो, गडाचं सर्वोच्च ठिकाण दिसलं. जवळच्या इमारती पाहून तिकडे निघालो.

खडकात पायऱ्या

सगळीकडे बांधकाम केलंच पाहिजे असं नाही. नैसर्गिक घटकांचा उपयोग करून अनावश्यक बांधकाम टाळता येतं आणि वेळही वाचवता येतो, हे गडबांधणीत कायमच दिसून येतं. इथेही या सर्वोच्च ठिकाणाकडे जाताना खडकातल्या कोरलेल्या ह्या सुंदर पायऱ्या दिसल्या.

सर्वोच्च स्थान आणि देवस्थान

वरून गडावरील वास्तू - दारूगोळा कोठार वगैरे

सर्वोच्च ठिकाणी हे देवस्थान आहे. बाकी कोणत्याही वास्तू इथे सध्या नाहीत. इथून गडाचा बराच भाग दिसला. मगाशी जिथून आलो ते दारूगोळा कोठारही मागे दिसलं. फोटोत अंतर वेगळं भासतं का? गंमत म्हणजे, त्या ठिकाणाहून इथे वरती यायला फक्त सात ते आठ मिनिटे लागली होती – ती सुद्धा फोटो काढत! अंतरच कमी होतं की अंतर बऱ्यापैकी असूनही फक्त सर्वोच्च ठिकाणावर यायच्या ओढीने आम्ही वेगाने पावलं टाकली होती? काय माहिती!

हनुमान

आता आल्या वाटेने झपझप खाली निघालो. कारण सगळ्या वास्तू पाहतच वर आलो होतो, त्यामुळे बघण्यासाठी आता तसं काही शिल्लक राहिलं नव्हतं. पण तरीही खाली येताना एका बाजूला राहून गेलेल्या मारुतीरायांनी उतरताना अगदी बोलावूनच दर्शन दिलंनी.

मारुती"राया"वरून एक गोष्ट आठवली, जी खरंतर सुरुवातीलाच यायला पाहिजे होती, ती म्हणजे या गडाचं नांव आणि अर्थ. त्यासाठी अतिशय थोडक्यात या गडाचा इतिहास नजरेखालून घालू.

या गडाचा सगळ्यात पहिला उल्लेख असलेला कालखंड म्हणजेच १४वे ते १६वे शतक. विजयनगर साम्राज्यात याची बांधणी कृष्णदेवराय किंवा अच्युतदेवराय यांच्याकडून झाली. नंतर १७व्या शतकात स्थानिक नायकांकडे हा गड होता. नंतर मराठा साम्राज्यातही हा गड व्यंकोजी राजे/एकोजी राजे यांच्याकडे होता. त्यानंतर हैदर अली, मग टिपू सुलतान, आणि नंतर इंग्रजांकडे पोचला.

इतिहासात डोकावायचं कारण म्हणजे ह्या गडाचं तग धरून राहिलेलं नांव. "राया" म्हणजे राजा आणि "कोत्ताई" म्हणजे दुर्ग. रायाकोत्ताई – म्हणजेच राजांचा दुर्ग. सगळ्या राजवटींतून इंग्रजांपर्यंत पोचूनही तो रायाकोत्ताईच राहिला.

तामिळ प्रदेशातल्या या भटकंतीची सुरुवात ह्या विजयनगर साम्राज्याच्या राजांच्या दुर्गाने झाली. पुढे प्रवास वेल्लोरकडे होणार होता. पण वाटेत अजून एक गड बघणार होतो.. कृष्णगिरी!

सुखद आठवणींशिवाय काही नेऊ नका... आणि पाऊलखुणांशिवाय काही ठेऊ नका!!!

Wednesday, August 13, 2025

दुर्ग गोजरा आणि मूर्तजा (तामिळनाडू)

दुर्ग गोजरा

दुर्ग साजरा वर लेख लिहिल्यावर दुर्ग गोजरा बद्दल लिहिणे म्हणजे जणू शास्त्र असतं ते. तसंही काही मित्रांनी आधीच सांगून टाकलंनी होतंच आधी. त्यामुळे पर्यायही नव्हता. तसं हल्ली २० सेकंदाच्या इन्स्टा व्हिडिओच्या काळात वाचणारेही लोक आहेत पण म्हणजे. मग, "नेक काम मे देरी किस बात की?" पण काय आहे, कामाच्या रगड्यातून वेळ शोधून काढून लिहीणे को वेळ तो लगताहीच है ना...

असो, तर साजऱ्यावरून खाली आल्यावर बहुतेक चेपून इडल्या हाणल्या असतीलच. तसं आठवत नाही म्हणा, पण तेही शास्त्रच असंत की!

गोजरा हा गडही पेस्तन काकांच्या भाषेत "साला हंड्रेड परसेंट मराठी"! म्हणजे हाही किल्ला महाराजांनीच बांधून घेतला होता, साजऱ्या बरोबरच. पण साजऱ्याच्या तुलनेत हा दुर्ग लहान. आणि याचा जोडीदार दुर्ग मूर्तजा, म्हणजे प्रवीण पाटील यांनी मराठीत "धर्मांतर" केलेला लाजरा, म्हणजे हा लाजून बसलेला आहे गोजऱ्याच्या बाजूला ना.. आणि हाही लहानच.

अर्थात, हे दुर्ग बांधण्याचा उद्देश, हा वेल्लोरचा कोट घेण्यासाठी रचलेल्या व्यूहाचा एक भाग होता. त्यामुळे उद्देशाला पुरेसा असा हा दुर्ग बांधलेला असणार. मोठा राबता असावा किंवा वस्ती वसवावी हा मूळ उद्देशच नसल्याने, दुर्ग बांधणी ही उद्देशाला साजेशीच लहान धाटणीची आहे.

दुर्ग गोजरा दर्शन

पोटपूजेनंतर वाटेला लागलो, तेव्हा अकरा वाजून गेले होते. गावातून दिसणारी टेकडी आणि त्यावर मोठ्या-मोठ्या दगडी शिळ्या दिसल्या. त्यावरून काही बांधकाम डोकावत होतं. सापडेल तशा वाटेने वर पोचायचे होते. तसं या किल्ल्यांवर बऱ्यापैकी लोक येतात, साजऱ्याच्या तुलनेत. त्यातून इथे जंगलही नाही, त्यामुळे फार प्रश्न येणार नव्हताच.

टेकडी चढायला सुरुवात केल्यावर कार्तिक स्वामी मंदिर लागतं, इथून डावीकडे वाट वरती जाते. आम्हाला दगडांवर काही ठिकाणी बाण दिसले. योग्य वाटेवर आहोत याची खात्री करत निवांत चढाई चालू होती. टेकडी तशी उघडी-बोडकी आहे, झाडी फार नाही. तुरळक काटेरी झुडुपं आणि लहानशी झाडं. वर बघितलं तर गडाची उंची फार दिसत नव्हतीच.

मोठे-मोठे खडक आणि त्याच्या शेजारून वाढलेली, परंतु खडकांच्या उंचीपेक्षा कमी उंचीची झाडं दिसत होती. त्यातूनच तटबंदीही डोकावताना दिसली. गंमत म्हणजे नुसती टेकडी, आजूबाजूला फोटो काढण्यासारखं काही नव्हतं.

बाण, शिळा आणि तटबंदी

बराच वेळ झाला होता तसा, तरी किल्ला काही येईना. उगाच वाकडेतिकडे वाटेने वर जात होतो बहुतेक असं वाटावं, इतका वेळ लागला. नाही, पण वाट चुकत नव्हतो. एक तर या गडांवर लोक बऱ्यापैकी फिरायला येत राहतात. तशातच एका दगडावर एक बाण दिसला, म्हणजे योग्य वाटेची खात्री! तसा गड जवळपास आलाच होता. वर दगडी शिळाही जवळच आल्या. त्यातून तटबंदी अगदी जवळ डोकवायला लागली.

प्रवेशद्वार

ती झाडाझुडपांनी वेढलेली तटबंदी जवळ येत होती आणि दरवाजाही दिसला. ताशीव दगडांनी बांधलेला दरवाजा. गोमुखी वगैरे नाही. वरती विटांची आता भग्न झालेली जुनी बांधणी.

जुन्या काळातल्या खुणा, म्हणजे नेहमी दरवाजांवर आढळणारे गणेश शिल्प, कमळ.. ह्यातलं काहीच दिसत नव्हतं. पण आधुनिक काळातले शिलालेख मात्र जिथे जाता येईल तिथे जाऊन लिहून ठेवलेले दिसले.

बालेकिल्लाच्या दरवाजाकडे आणि वाट

तसा हा गड छोटाच, आणि त्यातही उतारावर, उपलब्ध नैसर्गिक खडकांचा आधार घेऊन, तसा विचार करून बांधलेला. आतमध्ये गेल्यावर डावीकडे वरचा दरवाजा दिसला. याला बालेकिल्ला म्हणता येईल का? दरवाजासमोरच बाहेरच्या बाजूला प्रचंड खडक होते. हे तेव्हापासून आहेत आणि त्याचाच संरक्षणासाठी म्हणून उपयोग केला असावा, असं वाटलं. कारण हे इथे सहजगत्या कसे येऊन पडणार म्हणा!

पण दरवाज्याची वाट जशी दिसत होती, तशी पूर्वी नसावी. की गडबांधणीचा जो उद्देश होता, त्यात अशा वाटेने हेतूला आडकाठी येत नसेल म्हणून जशी सोपी पडली तशीच बांधली की काय... कोणास ठाऊक! पण खडकांवर तयार झालेल्या (की केलेल्या?), कोरलेल्या पायऱ्यांवरून सावधपणे चालत दरवाजा गाठला.

बालेकिल्ला दरवाजा

दरवाज्याची कमान अगदी तंतोतंत आधीच्या दरवाज्यासारखीच, ताशीव दगडांची, आयताकार रचना. इथेही बहुतेक शिल्पं नसावीतच. मात्र वर्तमानकालीन शिलालेखांबरोबर इथे दूरध्वनी संपर्क क्रमांकही लिहून ठेवलेले दिसले. आपला ऐतिहासिक ठेवा विद्रूप करण्याचा अभिमान असावा तर असा!!

डावीकडचा मोठा खडक प्राचीन काळापासून तसाच आहे, हे तिथली रचना बघता स्पष्ट झालं. कारण दरवाज्याची भिंत त्याच्याच आधाराने बांधलेली दिसली. आणि खडकावरतीच विटांचे बांधकाम. प्रश्नच मिटला ना.. अजून काय हवं त्याचं मूळ स्थान स्पष्ट करायला? दरवाज्यावरील विटांचं बांधकाम किती छान होतं! त्यातल्या कमानी ढासळत चाललेल्या असल्या तरी मूळ सौंदर्य लपत नव्हतं. मात्र उजवीकडच्या कोपऱ्यात जोमाने वाढलेलं झाड हळूहळू त्याच्या नाशास पुढे कारणीभूत ठरणार आहे.

भग्न वास्तू आणि पुढे तटबंदी

आतमध्ये समोरच एक भग्न वास्तू आहे. त्याचा ढाचा इतका ढासळलेला आहे की ती वास्तू कशाची आहे, दरवाजा-खिडकी किंवा प्रवेश कुठून वगैरे काहीच लक्षात आलं नाही. भिंतीला मधोमध भगदाड पडलं असलं तरी उरलेल्या भिंतींनी वरचं छत अजून तोलून धरलेलं आहे. वास्तूच्या मागच्या बाजूला जमिनीचा भाग संपलेला दिसत होता, कारण इथे तटबंदीच्या चर्या दिसत होत्या. हाच भाग खालून वर बघितल्यावर दिसतो तोच असावा. जिथे आम्ही उभे होतो तिथे बऱ्यापैकी भाग अजून खाली शिल्लक असावा, जो आता माती पडून बुजलेला आहे.

गोजऱ्यावरून साजरा

जलकंठेश्वर मंदिर आणि वेल्लोर कोट

कडेला जाऊन साजऱ्याकडे बघितलं. जो डोंगर दिसला, तो साजरा दुर्ग आहे असं कोणी सांगितलंनी असतं ना, तरी त्यावर विश्वास बसला नसता! नुसती झाडी, दुर्ग असल्याच्या काहीही खुणा इथून दिसेनात. नुसताच झाडाझुडपांनी भरलेला डोंगर. पण आम्ही काही वेळापूर्वी तिथेच होतो त्यामुळे तोच गड होता हे नक्की.

खाली पाहिलं तर "जलकंठेश्वर" मंदिर आणि वेल्लोरचा कोट व्यवस्थित दिसत होता. पण वातावरण साफ नव्हतं, प्रचंड धुकं होतं. त्यात लांबचे फोटो काढले तर त्यात काहीच दिसेना. बाकी खालचं, जवळचं वेल्लोर मात्र स्पष्ट दिसलं, फोटोत पण.

गोजरा - आतली बाजू

गडमाथा लहानसा आहे. थोडी सपाट जमीन, त्यातच मधेच मोठा खडक. कडेच्या बाजूला तर खडकच, आणि त्यावर जमेल तसं तटबंदी बांधून भाग सुरक्षित केलेला. सह्याद्रीत जसे नैसर्गिक कातळकड्यांचा आधार घेऊन तटबंदी बांधलेली असते, तसलाच प्रकार, फक्त इथे कातळांच्या ऐवजी तेच ठराविक पांढरे, मोठाले खडक.

चहुबाजूने असलेली तटबंदी ही खालीपासून थोडी उंची दगडांनी, तर वरती विटांची, ह्याच स्वरूपाची होती. चर्या-जंग्या स्पष्ट होत्या. त्यावर वाढलेल्या झाडांमुळे मात्र हळूहळू ती सुंदर तटबंदी ढासळून जाईल.

गडावर जे काही बांधकाम होतं ते बऱ्यापैकी ढासळून गेल्याने, कशाचाही फारसा बोध होत नव्हता.

सर्वोच्च स्थानाकडे जाणारी वाट

पुन्हा मागे फिरलो आणि ह्यातल्या थोड्या वरच्या भागाकडे, म्हणजे गडाच्या सर्वोच्च स्थानाकडे निघालो. इथे जाण्यासाठी दरवाज्याच्या कडेनेच वाट वर जाते. ह्या बाजूच्या चर्या इतक्या सुंदर आहेत आणि अजून शिल्लक आहेत! वर जाणारच होतो, पण वास्तविक वेळ टळटळीत बाराची होती. ऊन तापत होतं, त्यात वर पोहोचेपर्यंत कुठेच थांबलो नव्हतो आणि तशी जागाही मिळालेली नव्हती. समोर मात्र सावली दिसली. जरा बुड टेकवलं, तहान लाडू, भूक लाडू बाहेर काढले.

वरून गडाच्या आतला भाग

या बाजूच्या चर्या सुंदर आहेत. त्या खडकांवरूनच तटबंदीच्या कडेने वरच्या बाजूला गेलो. गडाचा आतला संपूर्ण भाग इथून दिसला. प्रमोद, अभिषेक अजूनही सावलीतच बसले होते. गडावरील वास्तूंचं बांधकाम पाहता, त्या वेगवेगळ्या कालखंडात बांधलेल्या असाव्यात, असं मला तरी वाटलं.

खिडकीत अस्मादिक

इथे एका बाजूला एक झरोका आहे, जो तटबंदीतच आहे. आणि नेमका झरोख्याच्या खाली प्रचंड मोठा खडक आहे, जो तटबंदीच्या बाहेरच्या बाजूलासुद्धा शिल्लक आहे. हा एक मस्त कोपरा आहे तटबंदीचा. इथे छान फोटो काढून घेतला. इथून खालचं वेल्लोर छान दिसतं.

लाजरा दर्शन - गोजऱ्यावरून

आता गोजरा बऱ्यापैकी पाहून झाला होता. यानंतर पुढचा जोडदुर्ग - दुर्ग मूर्तजा उर्फ लाजरा (प्रवीण भोसलेंनी दिलेलं नांव) उर्फ राणी (स्थानिकांच्या मते) हा 'राणी'. राणी का? तर हा गड गोजऱ्याच्या शेजारीच आहे आणि गोजरा राजा, म्हणून हा राणी... तर त्याच्याकडे जाणारी वाट बघायची होती. गोजऱ्यावरच्या सर्वोच्च ठिकाणाच्या ह्या कोपऱ्यावरूनच, समोरच एका टेकडीच्या पलीकडे तो मूर्तजाही डोकावत होता. कॅमेराची कमाल, काय सुरेख फोटो मिळाला! वरून साधारण वाटही बघून घेतली.

उन्हामुळे जरा थकवा जाणवत होता, पण जायचं तर होतंच ना तिकडे.

विहीर - प्रवेश भाग

त्या नादात पटकन खाली उतरलो. बालेकिल्ल्याचा दरवाजा, मग मुख्य दरवाजा उतरून बाहेरही आलो. जरा बाकीच्यांची वाट बघत थांबलो, तर "अरे, इथली विहीर बघितली का?" विनीत! बोंबला.... लाजऱ्याच्या नादात ती विहीर राहिलीच की! नशीब त्याने हाक मारलीन. मग काय, परत वर गेलो ना चढून.

आता मुख्य दरवाजातून आत गेल्यावर डावीकडे वरती बालेकिल्ल्याकडे गेलो होतो आणि तसंच खाली आलो होतो. पण बालेकिल्ल्याकडे न जाता उजवीकडे, दाट झाडीत घुसलो तर इकडे विहीर आहे. तीच बघायची राहिली होती.

विहीर

विनीत वरती होता. मी पटकन खाली गेलो तर तिथे मकरंद सरळ त्या कोरड्या विहिरीत उतरून रील काढत होता. त्याचा फायदा घेऊन तिथे एक फोटो काढून घेतला. ☺️ मग निवांत विहीर बघितली. अप्रतिम बांधकाम! या गडावरील सुस्थितीतली आणि रेखीव अशी ही कलाकृती. दगडांची बांधणीच अशी की जणू पूर्ण विहीरच नक्षीकाम वाटावी.

विहीर - विविधं शिल्पं

या विहिरीत उतरायला पायऱ्या आहेत. शेवटच्या पायरीच्या बाजूला भिंतीवर एक बापा विराजमान होतेच, परंतु आतल्या बाजूला, विहिरीच्या भिंतींवर एक सुंदर कासव, एक मासा व एक शिवपिंडी आणि काही नक्षी अशी शिल्पंही होती. साफसफाईची इथे खूप गरज आहे, पण त्या नंतर मात्र ही बावडी खुलून दिसेल यात संशय नाही. गंमत म्हणजे विहीरही खालून काही फूट दगडांची आणि वरती भाजलेल्या विटांची. गाळ उपसला तर अजूनही काहीतरी कलाकृती नक्कीच दडलेल्या असतील, त्या बाहेर येतील.

शेवटी गोजरा सोडला. वाट धरली मूर्तजाची.

साजरा, गोजरा ह्या गडांची नांवं. तामिळनाडूमधली सरकारी दरबारी, सच्चाराव, कुठल्या राव — अगदी "साला हंड्रेड परसेंट मराठी, खरे मराठी गडबी असे नाय"! मात्र 'मूर्तजा' हे नाव तसंच आहे. त्यामुळे प्रवीण भोसलेंनी दिलेलं नांव इथे सार्थ वाटतं.

दुर्ग मूर्तजा उर्फ लाजरा उर्फ राणी

लाजऱ्याची वाट

एक वाजून गेला होता. गडावर जायची वाट गोजऱ्यावरूनच बघून ठेवलेली होती. लक्ष समोरच होतं. या गडाची वैशिष्ट्यपूर्ण गोलाकार तटबंदी लक्ष वेधून घेते. खडकांचा आधार घेऊन बांधलेला गोलाकार बुरुज मस्त दिसला.

दुर्ग लाजरा - प्रवेशद्वार

त्याला वळसा मारल्यावर लगेच गडाचा दरवाजा दिसला. गोजऱ्यासारखाच कमानीपर्यंत दगडी बांधकाम आणि वर भाजलेल्या विटा. मकरंद दादांनी इथे जो भन्नाट फोटो मारलानी आहे ना.... बेफाटच!

गडाचा आतील भाग

गडाचा माथा तर गोजऱ्यापेक्षाही छोटा आहे. गडावर एकच वास्तू दिसली. त्याचेही छत गायब, भिंती मात्र शाबूत होत्या. तटबंदी सगळीकडे सारख्या उंचीची नाही. काही ठिकाणी दोन पुरुष इतकी उंच, तर काही ठिकाणी दोन-चार फूटच. अर्थात, ही बाहेरच्या बाजूने दिसणारी उंची. आतील बाजूने मात्र ती समपातळीत आहे. बाहेरच्या खडकांच्या उतारामुळे तशी बांधावी लागलेली आहे, जेणेकरून आतमध्ये समपातळीत राहील.

गोजरा दर्शन - लाजऱ्यावरून

गोजऱ्यावरून जसा हा गड सुंदर दिसला होता, तसाच इकडच्या बुरुजावरूनही गोजराचाही फोटो कॅमेराच्या कृपेमुळे मस्त मिळाला.

पण हे नंतर. येथे पोहोचल्यावर मात्र राहवलं नाही. "साजरा-गोजरा" नांवं ऐकल्यापासून 'लाजरा न् साजरा मुखडा' हे गाणं डोक्यात घुमत होतं. इथे त्यात शब्द बदलून दुसरं गाणं आपोआप तयार झालं, आणि मी नी प्रसाद तर चक्क नाचलो!

स्वाभाविक होतं, नाही का? पुण्यापासून हजार किलोमीटर लांबवरचे हे गड पाहायचे, हे स्वप्न होतं जणू. कारण जवळपासची ठिकाणं सुद्धा बरेच वेळा काही ना काही कारणाने राहून जातात, तर हजार किलोमीटरवरच्या गोष्टींचा योग कधी येणार? पण योग आला, संधी मिळाली, ती सोडली नाही. कसं चालेल म्हणा सोडून? कारण नंतर कितीही पश्चाताप केला तरी मनातून खंत जात नाही, आणि ती गोष्ट मन खातच राहते. ती वेळ येऊ न देता नियोजन तडीस गेलं होतं. नियोजनात साथीदार हे कायम सगळ्यात महत्त्वाचे असतात, याची जाणीव होत राहते. आनंद होणं आणि तो वाटायला मिळणं, यासारखं सुख नाही...

वेल्लोरमध्ये येऊनही वेल्लोर कोटापेक्षा या मराठमोळ्या त्रिकुटाचं जास्त कौतुक होतं. मनातली इच्छा पूर्ण झाली. समाधानाने "टेकडीवरील हे गड" पाहून झाले. संध्याकाळी जलकंठेश्वर मंदिर, वेल्लोरचा कोट पाहिला. दिवस सार्थकी लागला!!

सुखद आठवणींशिवाय काही नेऊ नका... आणि पाऊलखुणांशिवाय काही ठेऊ नका!!!

Wednesday, July 30, 2025

दुर्ग साजरा (तामिळनाडू)

दुर्ग साजरा

जिंजी.... नाम तो सुना ही होगा! अर्थात हे नांव माहिती नसलेला इतिहासप्रेमी विरळाच. जिंजी ही मराठ्यांची दक्षिणेकडील राजधानीच. राज्याभिषेकाच्यानंतर दोनच वर्षांनी महाराजांनी केलेली दक्षिण दिग्विजय मोहीम ही त्यांच्या कारकिर्दीतील सर्वाधिक काळ चाललेली, अत्यंत महत्त्वाची आणि यशस्वी मोहीम. एकूण दीड वर्षे ही मोहीम चालली, म्हणजे केवढा मोठा प्रदेश पादाक्रांत केला गेला असेल, याचा अंदाज येईल! जिंजीचा दुर्ग जिंकून परतताना, वेल्लोरला येऊन त्यांनी वेल्लोरच्या कोटाला वेढा दिला. त्यासाठीच या किल्ल्याच्या बरोबर समोर असलेल्या टेकड्यांवर दुर्ग उभारणी चालू केली.

इथे जे दोन दुर्ग बांधले, ते मराठमोळे दुर्ग, "दुर्ग साजरा" आणि "दुर्ग गोजरा".

"दक्षिण दिग्विजय" या मोहिमेत त्यांनी पादाक्रांत केलेला सगळा प्रदेश तर आमच्या आठ दिवसांच्या मोहिमेत फिरून होणे, कोणत्याही परिस्थितीत शक्य नव्हते. अर्थातच, त्यामुळे तसा विचारही नव्हता. पण डोक्यात “जिंजी” हे नांव मात्र रुंजी घालत होतं. शेवटी मुहूर्त लागला आणि नियोजन ठरलं. जेव्हापासून जिंजी नांव डोक्यात होतं, तेव्हापासूनच साजरा-गोजरा ही नांवंही त्याच्याबरोबरच "आम्हाला विसरायचं नाही बरं... " अशी आठवण करून देत होती. जिंजीची जेवढी ओढ होती, तेवढीच ओढ मराठमोळं नांव मिरवत असलेले, तामिळ प्रदेशातले साजरा आणि गोजरा यांचीही होती.

मुहूर्त लागला आणि मोहीमपण घडली. लिहायचा मुहूर्त मात्र लागेना... पण एखाद्या गोष्टीची एक कळ असते. कर्नाटक मोहीम की तामिळनाडू? यात तामिळनाडूचं पारडं जड होत होतं. त्यातच काही दिवसांपूर्वी भारतातल्या १२ दुर्गांना युनेस्कोमध्ये जागा मिळाली. त्यातले महाराष्ट्रातले ११, तर महाराष्ट्राबाहेरचा एकमेव दुर्ग जिंजी!

कळ दाबली गेली, वही-पेन निघाले, आणि त्यातही साजरा-गोजरा यांनी बाजी मारलंनी, जरी ते ह्या मोहिमेतले आधी बघितलेले किल्ले नसले तरीही. मराठी म्हणून वशिलेबाजी? असुद्या कि... पण म्हणजे लेखमालेत पहिला मान पटकावला ह्यांनीच!

वेल्लोरमध्ये मुक्काम झाला. दिवसाचा पहिला मान ठरला दुर्ग साजरा! गडावरची प्रत्येक गोष्ट बघितलीच पाहिजे, हा अट्टाहास! त्यामुळे काही गोष्टी मनात नोंदवून ठेवलेल्या, त्याकडे लक्षही होतं.

साजरा दुर्ग संवर्धन वगैरे केलेला नाहीये. यापूर्वी म्हणजे २००४ सालापर्यंत तर इथे जवळपास फार कोणी जातही नसे. त्यामुळे हातभट्टी वगैरे अवैध धंदे येथे चालायचे, असं ऐकल्याचं प्रवीण भोसले यांनी नोंदवून ठेवलेलं आहे. तसाही हा दुर्ग आजसुद्धा फार वर्दळीचा नाही. म्हणूनच वर चढण्याची वाट सापडते आहे ना? इथपासून, मनात नोंदवलेलं सगळं बघायला मिळतंय ना, तेही आधी शोधून-सापडून बघायला, याची काळजी जास्ती होती. पण जमेल तशी माहिती काढायचा आम्ही सगळेच प्रयत्न करत होतो. विनीत तर स्वप्नीलशी बोलून ताजी माहिती घेत होता. जमेल तशी बोलणीही करून ठेवलेली होती.

वेल्लोर किल्ल्याच्या समोरच्या टेकडीवर हे दुर्ग असल्याने, काहीजण इथून दोन दुर्गांच्या मधल्या खिंडीतून जाऊन, तिथून साजऱ्यावर गेले होते. ही वाट खडतर आहे. पण हीच वाट मूळ वहिवाटेची होती असे काहींचे मत असले, तरी सध्या ह्या बाजूला अजिबातच वर्दळ नसल्यामुळे इथून वाट सापडणं कठीण आहे. त्यात जंगल. म्हणजे वाटाड्या हवाच! तमिळनाडूमध्ये भाषेचीही अडचण. पण आमच्या सुदैवाने, दुसऱ्या एका भागातून वाट झालेली आहे असं कळलं. आणि त्यातून ती वाट तुलनेने सोपी आणि लवकर सापडणारी असल्याचंही समजल्याने थोडा धीर आला.

"जुनं वेल्लोर" किंवा "जुनं गांव" असं म्हटलं जातं त्या भागातून, घराघरांमधल्या गल्ली-गल्लीतून वाट काढत पायथ्याला पोचलो. आमचं नशीब जोरावर होतं बहुतेक. मार्गाची स्थिती पाहता, नवथरच कोणीतरी इथे येऊन गेलं आहे हे लक्षात येत होतं. झाडी वगैरे साफ केलेली होती. वाट स्पष्ट होती. दगडांवर चक्क बाण काढून ठेवलेले दिसत असल्यामुळे प्रश्नच नव्हता!

कालिका मातेचा भास व्हावा अशी देवी

गडावर दाट जंगल आहे. पण चढायला सुरुवात करतानाच ७ वाजले होते, त्यामुळे वर पोचेपर्यंत उजाडणारच होतं. सुरुवातीलाच दिसलेल्या, कालिका मातेचा भास व्हावा, अशा देवीला नमस्कार करून श्रीगणेशा केला. तांबडं फुटायच्या आधीची वेळ असल्यामुळे वातावरण एकदम आल्हाददायक होतं.

उघड्यावरचे शंकराचे देवस्थान

अवघ्या दहा मिनिटांत एका प्रशस्त दगडावर असलेल्या देवस्थानाजवळ पोचलो. सध्या तरी त्या मूर्ती उघड्यावरच ठेवलेल्या दिसल्या. चौथराही अर्धवट बांधलेला, त्यावरच शंकराची पिंडी, नंदी, शेजारी त्रिशूळ वगैरे होतं. चौथऱ्याला टेकूनच एका ऋषींची मूर्तीही होती. जटाधारी, गळ्यात रुद्राक्षांच्या माळा कदाचित शंकराचंच रूप तर नसेल?

साजरा-गोजरा या दुर्गांना इथे "टेकडीवरचे दुर्ग" म्हणून ओळखतात. वेल्लोर किल्ल्याच्या समोर असलेल्या टेकडीवर महाराजांनी हे दुर्ग बांधले असल्याने ह्या किल्ल्यांवरून वेल्लोर गाव आणि दुर्ग व्यवस्थित दिसतो. किंबहुना हाच तर हे दुर्ग बांधण्यामागचा उद्देश असणार नाही का? त्यामुळे इथून गाव संपूर्ण दिसलं. सगळे इथपर्यंत आल्यानंतर, पुढे निघालो.

बुरुज

वीस मिनिटांतच एकदम समोरच बुरुज दिसला. बुरुजाच्या जवळ जाण्यासाठी बरीच झाडी तुडवावी लागली. आणि, तसंही इथे ना प्रवेशद्वार आहे ना वर जायला वाट, हे स्पष्ट दिसलं.

दरवाजा

झाडांनी वेढलेला दरवाजा आतील बाजूने

मग परत पहिल्या वाटेला लागून, शेजारून वाट काढत पुढे गेलो. दोन-तीन मिनिटांतच दरवाजा दिसला... म्हणजे गड आला! आता शोधायची होती एक महत्त्वाची गोष्ट... ते म्हणजे...

तर काय आहे, कि जेव्हा आम्हाला कळलं, ह्या गडावर एके ठिकाणी महाराजांची अश्वारूढ मूर्ती कोरलेली आहे. तेव्हापासून नुसता गड आणि वास्तू सापडल्या म्हणजे झालं असं नाही, तर हे शिल्पही नक्की शोधून पहायचं, हे ठरलेलं होतं. आता इथे येण्याचा योग आलेला होता, पण येण्यापूर्वी केलेल्या अभ्यासानुसार हे शिल्प सापडणं तितकं सोपं नाही हेही माहित होतं. अनिकेत वाघ आणि अमर साळुंखे यांनी हे शिल्प उजेडात आणलं. अनिकेतशी बोलणं झालं होतं, त्यावरून थोडाफार अंदाज आला होता. पण त्यावेळी ते ज्या वाटेने गेले आणि आम्ही ज्या वाटेने येणार होतो, त्या दोन्ही वाटा भिन्न होत्या. त्यामुळे, लक्षात आलेली एक गोष्ट म्हणजे "दिसणारी प्रत्येक वास्तू बारकाईने पाहायची!" कारण, फक्त तसंच केल्यावरच हे शिल्प सापडू शकतं.

नेहमीप्रमाणे दरवाजा न्याहाळला. कमानीवरची नक्षी, मधोमध असणारे गणपती, कमळासारखे दिसणारे शिल्प असं नेहमी दिसणारं काही दिसतं का ते पाहिलं. या दरवाज्यावर मधोमध शिल्प तर होतं, पण त्याचा काही अर्थ लागत नव्हता. उजवीकडे मोठ्या अक्षरात निळ्या रंगात "WEL COME" हा वर्तमानकाळातला रंगीत शिलालेख मात्र दिसला.

कुठल्यातरी दरवाजामागच्या खांबांवर ते शिल्प असल्याची माहिती होती. त्यामुळे दरवाजाच्या मागे असलेल्या देवड्यांमधील प्रत्येक खांब वरपासून खालपर्यंत, गोल फिरून ३६० अंशात नजरेखालून घातले. पण... इल्ला! नाही, तामिळमध्ये "इल्लाई". म्हणजे तसं गणपती, शिवपिंडी, अगदी कमंडलूसुद्धा कोरलेलं दिसलं. छताच्या आतल्या बाजूने वरती नक्षी वगैरेही होती. पण महाराज इल्लाई.... म्हणजे महाराज काय दर्शन द्यायला तयार नाहीत. चला म्हणजे इथे नाहीत तर...

पुन्हा दरवाजा आत-बाहेर करून पाहून झाला. उंबरठ्यावर दिसलेला तामिळ भाषेतला मजकूरही बघून झाला.

दगड आणि वरती भांडं

मग सरळ प्रदक्षिणा मार्ग धरला. आमच्याकडे असलेला नकाशा काढला. थोडीशी चर्चा झाली, मग मार्ग ठरवला. तटबंदीवरून सुरुवात केली. कोपऱ्यावर एक मोठा उभा दगड आणि त्यावर एक भांडं दिसलं. पण इतर काही नव्हतं. पुढे काही मोठे खडक, आणि त्यावर ते फोडण्यासाठी वापरत असलेल्या जुन्या काळातल्या तंत्राच्या खुणा दिसल्या. आणखी पुढे गेल्यावर अजून एक उंच दगड, त्यावर भांडं. इथे मात्र याला शंकराचं चित्र असलेल्या फरशा लावलेल्या होत्या.

साजऱ्यावरून गोजरा

पुढे गेल्यावर एक ठिकाण होतं तिथून गोजरा स्पष्ट दिसला. नंतर मात्र झाडीत घुसलो. तरीही झाडीतली वाट थोडी का होईना, साफ केलेली दिसत होती.

दुसरा दरवाजा

पुढे एक वास्तू दिसली आणि त्यापुढे आला एक मोठा दरवाजा. दरवाज्याची एकूण रचना सुंदर आहे आणि खांबावर बऱ्यापैकी नक्षीकामही आहे हे लांबूनच लक्षात आलं. तिथूनच ठरवलं की ये एकटे-दुकटेका काम नाही... "तू इधर, मी उधर — बघू कोण काय शोधतो!" करून आम्ही विभागलो. कुठेही बघा शिल्पं, शिल्पं आणि शिल्पं! गणपती, नृत्य करणारी मंडळी, यक्ष, देवता, नृसिंह, देवी आणखी भरपूर काही! जिथे जागा मिळेल तिथे नक्षीने खांब भरलेले.

शिवपिंडीला अभिषेक

हत्तीशी युद्ध करणारा वीर

शिवपिंडीला हत्ती सोंडेतून अभिषेक घालणारे शिल्प होतं. म्हणजे मला तरी तसं वाटलं. पण हत्तीच्या सोंडेत काहीतरी दिसत होतं. काय कथा असेल काय माहिती! एका शिल्पात शिवपिंडीवर आचळातून दुधाचा अभिषेक करणारी गाय दिसली! केतनशी बोललो तर म्हणे गायीने जमीन उकरून पिंडी बाहेर काढलीन आणि दुध पाजलंन अशी कथा आहे. दुसऱ्या शिल्पात शिवपिंडी शेजारी फणा काढून बसलेला नाग... एके ठिकाणी हत्ती आणि एक माणूस खाली झोपलेला दिसला, ते म्हणे हत्तीशी युद्ध करणारा वीर आहे. एक एक काय सांगू? शिल्पांची ही जणू खाणच!

दरवाज्याच्या मागचे शिल्प

दरवाजा गोमुखी आहे. पुढे पाणी जाण्यासाठी किंवा तत्सम जागा होती. तिथेही जमिनीच्या खालच्या पातळीत सुंदर शिल्प! खाली उतरून त्या शिल्पासोबत फोटो काढायचा मोह आवरला नाही. तिथंच आजूबाजूला शिल्प घडवलेले दगड पडलेले दिसले. अरे हो.. एक महत्वाची गोष्टही इथे आहे ती म्हणजे शिलालेख. हा शिलालेख मराठी भाषेतील आहे आणि तो मोडी लिपीत आहे. त्यावर लिहिलेला मजकूर "शिवाजी महाराजांच्या किल्ल्याचे पहिले सरदार जाधव हवालदार, साजरा" असा काहीसा आहे असे कळते. अर्थात हा लेख पुसट झालेला आहे आणि नीटसा वाचताही येत नाही.

इतरही अजून शिल्पं

इतरही अजून शिल्पं

सगळं दिसत होतं. अचंबितही करत होतं. पण... ते शिल्प काही दिसेना! तेवढ्यात मकरंद की प्रमोद, कोणीतरी ओरडलं आणि सगळ्यांना बोलावलं. कोणी 'युरेका' असं ओरडलं नाही हे खरं, पण... सापडलं ना भौ!

अश्वारूढ शिल्प

एका खांबाच्या आतल्या बाजूला ते शिल्प सापडलं. महाराजांची अश्वारूढ मूर्ती असं हे शिल्प! आता हे इतकं महत्त्वाचं शिल्प इथे आतल्या बाजूला का असावं? कोणत्या प्रसंगी कोरलेलं असावं? कोणी कोरून घेतलं असेल? असे अनेक प्रश्न पडतात, आणि त्यांची उत्तरं शोधायचं काम अर्थात इतिहास संशोधकांचं. बघू ते कधी घडेल. आम्ही मात्र वेगवेगळ्या बाजूंनी त्याचे फोटो, आणि त्याच्यासोबत आमचे फोटो काढून घेतले. शिल्प व्यवस्थित न्याहाळलं. तो व्यवस्थित कोरलेला घोडा, त्यावर बसलेले महाराज. नुसते बसलेले नाही, तर हातात धोप किंवा तलवारसुद्धा! पोशाख, दाढी... सगळं स्पष्ट!

मग काय? झाला ना गड पाहून! कारण महत्त्वाची, बहुचर्चित-बहुप्रतिक्षित गोष्ट सापडलीच. मग करून टाकायची का बघितला म्हणून खुण? पण नाही. दुर्ग पूर्ण बघितल्याशिवाय समाधान नाही. जेवढ्या माहिती आहेत, उजेडात आलेल्या आहेत आणि पाहता येतील, त्या सगळ्या वास्तू पाहून झाल्यावरच, ते समाधान मिळणार होतं. ठरल्याप्रमाणे पुढचा मार्ग धरला.

इतर वास्तू

अजूनही काही वास्तू दिसल्या. काहींचं प्रयोजन समजलं नाही, तर काही मंदिर असावीत, हे कळलं. काही ठिकाणी न जाता येण्याजोगं जंगल होतं, तर काही ठिकाणी थोडा साफ केलेला भाग, तिथे पडझड झालेल्या वास्तू. काही ठिकाणी मोठे खडक, त्यावर काहीतरी घडवण्याचे केलेले प्रयत्न, हे स्पष्ट दिसत होते. तर काही घडवून झालेले, पण न वापरलेले दगड तसेच पडलेले.

एके ठिकाणी झुडपात एक लपलेलं भुयार दिसलं. नीट बघितल्यावर लक्षात आलं की ते फक्त भुयार नाही, तर एक मोठी वास्तू आहे. शेजारून बाजू-बाजूने पलीकडे गेलो आणि ती पूर्ण वास्तू समजली. धान्य कोठार? दारूगोळा कोठार? पण मुळात एकूण रचना तशी नेमकी काही कळत नव्हती. लढाईच्या वेळी लपण्यासाठी सुरक्षित जागा? म्हणजे बंकर? असेल बुवा काहीही, देव जाणे!

भुयार वाटलेली वास्तू

पण काय सुंदर प्रकाश येत होता! फोटो काढायचा मोह कोण आवरू शकतं? निसर्गानेच सगळी व्यवस्था करून ठेवलेली. पाहिजे होती फक्त दृष्टी आणि ते टिपायला कॅमेरा. सगळ्यांनी फोटो काढले.

पुन्हा मार्गाला लागलो. उंच झाडांचं, पण विरळ असं जंगल लागलं. या वाटेने समोर बघून, नक्की कुठे पोचणार हे सांगता येत नव्हतं. पण नकाशाच्या आधी केलेल्या अभ्यासानुसार ह्या बाजूने वाट परत दरवाजात येणे अपेक्षित होतं. मी, प्रसाद आणि प्रमोद गप्पा मारत-मारत मागून चाललो होतो. विनीत, मकरंद आणि अभिषेक पुढे. आम्ही त्यांच्या मागोमाग, निवांत चाललो होतो त्यांच्या पावलांवर पाऊल टाकत. तेवढ्यात "वा! वा! पोचलो रे!" विनीतचा आवाज आणि मागून टाळ्याही! लक्षात आलं दरवाजात पोचलो!

सगळ्यांनीच एकमेकांचं अभिनंदन केलं. सगळ्यांनाच आनंद झालेला. व्यवस्थित रस्ता मिळाला. जे बघता येणं शक्य होतं, जे बघायचंच होतं ते शिल्प, अवशेष, वास्तू सगळं बघायला मिळालं. छान फोटोही मिळाले.

महाराष्ट्राबाहेर, इतक्या लांब तामिळ प्रदेशात, स्वराज्यासाठी, स्वराज्याच्या मावळ्यांनीच बांधलेला, मराठी स्वराज्याला साजरा असा हा "दुर्ग साजरा", उत्तमरीत्या बघायला मिळाला! आनंद तर होणारच नाही का!!!

उतरताना हनुमानांनी एकदा दर्शन दिलंनी आणि जंगल अनुभवत खाली उतरून, पुढच्या नियोजनाला लागलो. पुढचं लक्ष होतं दुर्ग गोजरा आणि त्याचा जोडदुर्ग लाजरा उर्फ मुर्तजा.

सुखद आठवणींशिवाय काही नेऊ नका... आणि पाऊलखुणांशिवाय काही ठेऊ नका!!!