Tuesday, July 31, 2018

रायगडच्या प्रभावळीतले किल्ले - पन्हळघर, भोपाळगड आणि सोनगड

सध्या जरा दुर्लक्षित किंवा अल्पपरिचित किल्ले यांचीच भटकंती करायची हे जणू काही ठरून गेले होते. एक तर लोकप्रसिद्ध, भरपूर अवशेष उपलब्ध असलेले किल्ले हे ट्रेकिंगला जाणाऱ्या लोकांसाठी हक्काचे ठिकाण. व्यावसायिक ट्रेक ग्रुप यांचे माहेरघर. त्यातून पावसाळा. म्हणजे हवश्या-नवश्या लोकांसाठी पर्वणी. त्यामुळे गर्दी नसलेली ठिकाणे शोधून काढणे, त्या अनवट वाटांमधून भटकणे आणि त्यात लपून बसलेले अवशेष शोधून काढणे ह्यातला आनंद वेगळाच. विनीतने ह्याच मोहात पडून असेच ३ किल्ले फिरायचे ठरवले होते, “पन्हळेदुर्ग उर्फ पन्हळघर”, “दासगांवचा किल्ला उर्फ दौलतगड उर्फ भोपाळगड” आणि “सोनगड”.
हे किल्ले रायगडच्या प्रभावळीत येतात. दुर्गदुर्गेश्वर रायगड याच किल्ल्याला राजधानीचा मान देण्यामागे ह्या किल्ल्याच्या शेजारची भौगोलिक स्थिती हे महत्वाचे कारण होते. प्रभावळ म्हणजे मुख्य किल्ल्याच्या संरक्षणाच्या बळकटीच्या दृष्टीने बांधलेल्या उपदुर्गांचा विळखा. त्या किल्ल्याच्या कोणत्याही बाजूने हल्ला करायचा म्हटला तरी प्रभावळीतले किल्ले पहिले उभे ठाकतात. प्रभावळीतल्या ह्या पाहरेकऱ्यांचा उपयोग टेहळणीसाठीही होतो. रायगडाच्या प्रभावळीत साधारणपणे ८ किल्ले येतात. मानगड, कोकणदिवा, लिंगाणा, कावळा, मंगळगड, चांभारगड, सोनगड, पन्हळघर.
मी नांवं न ऐकताच येणार हे सांगून टाकलेले होते. बरोबर कौस्तुभ, प्रसाद आणि नेहा होते. विनीतच्या Tiago ला ह्यावेळी विश्रांती देऊन आमच्या सोबतीला आली होती कौस्तुभची Skoda Laura. २९ जुलै, रविवारी सकाळी ५:३० ला आमच्या भटकंतीला सुरुवात केली आणि ताम्हिणी घाटाने Skoda चे suspension तपासून घेतलेन. माणगावपर्यंत कशीबशी कळ काढली आणि मिसळ, पोहे, इडली, वडापाव हाणले. पहिले ठिकाण होते रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील छोटेखानी पन्हळघर किल्ला.

किल्ले पन्हळघर

अवशेष - किल्ले पन्हळघर

पुण्याहून आल्यावर ताम्हिणी उतरून पुढे माणगावमध्ये पोचल्यावर लोणेरेच्या आधी डावीकडे रस्ता पन्हळघरला जातो. आदिवासी वाडीपर्यंत गाडी जाते. तिथून समोरच किल्ला दिसतो. पायथ्याशी वाडीला पाणीपुरवठा करणाऱ्या पाण्याच्या २ मोठ्या टाक्या आहेत. तिथून सरळ वर जाण्यास सुरुवात करावी. गावातले लोक बकऱ्या चारण्यासाठी वर घेऊन येतात, त्यामुळे वाट चांगली मळलेली आहे. पावसाळ्यात दगडांवर शेवाळे साचलेले असल्याने पाउल टिकत नाही, जपून जावे. वर चढायला सुरुवात केल्यावर अवघ्या १० मिनिटांत वाटेच्या डाव्या बाजूला पाण्याच्या ३ टाक्यांचा समूह दिसतो. पाणी उत्तम असून पिण्यायोग्य आहे. माथ्यावर जाण्यासाठी हा टाकी-समूह डावीकडे ठेवत मळलेली वाट वर जाते. पण टाकी ओलांडूनही एक वाट सरळ माथ्यावर जाते. ह्या वाटेने गेल्यास माथ्यावरचे एक टाके दिसते. ह्यातीलाही पाणी अतिशय उत्तम आहे. दुर्ग संवर्धन उपक्रमातून ह्या टाक्यातील गाळ उपसून ठेवलेला दिसतो. उजवीकडे जवळच एक ध्वज उभारलेला दिसतो. उपलब्ध माहितीनुसार अजून एक टाके ह्या गडावर असल्याने त्याची शोधमोहीम सुरु झाली. त्या भानगडीत गडाला लागून असलेल्या डोंगरावर पण एक लहानशी चक्कर मारून झाली. परंतु नीट बघितल्यास ध्वजाजवळच्या टाक्यालाच एक जोडटाके असावे असं लक्षात आलं. गडावर एवढेच अवशेष उपलब्ध आहेत. ठरलेल्या वेळापत्रकाच्या मागे असल्याने पटापट गड उतरून, पुढच्या साध्याकडे निघालो.

दासगांवचा किल्ला उर्फ दौलतगड उर्फ भोपाळगड

दासगांवचा किल्ला उर्फ दौलतगड उर्फ भोपाळगड हा किल्ला अगदी महामार्गाला लागून आहे. लोणारे फाट्यापासून 10 किलोमीटरच्या आतमध्ये दासगांव गाव आहे. दासगांव खिंड ओलांडल्यावर महामार्गाला लागूनच उजवीकडे जिल्हा परिषदेच्या शाळेकडे जाणारा सिमेंटचा रस्ता आहे. ह्या रस्त्यावरून वर चालत निघाल्यावर 2 मिनिटांतच शाळा लागते. गडाकडे जाणारा रस्ता शाळेच्या आवारातूनच जातो. शाळेच्या परिसराचे फाटक बंद असल्यास शाळेच्या उजवीकडून पाठीमागे जाणाऱ्या रस्त्याने शाळा ओलांडता येते. पुढे उजवीकडे वर जाणारी पायवाट आपल्याला गडाकडे घेऊन जाते. पावसाळ्यात गवत वाढलेले असल्याने वाटा नीट समजत नाहीत. जेमतेम 10-15 मिनिटं चालल्यावर पठाराच्या डावीकडून पुढे गेल्यावर 3 वाटा दिसतात. ह्यातली डावीकडची वाट पाण्याच्या टाक्याकडे जाते. समोरची वाट गडाच्या माथ्यावर जाते, तर उजवीकडची वाट वळसा घालून गडाच्या मागच्या बाजूला जाते. आधी डावीकडच्या वाटेने टाके पाहून घ्यावे. पाणी अतिशय सुंदर पिण्यायोग्य आहे. आम्ही तिथले पाणी पिऊन परत माथ्यावर जाण्यासाठी त्या तिठ्यावर आलो. समोरच्या वाटेने माथ्यावर जाताना प्रचंड झाडी लागली. त्यातून डासही खूप आहेत. गावातली गुरे इथून सारखी जात असावीत, त्याच्या खुणाही जागोजागी दिसतात. पुढे वाट जाण्यायोग्य न वाटल्याने परत फिरलो. उजवीकडच्या वाटेने गडाच्या मागच्या दिशेला निघालो. इथून उजवीकडे गडाखालच्या वाड्या, काळू नदीचे पात्र, रेल्वेचा ट्रॅक असे सुंदर दृश्य दिसते. ते आम्ही डोळ्यात आणि कॅमेरात साठवून वाटेला लागलो.

अवशेष - किल्ले भोपाळगड

इंग्रजांनाही मोहात पडणारे विहंगम दृश्य

गडमाथा न बघायला मिळाल्याने थोडा विरस झाला होताच. पण सुदैवाने एक गाववाले मामा गुरं घेऊन आलेले होते. त्यांना वर बुरुज, वाड्याचे काही अवशेष अशी माहिती विचारली. त्यांनी गडाच्या मागच्या बाजूने वर जाणारी वाट दाखवून दिलंनी आणि निघून गेले. त्या वाटेने खडा चढ चढल्यावर गडाच्या तटबंदीने आमचे स्वागत केले. वर लगेच कुणी उभारलेल्या ध्वजाचा खांब तेवढा शिल्लक आहे. ह्याच जागेवर चौथऱ्याचे काही अवशेष दिसतात. आम्ही झाडीत लपलेले आणखी काही अवशेष शोधले आणि गडाच्या शेवटच्या टोकाला गेलो. तिथे बुरुज असावा. त्याचे अवशेष बऱ्यापैकी आहेत. इथून दिसणारे दृष्य न चुकवण्यासारखे आहे. सावित्री नदी आणि काळू नदीचा संगम, त्यावरचा रेल्वेचा पूल आणि गाव. ह्या दृश्याचा मोहात पडून इंग्रज इथे वाडे बांधून राहिले होते. ह्या गडाचा वापर मुख्यत्वे जलवाहतूक, जमिनीवरची वाहतूक ह्यावर नजर ठेवण्यासाठी होत असावा. आमची गडफेरी पूर्ण झाली होती. वेळापत्रक मात्र कोलमडले होते. पायथा गाठला. पुढचे लक्ष होते सोनगड.

किल्ले सोनगड

दासगांव सोडल्यावर पुढे वहूर गाव लागते. महामार्गावरूनच डावीकडे डोंगरावर ध्वज दिसतो हाच सोनगड किल्ला. ह्याच वेळी उजवीकडे महेंद्रगड म्हणजे चांभारगड सुद्धा खुणावत असतो. आमचे लक्ष सोनगड होते आणि वेळ उरला तर हा चांभारगड. वहूर गावाच्या पुढे गंधारपाले लेणी रस्त्याला लागूनच डावीकडे दिसतात.

किल्ले सोनगडकडे - गवळीवाडी/पठारवाडीतून

सोनगडला जायला एक वाट गंधारपाले लेण्याच्या वरच्या बाजूने आहे. दुसरी वाट मोपहारे गावातून जाते असे माहिती होते. पावसामुळे झाडी प्रचंड वाढलेली होती आणि जंगल असल्याने गावातला माणूस बरोबर असावा ह्या दृष्टीने याच गावातून जायचे ठरवले. गावात पोचून चौकशी केली तर आमच्या बरोबर यायला कोणीही तयार झाले नाही. गंधारपाले जवळून कोणी येतेय का बघावे म्हणून परत फिरून लेण्याच्या आसपास आलो. एकही माणूस यायला तयार नाही म्हणून निराशा झाली. मग अजून मागे येऊन बौद्धवाडीत चौकशी केली तर तिथूनही कोणी नाही. ह्या वाडीच्या विरुद्ध दिशेला एक कच्चा रस्ता गवळीवाडीत जातो. महामार्गापासून तिथे जायला साधारण तासभर लागेल आणि तिथून किल्ला जवळ आहे असे समजले. कच्चा रस्ता न चुकणारा आहे. पाऊण तासात गवळीवाडी/पठारवाडी गाठली आणि तिथूनही कोणी माणूस मिळेना. पण उजवीकडच्या वाटेने गेल्यावर पुढची टेकडी चढून जायची आणि पुढे किल्ला दिसतो अशी माहिती मिळाली. इथे थोडी विश्रांती घेऊन वाटेत न थांबता टेकडीचा माथा गाठला. इथूनही गड दिसत नाही. झाडी दाट आहे. मग दाट झाडीत न घुसता टेकडीच्या डाव्या बाजूने निम्यात उतरून कडेने वाट काढत निघालो. गड नाही सापडला तर डोंगर फिरल्याचे समाधान मानायचे अशी मानसिक तयारी झाली होती. पण प्रबळ इच्छा आणि दीड तासाची तंगडतोड याचे फळ म्हणून किल्ला दिसला. चाल वाढली. 20 एक मिनिटात किल्ला गाठला.

अवशेष - किल्ले सोनगड

सोनगड हा जावळी जिंकल्यावर महाराजांनी चांभारगडाबरोबर जिंकला आणि हेन्री रेव्हिंगटन आणि त्याच्या सहकाऱ्यांना कैद करून सोनगडवर रावजी पंडित याच्या स्वाधीन केले. कालांतराने कैद्यांची सुटका झाली, पुरंदरच्या तहात हा गड इतर 23 किल्यांबरोबर इंग्रजांकडे गेला. पुढे पेशव्यांच्या काळात त्यांनी रायगड ताब्यात घेतल्यावर सोनगडच्या प्रदेशाचा बंदोबस्त करण्याची आज्ञा दिल्याचा उल्लेख मिळतो.
सोनगड माथ्यावर काळ्या पाषाणाची दगडी ताटभिंत आहे. त्यावर भगवा ध्वजही आहे. पूर्वेस दाट जंगल तर पश्चिमेस खोल दरी आहे. उत्तरेस गांधारी तर पश्चिमेस सावित्री नदीचे पात्र असे अप्रतिम दृश्य इथून दिसते. गडावर आजूबाजूला गवतात लपलेले जोत्याचे अनेक अवशेष दिसतात. लयाला जाण्याच्या अवस्थेत असलेल्या बुरुजाचे काही अवशेषही दिसतात. परत मागे येऊन पाषाणाची भिंत समोर ठेवल्यास डावीकडे, म्हणजे गडाच्या पश्चिमेकडे खालच्या बाजूला कातळात कोरलेली 2 पाण्याची टाकी दिसतात. इथे जाण्यासाठी वाट बिकट असून सांभाळून जावे.
आमची गडफेरी आता पूर्ण झाली होती. साडेचार होत आले होते. चांभारगड होणारच नव्हता. दुपारचे जेवणही झालेले नव्हतेच. मग सरळ ठिय्या मारून खाऊचे बकाणे भरले. आता वाट शोधायची नव्हती. सरळ मिळेल त्या वाटेने गवळीवाडी गाठली आणि महामार्गाला लागून परतीचा प्रवास सुरु झाला. निघायला 6 वाजून गेले होते, सव्वाशे किलोमीटर पेक्षा जास्त रस्ता गाठायचा होता आणि पुढे सोमवार पूर्ण आठवडा बरोबर घेऊन आ वासून बसला होता.

Sunday, July 15, 2018

किल्ले रामदरणे

"Trek Alert" नावाचा एक प्रकार आहे. पत्र आल्यावर जसा आनंद होतो, ना तसाच आनंद असला alert आल्यावर होतो. आत्ताचा alert होता "रामदरणे" किल्ल्याचा.
"सह्याद्रीचे ट्रेकर" वगैरे म्हणवून घेणाऱ्या बहुतांशी लोकांना सुद्धा हा किल्ला माहित नसेल, तर माझ्यासारख्या भटक्याची गोष्टच सोडा. पण असलं नांव वाचून मला प्रचंड आनंद होतो. जत्रा नक्की नसणार या ठिकाणी, निवांत किल्ला पाहता येणार आणि मनसोक्त फोटो पण काढायला मिळणार. फक्त एकच मानसिक तयारी हवी. "किल्ला" म्हणून त्यावर काय बघायला मिळेल हे सांगता येत नाही. पण किल्ला नेमका कुठे दडलाय ते शोधणे आणि त्यावरचे अवशेष शोधून एकमेकांना दाखवणे ह्यात प्रचंड आनंद असतो हे अल्पपरिचित किल्ल्यांची भटकंती करणाऱ्यांना कळेल. अश्या किल्ल्यांची जागा आणि त्यावरचे अवशेष हे अश्याच प्रचंड भटकंती करणाऱ्या लोकांनी लिहून ठेवलेले असतात पण तरीही दुर्लक्षित ठिकाण म्हणून त्यावर लोकांचा राबता नसतो किंवा उलटं म्हणा, लोकांचा राबता नसतो म्हणून दुर्लक्षित! पण कोणीतरी काढलेला ढोबळ नकाशा, कोणीतरी लिहिलेली त्रोटक माहिती तर कोणी लिहिलेल्या दिशा आणि खुणा अश्या गोष्टी जमवून असले किल्ले आणि त्यावरचे अवशेष बघायला मजा येते. नाहीतर रसाळगड सारखा पायऱ्या, बुरुज, वाडा, मंदिर, पाण्याची टाकी आणि 15-16 तोफा बघून सुद्धा त्यावर फार काही नाही बघायला असं म्हणणारेही असतात.
तर असाच एक अल्पपरिचित किल्ला बघायला जाणारा trek alert आला होता. घरून परवानगीही मिळाली, पण... जागाच भरल्या होत्या!!
एक तर संपूर्ण मे आणि जून महिना संपून गेला तरी घरात "ट्रेक" शब्द उच्चारायला मी धजावत नव्हतो. एप्रिलमध्ये काही अनपेक्षित घटना घडल्याने ते धाडस मला करताच येत नव्हते. नशीब! त्यामुळे मग रविवारी बाकीची बारीक सारीक कामं ठरवली, शनिवारी दुचाकीवरून सहकुटुंब जवळच भटकून आलो आणि संध्याकाळी विनीतचा फोन, येणारेस ना उद्या? भरलेल्या जागांपैकी कोणीतरी गळाला होता. नाही म्हणायचा प्रश्नच नव्हता. रविवारची कामं कारणं शोधून बाजूला ठेवली गेली. उशिरा घरी आलो तरी रात्रीच सगळी तयारी करून ठेवली. पहाटे पावणे 5 च्या आधीच घरातून आपल्या दुचाकीवरून निघालो.
पावणे 6 म्हणजे पावणे 6. प्रसाद, कौस्तुभ वेळेवर पोचले विनीतच्या घरी आणि त्याच्या Tiagoने 6 च्या आधीच निघालो. सातपुते काकांना घेऊन अलिबागकडे प्रस्थान केले. पालीकडे जाणाऱ्या फाट्यावर उडुपीच्या "मयुरी" मध्ये तुडुंब न्याहारी करून "मेली ठेचेवर ठेच" करत  वाटेला लागलो. पावसाळ्यात गाडीतून फिरणे ह्यात काहीच मजा नाही म्हणून गाडीत बसूनही होडीत बसल्याचा आनंद मिळवा ह्यासाठी भारत सरकारने ठिकठिकाणी रस्ता तसा बनवून ठेवलेला आहे. (मुंबईत तर पाणबुडीचा ही आनंद घेता येतो म्हणतात बा!)
तर आता भरल्या पोटी ट्रेकचे नेमके ठिकाण, रस्ता, पायथ्याचे ठिकाण अश्या प्रश्नांवर विचार करण्याइतपत शक्ती आली होती. विनीत अर्थात तयारीनिशी असणार ह्यात काहीच शंका नव्हती. पण एकाला दोन बरे म्हणून उपलब्ध माहिती वाचून काढली. रामदरणे हा किल्ला अगदीच दुर्लक्षित. त्याची माहिती फक्त Trekshitij आणि सचिन जोशी यांच्या लिखाणातून मिळाली. ह्या गडावर जाण्यासाठी खूप वाटा आहेत. वायशेत, चोरोंडे, परहूरपाडा, भाल, मूळे आणि कार्ला अश्या गावातून वाटा ह्या किल्ल्यावर जातात. हा किल्ला गावातल्या लोकांनाही तेवढा परिचित नाही, जेवढे इथल्या डोंगरावरचे "रामदरणेश्वर मंदिर" आहे. त्यामुळे ह्या मंदिराची चौकशी करावी. आम्ही परहूरपाडा गावातून जायचा निर्णय घेतला होता. तिकडे चौकशी करत करत एका दुकानात "कृष्णा" नावाचा इसम आम्हाला नेऊ शकतो आणि तो "सोगांव" इथल्या आदिवासी पाड्यात राहतो हे एका आजोबांकडून कळले. परहूरपाडा पासून तसा फार लांब नाही हे सोगांव, आणि जरासा पुढे आदिवासीपाडा. पण ह्या पाड्यापर्यंत गाडी काही जात नाही. थोडी आधीच गाडी थांबवून त्या पाड्यात शिरलो. स्वागत कुत्र्यांनी केले. तिथली माणसं आमच्याकडे ढुंकूनही बघत नव्हती आणि हाकेला ओ पण देत नव्हती. बऱ्याच प्रयत्नांनंतर कृष्णा कामावर गेलेला असून आमच्या बरोबर यायला कोणीही तयार नाही असं कळलं. सोमा कि काहीसं नांव असलेल्या दादांनी जरा दया येऊन घराच्या बाहेर येऊन आमच्याशी बोलायची कृपा केली. मगाशी जिथे चौकशी केली होती त्या दुकानात बसलेला नितीन नावाचा मुलगा हा ह्या सोमाचाच मुलगा निघाला. बऱ्याच विनवण्या केल्यानंतर सोमा येतो म्हणाला पण त्याची गावात गरज आहे म्हणून नितीन आमच्याबरोबर निघाला. पाण्याची टाकी, जुन्या वाड्याचे अवशेष ह्यातले काहीही त्यांना कोणाला माहिती आहे असे दिसत नव्हते पण रामदरणेश्वर मंदिर मात्र पक्के ठाऊक होते. जवळजवळ 11 वाजले होते. Something is better than अजिबात nothing.
त्याच्या भरावशावर निघालो. किल्लाच काय, मंदिरही नक्की कुठेसे आहे ते कळत नव्हते त्या टेकड्या आणि डोंगरांमध्ये. लहान लहान पाण्याचे ओहोळ आणि मधूनच डोकावत असेलेले हिरवे गवत त्या चढाईची जाणीव होऊ देत नव्हते. एक साधारण 15 एक मिनिटांत एक पठार लागले. उजवीकडे लांबवर समुद्रात खांदेरी, उंदेरी दिसत होते. एका बाजूला वर लांबवर असलेले डोंगराचे टोक "कनकेश्वर" अशी ओळख सांगत होतं. पण ज्याच्या शोधात होतो तो किल्ला किंवा मंदिरही नेमके कुठे दडलेय त्याचा नुसताच अंदाज मनात बांधत होतो. समोरच्या डोंगरावर सरळ न जाता नितीनने मोर्चा डावीकडे वळवलान आणि एका बेचक्यात येऊन पोचलो. वाटेत उजवीकडे एक पाण्याचे टाके आहे असे नितीन हलकेच बोलला, पण किल्ल्याशी संबंधित 3 टाक्यांपैकी ते काही असावे असे त्याच्या आवाजात जाणवत नव्हते. सारखे, पाण्याची 3 टाकी, उंच वारूळ, पडक्या वाड्याचे अवशेष असे शब्द मध्ये मध्ये टाकून नितीनच्या माहितीचा अंदाज घेत होतो पण काही आशा दिसत नव्हती. त्या बेचक्याजवळ एक ब्रेक झाला आणि परत दिशांचा अंदाज घेतला. टेकड्या, वाटा अश्या खुणा बांधल्या. बेचक्यातून समोर आलेले उंच टोक, तिथेच मंदिर आहे रामदरणेश्वराचे असे नितीनने सांगितलेन. तिथे पोचल्यावर पुढचे बघता येईल म्हणून मोर्चा मंदिराकडे वळवला.

पठार
खांदेरी-उंदेरी

जंगल आणि मंदिराकडे जाणारा रस्ता
छत्री वाऱ्यापुढे टिकत नव्हती, ती घट्ट पकडली. तिच्याच आडोश्याने कॅमेरा धरून फोटो काढत होतो. निलगिरी सारख्या जातीच्या झाडांच्या बनातून वाट काढत बेडं ओलांडून मंदिरात पोचलो. मंदिराच्या बाहेरच नंदीच्या 2 जुन्या मूर्ती ठेवलेल्या आहेत. मंदिर प्रशस्त आहे, आतमध्ये समोरच एक नंदी असून गाभाऱ्याच्या बाहेर डावीकडे एक गणपती आहे. पिंडीशेजारी 2 शंख ठेवलेले आहेत तर पिंडीवर अभिषेक पात्रही आहे. दररोज पूजा होत असावी.
12 वाजले होते, म्हणजे तासाभरात इथे तर पोचलो होतो. दर्शन घेऊन बाहेर पायऱ्यांवर बसून आणलेल्या खाऊवर ताव मारला. पावसाने आता चांगलाच जोर धरला होता. पुन्हा माहिती वाचन आणि अंदाज घेणे चालू झाले. मागे एक डोंगर, त्यावर न जाता वळसा घालून आलो तिथेच किल्ला असावा असं मला वाटत होतं. नितीनला देवीचे मंदिर माहिती होते, ते ह्या रामदरणेश्वराला नमस्कार करताना बरोब्बर पाठीकडे खालच्या बाजूला येते. 5 मिनिटातच खाली उतरून त्या मंदिरात पोचलो. वाटेत एक लहानसा ओढाही लागला.

रामदरणेश्वराचे मंदिर
देवीचे हे मंदिर मात्र जीर्णोद्धार झालेले आहे. परहूरपाडा मधून एक वाट इथे येते असं नितीन म्हणाला. जुन्या मंदिरातल्या मूर्ती इथे आणून ठेवलेल्या आहेत. बाहेर ठेवलेल्या 4 मूर्ती ओळखू न येणाऱ्या आहेत तर आतमध्ये देवीची नवीन मूर्ती आहे. मंदिराचे नवीन बांधकाम अजून पूर्ण झालेले नाही. आता खुणा जमत होत्या पण दिशा लक्षात येत नव्हती. नितीनच्या तर अजूनही गडाचे काहीही अवशेष लक्षात येत नव्हते.
मंदिराच्या बरोबर समोरचा डोंगर (देवीकडे तोंड करून उभं राहिल्यावर मागचा डोंगर) चढून गेल्यावर खरं तर किल्ला दिसतो. त्या डोंगराकडे निघालो तर जवळच अजून काही मूर्ती डावीकडे ठेवलेल्या नितीनने दाखवल्यान. ह्या मूर्ती मस्त आहेत, रेखीव. ह्यात महिषासुर मर्दिनी आणि खंडोबाच्या मूर्ती सहज ओळखता येतात. अजूनही काही मूर्ती इथे आहेत. परत वाटेला लागलो आणि माथ्यावर आलो तर पलीकडे एक डोंगर दिसला. जिकडे जायचे त्या वाटेवरून काही आवाज पण ऐकू आले. किल्ला शंभर टक्के तिकडेच असणार असा अंदाज बांधला तर काही लोकं भेटलेच. हे trekshitij वालेच लोक होते जे काही ट्रेकर ना घेऊन आलेले होते.

देवीचे मंदिर
महिषासुर मर्दिनी, खंडोबा आणि इतर मूर्ती
समोरचा किल्ला आणि उतरलेला डोंगर याच्या मधल्या घळीत हे लोक भेटले आणि खुणेचे 4 फुटी वारुळही दिसले. ही घळ मानवनिर्मित असून किल्ला आणि डोंगर वेगळा करण्यासाठी निर्माण केलेली आहे असे उल्लेख आहेत. ते वारूळ दिसल्यावर वाचलेली माहिती डोळ्यासमोर आली आणि आता आम्ही नितीनला वाट आणि खुणा दाखवू लागलो. वारूळ उजवीकडे आहे. उजवीकडून त्याच्याच बाजूने जाणारी वाट 3 टाक्यांकडे घेऊन जाते, तर डावीकडची वाट बुरुज आणि अवशेषांकडे जाते. आधी उजवीकडे टाकी बघायला जावे. वाट मळलेली आहे, चुकत नाही. पण वाट खचलेली आहे आणि अरुंद. पूर्वी वाट चांगली असावी पण पावसाने दरड कोसळून खूप लहान लहान दगड वाटेवर आलेले आहेत. सांभाळून गेल्यावर 10 मिनिटात गडाच्या अवशेषांचे म्हणजे टाक्याचे दर्शन होते. पहिल्या टाके, नंतर दुसरे टाके. त्यातून जास्तीचे पाणी बाहेर काढण्यासाठी सुंदर दगडी पन्हळ खोदलेली आहे. लगेचच पुढे तिसरे मोठे आणि 2 खांबांवर तोललेले टाके आहे. ह्या टाक्यात एका भिंतीवर गणपतीआदी देवांची चित्रे असलेल्या 2 फारश्या लावलेल्या आहेत. पाणी पिण्यायोग्य आहे. इथूनच एक वाट खाली वायशेत गावाकडे जात असावी.

पाण्याचे टाके १

पाण्याचे टाके २ आणि पन्हळ

पाण्याचे टाके ३
बुरुज आणि उर्वरित अवशेष बघण्यासाठी वारुळाकडे परत यायचे आणि सरळ उजवीकडे वरच्या बाजूला जायचे. (आता डावीकडे असलेली वाट म्हणजे जिकडून आलो तिकडे परत जाणारी वाट.) झाडी दाट आहे, झाडांच्या फांद्यापासून झालेल्या कमानीतूनही जावे लागते. इकडे चावऱ्या उपद्रवी माशा आणि डास खूप आहेत. कदाचित पावसामुळे असाव्यात. ही वाट गोलाकार बुरुजावर घेऊन जाते. वाट बुरुजवरच जाते तर पलीकडे दगडाने बांधीव भिंत दिसते. हा आणखी एक बुरुज असावा. आणि ह्या 2 बुरुजांच्या मधून मूळ वाट वर येत असावी. इथे पायऱ्यासदृश काही दगडही दिसतात. बुरुज डावीकडे ठेवत वाट सरळ वरती माथ्यावर घेऊन जाते. इथे डावीकडे एक टोक जाते त्या बाजूला वाटेवरच काही अवशेष दिसतात, हे वाड्याचे जोते असावे. पुढच्या टोकावर काही नाही. इथे गडाचे अवशेष बघून पूर्ण होतात. इथून कनकेश्वर, सागरगड दिसतात तर पाऊस आणि धुके ह्यामुळे आणखी काही स्पष्ट दिसू शकले नाही.
आता 2 वाजून गेले होते, म्हणजे पायथ्या पासून निघून 3 तास झाले होते. पण गड आणि अवशेष सापडल्याचे समाधान होते. पाऊस जराचीही उसंत घेत नव्हता.

बुरुज आणि अवशेष

परत फिरलो. नितीनला आता पुढे येणाऱ्यांना इथे घेऊन हेच अवशेष दाखव म्हणून सांगितले. परत वारूळ, मुर्त्या आणि देवीचे मंदिर इथे येऊन पोचलो. वाटेत काही खाऊ आणि चिवड्याचे बकाणे भरले. आता मात्र रामदरणेश्वराला खालूनच नमस्कार करून वर न चढता तो डोंगर डाव्या बाजूला ठेवत उजवीकडच्या वाटेने त्याला वळसा मारून परत पठारावर आलो. वाटा मात्र भरपूर असल्याने नेमकी वाट सापडणे कठीण जाते. माहितगार किंवा गावातला माणूस बरोबर असणे उत्तम. ससे पकडण्यासाठी लावलेले सापळेही दिसत होते. हिरवागार गालिचा अमच्यासाठीच पसरलेला होता. फोटो काढायचा मोह काही आवरला नाही. पटापट खाली आलो. पाऊसही तसा कमी झाला होता. साडे 3 झाले होते. ओले कपडे बदलून परतीच्या प्रवासाला लागलो. आमचं जेवण तसं झालेलं नव्हतंच. वाटेत गरम पोळ्या, भाजी पुलाव वगैरेंवर ताव मारला आणि परत एकदा ठेचेवर ठेच करत express highwayला लागलो आणि 10-10:15 ला घरी पोचलो.

परतीच्या वाटेवर - हिरवागार गालीचा


लहानगे ओहोळ
घरातून निघून पूर्ण किल्ला बघून परत घरी येईपर्यंत पावसाने काही पाठ सोडलीन नव्हती. 4 दिवसांपूर्वी ज्या किल्ल्याचे नावंही माहिती नव्हते तो किल्ला पूर्ण बघून झाला होता.