Thursday, February 1, 2018

किल्ले अंकाई-टंकाई - II

अंकाई
अंकाईकडे जाताना वाटेत एका खोलीचे अवशेष शिल्लक आहेत, तिच्या मागूनच कातळ कोरीव पायऱ्यांची वाट पहिल्या दरवाजाकडे घेऊन जाते. त्याच्या मागे लगेच दुसरे प्रवेशद्वार आहे. पाहरेकर्‍यांसाठी असलेल्या देवड्या प्रशस्त आहेत. डावीकडे तटबंदी आहे तर समोर झाडांनी वेढलेली २ टाकी आहेत. उजवीकडे भग्न लेणी आहेत. ह्या लेण्यांना ब्राह्मणी लेणी म्हणून ओळखतात, गर्भगृह सुस्थितीत आहे, प्रवेशद्वारावर जय-विजय अश्या मूर्ती आहेत आणि अजूनही काही भग्न मूर्ती आहेत. आतमध्ये दरवाजाएवढीच मोठी मूर्ती असून इथे भरपूर वटवाघळे आहेत. नागमोडी वाट पुढच्या दरवाजापाशी जाते. व्दाराच्या बाजूला दोन भव्य अष्टकोनी बुरुज आहेत. एकामागून एक ३ दरवाजे ह्या चढवाटेवर आहेत. पायऱ्या सुस्थितीत आहेत. त्यावर चढून गेल्यावर मागे वळून बघितल्यावर टंकाई किल्ला पूर्णपणे खिंडीपासून मुख्य दरवाजापर्यंत छान दिसतो. अजून २ दरवाजे ओलांडल्यावर समोरच मुंजा महाराज म्हणून रंगवलेली मूर्ती आहे. डाव्या बाजूला एक वाडा आहे, पुढे डाव्या बाजूला २ आणि उजव्या बाजूला २ अशी निवडुंगात लपलेली पाण्याची टाकी आहेत. त्यातली ३ भरलेली तर एक कोरडे होते. 

ब्राह्मणी लेणी
अजून काही पायऱ्या चढल्यावर समोरच गुहा आहे, हिला सीता गुहा म्हणतात. त्याच्या बाहेरच पाण्याचे टाके आहे तर आतमध्येहि खांब असलेले पाण्याचे टाके आहे. दरवाजे जाळीच्या दरवाजाने कुलूप लावून बंद केलेले आहेत. हि वाट उजवीकडून पुढे अगस्ती ऋषींच्या आश्रमाकडे जाते. आधी डावीकडेच उंचावर पाण्याचे टाके आहे आणि खोलीही आहे. ह्या आश्रमात एक बाबा आणि त्यांचे शिष्य राहतात. आतमध्ये अगस्ती ऋषी, राम-सीता, विठ्ठल-रुक्मिणी, शिव-पार्वती अशी संगमरवरी बांधलेली मंदिरे आहेत. राहणाऱ्या बाबांचे पोथी-पुस्तके असे गीता वगैरे साहित्य इथेच आहे. तर लहान मंदिरांच्या मागेही त्यांचे गॅस सिलेंडर, चादरी वगैरे सगळे समान खोल्या-खोल्यात आहे. गुहेबाहेर समोरच झाडाला पार बांधून काढलेला आहे आणि बसायला बाकडेही आहेत. पारावर हनुमान आणि शंकराचे मंदिर आहे. इथे खिंडीतून आलेली माकडे बिनधास्त हिंडत होती. गाऱ्हाणं सांगत गावकरी बसले होते. चढायला सुरुवात केल्यापासून आता पहिल्यांदा पाणी प्यालो. आता मागच्या बाजूला निघालो तर डावीकडेच छोटेसे भुयार दिसले, वर निवडुंग होते आणि माकडेही किचकीच करत निघून गेली. ३*३ च्या छोट्याश्या भुयारात, आतमध्ये मात्र ३ एकशे पान सहज उठेल असे मोठे सभागृह आहे. ४-५ खांबी पाण्याचे टाकेही आहे. 

काशीकुंड आणि अगस्ती ऋषींची समाधी
आत न घुसता गडाच्या मागच्या बाजूला निघालो. समोरच काशीकुंड नावाचे पाण्याचे तळे आहे. तळ्यात बरोबर मध्यभागी अगस्ती ऋषींची समाधी आहे. तिथे जाण्यासाठी दगडी मार्गही आहे. तळ्याच्या आधी डावीकडे ४ छोटी मंदिरे/समाधी आहेत. इथे स्वतःचा फोटो काढलाच. काशीकुंड ओलांडून पुढे गेल्यावर एक गढूळ पाण्याचा तलाव लागला. पुढे अजून एक बांधीव तलाव आहे. पाणी पिण्यायोग्य नाही. समोरच जुना गढी छाप राजवाडा अशी वास्तू आहे, त्याचे छप्पर पूर्णपणे नाहीसे झालेले असून आतमध्ये २ खोल्या आहेत. हि वास्तू म्हणजे गडाच्या ह्या टोकाचा शेवट आहे.चारही बाजूंनी मजबून तटबंदी आहे तर आतील बाजून ३५ एक कमानी आहेत. आतमध्ये खूप खोल्या असाव्यात. बरोबर मध्ये एक कोरडा पडलेला तलाव आहे. डावीकडे शाबूत असलेल्या खोलीवरती पीराचे स्थान आहे. बाहेर एक थडगेही आहे. डावीकडच्या पडक्या दरवाजाने बाहेर पडताना पूर्ण राजवाडा कॅमेरात टिपून घेतला. 

राजवाडा
तलावाजवळून आश्रमाकडे निघालो. वाटेत माकडांची टोळी बसलेली होतीच. दोघेही एकमेकांना घाबरत होतो. हातातली काठी कोणावरही न उगारता नुसती समोर धरून सुरक्षितरित्या टोळ्यातून बाहेर पडलो. आश्रमाच्या वरती टेकडी आहे, पायवाट त्यावर घेऊन जाते. वाटेत उजवीकडे कोरडे पडलेले तळे दिसते तर जवळच ३*३ चे भुयार आणि आतमध्ये आधीच्यासारखीच खोली आणि दगडी खांब असलेले टाके आहे. गडाच्या ह्या सर्वोच्च माथ्यावर फक्त एक ध्वज आणि दगडी कट्टा आहे,. पूर्वी इथे कदाचित मंदिर असावे. इथून अगस्ती समाधी, मागे २ तळी, राजवाडा दिसतो. पलीकडे गोरखगड, कात्रा, उजवीकडे हडबीची शेंडी दिसते. खाली हायवे, डावीकडे अंकाईकिल्ला रेल्वे स्टेशन तर उजवीकडे मनमाड स्टेशन दिसते. बरोबर मागे टंकाई किल्ला, विस्तीर्ण पठार आणि एकाकी महादेवाच्या मंदिरासकट सुंदर दिसतो. सोय असेल तर ३६० अंशातून Panorama फोटो जरूर घ्यावा. दुसऱ्याच एका वाटेने आश्रम ओलांडून पलीकडे असलेल्या आधीच्या गुहेकडे खाली उतरलो. गड पाहून झाला होता. खिंडीकडे निघालो. गड संपला वाटत असतानाच उतरताना दरवाजाच्या उजवीकडे अजून एक गुहा दिसली, जवळ गेलो तर डावीकडे अजून २ मोठ्या गुहा दिसल्या. अश्या राहण्यायोग्य जागा गडावर खूप आहेत.
कामगारांची कामं जोरात सुरु होती. खालून येणाऱ्या वाटेवर ते बिनधास्त दगड ढकलून देत होते. हाक मारून त्यांना थांबायला सांगितले. २-३ मिनिटातच खाली मुख्य लेण्यांजवळ येऊन पोचलो. लेण्यांची देखरेख करायला ठेवलेला सरकारी माणूस येऊन बसलेला होता. त्याने काही दरवाजे उघडून मला आतमधून लेणी पाहू दिली. स्वताहून मूर्ती दाखवत होता आणि चक्क वरच्या मजल्यावर जायची भुयारी वाटही दाखवलीन. तिथून वरही घेऊन गेला, मनसोक्त फोटो काढू दिलेन. सगळे दरवाजे उघडून पूर्ण लेणी बघू दिलीन. घरातून आणलेल्या पाण्याच्या बाटल्या भरलेल्या होत्या, त्या सरळ ओतून टाकल्या. काढणं होतंच, त्याने पाणी काढले. "इथल्या पाण्याने सर्दी होईल, खाली गावात जाऊन चांगले पाणी प्या" ह्याकडे दुर्लक्ष केलं. मेलं कोंबडं आगीला थोडंच भीतं? मी भरल्या नाकानेच तिथे पोचलेला होतो. बिनधास्त पाणी प्यालो, बाटलीही भरून घेतली.
अवघ्या ३ तासांत दोन्ही गड मनसोक्त भटकून निवांत फोटोही काढले होते. २ वेळा लेणीही बघून खाली आलो होतो. गाडीवर टांग टाकून परत हायवेला लागलो.
दोनच दिवसांपूर्वी शेगावला जाताना वाटेतच बहादरपूर किल्ला अनपेक्षितरित्या बघायला मिळाला होताच. हायवेवरूनच लळिंग, कात्रा आणि गोरखगडचेही दर्शन घडले होते. हि यात्रा सुफळ-संपूर्ण झाली होती.

किल्ले अंकाई-टंकाई - I

जिल्हा: नाशिक
प्रकार: गिरिदुर्ग
श्रेणी: सोपी
डोंगररांग: सातमाळ


पुण्याकडून शिर्डी-कोपरगाववरून मनमाडकडे जाताना उजव्या बाजूला हे जोडकिल्ले आहेत. माझी सासुरवाडी कोपरगावपासून अवघ्या ३५ किमी अंतरावर हे किल्ले आणि लेणी आहेत, हे कळल्यानंतरही जाण्याचा योग मात्र येत नव्हता. तसे हे आडवाटेचे किंवा दुर्गम वगैरे किल्ले नाहीत. व्यवस्थित सर्वांना माहिती असणारे, पुरातत्व खात्याने संरक्षित करून लेण्यांपर्यंत पायऱ्या वगैरे बांधलेले हे ठिकाण आहे.
यावेळी मात्र योग (डाव किंवा संधीही म्हणा हवं तर) संधी साधली. दुचाकीवरून सकाळी ७ च्या आधीच निघालो. रस्त्यावर व्यवस्थित फलक लावलेले आहेत. हायवेपासून २ किमीवरच पायथा आहे. गांव केव्हाच जागं झालं होतं. पण किल्ल्यांवर कोणी दिसत नव्हतं. अर्थात स्थानिकांना काय गरज म्हणा सकाळच तिकडे फिरायची. निवांत एकटाच पायथ्याला गाडी लावून निघालो. अवघ्या ५-१० मिनिटांतच लेणी आहेत. पुरातत्व खात्याद्वारे संरक्षित स्थळ असले तरी प्रवेश फी वगैरे काही नाही. स्वच्छताही उत्तम आहे. छोटी २ खोल्यांची लेणी लगेच आहेत, ह्या लेण्यांत कोरीवकाम किंवा मूर्ती नाहीत. लगेचच १० पायऱ्या चढल्या कि लेण्यांची साखळी आहे. ह्यातील पहिल्या लेण्यांच्या समोर पाण्याचं टाकं आहे, पाणी पिण्यायोग्य उत्तम आहे. ही लेणी दुमजली आहे. मंडपाच्या व्दारशाखेवर सुंदर कोरीवकाम आहे. सभामंडप चार खांबांवर आहे. खांबांच्या टोकाला यक्ष कोरलेले आहेत. छतावर पाकळ्या असलेले सुंदर कमळ कोरलेले आहे. सभामंडपातूनच वरच्या मजल्यावर जाण्यासाठी जिना आहे. ह्यातील कोरीव पायऱ्याही सुंदर आहेत. जागाही अडचणीची नाही. वरच्या मजल्यावर मूर्ती वगैरे काही नाहीत. खोल्या आणि खांब आहेत. 

दुमजली लेणी
खाली परत येऊन दुसऱ्या लेेणीकडे गेलो, बाहेरच मूर्ती आहेत. डाव्या बाजूला यक्षाची मूर्ती, तर उजव्या बाजूला इंद्राणीची मूर्ती आहे. हीच अंकाई देवीची अतिशय सुंदर मूर्ती. देवी साडी वगैरे शृंगारांनी सजवलेली आहे. पुढच्या लेणीमध्ये डाव्या बाजुला किचकाची आणि उजव्या बाजुला अंबिका देवीची मूर्ती कोरलेली आहे. अजूनही लेणी आहेत आणि त्यात भगवान महावीर, जैन तीर्थंकर वगैरे सुंदर मूर्ती आहेत. सर्व लेण्यांना जाळीचे दरवाजे लाऊन कुलूप लावून बंदिस्त केलेले आहे. नीट निगा राखलेली ही लेणी म्हणजे जैन-हिंदू संस्कृतीचा सुंदर मिलाफ आहे. हि लेणी अंकाईची लेणी म्हणून प्रसिद्ध आहेत, वास्तविक ती टंकाई किल्ल्यात कोरलेली आहेत.

अंकाई देवीची अतिशय सुंदर मूर्ती

लेण्यांच्या डावीकडूनच किल्ल्यांकडे जायला पायऱ्या आहेत, मात्र ह्या सरकारी बांधलेल्या पायऱ्या लगेच संपतात आणि जुनी वाट किल्ल्यांच्या खिंडीत घेऊन जाते. वाटेवरूनच खिंडीच्या तटबंदीचे दर्शन मन मोहून टाकते. जोडकील्ल्यांची इतकी सुंदर तटबंदी महाराष्ट्रात आणखी कुठेही नाही. (हि माहिती वाचीव आहे, आपण कुठे सगळे किल्ले फिरलोय!) खिंडीच्या दरवाजातून वर गेल्यावर डाव्या बाजूचा किल्ला अंकाई, तर उजव्या बाजूचा टंकाई आहे. 

जोडकील्ल्यांची सुंदर तटबंदी
मी उजवीकडे टंकाई किल्ल्याकडे मोर्चा वळवला (भगवान चिले यांनी पुस्तकांत म्हटलेय कि आधी टंकाई बघावा म्हणून टंकाई, उगाच चर्चा नाही ;)) इथे किल्ल्यांच्या डागडुजीचे काम करण्यासाठी आणून ठेवलेली यंत्रसामुग्री दिसली. कामगार अजून आले नव्हते. किल्ल्याकडे जाणारी तटबंदी थोड्या अंतरापर्यंत शिल्लक आहे, हळू हळू ती ढासळत गेलेली दिसते. कातळ कोरीव पायऱ्यानंतर बांधीव पायऱ्या आहेत, इथे डाव्या बाजूला खाली २ लंबूळकी टाकी आहेत. एकात पाणी होते, ते पिण्यायोग्य आहे. ढासळत चाललेली तटबंदी इथे पायऱ्यांना येऊन मिळते. इथून पुढे वाट उजवीकडे जाते, पायऱ्यांवर वरून पडलेली दरड आहे त्यामुळे पायऱ्या अरुंद राहिल्या आहेत. नागमोडी वाट परत डावीकडे वळताना उजवीकडे अंकाई किल्ला छान दिसतो. पूर्वेकडून सूर्य आपल्या प्रकाशकिरणांनी त्या सौंदर्यात अजूनच भर टाकत होता. एकटाच असलो तरी इथे दगडावर कॅमेरा ठेऊन स्वतःचा फोटो काढायचा मोह मी आवरला नाही. अंकाईच्या मागे उजवीकडे गोरखगड किल्ला (कि कात्रा?) आणि अजून उजवीकडे हडबीची शेंडी दिसते. खाली रेल्वेचा रस्ता डावीकडून अंकाई किल्ला रेल्वेस्टेशन कडून येऊन २ फाटे फुटून मनमाडकडे गेलेले दिसतात. हायवेवरून पवनचक्कीची प्रचंड मोठी पाती घेऊन जाणारी अवजड वाहनेही दिसत होती.

टंकाई
वरच्या महादेवाच्या मंदिरात पूजा करून परतणारा गावकरी भेटला. मी एकटाच, कॅमेरा वगैरे घेऊन वर निघालेला दिसल्याने त्याला प्रचंड आश्चर्य वाटले. एक तर बहुतेक लोक अंकाईवर जाऊन परततात. टंकाई वर (ट्रेकर/किल्ले प्रेमी सोडल्यास) फारसे लोक येत नाहीत त्यामुळे त्याला जास्तच कौतुक वाटत होते, माझे नाही, त्याच्या गावाला लाभलेल्या किल्ल्यांचे! या गडावर काळ्या तोंडाची माकडे खूप आहेत, एकटे बघून खाणं मिळेल म्हणून ती कदाचित अंगावर येतील म्हणून मला त्याने सावध केले. तशी ती माकडं मला खिंडीतच भेटली होती. पण येतानाच वाटेतून मी एक लहानशी काठी बरोबर ठेवली होती, जराशी भीती दाखवण्यासाठी, त्यामुळे कदाचित ती फिरकली नाहीत माझ्याजवळ. तसेही खायलाही फक्त उपमा होता तो सॅकमध्ये ठेवलेला होता. हातातला कॅमेरा त्यांच्यासाठी अतिशय निरुपयोगी वस्तू असल्याचे त्यांना कदाचित माहित असावे.

एकाकी महादेवाचे मंदिर
टंकाई च्या दरवाजातच डावीकडे २ थडगी आहेत. दरवाजावर चढून मागचा अंकाईचा सुंदर view मिळणारा फोटो काढायचा मोह मी आवरला आणि वरच्या दिशेने महादेवाचे दर्शन घ्यायला निघालो. डाव्या बाजूला पिण्यायोग्य पाण्याचे टाके आहे. तर समोर कातळावर गोल आकारात छोटे छोटे गोल गोल खड्डे खोदलेले आहेत. समोरच विस्तीर्ण पठारावर एकाकी असे महादेवाचे मंदिर आहे. मंदिर अतिशय सुंदर आहे आणि त्यावर नक्षीही कोरलेली आहे. नंदी आणि शंकराची पिंडही आहे. मंदिराच्या समोर एक दगडी कट्टा आहे आणि लागुनच कोरडा पडलेला तलाव आहे. या गडावर अजून काही अवशेष शिल्लक नाहीत. आता मात्र स्वतःला आवरले नाही, परतीच्या मार्गावर दरवाजावर चढून समोरच्या अंकाईकिल्ल्याला गोरखगड आणि हडबीच्या शेंडीबरोबर कॅमेरात कैद केले. स्वतःचे फोटो मात्र हवे तसे काढता आले नाहीत. दरवाजावरील दगड हळूहळू ढासळत चालले आहेत. खिंडीकडे परत निघालो, तिथली यंत्र आता चालू झाली होती. कामगार निवांत तंबाखू मळत फेसबुकवरच्या कुठल्याश्या फोटोविषयी चर्चा करत होते. माकडं मात्र तिथून आता गायब झालेली होती.