Wednesday, March 14, 2018

रसाळगड, सुमारगड आणि महिपतगड - II

महिपतगड
थोडासा फराळ केला आणि एक वाजायच्या आधीच महिपतगडकडे वाटचाल चालू केली. सिताराम जाधव यांच्या घराच्या मागच्या बाजूने ही वाट वरती महिपतगडाकडे जाते. वाटेतच 5 मिनिटांवरच एक विहीर आहे. ह्या विहीरीचे पाणी हे सर्व लोक पिण्यासाठी वापरतात. वाडी-बेलदार गावात ५-७ घरं मिळून सुमारे १८-२० लोकच राहतात. बहुतेकांची मुलेबाळे शिक्षणासाठी-नोकरीनिमित्त मुंबईत आहेत. या विहिरीतले पाणी अत्यंत सुंदर आहे. सीताराम काकांच्या बोलण्यातून विहिरीचे कौतुक लपत नव्हते. त्यांनी खास काढणे आणि Can आणला होता पाण्यासाठी. आम्ही आपापल्या बाटल्यात पाणी भरून घेतले आणि विहीर उजवीकडे ठेवत डाव्या बाजूच्या वाटेने वर निघालो. येथून वळून पाहिले तर सुमारगड स्पष्ट दिसतो. ही वाट चुकण्याची फारशी शक्यता नाही, मळलेली आहे. डावीकडेच काही अंतरावर एक बुरुज स्पष्ट दिसतो हा बुरुज आपल्याला सुरुवातीपासूनच खुणावत असतो पण तरीही हा बुरुज डावीकडे ठेवत आपण पुढे गेल्यावर समोरच एक बांधकाम दिसते आणि त्यातले एकही भोकही. इथे परत इतरांची वाट बघत थांबलो. सर्वांना येऊ दिले. इथे यायला जेमतेम ३० मिनिटे पुरतात. हे बांधकाम म्हणजे खेड/गायमुख दरवाजा. त्याच्या मागून वाटेने पुढे गेल्यावर अजून एक मोठी बांधीव विहीर आहे. या विहिरीला पंप लावून पाणी गावात यायची सोय केली आहे. 

खेड/गायमुख दरवाजा
विहिरीच्या डावीकडून वाट पारेश्वर मंदिराकडे जाते. तिकडे आधी न जाता ही विहीर समोर ठेवत उजवीकडे जावे. इथून गडाचे अवशेष दिसायला सुरू होतात. आमच्याबरोबर वाटाड्या असल्यामुळेच हे अवशेष शोधायला त्रास पडला नाही. गडावर पूर्णपणे जंगल पसरलेले असल्यामुळे वाटाड्या सोबत असणे गरजेचे ठरते नाहीतर खूप वेळ जाईल. जंगल घनदाट आहे समोरच जोत्यावर एक मंदिर आहे ज्यावर हनुमानाची आणि गणपतीची मूर्ती ठेवली आहे. ह्या मूर्ती पश्चिममुखी आहेत. या मूर्तीजवळ आम्ही आरती केली. परत मागे फिरून आम्ही उजव्या बाजूला दिसत असलेल्या अवशेषांकडे गेलो इथे तीन मोठे चौथरे दिसतात. जागोजागी मुंग्यांचे वारूळही आहेत. थोडे डावीकडे घेऊन गेल्यावर 1 पीराचे ठिकाण दिसते. हे अतिशय सुंदर दगडी बांधकाम आहे. 

पश्चिमाभिमुख मारुती आणि गणपती
पीराचे ठिकाण - सुंदर बांधकाम
ही वाट अशीच घनदाट जंगलातून पुन्हा मोकळ्या जागेत जाते तिथे होळीचा माळ आहे. तिथेही काही अवशेष शिल्लक आहेत. तिथून पुढे गेल्यावर वाटेत पूर्वाभिमुख हनुमानाची मूर्ती आहे तर शंकराची पिंडही आहे. आमच्या वाटाड्यानी मात्र ती आम्हाला दाखवलनी नाही. पुढे वाट उत्तरेकडे असलेल्या कोतवाल दरवाजाकडे जाते. त्याचेही काही अवशेष शिल्लक नाहीत. पूर्वेला पुसाटी दरवाजा आहे असे उल्लेख आहेत. समोर महाबळेश्वर दिसते. शेजारीच भीमाची काठी, मधु-मकरंदगड, पर्वत, चकदेव तर खालच्या बाजूला उजवीकडे वडगाव दिसते. समोर डावीकडे प्रतापगड असावा. उजवीकडून पुढे गेल्यावर समोरच सुमारगड दिसतो. इथून वाट खाली वडगावमध्ये उतरते. इथून खालच्या बाजूला आग्नेयेस यशवंतदिंडी दरवाजा आणि २ बुरुज आहेत. तिथे न वापरलेल्या चुन्याचे काही अवशेषही आहेत. तिकडे खालच्या बाजूला न जाता वरतीच एक ग्रुप फोटो घेऊन आम्ही मागे फिरलो. 

ग्रुप फोटो
आता आमचे ठिकाण होते पारेश्वर मंदिर. या मंदिराजवळ लहान-मोठे बरेच अवशेष शिल्लक आहेत एक चौथरा आहे. मंदिराच्या जवळच डावीकडे काही अवशेष आहेत मंदिराच्या समोरच पिण्याच्या पाण्याची विहीर आहे मंदिरात बऱ्याच छोट्या छोट्या मूर्ती असून पारेश्वराची  शंकराची पिंड आहे तसेच त्रिशूळ घेतलेली एक मूर्तीही आहे. पिंडीसमोर नंदीची मुर्तीही आहे. समोरच तुळशीवृंदावन असून त्याच्या शेजारी तोफेचा गोळा ही ठेवलेला आहे. मंदिराला उजवीकडे ठेवत डावीकडून एका चौथऱ्याला वळसा मारून परतीच्या वाटेवर पुन्हा काही अवशेष बघायला मिळतात. हे अवशेष सगळे गवतात दडून बसलेले आहेत. डावीकडे ती मोठी विहीर ठेवत उजवीकडे वाट जाते. तिथे गडाची माहिती वाचन झाले. वाट पुढे उजवीकडे जाऊन एका दरवाजाकडे जाते. (शिवगंगा दरवाजा?) इथे पुन्हा शंकराची पिंड-नंदी आहे. एक-दोन तोफगोळे शिल्लक आहेत. थोडी साफसफाई केली, उजव्या बाजूला एक कोरडा पडत चाललेला पाण्याचा साठा आहे. समोरच दहिवलीतून येणारी वाट दिसते. इथे शिवगंगा दरवाजाचे अवशेष असावेत. डावीकडच्या वाटेने गेल्यावर आपण त्या बुरुजावर जातो जो आपल्याला सुरुवातीपासूनच खुणावत होता. इथून आपल्याला गाव स्पष्ट दिसते. उजवीकडे दहिवलीतून वर आलेली वाट शिवगंगा दरवाजाकडे गेलेली दिसते. मागे फिरून पुन्हा उजव्या बाजूला आपण वर येताना आलेल्या वाटेने परत जायचे. साडे चार वाजेपर्यंतच आम्ही खाली परत आलो. 
शंकराची पिंड-नंदी. एक-दोन तोफगोळे
किल्ल्याला एकूण सहा दरवाजे आहेत. ईशान्येकडे लालदेवडी दरवाजा, पूर्वेस पुसाटी दरवाजा, दक्षिणेकडे खेड दरवाजा, पश्चिमेस शिवगंगा दरवाजा, उत्तरेकडे कोतवाल दरवाजा, आग्नेयेस यशवंत दरवाजा. एक तर त्याचे फारच कमी अवशेष शिल्लक आहेत आणि जे आहेत त्यातलेही सगळे बघायला मिळाले नाही. आता गावात न थांबता जेवून रसाळवाडीला जायचे होते. सव्वा सहाच्या दरम्यान जेवण आमच्या समोर आले. फारशी भूक अशी लागली नव्हती. एक तर ऊन तापत होते आणि ही तशी ही जेवायची वेळही नव्हती. पण जेवायला बसलो. गरम-गरम तांदळाची भाकरी, बटाटा रस्सा, भात आणि मुगाची आमटी. नाही म्हटलं तरी बऱ्यापैकी खाल्ली गेली. 
रसाळगड
काल रात्री तो घाट चढून आलो होतो त्यावेळी अंधार होता. उतरण्यासाठी सातच्या आधीच तिथून निघालो. आता सगळ्यांनी तो घाट बघितला. रसाळवाडी शोधत निघालो रसाळवाडीचा हा फाटा डावीकडे आहे. तिथून साधारण पाच-सात किलोमीटरवर वाडी आहे. इथेही डांबरी रस्ता असला तरी धाकधूक होतीच. पुन्हा डांबरी रस्ता संपला, कच्चा रस्ता सुरू झाला आणि आम्ही चार जण उतरून पुढे रस्ता बघायला गेलो. ८ वाजून गेले असतील, अंधार पडल्याने काहीच समजत नव्हते. खालच्या बाजूला वाडीत घरं दिसली. आमच्या डोक्यावरचा टॉर्च त्यांना दिसल्यावर खालनं आवाज आले. थोडी चौकशी केली तर साधारण डांबरी रस्ता जिथे संपतो तिथेच आसपास पायर्‍या असाव्यात अशी शक्यता वाटली. तशीही पुढे गाडी नेण्यासारखी जागा नव्हतीच. सरळ मी आणि नितीन असे दोघेजण पायर्‍या शोधात निघालो. पायवाट संपल्यावर पुढे टाकी आणि बांधीव पायर्‍या दिसल्या. आता सगळ्यांना बोलावण्यास काहीच हरकत नव्हती पण खात्री करून घेण्यासाठी तसेच पुढे निघालो. 

मिशीवाला हनुमान
साधारण साडेआठ झाले होतेच. पायऱ्या चढून पुढे गेलो आणि एक दरवाजा लागला. दरवाजा ओलांडून पुढे गेल्यावर काही पायर्‍यानंतर समोरच एक हनुमानाचे मंदिर आहे. विशेष म्हणजे या हनुमानाला असलेली मिशी! उजवीकडून वळसा मारून वर गेल्यावर अजून एक दरवाजा लागतो या दरवाजाला सुंदर कमान आहे. पायऱ्या तशाच पुढे जातात. वाटेत डावीकडे चुन्याचा घाणा दिसतो. हा भाग पुरातत्त्व खात्याने बांधून काढलेला आहे. अजून एक दरवाजा लागला की हा मार्ग संपतो. लगेच डाव्या बाजूला एक आणि उजव्या बाजूला एक अशी तोफ ठेवलेली आहे. समोर पायवाटेने गेल्यावर आम्हाला बॅटरीच्या प्रकाशात ते झोलाई देवीचे मंदिर दिसले. मंदिरा जवळ पोचलो. मागून मुकुंद जाधवसरही आलेच. बाकीच्या मंडळींना बोलावण्याआधी अजून काही खात्री करुन घ्यावी म्हणून मंदिराच्या पलीकडचे पाण्याचे टाके बघून ठेवले. पाणी पिण्यायोग्य आहे. मंदिरात विजेची सोय आहे, पंखे आहेत. मंदिरासमोरच दिपमाळ आहे, त्याच चौथऱ्यावर तुळशी वृंदावन आहे, एक लहान तोफही ठेवलेली आहे. जवळ एक चूल मांडलेली दिसते. जवळच लाकडे आहेत. दीपमाळे जवळच तुळशीवृंदावन आणि एक तोफ ठेवलेली आहे. तसंच मंदिराच्या कठड्यावर अजून एक तोफ ठेवलेली आहे. मंदिर झोलाई देवीचे असले तरी अजूनही देव त्यात आहेत. मंदिराच्या आतमध्ये जमवलेल्या मुर्त्या ठेवलेल्या आहेत. शिवाजी महाराजांची वस्त्र नेसवलेली मुर्तीही आहे. आता मात्र परत सगळे जण खाली गेलो. तिथे कोणाला काहीच माहिती नव्हते. इथेच गड, मंदिर, पाणी सगळे सापडल्याचा सगळ्यांना दिलासा दिला आणि जिथे डांबरी रस्ता संपतो तिथे गाडी लावण्यास सांगितले. सगळे सामान घेऊन परतलो. जेवण झालेलेच होते, आता फक्त झोपायचे बाकी होते. सकाळी पोहे करण्यासाठी लाकडे शोधून ठेवली. सगळ्यांचीच इच्छा झाल्यामुळे चहा झाला. साडेदहा वाजता आम्ही झोपलो. काही जण मंदिराच्या बाहेर झोपले तर काहीजण आतमध्ये. 

डोंगराआडून वर येताना सूर्यनारायण
मला ५च्या आधीच जाग आली पण काही चुळबूळ दिसेना, म्हणून वाट बघत तसाच पडून राहीलो. पाच वाजता एक-दोन आवाज आल्यावर लगेच उठलो आणि आवराआवर केली. ती “ठराविक” बाटली घेऊन कामाला गेलो. कालच जागा बघुन ठेवली होती. काम उरकून परत आलो तोपर्यंत अजून काही सुरवंट डोक्यावर लाईट आणि हातात पाण्याच्या बाटल्या घेऊन जात होते तर काही फुलपाखर होऊन परत येत होते. पटापट पुढच्या कामाला लागलो. सगळ्यांचं आटपेपर्यंत आम्ही आम्ही चार-पाच जणांनी पोहे बनवले. चहा ठेवला गेला. भरपूर पोहे खाऊन घेतले, चहा घेतला तोपर्यंत सूर्याने डोके वर काढले होते. सूर्योदयाचे कितीतरी फोटो जमा झाले असले तरी कित्येक वेळा तो मोह आवरत नाही तसाच डोंगराआडून वर येताना त्या सूर्यनारायणाचा फोटो घेतला. मंदिरातल्या शिवाजी महाराजांनाही किरणांनी न्हाऊ घालण्याचा त्या सूर्यनारायणाला मोह आवरला नसावा. मला त्याचा फोटो घ्यायचा मोह आवरला नाही. तो घेतला आणि सगळ्यांनी बॅगा भरून गड बघण्यासाठी कूच केली. 
झोलाई देवी मंदिर, दीपमाळ आणि ग्रुप फोटो
सुर्यनारायणाने महाराजांना किरणांनी न्हाऊ घातले
मंदिराच्या डावीकडे लागुनच पाण्याचे टाके आहे, पाणी पिण्यायोग्य आहे. ह्यात एक गुहेसारखा भागही दिसतो. त्याच्याही डावीकडे वरच्या बाजूला बालेकिल्ला आहे. त्याच्या आतमध्ये न जाता उजवीकडून वळसा घालून पलीकडे गेलो. गडाची माहिती वाचन झालं. उजवीकडे खाली डांबरी रस्ता दिसत होता, गडावर येण्याची वाटही दिसत होती. डावीकडून गड फेरीला सुरुवात केल्यावर एक बुरूज आहे त्यावर ध्वज आहे. बांधकामाचे अवशेष असे बऱ्यापैकी आहेत. इथे एक तोफही आहे. एक पाण्याचा मोठा साठा आहे पण पाणी पिणे योग्य वाटत नाही. ते टाके ओलांडून पुढे गेल्यावर समोरच एक पठार लागते. त्यावर धान्याचे कोठार आहे. कोठाराच्या मागच्या बाजूने पुढे अजून एक टाके आहे त्यात पंप बसवून गावात पाण्याची सोय केलेली दिसते. इथेच कातळात लपलेले एक टाके असल्याची माहिती होती. हे टाके सहजासहजी कोणाला सापडत नाही. बरेच लोक ते माहितीच नसल्याने न बघताच परत जातात. ते बघायचे होते पण त्याचे अचूक ठिकाण माहिती नसल्याने फोनाफोनी चालू केली. एकतर मला सोडून बाकी कोणाला फार इच्छा असल्यासारखी वाटत नव्हती किंवा मला जाणवत नव्हती. त्यातून मी एकटाच त्यासाठी हट्ट करत असल्यासारखं वाटत होतं. व्यवस्थित पण पटापट बाकी अवशेष बघत एक डोळा त्या टाक्याकडे एकीकडे ठेवून होतो. पुढे एक सोंड गडाच्या शेवटच्या टोकाकडे जाते. विनीतला फोन झाला तेव्हा सोंडेवरून शेवटाकडे न जाता उजवीकडे एक वाट खाली टाक्याकडे उतरत असल्याचे त्याने सांगितलेन. प्रत्यक्षात ती वाट काही सापडत नव्हती सोंडेकडे निघालो तेव्हा उजवीकडे खालच्या बाजूला एक मंदिर दिसले शंकराची पिंड आहे समोर एक नंदी आहे तसंच काही कोरीव दगड आहेत. ते पाहून परत आल्यावर पुढे निघाले की काही सतीचे दगड ठेवलेले दिसतात. पुढे गेलं की सोंडेचे बऱ्यापैकी शेवटचे टोक दिसते. तिथूनही पुढे गडाचा काही भाग शिल्लक आहे परंतु तिथे बघण्यास काही नाही. डावीकडच्या शेवटच्या टोकावर एक ध्वज उभारलेला दिसतो. टाके न सापडल्याने थोड्याश्या निराशेने मी परत फिरलो. 

गडावरच्या तोफा
आत्तापर्यंत मी एकटाच त्या टाक्याच्या शोधात होतो आणि तो हट्ट सगळ्यांना कळला होता कदाचित काही जणांना रागही आला असेल अशी मला शक्यता वाटत होती. पण मलाही ते टाके बघायचे होते. शेवटच्या टोकावर नामजोशी काका आधीच पोचलेले होते. त्यांनाही तसे काही दिसले नव्हते. परत फिरताना डावीकडे खालच्या बाजूला एक कपार दिसली. निरखून पाहिल्यावर एक खांब दिसला आणि ते टाके असावे असे वाटले पण तिथे जाण्यास काही मार्ग नव्हता. रोप लावून जावे लागले असते. तसही जे मला शोधायचे होते त्या टाक्यापर्यंत वाट जाते हे मला माहिती होते. बराच फिरल्यावर मग परत येताना मी उरलेले सगळे अवशेष बघितले. ते कोठार, त्या समोर असलेली तोफही बघितली. तिथे एक अर्धवट तुटलेली तोफ शिल्लक आहे. उजवीकडे अजून एक पाण्याचे टाके आहे. जवळजवळ गडफेरी पूर्ण झाली होती. त्या मंदिराजवळचा बालेकिल्ला मात्र बघायचा शिल्लक होता. आता त्यात शिरलो आणि त्यावरून चालत चालत त्याचे चारही बुरुज बघितले. शेवटच्या मंदिराच्या कडील बुरुजावर 3 तोफा रचून ठेवलेल्या आहेत. एका तोफेचे तोंड बरोबर मुख्य दरवाजाकडे आहे. बांधकामाच्या मध्ये चुन्याचा घाणा आहे. सर्वजण मंदिरापर्यंत घेऊन पोहोचले होते गडफेरी पूर्ण झाली होती पण मला ती अपूर्णच वाटत होती. तोफा हे या गडाचे वैशिष्ठ्य. गडावर १६ तोफा असल्याचा उल्लेख आहे. आम्हाला त्यातल्या १५ दिसल्या होत्या.

कातळात लपलेले ४ खांबी टाके
मंदिरात पुजारी आलेला होता. कोणीतरी म्हणाले कि त्यांना माहिती असेल. लगेच त्यांना जाऊन त्या टाक्याचा पत्ता विचारला, त्याने सविस्तर सांगितले. माझ्याबरोबर राहुललाही ते टाके बघायचं होतं. मी ते शोधून दिसते का हे बघतो म्हणून परत निघालो. मागून प्रभू काकाही येत होते. नामजोशी काका आणि अजूनही एकदोन जणही येऊ लागले आता मात्र मला टेन्शन आलं. एकतर मी एकट्यानेच या टाक्याचा मार्ग ऐकला होता, तोही अर्धवट. त्यातून ते टाकं मिळेल की नाही याची खात्री नव्हती. उगाचच पोरं हट्ट करतात म्हणून वडीलधारी मंडळी चिडतील की काय एक शंका मनात होती. भीत भीतच मी आणि राहुल पुढे गेलो. सोंडेचा शेवटच होतो असे वाटले होते तिथुनच पुढे खाली उतरलो. नाही नाही म्हणत भवश्री पण तिथपर्यंत येऊन पोहोचली होती. खाली मात्र कोणीही येऊ नका म्हणून मी आणि राहुल पुढच्या वाटेकडे निघालो. पायवाट थोडी आशा दाखवत होती. वाट उजवीकडे खाली उतरत होती. आम्ही उतरलो, वाट अतिशय घसार्‍याची आहे. या वाटेवरच खाली गेलो आणि उजवीकडे खड्डा दिसला. आशा निर्माण झाली आणि तिथपर्यंत जाऊन पोहोचलो. तिथे एक तोफ ठेवलेली आहे आणि चार खांब असलेलं अतिशय सुंदर टाकं आहे. अतिशय आनंदाने सगळ्यांना ते टाकं सापडल्याचं सांगितलं. काही फोटो काढले. तोपर्यंत मालुसरे सर आणि प्रभू सर येऊन पोहोचले. त्यांच्याबरोबर नितीनही होता. तोफ अगदीच कडेला असल्यामुळे आम्ही ती टाक्याजवळ उचलुन ठेवली. टाक्यावर बरच गवत वाढलेलं होतं. तेही साफ केलं. गड फिरल्याचं समाधान मिळालं होतं. परत मंदिराजवळ आलो. सामान आवरलं आणि दहाच्या आतच परतीच्या प्रवासाला लागलो रसाळवाडी फाटा, भरणा नाका, खेड, महाड करत माणगावला पोचलो. पुढे थोडे खाणे झाले. मग मात्र कुठेही थांबा न घेता सरळ पुन्हा हिंजवडी-चिंचवड असं करत स्वारगेटला येउन पोहोचलो. साडेसहा वाजेपर्यंत चक्क मी घरात होतो. माझ्याच जिल्ह्यात असूनसुद्धा मला अपरिचित असे तीन किल्ले बघुन झाले होते.

रसाळगड, सुमारगड आणि महिपतगड - I


सुमारगड

काही गडांची नावं कायम एकत्रच घेतली जातात. अलंग-मदन-कुलंग, साल्हेर-सालोटा, मुल्हेर-मोरा तसंच हेही, रसाळ-सुमार-महिपतगड. हे नाव ऐकून एखाद दोन वर्ष झाली असतील तेव्हा जमले नाही, तेव्हापासून योगही आला नव्हता. गेल्या महिन्यात एका भटक्यांच्या भेटीत तिथे जायचं वगैरे बोलणही झालं होतं पण तसं काही नियोजन झाले नाही. कर्मधर्मसंयोगाने एका व्हाट्सअप ग्रुप वर 1 pdf  मिळाली. “Pune Venturers” नावाच्या ग्रुपचा प्लॅन  होता 10-11 मार्चला. आता दोन गोष्टी समोर आल्या. एक तर त्यात कोणीच ओळखीचे नव्हते, माझ्यासाठी पूर्ण ग्रुपच नवीन होता आणि दुसरे म्हणजे घरून परवानगी. एक तर हा ट्रेक करायचाच होता. त्यामुळे ओळखी-अनोळखी हा प्रश्न निकालात निघाला. पण महत्त्वाचं होतं घरून परवानगी. ती पण नशिबाने मिळाली. लगेचच confirmation कळवले. शेवटची एकच सीट शिल्लक होती माझ्या नशिबाने. होळीला मला घरी जायचे असल्याने आगाऊ रक्कमही त्यांना देणं शक्य नव्हतं. Online transfer option  त्यांच्याकडे नव्हता, पण त्यांनी विश्वासावर माझी जागा नक्की करून ठेवलंनी. दोन दिवस पाठीवरच वागवावं लागणार या हिशोबाने सामान बांधले. शुक्रवारी रात्री सव्वानऊला सारसबाग जवळून गाडीत बसलो. गाडीत माझ्याबरोबर अजून दोन-चार जण होते, अजून तरी  मी कोणालाच ओळखत नव्हतो. सगळे माझ्यापेक्षा बर्‍यापैकी मोठे लोक होते, वयाने आणि अनुभवाने पण. मग एकमेकांना गोळा करत गाडी university road, चिंचवड असं करत हिंजवडीतून ताम्हिणीला लागली. झोपेचा लपंडाव चालू होता. माणगांव-महाड-पोलादपूर सोडून कशेडी घाट उतरला आणि खेडला आलो. रत्नागिरी जिल्ह्यात यायला मिळण्याचा हा सलग दुसरा विकांत. पूर्ण काळोखी रात्र असल्याने रस्ता फारच भयाण वाटत होता त्यात डांबरी रस्ता संपला आणि कच्चा मातीचा रस्ता चालू झाला. डोंगर पोखरूनच ह्या नवीन रस्त्याचे काम चालू असल्याने खाली फक्त लाल माती. एका बाजूला कडा, तर दुसऱ्या बाजूला दरी. रस्त्याला पाट्या नाहीतच. बाजूला पट्ट्या मारलेल्या नाहीत. कडेला गेले तर गच्छंतीच. मस्त घाट बांधून काढत होते. कच्चा रस्ता सुरु व्हायच्या आधी पाट्या लागल्या होत्या, त्यातून रस्त्याला फाटा असा नव्हताच त्यामुळे हा रस्ता सरळ नक्कीच वाडी-बेलदार या गावात जातो हे खात्रीशीर होते. फक्त रस्ता जाण्यायोग्य वाटत नव्हता. आमच्या ग्रुपमधले एक-दोन जण त्यांच्या खाजगी नॅनो गाडीने रात्रीच तिथे पोहोचले असल्याने गाडी तिथपर्यंत जाते हे माहिती होते. किंबहुना त्या भरवशावरच निघालो होतो. वाटेत बोर्ड नव्हतेच आणि मध्यरात्र उलटून गेलेली असल्यामुळे माणसेही दिसत नव्हती (तशीही इथे दिवसाही दिसण्याची शक्यता कमीच!) कोणाला विचारण्याचा प्रश्नच नव्हता. मोबाईलवरचा google map आणि काल गेलेली नॅनो गाडी यांच्या भरवशावर चाललो होतो. काही किलोमीटर झाले असतील आणि शंका यायला लागली. एक तर त्या रस्त्याने नॅनो गाडी वर चढू शकेल अशी शक्यता वाटत नव्हती. ड्रायव्हरही मनातून थोडा घाबरलेला समजत होता. पूर्ण यू-टर्न असणारी वळणं, मध्येच खडा चढाव, दरी अशातून ते गाव सापडत नव्हतं. एक तर गाडी वळवायला जागाही दिसत नव्हती. आमची १७ सीटर बर्‍यापैकी मोठी बस असल्यामुळे तिला जागाही जास्ती लागणार होती. अखेरीस एका ठिकाणी गाडी उभी असलेली दिसली, नॅनो नव्हती ही. पण रस्ता संपला होता. पुढे सरळ शेतच होतं.

वाडी-बेलदारला येणारा वळणावळणाचा कच्चा रस्ता

गाईड सीताराम जाधव

आम्ही चार जण उतरलो आणि शेजारी असलेल्या घरात गेलो. तिथे गेल्यावर आमचे आधीचे आलेले दोन जण ओसरीवर झोपलेले दिसले. जीवात जीव आला. तिथे सीताराम जाधव भेटणार होते. शेजारच्या घरातून एक व्यक्ती आली आणि आम्ही सगळ्यांनी मिळून सीताराम जाधवना उठवलं. आता सगळे लोकं आपले सामान घेऊन त्या अंगणात येऊन बसले. झोपण्याला काही अर्थच नव्हता. सरळ आवरायला घेतलं. तोंड धुतलं. ग्रुपच्या लीडर लोकांनी घरातून आणलेला शिधा घेऊन उपमा करण्यास सुरुवात केली. आम्ही आपापली सकाळची कामे आटपून त्यांच्या मदतीला गेलो. चुलीवरच चहा ठेवला गेला. सगळ्यांनी चहा घेतला आणि साडेसहा वाजता सुमारगडाकडे वाटचाल चालू केली. तोपर्यंत माहितीच नव्हते की नक्की पहिल्यांदी कुठे जायचे आहे. शक्यतो हा ट्रेक  रसाळगडला सुरु करुन सुमार वरून महिपतगडला संपवतात. परंतु आमच्या ग्रुपचा प्लॅन वेगळा होता. आम्ही 18 जण होतो, त्यातले तीन जण पंचाहत्तरीच्या आसपासचे. पाच-सहा जण साठ-पासष्ठच्या दरम्यानचे आणि बरेचसे ३०-४० च्या दरम्यानचे होते. एकच मुलगी होती, ती चौदा वर्षाची. त्यामुळे प्लॅन थोडा वेगळा होता. सोबतीला सीताराम जाधव आमचे गाईड म्हणून असल्याने वाट शोधावी लागणार नव्हती. त्यांच्या घरातून निघून शेतं ओलांडल्यावर एक पठार लागले. डाव्या बाजूला लांबवर वाडी-बेलदार दिसत होते तर उजव्या बाजूला काल रात्री आम्ही चढून आलेला घाट. वाडी-जैतापूर हे गावही दिसत होते. वाडी-बेलदार गावातल्या लोकांना काहीही आणायचे असेल तर ह्या जैतापुरात चालत जावे लागते, अगदी बस मिळवण्यासाठी सुद्धा. त्या पठारावरून चालत गेल्यावर आम्ही जंगलात घुसलो. काही थोडक्या खुणा लक्षात ठेवत पुढे निघालो, वाटेत एका धनगराचे झाप लागले. पुढे परत जंगलच. अर्थात आम्ही काही विचार न करता फक्त चालत होतो, वाट सीताराम जाधव दाखवत होते. सगळे बरोबर आहेत ना याची खात्री मध्ये मध्ये केली जात होती. साठ-पासष्टीच्या पुढचे तरुणसुद्धा जोमाने चालत होते. आता एक यु-टर्न लागला जिथे रसाळगडकडून येणारी वाट मिळत होती. गुरांना जाण्यास प्रतिबंध म्हणून वाटेत काठ्या टाकून ठेवलेल्या आहेत. ही वाट उजवीकडे रसाळगडाकडे जाते, तर डावीकडे सुमारगडाकडे. आम्ही डावीकडून वरच्या बाजूला सुमारगडाकडे चाललो. वाडी बेलदार मधून इथे यायला आम्हाला साधारण तासभर पुरला होता. आता खडा चढ चालू झाला होता. परत गुरांनी जाऊ नये यासाठी बेडं टाकलेलं दिसलं. ते ओलांडून पुढे गेलो आणि मग वळसा घेत गेलेल्या वाटेवरून सुमारगडाचे सुंदर दर्शन झाले. या जंगलात बरेचसे वन्यप्राणी आहेत त्यात बिबट्याही आहे. थोड्याच अंतरावर आम्हाला बिबट्याच्या पायाचे ठसे त्याची खात्री देऊन गेले. आमच्याबरोबर सिताराम जाधव असल्यामुळेच अर्थात ते कळले होते, नाही तर त्यावर पाय देऊन आम्ही पुढे गेलो असतो. लाल मातीत ते ठळक ठसे छान नक्षी उमटवून होते. एक छोटासा रॉक पॅच लागला. मागच्या बाजूला दृश्य फारच छान होते.

बिबट्याच्या पायाचे ठसे

समोर वाट संपली असे वाटणारा एक काळा-कभिन्न कातळकडा आला. इथे क्षणभर विश्रांती घेतल्यावर त्याच्या डावीकडून वळसा मारुन पुढे निघालो. आता धोकादायक वाट चालू झाली. एक भुयार लागले त्यात बराच कचरा होता. आतमध्ये जाण्यास काही वाव नव्हता पण ते भुयार आपण गडावर आलो आहोत अशी निशाणी ठेवून गेले. डावीकडे दरीच तर उजवीकडे कडा धरूनच पुढे पुढे जात राहायचे. वाटेत एका धोकादायक ठिकाणी एक मजबूत झाड चांगला आधार देऊन जाते किंबहुना त्या झाडामुळेच पुढे सहज जाता येते नाहीतर कदाचित दोऱ्या बांधाव्या लागल्या असत्या. आमच्याकडे दोऱ्या होत्याच गरजेला. ही वाट अतिशय खडतर आहे. पुढे उजव्या बाजूला कातळात अजून एक भुयार दिसले. हे भुयार म्हणजे पाण्याच्या टाकीकडे जाणारा रस्ता होता कारण आतमध्ये पाणी होतेच. घाणही बरीच होती. ती आत मध्ये राहणाऱ्या वटवाघळांनी केलेली होती. आत वटवाघळं उलटी लटकलेली दिसत होती. पुढे निघालो आणि एक कठीण अशी जागा आली. जिथे अतिशय लहान जागा होती पुढे सरकण्यासाठी. दगडाकडे तोंड करूनच अशा वाटेवरुन पुढे जायचे असते, दरीकडे कधीही तोंड करू नये. आपले वजन दगडाकडे झुकवून सरकत-सरकत पुढे जायचे. मी बारीक असल्याने मला ते सोपे गेले. काहीजणांना थोडी कसरत करावी लागली. पुढे जाऊन मग बाकीच्यांना आधार देत पुढे येण्यास मदत केली. ह्या भानगडीत मी सगळ्यात शेवटी राहिलो होतो माझ्याबरोबर राहुल होता. आता उजवीकडे आणखीन एक भुयार दिसले. हे कोरडे होते. पुन्हा मी बारीक असल्याचा फायदा घेऊन आत मध्ये घुसलो. पुढे “L” शेपमध्ये भुयार उजवीकडे वळत होते. उजवीकडे वळल्यावर मात्र पुढे पाणी दिसले, तिथे जाणे धोक्याचे होते आणि काही विशेषही बघण्यासारखे नव्हते. मागे फिरलो आणि रांगत-रांगत परत भुयाराच्या बाहेर आलो.

धोकादायक वाट

तोपर्यंत सगळी मंडळी पुढे जाऊन वरती उजवीकडे वळण घेऊन जवळजवळच गडावर पोचत होती. इथे एक प्रचंड कठीण असा रॉक पॅच आहे. पण आता एका लोखंडी शिडी लाऊन हा मार्ग सोपा केला आहे. शिडी फार पक्की नसली तरी आपले काम चोख करते. आमचे गाईड मात्र इथेच थांबले. कधीतरी ह्या शिडीवरून पडल्याने त्यांच्या मनात भीती बसली होती. इथपर्यंत खडतर वाटेवरून पायात नुसत्या स्लीपर घालून लीलया आलेले ते सोप्या शिडीला मात्र भ्यायले होते. ह्या शिडीवरून आम्ही वर आलो. पुढे वाट चिंचोळी असली तरी रेलिंग बांधलेले आहे. आता वरती डावीकडे कडा आणि उजवीकडे दरी अशी वाट आहे. खडकात सतीची शिळा ठेवली आहे. थोडं पुढे गेल्यावर अजून एक गुहा आहे, त्यात काही निरांजन वगैरे ठेवलेले दिसते पण आतमध्ये देव नाही. आता गडाची तटबंदी चालू झालेली होती.


सतीची शिळा आणि मी

गडावर पोचल्यावर वाट डावीकडे जाते तिथून सुरुवात करावी. सुरुवातीलाच समोरच दोन मोठ्या टाक्या दिसतात. टाक्यांच्या आधीच एक मंदिरासारखी रचना आहेत त्यात काही काही देव एकत्र करून ठेवलेले आहेत. तिथे शंकराची पिंड आहे, त्यातल्या साळुंका गायब आहेत. ह्या टाक्यांच्या डावीकडे गुहेत शंकराचे मंदिर आहे, त्यात अजूनही मूर्ती आहेत, बहुतेक भोलाईदेवीची मुर्तीही असावी. लगेचच पुढे टाक्यांच्या पलीकडे भुयारात दोन खांबी टाके आहे. हे पाणी पिण्यायोग्य अतिशय सुंदर आहे. पाणी पिऊन मागे असलेल्या गुहेत परत आलो. महाशिवरात्रीचा उत्सव होऊन गेल्यामुळे मंदिर सजवलेले होते. पिंडीच्या मागे काही आकृत्या रेखाटलेल्या आहेत. समया, घंटा, अभिषेकपात्रही आहे. पूजेचं सर्व साहीत्य आहे, तसंच कळशी, हंडा, ताट-वाट्या असे बरेच साहित्य आहे. डावीकडून पुढे गेल्यावर एक मंडपाचा सांगाडा उभारलेला आहे. हा उत्सवासाठी उभारलेला असावा. गडाच्या अवशेषांवरच हे बांधकाम आहे. अजून एक चौथरा इथे दिसतो. समोरच एक कोठार असावे, तेथेही भुयारात एक पाण्याचे टाके आहे. उजवीकडे वरच्या बाजूला एक चौथरा आणि त्यावर ध्वज दिसतो. आधी तिथे न जाता जवळचे अवशेष बघून घ्यावेत. याच परिसरात आणखी एक टाके आहे त्यातही पाणी पिणे योग्य दिसले. पालापाचोळा बऱ्यापैकी त्यात असला तरी पाणी स्वच्छ दिसत होते. डावीकडून आपली गडफेरी चालू ठेवावी. पुढे अजून एक चौथरा आहे त्याला वळसा मारल्यावर उजवीकडे पाण्याचे एक खांबी टाके आहे. पाणी पिण्यायोग्य वाटले नाही. वळसा मारून वर गेल्यावर गडाचे सर्वोच्च टोक लागते. अवशेष अजून काहीही नाहीत. इथून आपल्याला खालच्या बाजूला पाण्याची टाकी मंदिर वगैरे नजारा दिसतो. पलीकडे बघितल्यावर मधु-मकरंदगड दिसतात तसेच महिपतगड दिसतो.

सुमारगडावरची पाण्याची टाकी

आल्या वाटेने परत निघायचे आणि जीथं वर चढलो त्याच ठिकाणी अजून एक पाण्याचे टाके आहे तेही बघायचे. हे एक खांबी टाके आहे. त्याच्याच वरच्या बाजूला दोन तीन खोल्या आहेत, पण त्यात आज जाण्यासाठी मार्ग व्यवस्थित राहिलेला नाही. सगळे खाली उतरत असल्यामुळे मी पटकन त्यावर नजर टाकून परतीला लागलो. आल्या वाटेने गड उतरायला सुरुवात केली सगळ्यात पुढे नामजोशी काका होते मागे वळून बघितल्यावर सुमारगड छान दिसत होता. पुन्हा रसाळगडाची वाट लागली आणि तिकडे न जाता उजवीकडच्या वाटेने निघालो. आता ऊन वाढलं होतं. रस्ता चुकण्याची शक्यता वाटत नव्हती. आमचे गाईड जरी मागे असले तरी समोरची पायवाट धरून आम्ही उतरणीला लागलो. मध्ये खूप अंतर पडल्याचे लक्षात आलं आणि आम्ही वाट बघत थांबलो. सुमारे २-३ ठिकाणी मिळून अर्धा-पाऊण तास वाट बघितली. सगळे लोक परत आले. डावीकडे ती घाटवाट ठेवत उजवीकडे दिसत असलेल्या सीताराम जाधव यांच्या घरी परत आलो होतो. सगळेच थकले होते. सुमारे साडेअकरा वाजले होते. एक-एक करत सगळे परत आले.

Tuesday, March 13, 2018

किल्ले बहादरपूर

नांव चुकलं नाहीये, बहादरपूरच नांव आहे किल्ल्याचं. "बहादूर" नाही. बहादुरपूर किल्लाही आहे, पण तो हिमाचलमध्ये. मला सापडला तो महाराष्ट्रातला बहादरपूर किल्ला. "सापडला" हेच बरोबर. गुगलकृपेने सापडलाच. अतिशय अनवट म्हणावा असाच हा किल्ला आहे. पारोळा आणि अमंळनेर यांच्यामध्ये बोरी नदीकाठावर हा किल्ला आहे. किल्ल्याबद्दल माहितीही कमीच उपलब्ध आहे. पाहण्यासारख्या गोष्टीही सापडतील अश्याही कमीच आणि फोटोही कमीच उपलब्ध आहेत. या सगळ्यामागचं कारण शोधताना "दुर्दैव" हाच शब्द चपखल बसतो.

जिल्हा: जळगाव
प्रकार: भुईकोट
श्रेणी: सोपा

किल्ले बहादरपूर - पेटंट फोटो

मुळात किल्ला बघायला बाहेर पडलोच नव्हतो. निघालो होतो शेगावला आणि वाटेत थांबा होता "कोळपिंपरी" जवळच्या आडवाटेला. मुळात मी कोकणी माणूस. धुळे, जळगाव, जालना वगैरे नांवं म्हणजे अगदीच अपरिचित ठिकाणं. भूगोलाच्या नावाने गोलंच, त्यामुळे नांव सोडल्यास सगळीच बोंब! भारताच्या नकाशावर ठिकाणं कुठे आहेत हेच माहिती नाही. धुळे? ते आता सासरकृपेने बघायला मिळणार होते. अगदी गाडीत ड्रायव्हरच्या शेजारी बसून हा नवीन भूभाग मी बघत होतो. कोपरगाव सोडल्यावर थोड्याच वेळात खूप दिवसांपासून खुणावत असेलेले अंकाई-टंकाई दिसले.
कात्रा-गोरखगड, हडबीची शेंडी दिसली तेव्हा आपणहून नजर किल्ले शोधू लागली. "लळिंग" किल्लाही दिसला. गुगल मॅप अपोआप उघडलं गेलं. शेजारी ड्रायव्हर त्याच भागातला. मी सोडून सगळी मंडळी तिकडचीच. आणि मी उगाच "हां, आता डावीकडे, आता पुढे १ किमीवर उजवीकडे घ्या" वगैरे माझा आत्ताचा आणि मागचाही जन्म विदर्भात गेल्यासारखा (धुळे खानदेशात ना? माझा भूगोल!) गुगलवाल्या काकू माझ्या कानात रस्ता सांगत होत्या आणि मी ड्रायव्हरला. मंडळींनाही अगदी "exact" म्हणावा तसा रस्ता त्या आडवाटेवरच्या मंदिराचा माहिती नसल्याने मी आपणहूनच खांद्यावरचा गुगलचा हात चाचपून बघत रस्ता सांगत होतो. "कोळपिंपरीला चल" असा हुकुम मोबाईलमधल्या जीनला सोडल्यावर त्याने ईमानेइतबारे पारोळ्याहून कोळपिंपरीला वळसा पडेल म्हणून जवळचा रस्ता म्हणून त्या आधीच्या फाट्याला आतमध्ये वळा अशी विनंती केली.
अचानक जॅकपॉट लागला. वाटेजवळच बहादरपूर किल्ला. म्हणजे सध्या फक्त मॅपवरच! प्रत्यक्षात अजून जायचे होते. वाट कोणालाच पक्की माहिती नसल्याने पारोळ्यावरून उलटा फेरा मारावा लागेल, अंतरही जास्त पडेल (आणि माझा किल्लाही जाईल!) यासाठी याच वाटेने जायचे ठरवले. मी ड्रायव्हरनाही तसंच सांगितलं. आता जबाबदारी माझ्यावर होती, आडवाट मी पकडायला लावली होती पण रस्ता काही फार वाईट नव्हता. धुळ्याहून पारोळ्याकडे जाताना फगाणे, अजांग, कासविहीर सोडलं की डावीकडे अंमळनेरकडे जाणारा फाटा आहे. पारोळ्याच्या आधी साधारण दहा-बारा किमीवर हा फाटा आहे. बोरी नदीच्या जवळून हा रस्ता अंमळनेरकडे जातो. रस्त्याला पहिलं गाव बहादरपूर आहे. खंडेराव मंदिर गेल्यावर मुख्य रस्ता डावीकडे वळून परत उजवीकडे वळून जातो पण डावीकडे न वळता सरळ रस्ता गावात घुसतो तिकडे घुसायचं. तसंच पुढे गेल्यावर उजवीकडे डावीकडे असे वळणे घेत आपण किल्ल्याजवळ पोचतो. रस्ता डांबरी आहे पण जरासा खराब आहे. तिथे पोचेपर्यंत नेटवर माहिती घ्यायचा प्रयत्न केला होता, फार काही हाती लागलं नाही. फक्त एकच फोटो दिसत होता. ओळखीचं दिसल्यावर थांबलो. मी सोडून कोणालाच त्यात काडीचाही रस नव्हता. त्यातून शेगावला जायला उशीर होईल म्हणून नाराजी असणारच. त्यामुळे "फक्त दहा मिनिटात येतो" म्हणून धावत सुटलो. एक आजी दिसल्या त्यांना विचारलं तर फार काही कळलं नाही पण त्यांच्या मुलाने मात्र रस्ता दाखवलान बुरुजावर जायचा. “बघायला काही नाही आहे, घाणही आहे” मी ऐकलं पण वेळ नव्हता विचार करायला. धावतच निघालो, वाटेत गाढवंही होती, अर्थात उकिरडाही होताच. वर जाणाऱ्या वाटेतच २ संडासही होते. गटारं वाहत होती. उड्या मारतच वर गेलो.  वाटेत काटेरी झुडपं होती. वर तर सगळीकडे झुडपे वाढलेली होती त्यात चरायला बकऱ्या वगैरे आणत असावेत. त्यातूनच फिरलो. वर खरंच काही दिसले नाही, मात्र वरून उजवीकडे भक्कम उभ्या बुरुजाचा आतला ढासळलेला भाग दिसत होता. डावीकडच्या बुरुजाने मात्र मान टाकली होती. दोन्ही बुरुजांच्या पलीकडे बोरी नदीचा काठ छान दिसत होता. नदी आणि किल्ल्याच्या तटबंदीमधल्या भागात मंदिर आहे आणि त्याचा परिसर. मंदिर शंकराचे असून “श्रीक्षेत्र हरीहर महादेव मंदिर” अशी कमानही डाव्या बुरुजाच्या बाजूला आहे. वर काहीच नसल्याने पळत खाली आलो. 

तटबंदीला धरून असलेले संडास आणि गोठा वगैरे
“अजून पाच मिनिट” असं सगळ्यांना सांगून धावतच तटबंदीला धरून नदीकडे जात असलेल्या वाड्याकडे गेलो. वाडा गुरांचा होता. तटबंदीला धरूनच हे सगळं. परवानगी मागायला तिथे कोणीही नव्हतं आणि वेळही नव्हता मी सरळ गुरांच्या कडेने गोठ्यातूनच पलीकडे गेलो. फक्त शेण आणि घाण. उतरायला पायर्‍या वगैरे नव्हत्याच. उडी मारली. तिथेच बुरुजाला लागून एक छोटे मंदिर आहे. घाणीतून पलिकडे मात्र बुरुजाच्या बाजूला मंदिराकडे जायला पायर्‍या आहेत. ही मंदिराची मागची बाजू आहे. थोडं मागे होऊन दोन्ही बुरुज व मंदिर असा पेटंट फोटो घेतला. बुरुज मात्र अत्युत्कृष्ट आहे. एकच पूर्णपणे उभा आहे आणि तोही काही वर्षात तो ढासळणार हे नक्की. सरळ सरळ किल्ल्याचा वापर संडास म्हणून होत आहे. दुसरा बुरुज तर जवळजवळ जात आलाच आहे, तोही सुंदर 40 फुटी असणारच. या बुरुजाजवळ 1 कबर आहे. एकंदरीत किल्ल्याच्या आत मध्येच गावाचा बराच भाग वसलेला आहे. किल्ला बराच मोठा असण्याची शक्यता आहे आता मात्र काहीही तसे शिल्लक राहिलेले नाही. गावात मधे-मधे तटबंदीचे उध्वस्त भाग दिसतात. गाडीजवळ येऊन परत पाच मिनिटं मागून घेतली. इंटरनेटवर एका पर्शियन भाषेतील शिलालेखाचा उल्लेख होता. तो आता ग्रामपंचायतीत आहे एवढीच माहिती मिळाली म्हणून ग्रामपंचायत कुठे आहे विचारले. “कोणती पाहिजे” असा प्रतिप्रश्न आला. इथे दोन ग्रामपंचायती आहेत. “जवळच असेल ती सांगा” म्हणून धावतच ती गाठली, तर मोठे कुलूप. वाकून बघितले तर शिलालेखाचा दगड ठेवलेला दिसला नाही. गावात कोणाला असलं काही आहे हेच माहिती असल्यासारखे दिसत नव्हते. एक तर मी धावत धावत फिरत होतो. गळ्यात कॅमेरा आणि घामेटलेला वेडाच वाटत असेल त्यांना. त्यांची काय चूक? गाडीतल्या लोकांची आठवण ठेवत तो न बघीतलेला शिलालेखाचा दगड स्वतःवर ठेवून पुढच्या प्रवासाला लागलो. गावाबाहेर पडताना तटबंदीचे अजून काही अवशेष दिसले, पण एकंदरीत आनंदच होता. मला बघायला मिळाले नाहीत, पण गावात अजुन खुप अवशेष शिल्लक आहेत तुकड्या-तुकड्याने. दोन-तीन तासांचा वेळ काढून नक्की बघायला पाहिजेत. घराबाहेर तोफेचे गोळेही पडलेले आहेत अशी माहिती आहे. तर गावाच्या बाहेर एक सुरेख मशीद आहे. त्यात दगडी बांधीव वास्तू आहे, एका खोलीत 5 तर दुसऱ्यात दोन कबरी आहेत. तळघरे आहेत. इंटरनेट वरच्या उल्लेखाप्रमाणे त्या राजघराण्यातल्या कबरी असाव्यात. दुर्दैव सोडून या किल्ल्याचे काहीच वर्णन करण्यासारखे राहिली नाहीये. दुर्दैव हे की माझ्याकडे वेळ नव्हता पूर्ण किल्ला अवशेष शोधून फिरायला. अक्षरशः जास्तीत जास्त पंधरा मिनिटात धावती भेट द्यावी लागली. अतिशय आडवाटेवरचा अजिबात माहिती नसलेला, कधीही या भागात येण्याची सुतराम शक्यता नसलेला किल्ला 15 मिनिट का होईना, बघायला मिळावा हे सुदैव!