Saturday, May 22, 2021

कर्नाटकातील किल्ले - किल्ले मान्वि आणि मुक्कुंदा

किल्ले मान्वि

मान्वि गांव रायचूर शहरापासून साधारण ४५ ते ५० किमीवर आहे. हा तालुका आहे. जुनं मान्वि गांव अर्धवर्तुळाकार आकारात टेकड्या-डोंगरांनी वेढलेलं आहे, आणि ह्यातील बऱ्याच टेकड्यांवर मंदिरं आहेत.

दसऱ्याच्या दिवशी निघणाऱ्या हत्तींच्या मिरवणुकीसाठी हे गाव प्रसिद्ध आहे. मुळात मान्वि हे गांव बर्‍याच धार्मिक लोकांसाठी ओळखलं जातं अशी माहिती उपलब्ध आहे. मध्वचार्य, श्री जगन्नाथ दास यांची ही भूमी आहे. ही झाली आंतरजालावरून मिळालेली माहिती.

ह्या किल्ल्यावर जायला वस्तीतल्या बारीक-बारीक रस्त्यांवरून लोकांना विचारतच पायथ्याशी पोचावे लागते. वाटेत दगडी शिळांपासून रचलेल्या भिंती दिसतात. पायथ्याशी पोचल्यावर त्या अरुंद बोळातच कशीबशी कडेला गाडी उभी केली आणि किल्ल्याकडे वळलो.

सिमेंटच्या पायर्‍या

किल्ल्याची उंची फारशी नाही. खालूनच तटबंदीचे अवशेष दिसतात. मोठ मोठाले दगड-शिळा आणि शेजारी दगडी जमीन. जमीन/दगड निसरडे होत असावेत म्हणून त्यावर सिमेंटच्या पायर्‍या बांधलेल्या दिसल्या. त्या जेमतेम ४०-५० पायऱ्या संपून आपली नेहमीची वाट चालू होते.

सगळे एकाच प्रकारचे दगड आजूबाजूला पडलेले. पायऱ्याही त्याच्याच आणि तटबंदीही त्यांचीच.

रेहमतुल्लाह अल्लाई दर्गा

काही मिनिटांतच आपण दर्ग्याजवळ येऊन पोचतो. येथील थडग्यावर कन्नड मध्ये “रेहमतुल्लाह अल्लाई” असं लिहिलेलं आहे. इथे मुसलमानांचा काही कार्यक्रम चालू होता. पायात बूट असल्याने दर्ग्यात गेलो नाही.

दगडी शिळांचा आधार घेऊन बांधलेली तटबंदी

दगडी शिळांचा आधार घेऊन बांधलेले बुरुज

मोठमोठ्या दगडी शिळांचा आधार घेऊन बांधलेल्या तटबंदीचे अवशेष दिसत होते. पण त्यात सलगता नव्हती. आणि याच दगडांचा वापर करून नुसती तटबंदीच नाही तर चक्क बुरुजही बांधलेले आहेत. असाच एक बुरुज खालून दिसला. त्याच्याखाली तर एक प्रचंड दगड पडलेला होता. बुरुज आणि त्यानुसार शेजारील दगडाचा आकार लक्षात घेतल्यास त्याची भव्यता कळेल.


पाण्याचा मोठा तलाव

तिथून किल्ल्यावर जायला फार वेळ गेला नाही. प्रवेश केल्यावर डावीकडे एक पाण्याचा मोठा तलाव आहे. चांगलाच खोल असलेल्या ह्या तलावाची एक बाजू अर्धगोलाकार आकारात बांधून काढलेली आहे. ह्या भागात त्याची उंची दहा-अकरा फूट तरी असणार.

सध्या या भागात थोडे पाणी शिल्लक होते. अर्थात सध्या तलावाच्या जमतेम १ टक्का एवढेच पाणी असले तरी पण पोहण्याएवढे नक्कीच होते. पोरं मस्त उद्या मारून पोहत होती. माझ्या गळ्यात अडकवलेळा कॅमेरा बघून त्या मुलांना जास्तीच चेव आला आणि वेगवेगळ्या पद्धतीने त्या पाण्यात उड्या मारून त्यांचे फोटो काढायला ते मला सांगू लागले. त्यांचे काही फोटो घेऊन मी दुसरे अवशेष बघायला वळलो.

ना आगा ना पिछा - एकला बुरुज

‘ना आगा ना पिछा’ असे मध्येच काही बुरुज बांधलेले असे इकडच्या किल्ल्यांवर दिसतात तसाच एक बुरूज आमच्यासमोर होता. आजूबाजूला ना तटबंदी, ना वाडा, ना आणखी काही. एकटाच बिचारा हा बुरुज.

टोकावर अजुन एक बुरुज, पलीकडे दर्गा आणि मल्लीकार्जून मंदिर

समोर हा एकटा बुरुज तर उजवीकडे टोकावर अजुन एक बुरुज दिसला आणि पलीकडचा डोंगरही. ह्या पलीकडच्या डोंगरांवर "हजरत सयद शाह सबजाली सत्तर कादरी साहेब दर्गा" आणि मल्लीकार्जून मंदिर आहे.

या बुरुजाचे स्थानच इतके मस्त आहे की त्याचे फोटो किती आणि कुठून काढू असं होतं. ह्याच्या वर जायला वाट सरळ नाही. मध्ये एक मोठा कोरडा तलाव आहे, जोडीला मोठे खंदक आणि बाभळीची झाडी. यांना वळसा मारून या बुरुजावर पोचलो.

मागे तटबंदीचे अवशेष

काही पायऱ्या चढून गेल्यावर बुरुजावर जायला दरवाजा आहे. मागे वळून पाहिल्यास तटबंदीचे बऱ्यापैकी अवशेष दिसतात. जी नैसर्गिक दगडांचा आधार घेऊनच बांधलेली आहे.

दरवाजातून आत गेल्यावर पायऱ्या चढून त्या बुरुजावर जाता येते. इथून मान्वि शहराचा परिसर दिसतो. पलीकडच्या डोंगरावरचे मल्लिकार्जुन मंदिरही स्पष्ट दिसते. इकडचे एकूणच डोंगर म्हणजे कशात तरी दगड भरून आणून तिथे ओतून ठेवल्यासारखे वाटतात.

टोकावरील बुरुजावरून किल्ल्याचा परिसर

बुरुज जमिनीवरचा आणि सर्वोच्च स्थानावरचा

बुरुजावरून किल्ल्याचा परिसरही न्याहाळता येतो. परिसरात मोठमोठाल्या दगडी शिळा अशाच इतस्ततः पसरलेल्या आहेत. मध्येच एक एकटाच छोटा बुरुज तर प्रवेशद्वाराजवळ पडलेल्या मोठा शिळांवर एक मोठा बुरुज.

किल्ल्याच्या साधारण मधोमध लहानसा तलावही आहे.

बुरुजाचा दरवाजा

बुरुजावरून खाली येताना दरवाजा नीट न्याहाळला. दरवाजावरची कमान कसल्याही मटेरियल शिवाय नुसतेच दगड तशा आकारात कापून नीट बसवलेले आहेत. दगडांवर कमळं कोरलेली आहेत.

कोरीव गणपती

परिसर न्याहाळताना एका दगडावर एक गणपती कोरलेला दिसला. हा दगड कोणत्याही अवशेषांचा भाग दिसत नव्हता म्हणजे काहीतरी घडवत असताना कारागिरांनी ते काम अर्धवट सोडलं असं वाटत होतं.

सर्वोच्च स्थानावरचा बुरुज (उजवीकडे). डावीकडे दगडाला टेकून प्रभाकर

फक्त सर्वात उंचावर दिसत असलेला बुरुज पहायचा राहिला होता. सगळ्या बाजूने फिरून त्या शिळांवर चढायचा प्रयत्न करून झाला. एका बाजूने नानांनी अर्ध्यापेक्षा जास्त पल्ला गाठला होता, पण त्यांना मागे फिरावे लागले. दुसऱ्या बाजूने प्रभाकरने मात्र सगळ्या प्रकारचे कौशल्य लावत तो बुरुज गाठलाच. एकूणच दुपारचा दीड वाजत आलेला असल्याने आळशीपणा आला होता. त्यात भूक लागली होती आणि मुळात वेळेचं बंधन होतं. वर जायचा रस्ता मिळूनही एकेकाने वरपर्यंत जाणे वेळेच्या दृष्टीने परवडणारे नव्हते.

त्या शिळांखालीच सावलीत बसकण मारून बकाणे भरले. फार वेळ न लावता धडाधड खाली उतरलो.

एकूणच आजचा दिवस थोडा वेगळा होता. सकाळी रायचूरचा राहिलेला नवरंग दरवाजा, मलिआबाद किल्ल्यातले शिव-मंदिर तर मान्वि किल्ल्यावरचा सर्वोच्च स्थानावरचा बुरुज नाही म्हटलं थोडी तरी मनात थोडी रुखरुख ठेवून गेला.


किल्ले मुक्कुंदा

तीन वाजून गेले होते. मान्वि किल्ल्यापासून साधारण ७० किलोमीटरवर असलेल्या मुक्कुंदा गावात पोचलो. गावात पोचल्यावर किल्ला तर दिसला, पण तिथे जायचा रस्ता सापडेना.

गावातली स्वच्छता तर काय वर्णावी... एक तर धड रस्ता कळेना, त्यात गावातले लोक नक्की कोणत्या रस्त्याने जायचं ते सांगताना गोंधळत होते. खरंतर त्यांनाच नक्की असं काही माहिती नसावं. मुळात सगळीकडे पडतो तसा त्यांनाही प्रश्न पडला असावा, कि हे लोक कशाला त्या डोंगरावर जातायत! महत्प्रयासाने एका रस्त्यावर शिक्कामोर्तब झाले.

अरारारा... तिथली अवस्था बघताच त्यात गाडी घालायची सरळ रद्दच केले. चालत जायचे झाले तरी मध्ये मध्ये दिसणाऱ्या दगडांवरून उड्या मारत जायला लागणार होते, तेही अलगद. न जाणो जोरात उडी पडली आणि पाय वरच नाही आला तर? पण त्यातून नाचतच वस्तीमध्ये पोचलो.

किल्ल्याचे दर्शन

समोर किल्ला तर दिसत होता, पण जायला चांगला रस्ताच दिसत नव्हता. किल्ला तर अगदी छोटासा दिसत होता. साधारणपणे पुण्यातल्या एखाद्या मोठ्या सोसायटी एवढा असेल. म्हणजे वर जायला दहा मिनिटं पुरी होतील, किल्ला बघायला पंधरा-वीस मिनिटं पुरेत आणि खाली यायला फारतर पाच मिनिटं बास झाली. म्हणजे एकूण अर्ध्या तासात किल्ला बघायचा कार्यक्रम आटपायला पाहिजे, अगदी फोटो धरून पावून तास. पण प्रत्यक्षात १५ मिनिटं तर नुसतीच इकडून जाऊन बघ, तिकडून बघ करण्यात गेली. गावातली दोन पोरं पण आमच्याबरोबर यायचा, आम्हाला रस्ता मिळवून द्यायचा प्रयत्न करत होती. पण शेवटी आम्ही बघत होतो त्या बाजूने रस्ताच नाहीये असं एकदा ठरवून टाकलं. ४ घरं फिरल्यावर नशिबाने एक मुलगा सापडला ज्याला वर कुठून जाता येईल याची कल्पना होती. म्हणजे तो कधीतरी जाऊन आलेला होता. तिथून जाता येईल कि नाही ह्याबद्दल तोही साशंकच होता, म्हणजे अर्थातच या किल्ल्यावर कधीच कोणीच येत नसणार. त्यामुळे सहज आणि साफ रस्ता सापडायचा प्रश्नच येत नव्हता.

Actually आमच्याकडे असलेल्या माहितीत/ब्लॉगमध्ये एक वाट दिलेली होती, म्हणजे त्या लोकांना वर जायला सापडलेला मार्ग. पण तो आम्हाला सापडत नव्हता. त्यातले फोटो आणि समोर दिसत असलेल्या किल्ला यांचा मेळ राखत शोधून झालं, पण नाही... तो ब्लॉग साडेसहा वर्षापूर्वीचा होता, नंतर पडझडीमुळे आम्हाला समोर दिसणारा मार्ग बंद झालेला असावा. त्यातून तिथे झाडी प्रचंड वाढलेली होती.

पण... शेवटी आम्हाला “हनमेश” भेटला आणि वर जाता येईल अशी शक्यता दिसली. पण तोही यायला तयार होईना. वर धड रस्ता नाही आणि खूप झाडी वाढलेली आहे, खूप घाण आहे, असली अनेक कारणे त्यामागे होती आणि ती खरीही होती.

पण आमचा हट्ट आम्ही सोडणार नव्हतो. एक तर किल्ला छोटुसा, पण सुंदर दिसत होता. आणि आम्ही १५-२० मिनिटं चक्क पायथ्याशी फिरत होतो. डोळ्यासमोर आणि अगदी शेजारीच असलेला किल्ला सोडायचा, हे शक्यच नव्हतं. प्रमोदला कन्नड येत होतं म्हणून ठीक, नाहीतर चर्चाही शक्य नव्हती. सरळ पाणी सोडणे भाग होते, नाहीतर अगदी कठीण तरी नक्कीच होते. खूप विनवण्या झाल्यावर हनमेश प्रसन्न झाला आणि कोयता घेऊन आमच्या मदतीसाठी सिद्ध झाला.

ह्या बाजूच्या किल्ल्यांची एकूणच अवस्था बघता आमच्या दोन गाड्यांपैकी जे आधी पायथ्याशी/गावात पोचतील त्यांनी वाट न बघता रस्ता शोधायला सुरुवात करायची हे ठरलेलं होतं. त्याप्रमाणे आम्ही आधी पोचल्याने हनमेशला प्रसन्न करून ठेवलं होतं आणि तोपर्यंत दुसरी गाडी पोचलीही गावात. पण एकंदरीत आम्ही पायथ्याशी असताना इथवर पोहोचलेल्या रस्त्याचे वर्णन ऐकून त्यांनी सरळ इकडे येणे रद्दच केले. त्यातून दुपारचं जेवण ही प्रथा बंद झाल्याने पोटात काही नव्हते. त्यांना भूकही लागली होती. आम्हालाही कदाचित लागली असावी पण आमच्या गाडीतल्या लोकांना किल्ल्यापुढे भूक दिसतच नव्हती.

वस्तीतला दरवाजा

दरवाजा आतील बाजूने

तर शेवटी हनमेशला घेऊन एका दरवाजात दाखल झालो. हा दरवाजा नक्की कसला आहे सांगणे कठीणच वाटावे, कारण हा दरवाजा पायथ्यालाच, अगदी वस्तीत आणि किल्ल्याशी सरळ काही संबंध नसलेला होता. प्रचंड मोठ्या दगडी शिळांचा आधार घेऊन बांधलेला आहे हा दरवाजा. कमानीतल्या सपाट आडव्या दगडावर लांब नाग कोरलेला आहे. आत दगडांची बैठक, तर वरती दगडी शिळांचे छत. म्हणजेच किल्ला पूर्वी या वस्तीच्या भागातही असणार, जो आता लुप्त झाला आहे.

किल्ला

पलीकडे गेल्यावर दिसला तो अखंड किल्ला. नाहीतर इतका वेळ एका कोनातून थोडासाच भाग दिसत होता. आता ब्लॉगमध्ये वाचलेला आणि पाहिलेला भाग समोर आला, जो ढासळलेला होता आणि प्रचंड झाडीही त्यात वाढलेली होती. पण आम्हाला याला वळसा मारून मागच्या बाजूला जायचं होतं. समोरच दिसणार्‍या किल्ल्याच्या भागात तटबंदीचा ढासळलेला भाग, आणि त्यातून आतमधून डोकावणाऱ्या तीन खोल्या ही नक्की काय रचना असावी हे सांगता येत नव्हतं. त्याच्या उजव्या बाजूला प्रचंड शिळेवर तटबंदीचा टोकाकडेचा भाग आहे, टोक असल्याने तो अर्धवर्तुळाकार आकारातल्या तटबंदीचा भाग बुरुजासारखा दिसत होता. अर्थात याला बुरुज म्हणणे शक्यच नाही. याला जर बुरुज म्हणायचं असेल तर पूर्ण किल्ल्यालाच बुरुज म्हणावे लागेल.

किल्ला - उजवीकडून

बाकी तटबंदी आणि एकूणच किल्ला शेजारच्या शिळांचा आधार घेऊनच बांधलेला आहे.

वळसा मारून झाडीत घुसलो. हरे राम... गावकऱ्यांनी या किल्ल्याकडे अजिबात दुर्लक्ष केलेले नाही. उलट जुने अवशेष सांभाळत, वर नवनवीन अवशेष तयार करण्याकडे भर दिलेला आहे, हे जागोजागी.. नव्हे, तर पायाखालीच दिसत असलेल्या नवनवीन बुरुजांवरुन सहज लक्षात आले. रोज सकाळी असे सोनखत आणि पाणी मिळत असल्याने इथली झाडी फोफावली नसती तरच नवल! अरारा... पाउल चुकलं की संपलंच.


किल्ल्याची मागची बाजू

किल्ल्याचा खोबणी प्रवेशभाग आणि त्यासमोर दगडी शिळा


खोबणीतून वर जाताना

असला रस्ता पार करत आम्ही गडाच्या पलीकडच्या बाजूला भिंतीजवळ गेलो. रमेश हातातल्या कोयत्याने वाट करतच आम्हाला नेत होता तिथे. ह्या बाजूला एक जवळजवळ किल्ल्याच्या उंचीचीच एक प्रचंड शिळा उभी आहे. त्याच्या शेजारी एका खोबणीतून वर जायला वाट आहे. ही वाट काही खरी वाट नसणार. दगड पडून झालेली खोबणी ही सध्याची तात्पुरती झालेली वाट. त्यामुळे इथे पायर्‍या वगैरे असण्याचा संबंधच नाही. त्या खोबणीतून डोकं वर काढून सरतेशेवटी किल्ल्यावर पोचलो.

किल्ल्याचा आकार केवढा आहे वर? लंबूळक्या आकाराचा हा किल्ला लांबीला ४०-४२ मीटर आहे आणि रुंदी तर फक्त १५ मीटर म्हणजे अवघी ४५ फूट.

आजूबाजूचा परिसर बघता हा नुसता टेहळणी बुरुज वाटत नाही. म्हणजे टेहळणी करण्यासाठी जे स्थान आवश्यक असते असे स्थानच नाहीये ह्याचे आणि तटबंदीही पूर्ण आकारात आहे. म्हणजे हा नुसता त्यांनी टेहळणी बुरुज नसून प्रॉपर किल्ला आहे. आत्तापर्यंत पाहिलेल्या किल्ल्यांत हा सर्वात लहान आकाराचा किल्ला आहे असं म्हणायला हरकत नाही.

माथ्यावरचा एकमेव अवशेष

वर पोचलो तर मध्ये मध्ये लांब लांब दगडी शिळा पडलेल्या आहेत. त्यावर दगड घडवत असल्याच्या खुणाही आहेत. लंबूळक्या माथ्यावर उजवीकडच्या टोकावर खांबी वास्तू आहे. या वास्तूवर चढून बघितले तर खालच्या बाजूला लहानशी मुक्कुंदा गावातली वस्ती दिसली. किल्ल्याची उंची मुळातच फार नसल्याने लांब वरचे दिसणे काही शक्यच नव्हते.

वास्तुवरून दिसणारा किल्ल्याचा लंबूळका आकार

येथून किल्ल्याचा संपूर्ण लांबुळका भाग एका दृष्टीक्षेपात बघता येतो. दुसऱ्या टोकाला आलो. तिथे एका बाजूला तटबंदी ढासळलेली आहे. हा भाग घालून आम्ही पाहिला होता. आम्ही जिथे उभे होतो तिथे पायाखाली खरंतर एक वास्तू आहे. आतले बहुतेक ढासळलेले असल्‍याने ह्या वास्तूचे कसलेच प्रयोजन कळत नाही.


मागच्या बाजूने किल्ला

२० मिनिटांत किल्ला बघून आल्यावाटेने खोबणीतून खाली आलो. सगळे परत निघालो पण माझ्या डोक्यात ब्लॉगमध्ये वाचलेली एक शंकराची पिंडी डोक्यात होती आणि त्याच्या शेजारीच पडलेला असायला हवा होता एक दगडी खांब, ज्याच्यावर एक शिलालेख आहे. हनमेशलाही ते पाहिल्याचे आठवत होते पण नेमकी जागा आठवत नव्हती. वेळ कमी होता त्यात भयानक असं हे वावर. शोधता शोधता घाईत जे व्हायचं तेच झालं. जरा पाऊल वाकडं पडलं आणि एक नवनिर्मित बुरुज मी तोडला. परिणाम माझी चप्पल पवित्र झाली आणि शंकराची पिंडी वगैरे सगळं विसरावं लागलं.

वस्तीत परतल्यावर रमेशने पाण्याची व्यवस्था करून दिलीन आणि मग ते साफ करण्याचा कार्यक्रम उरकला. पटापट गाडीत बसून रवाना झालो ते रौडकोंडाला.

सुखद आठवणींशिवाय काही नेऊ नका... आणि पाऊलखुणांशिवाय काही ठेऊ नका!!!



Sunday, May 9, 2021

कर्नाटकातील किल्ले: किल्ले रायचूर आणि किल्ले मालिआबाद

किल्ले रायचूर

रायचूर किल्ला बघून झाल्यावर मुक्कामाला जायचं होतं रायचूर जिल्ह्यात. गाडीत बसल्यावर काम चालू झालं ते राहण्यासाठी ठिकाण शोधायचं. मंदिर वगैरेंचा विचार करता करता डॉर्मेटरी विषय झाला आणि नवरंग दरवाजा रस्ता परिसरात सोय झाली.

हि डॉर्मेटरी म्हणजे चक्क एकावर एक बेड असणारी बस सारखी झोपायची व्यवस्था असलेली निघाली. म्हणजे चक्क एसी-स्लीपर बस एका ठिकाणी रात्रभर उभी आहे असं वाटावं. पण व्यवस्था उत्तम. प्रत्येकाला चार्जिंग पॉईंट, लाईट, बॅग ठेवायला जागा वगैरे. अशी चक्क ३५० तरी बेड असतील तिथे. बऱ्यापैकी पुरतील सगळ्यांना एवढी सकाळी आवरण्याची व्यवस्था, बाथरूम वगैरे. म्हणजे म्हटलं तर व्यवस्था उत्तम झाली. गरम नसले तरी अंगावर घेण्याइतपत पाणी मिळाले. ट्रेकचा तिसरा दिवस आणि सलग आंघोळ 😄
तिथून सामान घेऊन बाहेर आलो. ते गाडीत टाकलं आणि इडलीचा कुकर शोधला अर्थात त्यातून गरम गरम इडल्या काढत असलेल्या मालकासकट. इडल्या चापून चहा ढोसला आणि रस्ता विचारून लागलो तडक किल्ले रायचूरकडे.
रायचूर किल्ला तुंगभद्रा नदीकाठी आहे. सापडलेल्या शिलालेखानुसार हा किल्ला काकतिय राणी रुद्रम्मादेवी हिच्या आदेशाने राजा विठ्ठल याने तेराव्या शतकाच्या अखेरीस बांधला. नंतर बहामनी व आदिलशाही राजवटीत आला. त्यांनी त्याचा विस्तार केला. हा किल्ला दोन भागात आहे. “अंदरून” आणि “बाहरून”. बाहरून म्हणजे रायचूर शहराला असलेला जणू परकोट. ह्याला पाच दरवाजे आहेत. त्यातला “नवरंगी” दरवाजा सर्वात जास्त प्रसिद्ध. इतर दरवाजे म्हणजे मक्का, काठी, खंदक आणि दोड्डी दरवाजा.

दर्ग्याच्या जवळ कातळात कोरलेल्या पायऱ्या
आधी अंदरून किल्ला बघायचे ठरले होते. अंदरून किल्ला म्हणजे या शहरातल्या एका उंच टेकडीवर असलेला किल्ला. शहराच्या ह्या भागाचे नांव पण “अंदरून किल्ला” असेच आहे. रायचूर बस स्टँड समोरच “काली मशीद”, कबरस्थान आणि “दर्गा हज शेख मिया”/”टाकी वाले बाबा दर्गा” आहे. टेकडीवर असलेल्या अंदरून किल्ल्याकडे वाट तिथूनच जाते.

डाव्या बाजूला असलेली तटबंदी

खाली दर्गा, त्याच्या पुढचं छोटंसं तळं, त्यात कारंजं

प्रवेशद्वार आणि त्यावरील तटबंदी

प्रवेशद्वार
ह्या वाटेने वर निघाल्यावर उजवीकडच्या कडेच्या बाजूला तटबंदी दिसायला लागली. मागे वळून बघितलं तर खाली दर्गा, त्याच्या पुढचं छोटंसं तळं, त्यात कारंजं आणि नुकतीच दर्ग्यावर प्रार्थनेसाठी यायला लागलेली लोकं दिसायला लागली. थोडासा ओबड-धोबड रस्ता पार केल्यावर पायऱ्या लागल्या. त्यावरून जाताना काही मिनिटांतच तीन प्रचंड दगडी शिळांचं  नैसर्गिकरित्या तयार झालेलं प्रवेशद्वार लागलं. गंमत म्हणजे हेच गडाचे प्रवेशद्वार आहे. ह्या दगडांची रचना न बदलता उलट त्यांच्याच आधाराने बाजूला तटबंदी तर वरती बुरुज बांधलेला आहे.

प्रवेशद्वारापुढील नैसर्गिक दगडी कमान (आतील बाजूने)

दगडी पायऱ्या

दृश्य पूर्वेकडील टोकावरून, सूर्योदय आणि आम तलाव

ह्या नैसर्गिक दरवाजातून आत गेल्यावर आणखी एका कमानीतून पलीकडे गेलो. आजूबाजूला मोठे दगड व शिळा. उजव्या बाजूला तटबंदीचे अवशेष. पायऱ्यांवरून चालत गेलो तर डाव्या बाजूला एक तलाव असावा जो कोरडा पडलेला होता. किल्ल्याच्या समोरच्या टोकावरून सूर्य वर डोकावताना दिसला. किल्ल्याच्या ह्या पूर्वेकडील टोकाला पोचलो. खाली उजव्या बाजूला प्रचंड पसरलेला तलाव आहे, हा “आम तलाव”. किल्ल्याच्या टेकडीवर आम्ही उभे होतो तर टेकडीवरून खालच्या बाजूला अजून तटबंदी दिसली.
या किल्ल्याला तीन लेअर मध्ये तटबंदी आहे तळापासून. बहुतांशी तटबंदी ढासळलेली आहे.

सर्वोच्च माथा प्रवेशद्वार

ह्या पुर्वेकडील टोकावर उभे असताना डावीकडे पाहिले तर एक प्रवेशद्वार दिसले. ह्याच्या बाजूची तटबंदी सुद्धा बऱ्यापैकी ढासळलेली आहे. तिथून आत मध्ये गेलो तर डावीकडे एक थडगं दिसलं. तिथे नित्यनियमाने पूजा-अर्चा होत असावी. समोरच लक्ष वेधून घेते ती एक तीन कमानी असलेली एक इमारत.

चौथरा आणि इमारती

हा एक राहता वाडा असावा. तीन कमानी पैकी उजवीकडची कमान आता अर्धी ढासळलेली आहे. आम्ही एका ब्लॉगवर ह्या किल्ल्याबद्दलची माहिती वाचली होती, त्यावर असलेल्या फोटोत ह्याच इमारतीच्या तीनही कमानी सुस्थितीत होत्या. म्हणजे सध्या शिल्लक असलेल्या अडीच कमानी कालांतराने दोन होऊ शकतात. इमारतीच्या डाव्या बाजूला एक छोटेखानी वास्तू आहे. ह्यालाही मिनार आहेत.

एकमेव तोफ

आम तलाव (मोठा) आणि खास तलाव (लहान)

एकूणच किल्ल्याचा हा सर्वोच्च माथा म्हणता येईल. याच्या मधोमध एक मोठा चौथरा आहे, जिथे पुर्वी वाडा असावा. उजव्या हाताला एका बाजूला चौथऱ्यावर एक तोफ पडलेली आहे. ती चांगली २१ एक फूट लांब आहे. तोफेच्या एका टोकावर पर्शियन भाषेत लेख आहे. इथून भोवातालचे लांबपर्यंतचे दृश्य दिसते. लांबवर काही डोंगर दिसतात, ह्याबाजुलाच मालिआबाद किल्लाही असावा. तर जवळच खालच्या बाजूला प्रचंड पसरलेला “आम तलाव”, त्याच्या अलीकडे लहानसा “खास तलाव”. हे दृश्य बघून तीन कमानीवाल्या इमारतीजवळ आलो.

मंडप

कमानीयुक्त इमारत

इमारत आतील बाजू - झरोके

झरोक्यातून बाहेरचे दृश्य

झरोक्यातून बाहेर दिसणारा अर्धवट कोरलेला नंदी

इमारतीच्या बाहेर उजव्या बाजूला एक मंडप आहे. पूर्वी एखादे मंदिर इथे नक्कीच असणार हे दर्शवणारी ही वास्तू. या मंडपाच्या छतावरील दगडांवर वेलबुट्टीची सुरेख नक्षी कोरलेली आहे. कमानीदार इमारतीत आतमध्ये पलीकडील बाजूला चांगले झरोके आहेत. इथल्या एका झरोक्यातून बाहेर एका दगडावर अर्धवट कोरलेला नंदीही दिसला.

मिनारयुक्त लहानशी वास्तू

वास्तूजवळून खाली रायचूर शहर

ही इमारत बघून शेजारच्या मिनारवाल्या वास्तुकडे आलो. वास्तू लहान असली तरी रेखीव आहे. दोन मिनार मात्र ढासळलेले आहेत. ह्या बाजूने खाली रायचूर शहराचा भाग छान दिसतो. रायचूर बसस्थानक आणि पलीकडे एक मोठे मैदान येथून दिसते.

मोठ्या दगडी शिळांवर फोटो काढायचा मोह कसा आवरणार...

“अंदरून” किल्ल्याचे सगळे अवशेष पाहून झाले. परतताना अवशेष निरखत, फोटो काढत त्या नैसर्गिक दरवाजातून खाली आलो.
जेमतेम ८:३०-७:४५ वाजत असावेत, सकाळी खादंती करूनही पोट परत खायला मागत होतं. अर्थातच चांगले हॉटेल बघून गाडी थांबवली. इडली, डोसा, उपीट, पोहे, मेदुवडा जे काही मिळालं ते रिचवून पुढच्या अवशेषांकडे वळलो.
शहरात पसरलेला “बाहरून” किल्ला बघायला सुरुवात केली. इथे रस्त्यांवरून फिरताना अवशेष दिसायला लागले.

बाहरून किल्ल्याचे बुरुज 

बाहरून किल्ल्याचे दरवाजे आणि इतर अवशेष
नवरंग दरवाजाकडे जाताना अनेक लहान मोठे बुरुज लागले. जिथे शक्य झाले तिथे उतरून ते नीट पाहता आले तर काही ठिकाणी फक्त लांबूनच ते बघता किंवा फोटो घेता येत होते.

अवशेषांवरील नक्षीकाम असलेले दगड

बहुतांशी बुरुजांची अवस्था खूपच वाईट आहे. झाडे झुडपे वाढलेली आहेत. अतिक्रमण प्रचंड आहे. निरखून पाहिल्यास बुरुजातील काही दगडांवर कोरीव काम केलेले दिसते. हे सगळं जतन केल्यास खूप मोठा ठेवा हाती लागू शकेल, पण अतिक्रमणामुळे ते कितपत शक्य आहेत ते सरकारी खातंच जाणो.


नवरंगी दरवाजा

एवढं करून नवरंग दरवाज्यापाशी पोचलो तर हा सगळा भाग कर्नाटक सरकारच्या पुरातत्व विभागाने Museum केलेला दिसला. सरकारी म्हटल्यावर ९-९:३० ला काय उघडणार? त्याची उघडायची वेळ साडे दहा होती आणि कोरोना काळामुळे ते उघडेल की नाही याचीही शाश्वती नव्हती.

आतील बाजूस ठेवलेल्या पुरातन वस्तू

दरवाजातून डोकावून जमेल, दिसेल तेवढे नजरेखाली घातले. खूप जुन्या मूर्ती, शिलालेख इथे जतन करून ठेवलेले दिसले. आमच्या दुर्दैवाने ते जवळ जाऊन काही पाहता आले नाहीत. आत मध्ये खूप काही बघायला असणार हे मात्र नक्की.
वेळ-काळ ओळखून, मनावर दगड ठेवून तो भाग पुन्हा कधीतरी बघू म्हणून तसाच सोडून पुढच्या किल्ल्याकडे वळलो.
पुढे जायचं होतं मालिआबादला.

किल्ले मालिआबाद


मालिआबादला पोचल्यावर किल्ल्याची चौकशी करायच्या ऐवजी सरळ “रमणी गोशाळा” विचारायचं. ही गोशाळा किल्ल्यातच आहे. एक कच्चा रस्ता या गोशाळेकडे घेऊन जातो. वाटेत दोन्ही बाजूला कापसाची शेती आहे तर पुढे बऱ्यापैकी जंगलाचा भाग आहे. इथे मोर तर आरामात फिरताना दिसले.

कच्चा रस्ता आणि आजूबाजूला दिसणारे अवशेष


साधारण दहा वाजले होते. या कच्च्या रस्त्यावर आल्यावर गोशाळेकडे जाताना वाटेतच किल्ल्याचे अवशेष दिसायला लागले. हा किल्ला म्हणे १०० एकर मध्ये पसरलेला आहे.

कापसाची शेती

अर्थातच थोडे मोठे आवार आम्हाला बघण्यासाठी कोणीही योग्य ठेवलेलं नसणार हे गृहीत धरलेले होते. कारण एवढे मोठे वावर, त्यात शेतं असणारच. वस्ती नसेल फारशी असं जरी धरलं तरी एवढा मोठा भाग मोकळा कोण ठेवणार?

गोशाळेचे गेट

गोशाळेच्या गेटच्या आतील बाजूने गडाचे अवशेष

तर... गेट मधून आत गेलो तर जवळच एक हनुमान मंदिर दिसलं. या मंदिराच्या परिसरात असंख्य कोरीवकाम केलेले दगड आहेत. परिसरात तिथली मंडळी बसलेली होती, त्यात कदाचित काही इथली मॅनेजमेंट बघणाऱ्या मंडळींपैकी ही असावीत. गोशाळेत तर अनपेक्षित असा अनुभव आला. मंडळी तर कन्नड सोडून कशातच बोलायला तयार नव्हतीच. वर काही दाखवायलाही अनुत्सुक होती. इथले काही आम्हाला ते फिरू देणार नाहीत हे समजल्यावर या किल्ल्याबरोबर अजिबात न टाळता बघावी अशी गोष्ट म्हणजे अखंड दगडात कोरलेले हत्ती, ते तरी बघायला मिळावे म्हणून चौकशी केली. आमच्याकडे असलेल्या माहितीप्रमाणे ते जवळपासच्या कापसाच्या शेतात ठेवलेले असणार होते. पण चौकशी केल्यावर त्या मंडळींनी काहीच सांगायला नकार दिला. उलट तिथल्या कामगार बायकांनी काही सांगायला सुरुवात केल्यावर त्यांनाच गप्प राहायला सांगितल्यासारखे वाटले.
ह्या किल्ल्यात तटबंदीजवळ कुठेतरी शिवमंदिर आहे हेही वाचून होतो. पण यातलं काहीच आमच्या नशिबात दिसत नव्हतं. या मंदिरात म्हणे ३ फुट उंचीची शंकराची पिंडी आहे आणि वीरगळही आहे. ह्यातले काही नाही तरी जेवढा बघायला मिळेल तेवढा किल्ला आणि किमान ते हत्ती तरी बघायचेच असं ठरवून त्या गोशाळेतून बाहेर निघालो.
बहुतेक सरकारी/पुरातत्व खात्याच्या माणसांनी यांच्या श्रद्धास्थानांना काही धोका पोचावलेला असावा. कदाचित तिथल्या वस्तू उचलूनही नेत असावेत नाहीतर असे अनुभव येत नाहीत. अर्थात हा आमचा तर्क होता वस्तुस्थितीची कल्पना नाही.



गोशाळेतून बाहेर पडून कच्च्या रस्त्यावर वाटेत भेटलेल्या लोकांशी चौकशी करत एका कापसाच्या शेतात घुसलो. तिथल्या बायका बहुतेक तुळू मध्ये बोलत होत्या. त्यांनी खाणा-खुणा करून हत्ती कुठे आहेत ते सांगितल्यावर त्या कापसाच्या शेतातून वाट काढत ते “दगडांचे हत्ती सांगा कुणी पाहिले” करत निघालो. आम्ही सरळ किल्ल्याच्या तटबंदीवरुन चालत होतो हे लक्षात आलं. तटबंदीला लागून किल्ल्याचा आतमध्ये सगळी शेती आहे.

कापसाच्या शेतात असलेले हत्ती

सगळेजण त्या शेतात कुठेतरी लपलेले (कि लपवलेले?) हत्ती दिसतात का ते बघत होतो. अचानक एके ठिकाणी दुरवर ते हत्ती दिसले. आता तटबंदी सोडून सरळ त्या शेतात घुसलो. कसली वाट अन कसलं काय! त्या कापसाच्या शेतातूनच तिथपर्यंत पोचलो.




अहाहा! हत्तींचे सौदर्य काय वर्णावे? संपूर्ण एका दगडात एक असे दोन हत्ती कोरून ठेवलेले आहेत. अगदी Lifesize मध्ये. डोळे, सोंड, सुळे, सुळ्यावरचे दागिने, कान... काय काय लिहायचे? अवयव आणि दागिने... सगळंच सुरेख! पाठीवर झुल, गळ्यातले वळ्यावळ्यांचे दागिने, साखळ्या, त्या साखळ्यांना घंटा. गंडस्थळावर खास लटकन असलेला दागिना आणि गंमत म्हणजे पाठीवरची झुल नुसतीच नाही तर त्याला व्यवस्थित Figure of 8 ची गाठ मारलेली आहे. पायात घुंगुर... असो. वर्णन अशक्य.

हत्तीच्या पाठीवरील Figure of 8 ची गाठ

मनसोक्त फोटो झाल्यावर सरळ निरखत बसलो प्रत्येक दागिना. अगदी जणू हातात घेऊन पाहिला.

नक्षदार दगड

पूर्वी इथे मंदिर असावे किंवा जिथे मंदिर असेल तिथे हे हत्ती असावेत कारण आजूबाजूला काही नक्षीदार दगडी गोळा करून ठेवलेले आहेत, जे मंदिराच्या बांधकामाचे दिसतात. पुरातत्ववाले हे उचलून नेत असावेत म्हणून स्थानिक आम्हाला हे सगळं दाखवत नसावेत.

काही अनगड देव

तटबंदीचे प्रचंड आकाराचे दगड

प्रचंड आकाराच्या दगडांची तटबंदी

आम्ही हे पाहून त्या कापसाच्या शेतातून परत तटबंदीवर आलो. पूर्ण मागे न जाता वाटेतच एका बाजूला कच्चा रस्त्याकडे परत जायला जागा आहे. हे किल्ल्याचे एक प्रवेशद्वार आहे. सगळी तटबंदी आणि बांधकाम प्रचंड आकाराच्या घडवलेल्या दगडांनी बांधलेले आहे. लांबीला एक-एक दगड किमान दहा फूट तरी असावा. तरी ह्या प्रवेशद्वाराचे सुद्धा अवशेषच शिल्लक आहेत. यामधूनच कच्च्या रस्त्याने आम्ही गोशाळेकडे गेलो होतो.
थोडक्यात जेवढा बघायला मिळाला तेवढा मालिआबाद किल्ला बघून झाला. अकरा वाजत आलेच होते.

पुढे बघायचा होता किल्ला मान्वि.


सुखद आठवणींशिवाय काही नेऊ नका... आणि पाऊलखुणांशिवाय काही ठेऊ नका!!!