Sunday, February 26, 2023

विदर्भीय भटकंती – किल्ले महादागड

किल्ले म्हटलं की डोळ्यासमोर येतो तो सह्याद्री. डोळ्यासमोर येतात ते मराठा साम्राज्य आणि छत्रपती शिवाजी महाराज! आपल्या सुदैवाने इतकं सुंदर चित्र सतराव्या शतकात चितारलं गेलं आणि आपलं नशीब म्हणून आपण त्या चित्राचा एक भाग असलेल्या मातीत जन्माला आलो. किल्ला म्हटलं की “महाराजांचा गड” म्हणून आपण जवळ करायला बघतो तळपलेल्या उन्हात, चिंब पावसात, लाल-काळ्या मातीतून किंवा काळ्याकभिन्न कातळावरून...

पण ह्या मराठा साम्राज्याबरोबर अजूनही काही साम्राज्य इतरत्र नांदत होती, जी मराठा साम्राज्याचा भाग होऊन भाग्यवान ठरली नाहीत. विदर्भ हा त्यातलाच भाग. या “गोंड”वनातील किल्ले हे “गोंड” राजाकडे होते, जे मुघलांचे मांडलिक बनून राहिलेले होते. गोंड राजांचा काळ हा तेराव्या शतकापासून सुरू होऊन १७व्या शतकानंतर नागपूरकर भोसल्यांनी घेईपर्यंतचा. या गोंडवनातील किल्ले ही अत्यंत सुंदर आहेत व ह्यातले गिरीदुर्ग प्रकारात मोडणारे किल्ले हे बहुतेककरून चहूबाजूंनी घनदाट अरण्याने वेढले गेल्याने ते वनदुर्ग आहेत. सुदैवाने ते खरंच वनदुर्ग राहिलेले आहेत.

ह्या भटकंतीत नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, वर्धा आणि यवतमाळ असे सात जिल्हे पालथे घालून जवळपास ३७ किल्ल्यांना भेट दिली. त्यातले मोजकेच किल्ले या लेखमालेत मांडणार आहे. त्यातला पहिला लेख हा “महादागड” ह्या वनदुर्गावर.

हा सोप्या श्रेणीतला किल्ला आहे. सहज भटकत जावे आणि किल्ला फिरून यावे. पण यासाठी दोन महत्त्वाचे अडथळे आहेत. ते म्हणजे प्रचंड संख्येने भटकंती प्रेमी असलेल्या पुण्या-मुंबईपासून खूप लांब आहे, नागपूर जिल्ह्यात. आणि दुसरे म्हणजे घनदाट जंगलात हा किल्ला आहे. गंमत म्हणजे हा जंगलाचा भाग पुणे-मुंबईकडून नागपूरकडे जाताना फक्त ३० किलोमीटर आधी अंतरावर आहे. समृद्धी महामार्गाने नागपूरकडे जाताना “सातनवरी” नावाचे ठिकाण “बाजारगाव” च्या पुढे आहे. तिथून डावीकडे हा किल्ला चार किलोमीटर पेक्षा कमी अंतरावर आहे. “सातनवरी” वरून डावीकडे वळून पुढे जाताना “खैरी” गांव लागते. इथे कागद कारखाने आहेत. इथल्या “उत्कर्ष पेपर मिल” च्या पुढे हा रस्ता किल्ल्याच्या पायथ्याशी जातो. ह्या पेपर मिलजवळ पोचलो की गुगल मॅप बंद करायचा. नाही तर आपला वेळ वाया जातो आणि स्थानिकांची मदत घेतल्याशिवाय पुढे नक्की समजत नाही.

कच्चा प्रशस्त रस्ता

गावात पोचल्यावर वस्तीजवळ डांबरी रस्ता संपतो तिथे वडाच्या पारावर नागमूर्तीची स्थापना केलेली आहे. इथे उजवीकडे वस्ती आहे तर समोरचा कच्चा, पण प्रशस्त रस्ता जंगलाकडे जातो. रस्ता तसा चांगला मळलेला आहे पण आपल्याकडचं जंगल आणि इकडचं जंगल ह्याच्यात खूप फरक असल्याने आम्ही मोठ्या कष्टाने गावातल्या दादांना आमच्याबरोबर यायला तयार केले आम्हाला किल्ला दाखवायला.

प-ह्या

एक तर पावणेतीन झालेले होते. भटकंतीचा हा पहिलाच दिवस, पहिलाच गिरीदुर्ग. हा राखीव जंगलाचा भाग. रस्ता चुकून वेळ वाया घालवणे आम्हाला परवडणारे नव्हतेच. ह्या प्रशस्त रस्त्यावरून चालू लागल्यावर अवघ्या दोन मिनिटात एका प-ह्याजवळ पोचलो. स्वच्छ पाण्यात अंग घुसळावे हा झालेला मोह बाजूला ठेवत बूट सुद्धा न भिजवता तो दगडांवरून उड्या मारत पार केला आणि वन खात्याच्या लोखंडी गेट जवळ पोचलो.

बांबूच्या वनात.. अहा अहा...

उजवीकडेची मळलेली पायवाट थेट गडावर जाते. वाटेत बांबूचं अक्षरशः वन आहे. पराकोटाची तटबंदी असेल असं वाटणारा एक गडगा ओलांडून जंगल भागातून किल्ल्याच्या पायवाटेवर चालताना पुढे इथे पूर्वी पायऱ्या असाव्यात अशा मार्गाजवळ येतो. तिथूनच डावीकडे गड स्पष्ट दिसायला लागतो.

तटबंदी

गडाच्या दरवाजात

मोठमोठ्याला खडकांवर तटबंदी दिसायला लागली आणि दोन मिनिटात गडाचा उध्वस्त दरवाजा लागला. दरवाजाचे अवशेष काही शिल्लक नसले तरी उजवीकडच्या शिल्लक तटबंदीमुळे आणि डावीकडच्या बुरुज सदृश्य पण आता शिल्लक नसलेल्या बांधकामामुळे इथेच दरवाजाचे अस्तित्व असणार हे कळून येते. वरती दर्गा असल्याने हिरवी फडकी काही ठिकाणी लावलेली दिसतात.

गडाची शाबूत तटबंदी

दर्गा

गडाची तटबंदी शाबूत आहे, फक्त झाडीत लपून गेलेली आहे. दर्ग्याच्यासमोर एका झाडाखाली हिंदू देवस्थान आहे. तिथे लावलेला ॐ आणि त्रिशूळ यामुळे त्याचे अस्तित्व टिकून आहे. इथे मूळ शंकराचे स्थान होते असं वाचनात आलं होतं, पण सध्या पिंडी काही दिसत नाही.

जुने शंकराचे स्थान जे आता नष्ट होत चालले आहे

अनगड देव

गडमाथा तसा लहानच आहे आणि तटबंदी शाबूत आहे. या माथ्याच्या बऱ्यापैकी मधोमध असलेल्या या दर्ग्याच्या डावीकडून मागच्या बाजूला गेल्यावर काही अनगड देव दिसतात. शेंदूर फासलेल्या देवाजवळ दिवाबत्तीची सोय आहे.

पलीकडे डोळ्यांना सुखावणारं हिरवंगार जंगल

तटबंदी पलीकडे लांबवर पसरलेलं घनदाट हिरवंगार जंगल डोळ्यांना सुखावतं. एकूणच गडाचे स्वरूप बघता, त्यावेळीही इथे राबता नसावा. पण याचं स्थान पाहता टेहळणीच्या दृष्टीने आणि एक लष्करी ठाणं म्हणून याचं महत्त्व नक्कीच जास्त असेल.

गड-देवता

गड-देवता

आल्यामार्गानेच खालपर्यंत आल्यावर जंगलातच एके ठिकाणी एक गणपती जंगल राखतो आहे, हे स्थान जातानाच हेरून ठेवलेलं होतं पण दुसरं स्थान मात्र स्थानिक बरोबर नसेल तर कळूसुद्धा शकणार नाही. इथे गणपती आणि हनुमानाच्या मूर्ती आहेत. गणपतीची मूर्ती ही नेहमीपेक्षा वेगळी आहे, जी उभी आहे आणि त्याचा साईड-व्ह्यू आहे. एका हनुमानासमोर एक नंदीही आहे. म्हणजे शंकराची पिंडी कुठेतरी गायब झालेली असणार हे नक्की.

महाकाली देवस्थान - मांसाच्या नैवेद्याची व्यवस्था

स्थानिकांचा आग्रह मोडवेना, म्हणून “मौजे भुयारी (शिरपूर) धामणा” इथल्या महाकाली देवस्थानालाही भेट दिली. मूळ मंदिर आता अस्तित्व गमावून बसलेले असले, तरी त्यावेळच्या मूर्ती तिथे जतन करून ठेवलेल्या आहेत. या महाकाली देवीला बकरा किंवा कोंबड्याचा नैवेद्य लागत असल्याने त्याची स्वतंत्र सोयही केलेली आहे.

पहिल्या दिवसाच्या भटकंतीची सांगता करून पुढे मुक्कामाला “पार-शिवनी” गाठले. सकाळी बघायचा होता “कुंवारा भीमसेन” हा पेंच अभयारण्य किल्ला.

सुखद आठवणींशिवाय काही नेऊ नका... आणि पाऊलखुणांशिवाय काही ठेऊ नका!!!

Sunday, February 19, 2023

रसलपुर सराई, वरखेड गढी, मलकापूर नगरकोट

रसलपुर सराई

याआधीच्या भटकंतीत काही गिरीदुर्ग, वनदुर्ग, जलदुर्ग आणि स्थळदुर्ग बघायला मिळाले होते, पण त्यात “सराई” हा प्रकार माहिती नव्हता. “सराई” म्हणजे एक प्रकारचा स्थळदुर्ग प्रकारात मोडणारा किल्ला. फरक असा कि, या प्रकारच्या किल्ल्याचा मुख्य उद्देश नेहमीच्या किल्ल्यांसारखा लढाईच्या दृष्टीने सुरक्षित जागा किंवा शेजारच्या प्रदेशावर ताबा मिळवण्यासाठी, टेहळणीसाठी असलेले ठिकाण/चौकी वगैरे नसून दोन महत्त्वाच्या ठिकाणांना जोडणाऱ्या रस्त्यावर येणाऱ्या-जाणाऱ्या लोकांच्या, व्यापाऱ्यांच्या आणि लष्कराच्या विसाव्यासाठीची सुरक्षिततेची जागा असं म्हणता येईल. नगरकोट आणि सराई ह्या मधला हा महत्त्वाचा फरक म्हणता येईल.

यावल किंवा भुसावळवरून रस्ता साव्हडा, रावेर, खानापूरवरून पुढे बुऱ्हाणपूर कडे जातो. पालवरून रावेरकडे जाताना अलीकडेच हे रसलपूर आहे.

ही सराई बघणे, म्हणजे खरं तर दिव्य काम आहे. ही सराई पूर्णपणे कॅप्चर्ड आहे. सामान्यतः नगरकोटांच्या आत-बाहेर वस्ती वाढतेच, पण ही सराई पद्धतशीरपणे ताबा मिळवलेली आहे. स्थानिकांच्या वागण्या-बोलण्यातून आणि नजरेतून ते सहज कळून येते.

अतिक्रमण: खंदकांवर आणि तटबंदीशेजारी

माझ्या गळ्यात अडकवलेल्या कॅमेरावरून पत्रकार किंवा सरकारी माणसं असल्यासारखे वाटून अगदीच हाकलून लावता येत नसल्याने, “हमारा इलाका” दाखवायला आलेल्या मुलाने “अब ये हमारा है” असं स्पष्ट म्हणून शंकेला जागा सुद्धा ठेवलीन नाही.

तसे म्हटले तर खूप अवशेष शिल्लक आहेत. परंतु तटबंदी-बुरुज जे काही आहे त्याला नुसते लागून नव्हे, तर त्यावर आणि आतमध्ये सुद्धा घरं बनवून ताबा मिळवलेला आहे. म्हणजे पूर्वापार नगरकोटाच्या आत-बाहेर लागून जागा दिलेल्या असत, पण बुरुजाच्या आत कोणाला कोणत्याच राज्यकर्त्याने जागा दिलेली असणे शक्य तरी आहे का? तटबंदीच्या बाजूने असलेल्या खंदकांवर काही ठिकाणी सरळ सरळ तो बुजवून त्यावर घरे बांधण्याचे काम चालू आहे. म्हणजे चुकून सुद्धा ज्याला वडिलोपार्जित आहे म्हणून तरी अधिकृत वगैरे म्हणावे असं सुद्धा नाही. आणि त्यातून साधारण पंधरा फुटाच्या आसपास असलेल्या ह्या खंदकावर घाण आणि कचऱ्याला तर सुमार नाहीच. तसं एकूणच इकडच्या सगळ्या भागात हीच परिस्थिती आहे.

असो, तर हे अवशेष शोधून-शोधून बघताना कधी एखादा बुरुज लपलेला दिसायचा, तर कधी दरवाजा. तटबंदीत घरं तर दोरीवर कपडे वाळत घातलेले दिसतात तशी सजलेली दिसली.

अतिक्रमण: दरवाजा कमानीत, तटबंदीत

शिल्लक असलेल्या दरवाजांपैकी एक उत्तरेला तर एक पूर्वेला आहे. फोटोत दिसत असलेल्या दरवाजाला लागून, वरती आणि चक्क आतमध्येसुद्धा घर सहज दिसतात. हे अवशेष शिल्लक राहण्यामागचे कारण सुद्धा १०-१२ फूट उंचीची दगडी बांधीव मजबूत भिंत फुकट, कष्ट न करता बांधून मिळते तर कशाला सोडा? हेच असेल.

काही ठिकाणी ह्या दगडी भिंतींच्यावर विटांचे बांधकाम दिसते. त्यात जंग्या दिसतात. तटबंदीतल्या खोल्यांत लोकांनी घरं, तर काही ठिकाणी गुरांसाठी चक्क गोठे बांधलेले आहेत.

शिल्लक बुरूज पाहतानाही त्याचे तटबंदीच्या वरच्या उंचीचे बांधकाम विटांत केलेले दिसते. आत मध्ये फिरताना नशीब चांगले असेल आणि स्थानिकांनी दाखवले तर दोन विहिरी बघायला मिळतात. खंदकात उतरण्यासाठी बांधलेल्या पायऱ्याही काही ठिकाणी बघायला मिळतात.

सुदैवाने जे काही शिल्लक आहे ते बघायला मिळाले आणि पहिली-वहिली “सराई भेट” पदरात पडली.

वरखेड गढी

वरखेड/वरखेडे/वरखेडी अशा काहीशा नावाने ओळखली जाणारी गढी शोधणे हे जरासे कठीण काम आहे.

रसलपुर वरून मलकापूर कडे जाताना चिखली-दसरखेड मार्गे न जाता बोदवड मार्गे जावे. बोदवड-मलकापूर रस्त्याजवळ वरखेड बुद्रुक मध्ये ही गढी आहे.

गावात अतिशय जुने वाडे आहेत. त्याचे नक्षीदार दरवाजे, सुंदर कोरीव काम असलेले वासे पाहत या गढीजवळ पोचायचे. गढी बरोबर चौरस आकारात आहे. आतमध्ये उध्वस्त असलेल्या या गढीची तटबंदी मात्र पूर्ण शाबूत आहे.

गढी दरवाजे

मुख्य प्रवेशद्वारावरती विटात सुंदर नक्षीकाम आहे. बांधकामात दगडाचे असून वरचे बांधकाम विटात आहे. आतमध्ये खूप उध्वस्त अवशेष आहेत. तटबंदीवर चढायला तशी जागा नाही. पण शिल्लक अवशेषांवरून वर चढून तटबंदीवर फिरता येते.

पूर्ण तटबंदीला जागोजागी जंग्या आहेत.

अष्टकोनी शिल्लक बुरुज

तटबंदीच्या एका कोपऱ्यात अष्टकोनी, तटबंदीपेक्षा जास्त उंचीचा एक बुरुज आहे.

वेगळी गणेश मूर्ती

तटबंदीच्या आतमध्ये विहिर आहे. तिच्या काठावरच्या भिंतीतल्या कमानीत गणपतीची सुंदर उभी आणि नेहमीपेक्षा वेगळी मूर्ती आहे. गढीच्या आत मध्ये एक चौकोनी विहीर आहे.

भक्कम तटबंदी

गढीच्या बाहेरून फिरताना मात्र ही तटबंदी भव्य वाटते.

मलकापूर नगरकोट

मलकापूर हा नगरकोट असल्याने अवशेष पूर्ण पसरलेले आहेत. सात वेशींचे शहर अशी याची ओळख आहे. म्हणजे हा किल्ला पाहणे हा वेळ देऊन अवशेष शोधणे असे काम आहे. नगरकोट म्हटला की लांबच्या लांब तटबंदी, त्याला धरून वस्ती हे आलेच. त्यामुळे सुरुवातीला मुख्य दरवाजापासून श्री गणेशा करायचा.

आम्ही सरळ गाडी एका ठिकाणी लावून एक रिक्षा केली. स्थानिकांबरोबर फिरण्याचा फायदा म्हणजे आपण वाचून, माहिती काढून आलेले अवशेष तर त्यांच्या मदतीने बघता येतातच आणि अजूनही काही माहिती पदरात पडण्याची शक्यता असते. तसेच नगरकोट म्हणजे खूप अवशेष दडलेले असतात जे त्यांच्या शब्दांवर बघता येतात.

दरवाजा

अवशेषांची सुरुवात अशीच तटबंदीत बांधलेल्या बुरुजावरच्या घरापासून झाली. नगरकोटाचे सात वेशींचे शहर म्हणजे सात दरवाजे असणार. परंतु सध्या तीनच दरवाजे पाहता येतात. चौथा दरवाजा काही काळापूर्वीच रस्ता रुंदीकरणात पाडला गेल्याचे वाचले होते. पहिला मुघल दरवाजा बघितला, त्याला “बडा मुघल दरवाजा” म्हणतात. तिथे जवळच “सूर्यमुखी बडा हनुमान मंदिर” सुद्धा आहे. ह्या मुघल दरवाजाचे संवर्धन झालेले दिसते. वरचा अर्धा बुरुज आता सिमेंटने बांधलेला असून त्यावर ध्वज उभारण्यासाठी जागा ठेवलेली आहे. आतील बाजूने घराचे वेढलेली तटबंदी असली, तरी एके ठिकाणी बुरुजांवर जायला जागा ठेवून आपल्यावर कृपा केलेली दिसते.

दरवाजा

दरवाजा

जीभीची भिंत

सरळ पुढे गेल्यावर दुसरा दरवाजा लागतो त्याच्या समोर जिभीची भिंत आहे. दोन्ही बाजूला छोटे बुरुज आहेत. तिथे एक जुने मारुतीचे मंदिर आहे. तिसऱ्या दरवाजाच्या वर मात्र जाता येत नाही.

दुरावास्थेतले शिल्लक अवशेष

बुरुज

एका मागून एक असे दरवाजे बघता येतात. नदीच्या बाजूला सुटे बुरुज आहेत. एका दरवाजाच्या बाहेर घोड्यांच्या पागेसारखी जागा पण आहे.

नेमीवंतांची हवेली आणि राजे नेमिवंत यांचे श्रीराम मंदिर

शोधून शोधून दरवाजे, बुरुज वगैरे बघितल्यावर स्थानिकांच्या मदतीने “नेमीवंतांची हवेली”, “श्री मल्लिकार्जुन मंदिर”, राजे नेमिवंत यांचे श्रीराम मंदिर बघता येते. इथे एक मोठा देवनागरीतला शिलालेखही आहे.

राणी बाव - शिलालेख

गावाबाहेर एका शेतात एक जुनी बाव आहे, याला राणीची बाव म्हणतात किंवा लालबाव. समोरच शेतात एक जुनी वास्तू आहे. वास्तू जवळ हनुमान मंदिरही आहे. या विहिरीत दोन शिलालेख असून एक देवनागरीत दर दुसरा फारसी मध्ये लिहिलेला आहे.

या भटकंतीत गिरीदुर्गांपेक्षा बहुतेककरून जास्ती गढ्या आणि भुईकोट किल्ले किंवा वाडेच पाहण्यात आले. या भागात "सराई" हा एक वेगळा प्रकार बघितला.

भटकंतीत पुढे पिंपळगाव राजा इथली देशमुखांची गढी, रोहिणखेडचा भुईकोट किल्ला, देऊळगाव घाट इथला नगरकोट आणि शिरानी गढी तसेच “करवंड” इथली शेवटच्या घटका मोजत असलेली गढी, जाफ्राराबाद इथला भुईकोट किल्ला, मेहुणा राजा इथली गढी, देऊळगाव राजा इथला नगरकोट किल्ला तसेच उतरांडा इथली गढी पाहिली. “करवंड” इथली गढी इंगळे घराण्याची, म्हणजे शिवरायांची ८ वी पत्नी, “गुणवंताबाई” यांची आहे. ही तर “५२ बुरुजी” होती असं गावकरी सांगतात.

एकूणच यानंतर आमची भटकंती इथे सुफळ संपूर्ण झाली.

देशमुख गढी (पिंपळगांव राजा)

रोहीणखेड - गढी, मशीद

रोहीणखेड - एकलकोंडा बुरूज

देऊळगांव घाट - शिरानी यांचा वाडा

देऊळगांव घाट - नगरकोट दरवाजा

देऊळगांव राजा

सुखद आठवणींशिवाय काही नेऊ नका... आणि पाऊलखुणांशिवाय काही ठेऊ नका!!!