Thursday, February 26, 2026

जिंजी - त्रिचंदी कोट (तामिळनाडू)

जिंजीच्या लेखमालेत आपण थोडं उलट दिशेने जात आहोत. म्हणजे वास्तविक, याआधी कृष्णागिरी हा लेखमालेत आला असला, तरी त्याआधी आम्ही राजागिरी, म्हणजे "राजा" गड, सकाळी पाहिला.

"जिंजी" पाहणं हे व्यवस्थित वेळ घेऊन पाहण्याची गोष्ट आहे. या मोहिमेचं नियोजन करण्याआधी व्यवस्थित माहिती घेऊन आखणी केल्यास, कोणत्या ठिकाणी किती वेळ दिला पाहिजे याची मांडणी करावी. कारण मुळातच जिंजी हा दुर्गसमूह आहे. त्यात गिरीदुर्ग, स्थळदुर्ग असे मिश्रण आहे. त्यामुळे दिवसाच्या कोणत्या वेळी कोणता गड पाहायचा हे ठरवता येतं आणि आपल्यासमोर आलेले अवशेष पाहताना हे कोणत्या गडाचे आहेत हे आधीच माहिती असल्यास डोळसपणे दुर्गभ्रमंतीचा आनंद मिळतो.

जसं राजागिरीकडे पाहताना आपण लांबून दिसणारा डोंगर/टेकडी आणि त्यावर दिसत असणारे दुर्गावशेष, म्हणजेच फक्त दुर्ग आहे असं धरल्यास ते चुकीचं ठरतं. म्हणजे तो टेकडीवर असणारा राजागिरी हे बरोबर असलं, तरी जेव्हा आपण "गेंगावरम (की सेंजावरम?) - जिंजी" या मुख्य रस्त्यांवरून, या टेकडीकडे जाणाऱ्या रस्त्यावर वळलो, की आजूबाजूला पाहत राहिल्यास लक्षात येतं, की तटबंदी, बुरुज असले अवशेष आपल्या बाजूला अजूनही आहेत. किंबहुना, आपण रस्त्यावरून वळल्यानंतर तटबंदी फोडूनच आत आलेलो आहोत, हेही लक्षात येतं. अर्थात, हा राजागिरी गडाचा भाग नाही.

त्रिचंदी कोट - बाह्य भाग

हा आहे इथल्या भुईकोटाचा भाग, तोही बाह्य भाग. हा आहे ह्या दुर्ग-समूहातला भुईकोट - "त्रिचंदी" कोट! आणि अर्थातच, "राजागिरी" बघायची उत्सुकता कितीही असली, तरी या अवशेषांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. आम्हीही सकाळी आधी हे पाहिले नाहीत, तसं नियोजनच नव्हतं. आम्ही गेलो होतो त्याच्या आदल्या दिवशी पाऊस पडला होता आणि या भागात ऊन प्रचंड तापतं. त्यामुळे टेकडीवर असणारे अवशेष हे आधी पाहणं हे आमच्या नियोजनातच होतं. थोडक्यात, फक्त राजागिरी असं ध्येय न ठेवता वेळेच्या नियोजनात त्रिचंदीकोट हाही डोळसपणे पाहण्याचा भाग आहे, हे धरूनच आखणी करावी. राजागिरी पाहताना वाटेत दिसेल तेवढाच पाहणे, असं केल्यास आपण महत्वाचे भाग सोडून देत आहोत हे मनाला नक्की टोचत राहील.

त्रिचंदी कोट हा दोन भागात विभागलेला आहे, बाह्य भाग आणि अंतर्गत भाग. आपण बाह्य भागापासून सुरुवात करू. कोटाच्या बाह्य भागात खूप अवशेष आहेत, ह्यातले आपण काही अवशेष ह्या लेखात पाहू. पण अजूनही खूप अवशेष याचा भाग आहेत, जे ह्यात विस्तृतरित्या घेतले नाहीयेत. जसं वेंकटरमणस्वामी मंदिर, अंजनेयर मंदिर - अशी काही मंदिरं, पाण्याचे मोठे तलाव, टाकी, चौकी, बुरुज. ह्यातील तटबंदी प्रचंड मोठी आहे आणि ह्याच तटबंदीचा भाग, हा एक दरवाजा आहे. हा दरवाजा म्हणजे "पॉंडीचेरी गेट".

"जिंजी" या नांवाचं वलय दुर्गप्रेमींना ह्या जिंजीत घेऊन येतं. परंतु बघायला येणाऱ्यांकडून हा दरवाजा काही प्रमाणात दुर्लक्षित राहतो. कारण राजा–राणीचे गड म्हणून राजागिरी आणि कृष्णागिरीला भेट दिली जाते. परंतु बाकी थोडे बाजूला असलेले भाग दुर्लक्षित राहतात. हा कोटाचा बाह्य भाग म्हणून असणाऱ्या अवशेषातला महत्त्वाचा दरवाजा आहे, आणि अर्थातच तो पाहणं आवश्यक ठरतं. खरंतर, आपण शक्यतो कोणताही दरवाजा पाहायला जात असताना त्याच्या बाह्य भागातून आतमध्ये प्रवेश करतो. परंतु इथे मात्र थोडंसं विरुद्ध दिशेने जावं लागतं. म्हणजेच, राजागिरी गडाच्या तिकीटखिडकी असणाऱ्या मुख्य प्रवेशद्वाराकडे पाठ केल्यास, बरोबर समोर चालत गेल्यावर हा पॉंडिचेरी दरवाजा आहे. हा दरवाजाही तटबंदीतच आहे.

पॉंडीचेरी दरवाजा

या दरवाजाच्या बाहेरच्या बाजूने आपण प्रवेश केलेला नसतो. पण पलीकडच्या बाजूने बाहेर गेल्यावर कदाचित जनावरांसाठी उत्तम चारा असावा, कारण आमचं स्वागत भरपूर बकऱ्यांनी केलंनी. त्या तृप्त होऊन बहुतेक परतत होत्या. हा दरवाजा म्हणजे फक्त चौकट नाहीये, तर उत्तम वास्तुकला आणि बांधकाम आहे. बुरुजाप्रमाणे तटबंदीतून अर्धगोलाकार भाग बाहेर काढून त्यात देवड्या बांधलेल्या आहेत.

पॉंडीचेरी दरवाजावरून चंद्रयानदुर्ग

या दरवाजाला भेट देण्यासाठी एक उत्तम कारण जर सांगायचं झालं, तर ते वास्तुकला आहेच, पण त्याबरोबर इथून दिसणारा चेन्नागिरी, म्हणजे चंद्रयान दुर्ग. वेंकटरमण स्वामी मंदिराच्या पार्श्वभूमीवर या दुर्गाचं मस्त दर्शन होतं.

वेल्लोर/अर्कोट दरवाजा

बऱ्यापैकी दुर्लक्षित असणारा हा दरवाजा खरंतर जिंजीचा मुख्य दरवाजा आहे. वेल्लोर आणि अर्कोटच्या बाजूला तोंड असल्यामुळे याला असं नांव आहे. या गडावर जाण्यासाठीचा हा मूळ राजमार्ग आहे, आता होता म्हणूया, कारण आपण आपल्या वाहनाने राजागिरीच्या तिकीटघरापर्यंत जाता येत असल्याने वेगळा मार्ग हा मुख्य मार्ग झालेला आहे आणि हा दरवाजा मात्र एका बाजूलाच राहतो. किंबहुना, राजागिरीला भेट देणाऱ्यांना कळतच नाही की काहीतरी महत्वाचं राहून जातंय.

हा दरवाजा आता इतक्या आडवाटेला राहिलेला आहे, की इथे जाण्यासाठी गाडीमार्गच नाही. अर्थात दुर्गम वगैरे ठिकाणी नाहीये हा, परंतु मुख्य रस्त्याच्या कडेला गाडी थांबवावी लागते. आणि आम्हीही तिथून मातीच्या वाटेने चालत पोचलो, असं आठवतंय. चारचाकी डांबरी रस्ता सोडून आत घालता येत नाही.

महादरवाजा आणि बाजूच्या दोन मूर्ती

या दरवाज्याला कायमच कुलूप लावलेलं असतं. हा दरवाजा गोमुखी आहे. दोन्ही बाजूला भक्कम बुरुज आहेत. दरवाजाच्या दोन्ही बाजूला मूर्ती आहेत. या दरवाजाची रचना थोडीशी वेगळी आहे, हे जाणवतं. आणि लक्षात येतं की ह्याची आपल्यासमोर उभी असलेली बांधणी, ही एका कालखंडात नक्कीच झालेली नाहीये. कारण या दरवाजात प्रवेश करतानाच अगदी जमिनीवर एक पोर्तुगीज पद्धतीचा छोटा बुरुज, म्हणजे बार्टीझन, दिसतं. आणि दरवाज्याच्या बाजूच्या असलेल्या बुरुजावरसुद्धा तटबंदीत एक बार्टीझन बांधलेलं आहे.

दरवाजा आतील बाजूने

ह्याला आपण महादरवाजा म्हणू शकतो. कारण एक तर हा गडाचा मुख्य दरवाजा आहे, गोमुखी आहे म्हणजेच महत्वाचा प्रवेशमार्ग आहे. (तसंही हा राजमार्ग होताच) आतील बाजूने, जिथे शक्यतो दोन्ही बाजूला एक-एक वगैरे अशा वेगवेगळ्या देवड्या असतात, तिथे या दरवाजाला दुमजली बांधकाम आहे. कोरीव खांब आहेत. साधारण दरवाजाच्या तुलनेत हे देवड्यांचं बांधकाम भव्य आहे. आता दरवाज्याला कुलूप असूनही मी आतमध्ये कसा आलो, हा प्रश्न विचारायचा नाही. 😉 परंतु शक्य होईल तेवढा, शक्य होईल तसा सगळा भाग बघणे हा आमचा नेहमीच प्रयत्न असतो, तोच प्रयत्न इथे घेऊन आला 😄

एकांबरेश्वर मंदिर

राजागिरी गडाकडे जाताना, जेव्हा तटबंदी फोडून केलेल्या रस्त्यावरून आपण तिकीटघराकडे जात असतो, त्याचवेळी डाव्या बाजूला भरपूर दगडी खांब असलेलं मंदिर दिसतं. त्याच्याजवळच बागेसारखा व्यवस्थित ठेवलेला परिसरही दिसतो. हेच एकांबरेश्वर मंदिर. माहिती शोधण्यासाठी गुगलवर बघितल्यास, एकांबरेश्वर मंदिर ह्या बद्दलच्या माहितीत जवळपास सगळी माहिती कांचीपुरम इथल्या प्रसिद्ध एकांबरेश्वर मंदिराचीच येते. ते अत्यंत प्रसिद्ध मंदिर आहे. परंतु हे जिंजीमधील हे एकांबरेश्वर मंदिर त्या तुलनेत लहान आहे. तरीही अत्यंत सुंदर आहे हे मात्र नक्की. हे चोल कालखंडातील मंदिर आहे. संपूर्ण परिसर व्यवस्थितरित्या ठेवलेला असल्यामुळे हा परिसर फिरण्यासाठीसुद्धा छान आहे. भरपूर खांब असलेलं प्रशस्त मंडप, गर्भगृह असं हे मंदिराचे स्वरूप आहे.

गडाच्या वाहनतळाजवळ पोचल्यावर समोरच एक मशीद दिसली. ही सदातुल्लाखान मशीद. अर्थात, आम्ही तिथे पोचलो तेव्हा ही मशीद लक्षातसुद्धा आली नव्हती. किमान, आता तरी आठवत नाही. पण हा गडाच्या बाह्यभागातीलच एक अवशेष आहे.

त्रिचंदी कोट - अंतर्गत भाग

खंदक

पहिला आणि दुसरा दरवाजा

खंदकातून आत शिरलो आणि "मराठा टच" असा गोमुखी दरवाजा समोर आला. हा या भुईकोटाचा पहिला दरवाजा. पहिल्या दरवाजातून आत शिरलो, तर मोकळा भाग. दरवाजाशेजारी देवड्या. आणि लगेच दुसरा दरवाजा. आम्ही हा पाहिला तेव्हा युनेस्कोमध्ये "जिंजी"ची नोंद झालेली नसली, तरी पुरातत्त्व खात्याकडे हा संरक्षित होताच. त्यामुळे ह्या सगळ्या दरवाजांना लोखंडी दारं होती, जी ठराविक वेळेनुसार बंद करून घेतली जातात.

दरवाजातून कल्याण महाल आणि राजागिरी दुर्ग

दरवाजातून पलीकडे दिसणारे हे दृश्य आत जाताना तितकसं छान नव्हतं. कारण काल पडून गेलेला पाऊस आणि वातावरण. पण डोक्यात फ्रेम तयार ठेवलेली होती. येताना निसर्गाची साथ लाभली, आणि ही फ्रेम घेता आली.

मूर्ती

तिसऱ्या दरवाजात जाण्याआधी असलेल्या जागेत, काही मूर्ती ठेवलेल्या होत्या. या सगळ्या मूर्ती इथे आणून ठेवलेल्या दिसत होत्या. विशिष्ट अश्या मूर्ती, म्हणजे यात असलेल्या दोन. त्यातली एक, म्हणजे बरोबर मध्ये ठेवलेली मूर्ती, ही कशाची आहे, कोणाची आहे, हे समजत नाही. हातात शस्त्र नाही. वेगळ्याच पद्धतीने पाय मुडपून बसलेल्या अवस्थेत अश्या व्यक्तीची ही मूर्ती आहे. शस्त्र, चिन्ह असं काहीही नसल्याने कोणत्याही देवाशी या मूर्तीचा संबंध त्यामुळे लावता आला नाही. दुसरी म्हणजे एक विरगळ असावी; पण त्यावर घोड्यावर दोन जण बसलेले आहेत. पहिली व्यक्ती भालाफेक करताना अश्या अवस्थेत कोरलेली आहे. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार हे राजा देसिंग आणि त्याची राणी आहेत, तर अमर साळुंखे यांच्या मतानुसार हे महाराज राजाराम आणि ताराराणी आहेत.

विहीर आणि बुरुज

यापुढे असलेल्या तिसऱ्या दरवाजातून आत गेल्यावर खूप काही आपल्यापुढे वाढून ठेवलेलं आहे, हे लक्षात आलं. सगळंच एकदम दिसायला लागलं. समोरच अगदी छोटी विहीर दिसली. ही जरी छोटी असली, तरी बारमाही पाणी असलेली विहीर आहे, जी अजूनही वापरात आहे. पलीकडे दगडांवर सुंदर बुरुज आहे. त्यामुळे इथे फोटो काढून घेण्याचा मोह आवरला नाही. त्यासाठी आपल्याबरोबर तसेच रसिक भिडू असणे ही गरजेचं असतं, हे मात्र नक्की.

या सगळ्याबरोबर अजून पाच कमानी दरवाजा, भुलभुलय्या नावाने ओळखली जाणारी वास्तू, अश्या अनेक वास्तू दिसत राहतात. राजसदर आणि कल्याण महाल ह्या या गडाच्या अजून महत्त्वाच्या असलेल्या वास्तू.

कल्याण महाल

आधीच म्हटल्याप्रमाणे आमचा डोळा टेकडीवरचा राजागिरी दुर्गावर असल्याने ह्या वास्तू आधी पाहिल्या नाहीत. राजागिरी पाहून उतरल्यावर या सर्व वास्तू पाहिल्या. परंतु ह्या त्रिचंदीकोटाचाच भाग असल्याने ह्याच लेखात पाहून घेऊ. कल्याण महाल किंवा राणीवसा, ही अतिशय सुंदर वास्तू आहे.

महालासमोरचा चौकोनी भाग आणि चौथरा

आपल्याकडे "चौसोपी वाडा" असं ज्याला म्हणतात, तश्या वाड्याची आठवण इथे नक्की होते आल्यावर. म्हणजे वाड्याला वरती छत असतं तसं इथे नाहीये, परंतु दरवाजातून आत शिरल्यावर समोरच जमिनीच्या थोड्या खालच्या पातळीला मोकळी चौकोनी जागा आहे. वाड्यात त्याच्या मधोमध तुळशी वृंदावन असतं तसं इथे वृंदावन नाही, पण एक छोटासा चौथरा मात्र आहे. सभोवताली मिळून एकूण ३६ कमानी आहेत. हा सुंदर महाल राजा तुबाकी कृष्णप्पा नायक याने बांधलान. "चक्रकुलम" नावाच्या पाण्याच्या टाक्यातून इथं पाणीपुरवठा केलेला आहे. ही व्यवस्था नक्कीच बघण्यासारखी आणि अभ्यासण्यासारखी आहे. कारण इथे या बहुमजली असलेल्या वाड्यात अगदी वरच्या मजल्यावरसुद्धा पाणीपुरवठा व्हावा, अशा पद्धतीने सर्वत्र दगडी खापरांमधून ही जलव्यवस्था केलेली आहे.

राजसदर

छ. राजाराम महाराज यांनी तब्बल ११ वर्ष जिंजीच्या गडामधून औरंगजेबाशी लढा दिला. इथे असलेल्या एका जागेला राजसदर मानलं जातं. ह्याच सिंहासनावर बसून राजाराम महाराजांनी राज्यकारभार चालवला असंही मानतात. राजसदर ही अतिशय भव्य वास्तू आहे. आधीच म्हटल्याप्रमाणे सुरुवातीला फक्त फोटो काढून घेतला या वास्तूचा. कारण नंतर हा परिसर माणसांनी फुलून गेला असता. भेट मात्र राजागिरी बघून आल्यावर दिली. कल्याण महालाप्रमाणेच राजसदरेलाही बऱ्यापैकी कमानी आहेत. इथल्या वास्तूची भव्यता आपलं लक्ष वेधून मात्र नक्की घेते. पण त्यापेक्षाही माझं तरी जास्त लक्ष वेधून घेतलंन ते इथल्या दगडी लोडाने. ही वास्तू राजसदर आहे की पाण्याचा तलाव, स्नानगृह, याबद्दल मत-मतांतरं आहेत. हे सिंहासन आहे की नाही, मुळात ही राजसदर आहे की नाही, यापेक्षा जे काही आहे ते मात्र अतिशय अप्रतिम आहे, हे नक्की. त्यामुळे त्या प्रश्नात मी शिरलो नाही.

ह्या दगडी लोड असलेल्या चौथऱ्याच्या पलीकडे कमानी दिसतातच, परंतु त्याला लागून अलीकडे एक चौकोनी भाग आहे. तो गोंधळात टाकणारा आहे. हा भाग नक्की काय आहे, हे मात्र लक्षात आलं नाही. नृत्यालय म्हणून कदाचित हा भाग ओळखला जात असेल, पण तेही नीटसं सांगता येत नाही. गोंधळात टाकणारा का? तर ह्याच्या चौथऱ्याच्या आतल्या बाजूने कीर्तीमुख सदृश कोरीव दगड लावलेले आहेत. त्यांचा छातीपासून वरचा भाग गायब आहे. तर दोन पायांच्या मध्ये दोन हात अशा बसलेल्या अवस्थेत हे शिल्प कोरलेलं आहे. ह्या पूर्ण चौकोनी भागाला खांब किंवा छत काहीही शिल्लक नाही.

व्यायामशाळा

हा कोट म्हणजे अलीबाबाची गुहाच आहे. कारण एका मागून एक अत्यंत सुंदर वास्तू येथे दिसत राहतात. व्यायामशाळा हीसुद्धा अशीच एक निरखून पहावी अशी वास्तू. ही वास्तू व्यायामशाळाच कशावरून, वगैरे प्रश्न बाजूला ठेवू. व्यायामशाळा याच नावाने ही वास्तू ओळखली जाते. ह्या वास्तूची रचना एकदम लक्ष वेधून घेणारी आहे. आतून बघितलं, तर ही पूर्णपणे मोकळी वास्तू आहे; परंतु बाहेरून मात्र बघण्यासारखी आहे. वरील फोटोत विशिष्ट कोनातून ही दिसत नसल्यामुळे ते लक्षात येणार नाही, कदाचित. परंतु वर ह्या बाजूने मुद्दाम फोटो देण्याचा उद्देश वेगळा आहे. कारण ह्या बाजूने जे बांधकाम, कोरीव काम बघायला मिळतं, ते दुसऱ्या ठराविक कोनातून मिळत नाही, ते म्हणजे वास्तूच्या छताला कडेने वर असलेले छोटे छोटे मिनार. छोटी छोटी मंदिरं किंवा मूर्ती ठेवण्यासाठी कोनाडे असावेत, अशा नक्षीदार मिनारांनी माझं लक्ष जास्ती वेधून घेतलंनी. फक्त समोरच्या बाजूनेच हे मनोरे शिल्लक आहेत. असेच मनोरे आसपास असलेल्या काही वास्तूंमध्येही थोड्याफार प्रमाणात बघायला मिळतात. ह्या वास्तूच्या दरवाज्याच्या आधी एक दगडी भिंत आहे. दरवाज्याच्या उंचीला धरून विटांच्या बांधकामांमध्ये असलेल्या सुंदर कमानी, असं हे देखणं बांधकाम आहे.

हत्ती तलाव

ह्या कोटातील अजून एक भव्य वास्तू म्हणजे हत्ती तलाव, किंवा "अनयकुलम" टाकं. एखादं टाकं बऱ्यापैकी मोठं असलं, की त्याला हत्ती टाकं म्हटलं जातं. कारण आकार मोठा आहे, म्हणजे इथे हत्ती पाणी पाजण्यासाठी आणले जात असावेत असा तर्क लावला जातो. तसाच टाक्यापेक्षा जर मोठा असेल, म्हणजे तलावसदृश, तर त्याला साधारणपणे हत्ती तलाव म्हटलं जातं. म्हणजे हत्तीला इथे स्नानासाठीसुद्धा नेलं जात असेल, असाही सहज तर्क लावला जातो. या ठिकाणीही तेच आहे. पण या भव्य टाक्याभोवती बहुखांबी बांधकाम आहे. त्याला मध्ये मध्ये भिंती बांधून खोल्या पाडलेल्या नाहीत. परंतु हत्तीच्या स्नानासाठी असा तलाव असेल तर तलावाभोवती या बांधकामाचं काय काम? म्हणून राजे-महाराजांसाठीचा जलतरण तलाव असंही ह्याला काही ठिकाणी मानलं जातं. यावरही शंका घेता येऊ शकते. कारण त्याला सध्या तरी काही खाजगीपणा दिसत नाही. ना छत, ना खांब, ना त्याच्या मागे बांधकामाला व्यवस्थित भिंती. सुरक्षिततेच्या दृष्टीनेही तेवढं, म्हणजे जर राजघराण्यातील व्यक्तींसाठी जलतरण तलाव असेल, तर तेवढी सुरक्षित जागा म्हणता येईल, अशी ही वाटत नाही. व्यवस्थित पाहिल्यास पलीकडे एक बुरुजही दिसतो. तसंच एका बाजूला डोंगरही आहे. त्यामुळे ह्या बाजूने शिबंदीची नेमणूक करावी असे ठिकाण असेल, तर तिथे जलतरण तलाव कसा? परंतु ह्या सर्व प्रकारात न पडता ह्या वास्तूचा आनंद घ्यावा, हे उत्तम.

आकड्यात सांगायचं झालं, तर सुमारे दोनशे × सव्वाशे फूट आकाराचा हा तलाव आहे. त्यात उतरायला पायऱ्या आहेत. त्यामुळे इतिहासात काहीही म्हणून वापरला जात असला, तरी मस्त डुबकी मारायची इच्छा इथे मला झाली, हे मात्र नक्की. परंतु वेळ, ठिकाण हे सर्व लक्षात घेता तो मोह आवरला. उडी मारलीच असती, तर पुरातत्त्व खात्याच्या काठ्यांपासून माझा पार्श्वभाग सुरक्षित राहिला नसता, हे नक्की. विनोद बाजूला ठेवला, तरी ह्या सर्व वास्तू विविध प्रकारे मोहात पाडणाऱ्या आहेत, हे नक्की.

विस्तीर्ण वृक्ष

या सर्व अवशेषांशिवाय भव्य असे धान्यकोठार, रंगनाथ मंदिर, कैदखाना, टेहळणी बुरुज, अशा अनेक पुरातन वास्तू हा कोट आपल्या पोतडीत राखून आहे. याशिवाय, फोटोत अगदी वाईट अँगलमध्ये सुद्धा न मावणारा असा विस्तार असलेले हे वृक्ष टिपण्याचा मोह कोणाला होणार नाही? विस्ताराने मोठी, सुंदर आणि हवेशीर असलेली झाडं गार सावली देतात. राजागिरी उन्हातून पाहून परतल्यानंतर विश्रांतीसाठी हे ठिकाण अतिशय उत्तम आहे. थोडा वेळ ह्या झाडाखाली पाठ टेकली, तर त्या गडावर आपण चढून उतरल्याचा थकवा नक्की पळून जाईल.

सुखद आठवणींशिवाय काही नेऊ नका... आणि पाऊलखुणांशिवाय काही ठेऊ नका!!!