Monday, June 13, 2022

किल्ले खंडरगड उर्फ “सत्रासेनचा किल्ला”, किल्ले यावल आणि पाल

खंडरगड उर्फ “सत्रासेनचा किल्ला”

किल्ले खंडरगड

चौगाव हा तसा कमी परिचित किल्ला पाहून झाल्यावर त्यापेक्षा अतिशय कमी परिचित असणारा एक किल्ला बघायचा होता. तो “किल्ले खंडरगड उर्फ सत्रासेनचा किल्ला”. सुदैवाने चौगावचा किल्ला “त्रिवेणीगड” दाखवायला आलेला मित्राचे काही मित्र खंडरगड किल्ल्याच्या परिसरात असलेल्या गावचे होते, त्यामुळे हा किल्लाही बघायचा मार्ग सोपा होणार होता.

चोपडा तालुक्यातील ह्या गावाचं नाव सत्रासेन. त्यामुळे हा किल्ल्याला सत्रासेनचा किल्ला म्हणून पण ओळखतात. हा भाग मध्यप्रदेश सीमेवर येतो, अवघ्या बारा किलोमीटरवर मध्यप्रदेश मधले वरला गाव आहे. त्यामुळे इथे हिंदी भाषेचाही प्रभाव आहे. किल्ल्याच्या नांवातच हे दिसून येतं. “पडीक अवशेष” म्हणजे म्हणजे “खंडहर” आणि एक “खंडहर असलेला किल्ला” म्हणजे “खंडरगड”. आता मुळात किल्ल्याच्या नावातच जर खंडहर असतील तर हेच अवशेष पडीक व्ह्यायच्या आधी म्हणजे किती जुना असेल हा किल्ला... म्हणूनच हा किल्ला अतिप्राचीन म्हणावा लागेल.

हा किल्लाही चौगाव किल्ल्याप्रमाणे “भिराम घाट” या डोंगरी मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी महत्त्वाचा होता.

नदीपात्राकडे जाणारा रस्ता

तर, या सत्रासेन गावात दुपारी ११-११:१५ सुमारास पोचलो असू आम्ही. आमचा मित्र तयारच होता. गाडी एका ठिकाणी लावून त्याच्या दुचाकीवरून दोघेजण कच्च्या रस्त्याला लागले. आम्ही ११ नंबरची गाडी पकडून मागून निघालो.

गाडी नदीपार - गांवकऱ्यांसाठी नेहमीचेच

गावातून एक कच्चा रस्ता नदीपात्रापर्यंत जातो. हा रस्ता चांगलाच कच्चा आहे. म्हणजे तो खरा तर ट्रॅक्टर्सचा रस्ता आहे. साधारण दोन किलोमीटर ओलांडल्यावर नदीपात्रात रस्ता येऊन थांबतो. पलीकडे वस्ती असल्याने गावकरी नदीतूनच गाड्या घालतात.

बूट काढून नदी पार

मित्रांनी दुचाकी तिथेच लावली. बूट काढून नदी पार केली. किल्ल्याचा डोंगर शोधायला लागत नाही, समोरच दिसतो. भर दुपारी पावणेबाराच्या सुमारास पायथ्यापासून सुरुवात केली. डोंगर समोरच असला तरी इथे कोणी फारसे येत नसल्याने वाटाड्या बरोबर हवा. तरच नीटपणे वरती पोचता येईल आणि वरचे अवशेष पाहता येतील.

आई तुळजाभवानी मंदिर

निवांत चालत १५ मिनिटात एका छोटेखानी मंदिराजवळ आपण येतो. हे “आई तुळजाभवानी मंदिर”. मंदिरातल्या मूर्तीवर झालर लावलेली वस्त्रे आहेत जी आपल्याला उत्तर भारतीय पद्धतीची आठवण करून देतात. देवीची मूर्ती सजवायची पद्धत अगदी चित्रपटात बघितल्याप्रमाणे “जय मातादी” म्हटलं समोर येते, तशी शेरवाली वगैरे पद्धतीने सजवलेली मुर्ती. हे मंदिर मात्र चित्रपटात दाखवतात तसले मोठे वगैरे नाहीये. पुढे एक कबरही दिसली.

"अनेर" नदीकाठी खंडरगड स्थान

इथून मागे वळून पाहिलं तर या गडाचं स्थान किती अप्रतिम आहे हे लक्षात येतं. महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशला सामायिक “अनेर” नदीकाठी हा किल्ला आहे. या नदीवर महाराष्ट्र हद्दीत “अनेर धरण” सुद्धा आहे. म.प्र. मधून वाहत येणाऱ्या नदीच्या प्रवाहाजवळ, ह्या धरणाचं बॅकवॉटर सुरू व्हायच्या आधी नदी अतिशय सुंदर उलट्या S आकाराचे वळण घेते. अगदी त्याच वळणावर हा किल्ला आहे. किल्ल्यावरून घेतलेल्या फोटोमध्ये हे स्थान कळणार नाही म्हणून गुगल मॅपवरचा हा स्नॅप देत आहे.

नदी पार करावी लागत असल्याने पावसाळ्यात इथे येणे थोडे जिकिरीचे आहे.

शिल्लक तटबंदी

पाण्याचं खांबटाकं बुजत आलेलं

पाण्याच्या टाक्यातले खांब

तुळजाभवानी मंदिरा पासून गडावर जाणारा रस्ता हा झाडी-झाडीतून आहे. १०-१२ मिनिटांत आपल्याला गडाची तटबंदी दिसते. इथेच पहिलं पाण्याचं टाकं दिसलं. हे खांब टाकं असून बऱ्यापैकी प्रवेश बुजलेला असला, तरी वाकून पाहिल्यास आत मध्ये ४ खांब दिसतात. पुढे गडाची तटबंदी ढासळलेली दिसली. अशी असली तरी गडाचे अस्तित्व दाखवण्यापुरती नक्कीच शिल्लक आहे.

आदिवासी देवस्थान

पुढे एके ठिकाणी मंदिराचे जुने दगड दिसून येतात. तिथे लाकडाची काहीतरी कामासाठी उभारलेली कमान दिसली. इथे आदिवासींची देवता आहे आणि त्यासंबंधीच काहीतरी हे काहीतरी आहे असं गावकऱ्यांकडून कळलं. या ठिकाणी वर्षातून एकदा गडदेवतेची जत्रा भरते व तेव्हा बोकडाचा बळी देण्याची प्रथा आहे असं आंतरजालावरून मिळालेल्या माहितीत वाचलं होतं. पण प्रत्यक्षात गावकर्‍यांना विचारले असता असा कोणताही बळी इथे दिला जात नाही असं कळलं. कदाचित खूप पूर्वी ही प्रथा असूही शकेल जी नंतर बंद झाली असावी आणि सध्याच्या पिढीला माहितीही नसावी.

लेणी - खांबच खांब

जवळच लांबलचक सात-आठ खांबी अशी लेणी दिसून येतात. ही लेणी अतिप्राचीन असून यात सुबकता नाही. “सुबकता नाही” याचं कारण म्हणजे लेणी बांधायच्या सुरुवातीच्या काळातली ही लेणी आहेत. त्यामुळे “अतिप्राचीन” म्हणावी लागतील. आणि त्यामुळेच सुबकता जरी नसली तरी त्यावर घेतलेले परिश्रम दिसून येतात. इथेच घडलेल्या ह्या परिश्रमातूनच आपल्याला इतरत्र महाराष्ट्रात खूप ठिकाणी नंतर घडवलेली अतिशय सुबक लेणी बघायला मिळतात.

लेण्यांचे ओबडधोबड कोरलेले खांब

ओबडधोबड खांब: मेहनत

इथल्या लेणींमध्ये आत मध्ये कशाचीही मूर्ती वगैरे नाहीये पण जर लेणी पूर्ण झालेली असती तर प्रचंड सुंदर कलाकृती नक्की बघायला मिळाली असती. कारण कोरीव कामासाठी घेतलेला भाग छोटेखानी नाही तर चांगलाच एक पन्नास एक फूट लांब आहे आणि तसाच पंचवीस-तीस फूट रुंद.

लांबलचक भागात लेणी

लेण्यातील खोल्या

इथे अशी एकच नाही तर अजूनही काही ठिकाणी लेणी कोरलेली आढळतात. एका लेण्यांमध्ये खांबाच्या मागे भिंतीत चौकोनी मोठे कोनाडे कोरलेले दिसले. कदाचित ध्यानाला बसण्यासाठी वगैरे ही जागा केलेली असावी. इथे ध्यान लावून बसणे आम्हाला शक्य नसले तरी त्यात बसून फोटो वगैरे काढले. भूक मात्र लागली होती आणि दुपारचा एक वाजत असल्याने पोटात काहीतरी ढकलणे भाग होते. जेवणाचा तसाही नक्की असा बेत नसल्याने पाठपिशवीतले तहानलाडू-भूकलाडू खाऊन घेतले.

झेंडा निशाण आणि झोपडी देवस्थान

अनगड देव

लेण्यांचे हे अवशेष बघून पुढच्या पाच मिनिटांत लांबूनच दिसलेले एक झेंड्याचे निशाण आणि शेजारी बांधलेल्या झोपडीवजा मंदिरात दाखल झालो. ह्या मंदिरात देव असा नसून एका जुन्या मंदिराचे काही दगड देव म्हणून ठेवलेले आहेत. शेजारीच एक त्रिशूळ उभा करून ठेवलेला आहे. त्यावर सगळीकडे जरीपटका वाली वस्त्रं ठेवलेली आहेत.

उध्वस्त मंदिरासमोर दोन तलावही आहेत ह्याला झरे वगैरे नसल्याने ते कोरडे दिसले. गडाच्या पश्चिम टोकाकडे जवळच एक डोंगर आहे, जो मुद्दाम गडापासून सुरक्षिततेच्या दृष्टीने वेगळा करण्यात आलेला आहे.

भुयाराचा प्रवेशमार्ग

येताना वाटेवरील भुयार बघितलं, त्याच्या आतमध्ये जाण्यासाठी एक लाकूड ठेवलेलं आहे. हे भुयार आत मध्ये दीडशे फूट तरी असल्याचं समजलं. पण त्यात बघण्यासारखं काही नाही, आत मध्ये वटवाघळं आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे आमच्याकडे असलेला मर्यादित वेळ, सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन आत मध्ये जाण्याचे टाळले.

श्रमपरिहार

अर्ध्या तासात नदीपर्यंत परत आलो आणि इथे मात्र नदीत डुंबण्याचा मोह कोणालाही आवरला नाही. नाही म्हटलं तरी दुपारचे दोन वाजले होते, म्हणजे दुपारी बारा ते दोन ह्या टळटळीत उन्हात किल्ला बघितला होता. त्यामुळे असा श्रमपरिहार तो बनता है!

अशाप्रकारे अत्यल्प परिचित असा, भटक्यांकडून दुर्लक्षित आणि अतिशय कमी भेट दिला जाणारा किल्ला पाहून झाला.

किल्ले चोपडा

खंडरगड बघून सत्रासेन मधून दुपारी निघालो ते सरळ पोचलो चोपडा गावात. चोपडा किल्ला म्हणजे खरातर नगरकोट. आंतरजालावरुन मिळालेल्या माहितीनुसार ह्या नगरकोटाच्या तटबंदीत सहा दरवाजे होते.

प्रत्यक्षात या सहापैकी दोनच दरवाजे शिल्लक असून तेही जीर्णोद्धारामुळे नष्ट होता होता वाचलेले आहेत. पण त्यामुळे त्यांचे मूळ स्वरूप पूर्णपणे नष्ट झालेले आहे. नष्ट झालेल्या ह्या दरवाजांच्या मूळ स्थानावर अस्तित्वाची खूण म्हणून आधुनिक स्वरूपात कसेबसे हे टिकून आहेत हेच नशीब.

पाटील दरवाजा

टिकून जरी असले तरी अगदीच नावापुरते. एक “पाटील दरवाजा” तर दुसरा “ठाण दरवाजा”. तटबंदी पूर्णपणे उध्वस्त करून लोकवस्तीने हातपाय पसरलेले आहेतच. दरवाजावर सुद्धा अतिक्रमण आहे. आणि ते इतकं, कि गुगलवर पाटील दरवाजा लिहिलं तर “पाटील दरवाजा सार्वजनिक शौचालय” असं येतं. दरवाजाला लागून बिल्डिंग, दुकाने आहेत. दक्षिण वेशीत असलेल्या ह्या दरवाजावर नांव मात्र ठसठशीत आहे.

ठाण दरवाजा

ठाण दरवाजा हा पश्चिम तटबंदीत, “सिद्धार्थनगर” परिसरात शिरपूरच्या दिशेला आहे. ह्या दरवाजाची रचना पाटील दरवाजापेक्षा वेगळी आहे. या दरवाजाच्या दोन बुरुजात खुप अंतर आहे आणि दरवाजा जरासा मागे आहे. त्यात देवड्याही आहेत. देवडीत एक घरही बांधले आहे.

तिरंगी भेळ भत्ता

प्रत्येक शहरात तिथला स्थानिक एक खास पदार्थ असतो तसा इथला कदाचित सुखी भेळ असावा. एका पिशवीत चुरमुरे, वर चणाडाळ आणि त्याच्यावर शेव अशी तिरंगी भेळ बांधून आकर्षक आकारात जागोजागी दिसत होती. खायचा मोह टाळून निघालो ते किल्ले “यावल”कडे, संध्याकाळच्या आत तोही बघायचा होता.

 

किल्ले यावल

चोपडा हे मध्य प्रदेश सीमेपासून फक्त २० किमीवर, तसंच यावलसुद्धा. गंमत म्हणजे यावल गांव जरी महाराष्ट्रात असलं, तरी यावल अभयारण्याचा बऱ्यापैकी भाग मध्यप्रदेश मध्ये येतो. यावलचा भुईकोट किल्ला यावल नगरपरिषदेजवळ आहे. साधारण ३५०x२५० फुट अश्या भागात चौकोनी स्वरूपात हा किल्ला आहे. हा किल्ला “सूर” नदीच्या काठावर, निंबाळकर राजे यांचा आहे.

उंच आणि सुंदर बुरुज

या किल्ल्याला लहान-मोठे ९ बुरुज आहेत असं जरी वाचलेलं असलं तरी एकूणच अवस्था कठीण असल्याचं दिसलं. त्यामुळे सगळेच बुरुज व्यवस्थित असे दिसत नाहीत. त्यातच काही ढासळलेले आहेत. आत मध्ये बऱ्यापैकी झाडी माजलेली आहे.

छोटा पण रुंद आणि अरुंद पण उंच बुरुज

किल्ल्याच्या बाहेर तटबंदीला लागून सरकारी कार्यालयं आहेत. बाजूला रुंदीने लहान-मोठे असे बुरुज आहेत. किल्ल्याचे रुंदीला कमी असलेले बुरूज अतिशय सुंदर व उंच आहेत. तटबंदीवर माजलेली झाडी यांना पुढे उध्वस्त करून टाकेल हे नक्की.

अरुंद बुरुज

रुंद बुरुज

बुरुजातील जंग्या

आतील बाजूने तटबंदी वरून फिरताना बुरुजावर असलेल्या जंग्या-झरोके सुस्थितीत दिसतात, पण आत मधल्या भागातल्या वास्तूंचे अवशेष उध्वस्त झालेले आहेत. किल्ल्याच्या बाहेर जाऊन नदीपात्रातून पाहिल्यास बुरुज अतिशय सुंदर दिसले. बुरुजांची रुंदी एकसारखी नाही तटबंदीच्या मधले अरुंद तर कोपऱ्यावरचे बुरुज जास्ती रुंद आहेत.

बुरुज, नदीपात्रातून

किल्ल्यातील रिकामा आणि पाणी असलेला असे हौद

या किल्ल्यात पाण्याचे हौद असून त्यातल्या एकात पाणीही दिसलं. एके ठिकाणी एक खोल विहीरही आहे.

आंतरजालावरील माहितीतून इतिहासात डोकावताना या परिसरावर धार-पवार, निंबाळकर, शिंदे, झांबरे-देशमुख यांचा ताबा असल्याचं कळतं. सरतेशेवटी इतर गड-किल्ल्यांप्रमाणे याचाही ताबा इंग्रजांकडे गेला.

महर्षी व्यास मंदिर प्रवेशमार्ग महर्षी व्यास मुती

यावल ही “महर्षी व्यास” यांची भूमी. संपूर्ण भारतात व्यास मुनींची दोन मंदिरं आहेत. त्यातलं एक यावल मध्ये आहे. अर्थातच त्याचे दर्शन घेतल्याशिवाय इथून कसं जाणार? त्यामुळे वेळेत किल्ला बघून अंधार पडायच्या आत मंदिरात जाऊन दर्शनही घेतले.

किल्ले पाल

जळगांव या तापमानाच्या बाबतीत उच्च ठिकाणी असणाऱ्या खानदेशातल्या भागात एक थंड हवेचे ठिकाण आहे, ते म्हणजे पाल. पाल हे गांव यावल अभयारण्याच्या क्षेत्रात येते, जे “सुखी” नदीच्या काठी वसलेले आहे. मध्यप्रदेशातून वाहत येणाऱ्या नदीवर या सुखी नदीच्या प्रवाहावर पालच्या पुढे “गरबल्डी” किंवा “गर्बर्डी” नावाचे धरण सुद्धा आहे.

आधी बघितलेल्या यावल या किल्ल्याचे किल्लेदार निंबाळकर यांनी “कॅप्टन ब्रेग्ज” या इंग्रजाच्या मदतीने पाल हे गाव वसवण्याचा प्रयत्न केला, जे मुगल काळानंतर पूर्णपणे उध्वस्त झाले होते, पण ते प्रयत्न वाया गेले. परंतु काही वर्षांनी “सी एस जेम्स” या इंग्रज अधिकाऱ्याने स्थानिक आदिवासींच्या मदतीने हे गांव उभे केले असे म्हणतात.

पर्यटकांसाठी थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध असलेल्या या पाल मध्ये एक किल्ला आहे. आता “होता” असं आपण म्हणू.

यावलचे व्यास मंदिर पाहिल्यावर पालला येऊन मुक्काम करायचा होता. इथून पाल साधारण ४५ ते ५० किलोमीटरच्या आसपास आहे. रात्री उशिरा, या रस्त्याने निर्मनुष्य असल्याने जाणे धोक्याचे आहे, लुटालूट होण्याची शक्यता असते असे ऐकिवात होते. पण आम्हाला आमच्या वेळापत्रकानुसार इथं येऊन राहायचं होतं. आणि पन्नास किलोमीटर म्हणजे दीड-दोन तासांचं काम. त्यामुळे नियोजन न बदलण्याचा आम्ही निर्णय घेतला. रात्री नीट असं काही समजत नव्हतं, पण पाल फार लांब राहिलं नसेल, रस्त्यात गेट म्हणजे लोखंडाचा पोल आडवा करून रस्ता बंद केलेला दिसला. मनात “पाल” चुकचुकली. सापळा तर नसावा? कारण वनखात्याचा असेल तर गेटला लागूनच चौकी आणि लक्ष ठेवायला अधिकारी हवा. तसं काही नसल्याने गाडी थांबवणं धोक्याचं होतं आणि गेट उघडायला उतरणं त्याहून. पण पर्याय नव्हता. गाडी थांबवली आणि आपल्याबरोबर अजून चार जण आहेत आपण एकटे नाही अश्या आधाराने धडधडतच खाली उतरलो. गेट उघडले, गाडी पलीकडे गेल्यावर पटकन गाडीत बसलो. गेट वनखात्याचे होते म्हणजे 😊

तर पालच्या “रेंज वन खात्याच्या” कार्यालयात दाखल झालो. इतर ठिकाण असतं तर गावाबाहेरचं कोणतेही मंदिर, मोकळी जागा बघून कुठेही झोपलो असतो. पण हे थंड हवेचं ठिकाण, त्यात आम्ही डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात तिथे. बाहेर उघड्यावर काकडून गेलो असतो नक्की. पर्यटकांसाठी असलेल्या खोल्या शिल्लक नव्हत्या पण थोडे प्रयत्न केल्यावर आणि “गांधीजींच्या” मदतीने कुठलीतरी एक खोली मिळाली. थंडी अडवायला छप्पर आणि ४ भिंती महत्वाच्या. सकाळी उठून आटपून सगळा भाग फिरलो.

पाल “किल्ला” म्हणावा अशा फक्त दोनच गोष्टी शिल्लक आहेत, त्या म्हणजे “गडाचा दरवाजा” आणि एक “उध्वस्त बुरुज”. त्यात किल्ल्याचा भाग म्हणून जर चिकटवायचं म्हटलं तर मशीद आणि हत्तीखाना.

पाल किल्ला दरवाजा

गडाचा हा दरवाजा जुन्या काळात भक्कम असणार हे त्याच्या आकारावरून नक्कीच लक्षात येतं. जसा दरवाजा, त्यामानाने गडाची तटबंदी असणारच. पण जी शिल्लकच नव्हती. गडाचा दरवाजा वनखात्याने संवर्धन करून जतन केलेला असला तरी त्याचा जीर्णोद्धार करताना मूळ स्वरूप पूर्णपणे नष्ट झालेलं आहे. नवीन रंगाने त्याचं सौंदर्यही गेल्यात जमा असंच म्हणावं लागेल.

पालचा एकमेव शिल्लक बुरुज

ह्या दरवाजाच्या शेजारी वनखात्यानेच एक उद्यान केलेले आहे. त्यातच दरवाज्याच्या डाव्या बाजूला एक बुरुज शिल्लक राहिलेला आहे. जवळपास उध्वस्त झालेला हा बुरुज मात्र आहे त्या स्थितीत सुरक्षित ठेवलेला आहे.

पालची मशीद

तसं म्हटलं तर हा एवढा किल्ला बघायला पाच मिनिटं पुरेशी होतात. किल्ल्याच्या बाहेर येऊन मशीद बघायचा प्रयत्न केला पण चपला काढून, हात-पाय धुऊन जरी आत मध्ये जायची परवानगी मागितली तरी ती मिळत नाही. फोटो तर लांबच. कदाचित एखादं मूळ मंदिर तोडून मशीद बांधल्याची खुण आम्हाला दिसेल या भीतीने प्रवेश नाकारला जातो कि काय अल्ला जाणे!

हत्तीखाना

मशिदीच्या मागे मोठ्या चौरस आकारात जुनी भिंत आहे, त्याला स्थानिक लोक “हत्तीखाना” म्हणतात. हा चौरस २००x२०० फुट आहे. या दरवाजाची कमान शाबूत असून एका बाजूच्या देवड्याही शाबूत आहेत. एका बाजूच्या भिंतीत “इदगाह” निर्माण झालेला आहेच आणि मशिदी मागच्या लागून असलेल्या भागात मोठे बांधकाम हे चालू होतं. (निर्माण झालेला म्हणण्याचं कारण म्हणजे, हा जर हत्तीखाना असेल तर तिथे नमाज पढायला जागा कशाला केलेली असेल ना?)

असो... हे सगळं बघून झाल्यावर पाल मधून बाहेर पडलो ते रसलपुरची सराई बघण्यासाठी.

सुखद आठवणींशिवाय काही नेऊ नका... आणि पाऊलखुणांशिवाय काही ठेऊ नका!!!

Sunday, April 10, 2022

किल्ले चौगाव उर्फ त्रिवेणीगड

आजच्या दिवसात तशा गढ्या, भुईकोट किल्ले आणि नगरकोट होते. डोंगर चढायचे नव्हते. नाही म्हणायला तसा थाळनेर हा गिरीदुर्ग आहे. पण उंच वगैरे नाही आणि त्यातून पायर्‍यांपर्यंत गाडी जाते. म्हणजे आता फक्त नावालाच गिरीदुर्ग.

किल्ले विचखेडे

एकलकोंडा बुरुज

दुपारी पावणे बाराला पोचलो “बोरी” नदीच्या काठी असलेल्या या गढीवजा किल्ल्यात - “किल्ले विचखेडे”. पारोळा किल्ल्यापासून अवघ्या दहा मिनिटांवर हा किल्ला आहे. पारोळाकडून धुळ्याकडे जाताना “बोरी” नदी वरचा पूल लागतो. हा मुंबई-नागपूर महामार्ग. पुलाच्या जरा अलीकडेच उजवीकडे एकलकोंडा बुरुज दिसतो. हा या किल्ल्याचा सुस्थितीत असलेला अवशेष. कारण शेजारी वस्ती नाही. उरलेले अवशेष पुलाच्या डाव्या बाजूला आहेत. राष्ट्रीय महामार्ग या किल्ल्यातूनच गेलेला आहे, या किल्ल्याला दुभागत. किल्ल्याची चांगलीच दुरावस्था झालेली असली तरी अजूनही एका बाजूची तटबंदी तग धरून उभी आहे.

बुरुज, तटबंदी असे अवशेष

या बाजूला काही बुरुज, पुरातन महादेव मंदिर, समोर दीपमाळ, कबर, भुयारी मार्ग, बुरुजावर पीराचे स्थान, नाग मंदिर, सात पैकी दोन शिल्लक चौकोनी विहिरी... असा तब्बल २५ एकराचा भाग हा किल्ला व्यापून आहे. पण एकतर किल्ल्यात वस्ती असल्याने खूप असे अवशेष नष्ट झाले आहेत, झाडीत गेलेले आहेत. तर काही सापडत नाहीत. आम्ही थोडक्यात अवशेष बघून निघालो अमळनेरकडे.

किल्ले बहादरपूर

किल्ले बहादरपूर - एकमेव शिल्लक अभेद्य बुरुज

जानेवारी २०१८ मध्ये आम्ही सहकुटुंब शेगावला जात असताना अचानक बहादरपूर किल्ला पदरात पडला होता. त्यावेळी आडवाटेवरचा किल्ला बघून ब्लॉग लिहिताना म्हटलं होतं, की “परत कधीही इथे याची सुतराम शक्यता नसताना पंधरा मिनिटात धावत-पळत किल्ला बघायला मिळाला”. पण दोन वर्ष पुर्णही झाली नाहीत आणि आज परत या किल्ल्यात होतो. फक्त मी यावेळी उगाच छाती पुढे काढून वाटाड्या असल्यासारखा सगळ्यांना किल्ल्यात घेऊन गेलो.

कबर, वाडे असे इतर अवशेष

गेल्यावेळी बघायचे राहिलेले अजून शिल्लक असे अवशेष बघितले. इथे एका शेतात काही कबरी आहेत. या राजघराण्यातील व्यक्तींच्या असल्याचे सांगतात. त्या बघितल्या, जुन्या काळातले वाडे, त्यावर ते सुंदर नक्षीकाम यावेळी बघता आलं.

किल्ले अंमळनेर

भव्य दरवाजा आणि बुरुज

अंमळनेर मध्ये पोचलो तेव्हा दोन वाजत आले होते. अंमळनेर ही साने गुरुजींची कर्मभूमि. अंमळनेर हा खरा नगरकोट, पण शहराच्या वाढत्या विस्ताराने हा नष्ट होत गेला. सध्या इथे भव्य असा वीस फुटी दरवाजा दोन्ही बाजूंना बुरुजांसह शहरात उभा आहे.

शिल्लक तटबंदी आणि अवशेष

नदी पात्राच्या बाजूने संरक्षणासाठी तटबंदी उभारलेली होती, ती आजही “संत सखाराम महाराज” मंदिराकडे जाताना नदीपात्रात बघायला मिळते. चाळीस फूट लांब असलेल्या या तटबंदीवर आता घरं आहेत. त्यातही मशीदी सारखे छोटे मिनार असलेला दरवाजा कसाबसा तग धरुन आहे. काही बुरुजही नष्ट होण्याची वाट बघत तिथे लपलेले आहेत. खूप जुनी मंदिरं या तटबंदीवर बांधलेल्या घरांच्या मध्ये आहेत. बांधकाम जुने असल्याने घरांवर नक्षीदार कमानी आहेत. हे जुनं लाकडी सुतारकाम मजबूत आहे. तटबंदीतल्या दरवाजाच्या बाहेर लागूनच तीन सार्वजनिक संडास आहेत. अर्थातच त्यांना कुलपं होती. इथे एकूणच असल्या गोष्टींचा वापर करण्याची गरज कोणाला वाटत असेल असं दिसत नव्हतं.

किल्ले गांधली

अंमळनेर पासून दहा किलोमीटरवर गांधली गांव आहे. या गावालाही कोट आहे. गावात पोचून कोट कुठे आहे अशी विचारणा करण्याआधीच रस्त्याच्या डाव्या बाजूला बुरुज, तटबंदी असे अवशेष दिसायला लागले. पूर्ण गावच कोटात वसलेलं असल्यानं याचे अवशेष असे ठरवून बघता येत नाहीत. स्थानिकांच्या मदतीने ते शोधावे लागतात. चालताना मध्येच दोन घरांच्या मध्ये एखादा बुरुज दिसतो, कुठेतरी तटबंदीचा जरासा शिल्लक भाग दिसतो.

पूर्वाभिमुख देवड्यांसह आणि पश्चिमेकडील दरवाजा

दोन दरवाजे मात्र आपल्या दोन्ही बाजूला बुरुज घेऊन उभे आहेत. मध्ये-मध्ये सहा असे एकूण दहा बुरूज बघता येतात. बुरुजांना प्रचंड मोठ्या भेगा पडलेल्या असून, कधीपर्यंत हे उभे राहतील हा प्रश्नच आहे. त्यातून तटबंदी व बुरुजांचे दगड स्थानिक घर बांधायला घेऊन जातात.

पूर्वाभिमुख ह्या दरवाजात देवड्या वगैरे अजून तरी शिल्लक आहेत. कमान मात्र गायब आहे. इथे याला लागूनच घरं आहेत, गुरं बांधलेली आहेत. दुसरा दरवाजा मात्र जरा श्वास घेत उभा आहे, हा पश्चिम दरवाजा. त्याला लागून फक्त एक हनुमान मंदिर आहे.

जैन मंदिर परिसरातील अवशेष

आत मध्ये इथे एक जैन मंदिर आहे. त्यालाही तटबंदी व बुरुज आहेत. इथे असलेल्या कोटात खूप काही दडलेलं आहे. आम्हाला कोट दाखवायला आलेल्या मामांनी गवत बाजूला करून एक सरळ तळघर दाखवलं. म्हणजे आम्ही जमिनीच्या पातळीला फिरत असलो, तरी पायाखाली चार खोल्या होत्या. त्या संपूर्ण तटबंदीच्या आत प्रदक्षिणा मार्गावर दोन विहिरी आहेत, त्यावर चढण्यासाठी पायर्‍याही आहेत. एकंदरीत हा कोट शेवटचे श्वास घेत अस्तित्व कसे तरी राखून आहे. इथेच बसस्थानकासमोर ३ कमान असलेली बारंवही आहे.

किल्ले थाळनेर

केळी वेफर्स On The Road...

लहानपणापासून जळगाव म्हटलं की इथली केळी प्रसिद्ध असं वाचलं होतं. आम्हाला थाळनेरकडे जाताना रस्तोरस्ती केळ्यांचे लोंगरच्या लोंगर घेऊन, तिथेच जमिनीतली चूल मांडून वेफर्स तळत असलेले अनेक जण दिसले. ते गरम-गरम वेफर्स बघून खायचा मोह आवरला नाही. तसंही अशा भ्रमंतीत दुपारचं जेवण फारसं विचारात घेत नव्हतो आम्ही, त्यामुळे त्या वेफर्सवर ताव मारला.

संध्याकाळी पाचच्या सुमारास या किल्ल्यावर घेऊन जाणाऱ्या पायऱ्यांजवळ आम्ही दाखल झालो. हा किल्ला तापी नदीकाठावर आहे. इथून जेमतेम ४५ किलोमीटरवर मध्य प्रदेश सीमा आहे. किल्ल्याचे स्थानच अतिशय सुंदर आहे. किल्ला उंचावर असल्याने खाली तापी नदीचं खोरं लांबवर दिसतं. इथे ती इंग्रजी “U” आकारात वळण घेत असल्याने हे दृश्य अजूनच सुंदर भासतं. त्याहून सुंदर म्हणजे समोरच पश्चिम दिशा. म्हणजे नदी पलीकडे सूर्य मावळतो आणि आम्ही त्याच सुमारास इथे किल्ल्यावर होतो. काय सुरेख दृश्य होतं हे. आमचे कॅमेरे मात्र हे दृश्य साठवण्यास सक्षम नव्हते.

थाळनेर किल्ला नवे-जुने अवशेष आणि वरून दिसणारे विहंगम दृश्य

किल्ल्यावर अवशेष फारसे नाहीत. तीन-चार फूट उंचीची तटबंदी नव्याने बांधून काढलेली आहे आणि संध्याकाळी निवांत येऊन बसायच्या दृष्टीने हे ठिकाण विकसित केलेलं आहे. वरती सप्तश्रुंगी मातेचं छोटसं मंदिर आहे. अजून एक जुनं मंदिर आहे. काही पडके वाडे, त्यातल्या खोल्या, काही तळघर असं शोधल्यास सापडतात. नव्याने बांधलेल्या तटबंदी बाहेर जुनी तटबंदी आहे आणि त्याच्या बाहेरच्या बाजूने बुरुजही आहेत.

अवशेष फारसे नसल्याने समोर तापी नदी, त्यामागचा मावळतीचा सूर्य, अशा दृश्याचा आनंद घेतला. खाली उतरून रस्ता “पाताळेश्वर महादेव” मंदिरावरून गावात “जमादार हवेली”कडे जातो. ही हवेली राहती, जागती आहे.

जमादार हवेली

हवेलीला लागून आता सिमेंटचे बांधकाम असलं तरी हवेलीचं सौंदर्य काही कमी होत नाही. भव्य असा दरवाजा, त्यावर खूप कलाकुसर केलेलं लाकूडकाम. जमिनीपासून सहा फुटापर्यंत दगडी तर वरती अजून दहा-पंधरा फूट विटेचं बांधकाम, अशी ही हवेली आहे. एका बाजूला सुंदर आणि अजूनही सुस्थितीत असलेला बुरुज आहे. त्यात खिडकीही आहे.

ही हवेली बघताना अंधार पडण्याच्या आत काही थडगी बघायची असल्याने आवरतं घेतलं. “थडगं” म्हटल्यावर डोळ्यासमोर येत असेल त्यापेक्षा वेगळंच काहीतरी हे बघायला मिळालं. ताजमहाल हेही एक थडगंच आहे हे लक्षात घ्यायचं. राजदरबारातील लोकांची थडगी अशीच सौंदर्यपूर्ण असतात. “थडगी काय बघायची” असा विचार असल्यास आल्यास इथली अशी थडगी बघितल्यावर हे विचार झटकले जातात.

कबरी - अप्रतिम नक्षीकाम आणि शिलालेख

प्रचंड कलाकुसर, जागोजागी नक्षी, दरवाजांवर ओळीच्या ओळी फारसी भाषेतील शिलालेख, असा खरोखर सौंदर्याचा उत्तम असा हा नमुना आहे. लवकरच अंधार पडणार होता, मग काही बघता येत नाही, फोटो तर लांबच, म्हणून थडगं हा शब्द डोक्यातून काढून त्यातूनच नाचत-नाचत इथलं सगळी कलाकारी डोळ्यात भरून घेतली. अर्थात फोटो आलेच की.

हाती असलेल्या वेळेचं योग्य नियोजन केलं, की अशा गोष्टी आपल्याकडच्या मर्यादित वेळातही नीट बघून होतात, याचं आजचा दिवस हे एक उदाहरण होतं. नगरदेवळा, पारोळा, विचखेडे, बहादरपूर, अंमळनेर, गांधली आणि थाळनेर हे किल्ले बघून, वर जमादार हवेली आणि ही थडगी एवढ्या गोष्टी बघितल्या. नुसत्या बघितल्या नव्हे, तर फोटोही काढले आणि अवशेष शोधून शोधून बघीतले. मग रात्री मुक्कामाला पोहोचलो चौगाव गावात.

किल्ले चौगाव उर्फ त्रिवेणीगड

ब्लॉगचं नांव हे इथल्या किल्ल्याचं असलं, तरी पारोळा नंतरचा इथे येईपर्यंत त्याचा प्रवास हा थोडक्यात मांडताना नमनाला घडाभर, नाही, अगदी दोन घडे तेल, असाच झाला.

रात्री “चौगाव” गावात पोचल्यावर पहिल्यांदी राहायची सोय बघायची होती. सुदैवाने आपल्याकडे मंदिरांना तोटा नाही. इथे ही एक शंकराचे मस्त मंदिर आहे. २६ डिसेंबर, म्हणजे चांगलेच थंडीचे दिवस. उघड्यावर झोपायची सोय नाही. पण नशिबाने या मंदिराच भाग असलेल्या खोलीत आमची झोपायची व्यवस्था झाली. सकाळी वाटाड्याची तजवीज करून सगळे गुडुप झालो.

शेकोटी

पहाटे लवकर उठून छानशी जागा बघून मोकळा झाल्यावर आटपून तयार झालो. सहा वाजता बरोबर येतो म्हणालेला आमचा वाटाड्या भाऊ उगवायला तयार नव्हता. त्याची वाट बघता बघता शेजार जागा व्हायला लागला. इथे एके ठिकाणी मस्त शेकोटी तयार करून लोक बसले होते. मीही त्याचा लगेच फायदा घेतला. जरा अंग गरम झाल्यावर त्यांना आमचा वाटाड्या मित्राचा पत्ता विचारला. सरळ घरी गेलो तर साहेबांना त्यांच्या आईने उठवावं लागलं. त्याला घेऊनच परत आलो. तोपर्यंत बाकीचेही वाट बघत थांबले होतेच.

त्रिवेणी संगम, महादेव मंदिर आणि मागे चौगाव किल्ला

आता वेळ न काढता गडाच्या वाटेला लागलो. सुरुवातीचं काही अंतर गाडी नेता येते. तसा रस्ता नाहीच आहे, पण त्या कच्च्या रस्त्यावरून गाडी काही अंतरापर्यंत जाते. पुढे पंधरा-वीस मिनिटे चालल्यावर त्रिवेणी संगम लागतो. इथे तीन ओढे एकत्र येतात, म्हणून त्रिवेणी संगम. त्यामुळे या किल्ल्याला “त्रिवेणीगड” असेही नांव आहे. अजून एक नांव “विजयगड”. पण एक तर या नावाचे फारसे संदर्भ उपलब्ध नाहीत आणि त्यातून रत्नागिरीमध्ये विजयदुर्ग आणि विजयगड दोन्ही किल्ले असल्याने गोंधळ नको म्हणून हा उल्लेख टाळू.

तर या संगमावर जवळ यायला सात वाजून गेले होते. इथे महादेवाचे मंदिर आहे. परत येताना हे बघणार होतोच. सध्या बाहेरूनच नमस्कार करून, संगमाचे पाणी ओलांडून, गडाच्या वाटेला लागलो. हा भाग “बडा बाजार” म्हणून इतिहासात ओळखला जात असे. तसा गड आपल्याला आधीपासूनच दिसत असतो. या “त्रिवेणी संगमाजवळच्या” महादेव मंदिरापासून गडाचा पायथा अजून पंधरा मिनिटावर आहे.

खांबटाकी

पायथ्याशी पोचल्यावर प्रत्यक्ष चढाईला सुरुवात होते. चढाई फारशी नाहीये. अवघ्या अर्ध्या तासात जरा वरती गडाचा दरवाजा दिसला. पण आधी वर न जाता डावीकडे जायचं. तिथे पाण्याची टाकी आहेत. एक कोरडं आहे. एकाच पाणी आहे पण त्यात जाण्यासारखी जागा नाही आणि पाणीही पिण्यासारखे नाही. एका जमिनीच्या खालच्या पातळीत असलेल्या दुसर्‍या खांबटाक्यात पाणी आहे. पाणी पिण्यायोग्य नाही, पण हे टाकं प्रशस्त आहे. काही प्रमाणात गाळाने भरलेलं असलं तरी चार-पाच खांब पाण्यावरती व्यवस्थित आहेत.

पूर्वाभिमुख दरवाजा

पुढे फक्त पाच-सात मिनिटात आपण दरवाजा जवळ पोचतो. दरवाजा पुर्वाभिमुख असल्याने उगवत्या सूर्याच्या सोनेरी किरणात न्हाऊन निघाला होता. दरवाजा पलीकडे गेल्यावर एक पायवाट दिसते, पण इथे झाडी असल्याने वाटा कळायला वाटाड्या हवा. इकडे एका बाजूला एक कोरडा तलाव आहे.

दुर्गामाता मंदिर

पुढे काही चौथरे आपल्याला दिसतात, इथे एक मंदिर आहे. हे दुर्गा मातेचे मंदिर. इथल्या उध्वस्त वास्तूचे दगड गोळा करून हे दुर्गा मातेचे मंदिर गावकऱ्यांनी बांधलेलं आहे. त्याला लाकडाने सुंदर मंडप उभारलेला आहे आणि साड्यांनी छान पैकी आच्छादून घेतलेलं आहे. देवीची मूर्ती हा तांदळा असून त्याला साडी नेसवून मुकुट वगैरे घातलेला आहे. या मंदिरात आवर्जून बघावा असा एक दुमजली दगडी दिवा आहे.

उत्तरेकडील लपलेले प्रवेशद्वार

बाजुला तटबंदीचे अवशेष आजही दिसतात. झाडाझुडपात लपलेले तटबंदीचे अवशेष बघता बघता आम्ही एका दरवाज्याजवळ पोचलो. या दरवाजाची कमान अगदी सुबक आणि रेखीव आहे. गडाच्या उत्तरेकडेचं हे प्रवेशद्वार अतिशय सुंदर जागी असून दोन्ही बाजूला उंच भाग तर द्वार मधल्या, जराशा खालच्या बाजूला आहे. संरक्षणाच्या दृष्टीने याचं स्थान उत्तम योजलेलं आहे.

हा दरवाजा पाहून आम्ही ह्या गडाच्या मुख्य अवशेषाजवळ जवळ आलो. हा इथला राजवाडा. याला “गवळी राजाचा राजप्रासाद” म्हणून ओळखतात. या वाड्याचे चुना आणि दगडात असलेले बांधकाम खूप मजबूत आहे, कारण या भिंती अजूनही उत्तम स्थितीत उभ्या असलेल्या दिसतात.

गवळी राजा राजप्रासाद - प्रवेशद्वार आणि अप्रतिम नक्षी

बाहेरून या भिंती निरखून मग आत मध्ये प्रवेश केला. पूर्वेकडच्या भागात हे प्रवेशद्वार आहे. पाच फुटांवरचा भाग हा मात्र फोडल्या सारखा वाटतो. म्हणजे मूळ प्रवेशद्वार नक्की किती उंचीचं असावं व त्याची कमान कशी असावी हे प्रश्न आपल्याला पडतात. पण हे प्रश्न नंतर पडतात. त्या आधी आपल्याला थक्क करते ती वाड्याच्या या भिंतीवर असलेली विटांची दुमजली नक्षी. पत्त्यांचा बंगला आपण बांधत जातो तशी विटांची नक्षी केलेली आढळते. इतकी अप्रतिम नक्षी दुसरीकडे बघायला मिळत नाही.

प्रवेशद्वारातून आत शिरल्यावर समोरच साधारण तीन फूट उंच व सात-आठ फूट लांब अशी एक भिंत मधोमध आहे. भिंतीची पडझड झाल्यासारखं वाटत नाही. आजूबाजूलाही काही नाही, त्यामुळे हिचं नक्की प्रयोजन कळत नाही. कदाचित संरक्षण व्यवस्थेचा हा भाग असावा.

प्रासादाचे प्रवेशद्वार आतील बाजूने, समोर भिंत. मागच्या बाजूला टाक्यांचे उंचावरून दर्शन

चुन्याने लिंपलेल्या भिंतीच्या आतल्या बाजूस खूपसे कोनाडे आहेत. हे एका ठराविक अंतरावर असल्याने, कदाचित प्रत्येक खोलीत एक, अशा प्रमाणे इथे खोल्या असाव्यात असं वाटतं. वाडा आतमध्ये चांगलाच लांब आहे. साधारण २५० फुट X ८० फुट असा प्रशस्त असा हा राजवाडा आहे. पण आतल्या सगळ्या भागात सायाच्या झाडांनी गर्दी केलेली आहे.

हे बघून वाड्याच्या बाहेर आलो आणि एका बाजूला मगाशी आम्ही बघितलेलं दुर्गामातेचे मंदिर दिसलं. शेजारी एक उंच ध्वजही दिसला. तिथून इथे यायला सरळ वाट आहे, पण आम्हाला उत्तरेकडचा दरवाजा दाखवण्यासाठी वाटाड्या मित्राने दुसऱ्या वाटेने इथे आणलंन होतं. वाड्याच्या समोर मोकळ्या जागेत १९७७ साली सहा फूट लांबीच्या चार तोफा सापडल्या. त्या आता चोपडा तहसीलदार कचेरीच्या आवारात ठेवण्यात आल्या आहेत.

मंदिराकडे न जाता त्याच्या मागच्या बाजूला असलेल्या भागाकडे आम्ही निघालो. जरा खालच्या बाजूला चार टाक्यांचा एक सुंदर समूह आम्हाला दिसला. त्यामुळे उत्साह अजून वाढला आणि उड्या मारतच अवघ्या दोन मिनिटात या समूहासमोर दाखल झालो.

पाण्याने तुडुंब भरलेली टाकी

एक मोठा आयताकार भाग. त्याला मधोमध अधिकच्या चिन्हात विभागून त्याचं चार टाक्यांत रूपांतर केलेलं आहे. त्याला लागूनच चार-पाच कमानयुक्त गुहा आहेत. पाणी तुडुंब भरलेला असल्याने इतर टाक्यातही काही खांब-गुहा वगैरे आहेत का हे समजू शकलं नाही. त्या अधिकच्या चिन्हाच्या बरोबर मध्ये जाऊन फोटो काढायचा मोह आमच्यापैकी कोणालाही आवरला नाही.

झेंडा बुरुज अवशेष

इथून अवघ्या तीन-चार मिनिटांत दुर्गामाता मंदिराजवळ परत येता येतं. परत येऊन मंदिराजवळ असलेल्या, मगाशी वरून दिसलेल्या त्या उंच झेंड्याजवळ गेलो. हा झेंडा बुरुज. इथली तटबंदी उत्तम स्थितीत असून त्यात शिबंदीची घरटी आपल्याला दिसतात.

इथून आजूबाजूच्या परिसरातील डोंगरही दिसतात. काली टेकडी, लेभागा डोंगर, बांदरा डोंगर, धाकला चिपाट्या डोंगर अशा नावाचे काही डोंगर येथे आहेत. हा चौगाव उर्फ त्रिवेणीगड किल्ला प्राचीन काळापासून दक्षिणेतून मध्यप्रदेशात (नेमाड) आत जाणाऱ्या “भिराम घाट” या डोंगरी मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी बांधलेला होता. हा किल्ला सातपुडा डोंगर रांगेत येतो.

सोनेरी किरणांत चमकणारा डिंक

पावणेदहा वाजले होते आमची गडफेरी पुर्ण झाली होती. उतरताना काही झाडांना डिंक आलेला दिसला. त्या सूर्यकिरणात हा सुंदर दिसत असल्याने, फोटोचा मोह आवरला नाही.

त्रिवेणी संगम मंदिर - महादेव, पंचमुखी हनुमान

जेमतेम वीस ते पंचवीस मिनिटात त्रिवेणी संगमाजवळ परत आलो. वर जाताना बघितलेल्या मंदिरात जाऊन दर्शन घेतलं. मुख्य मंदिर महादेवाचं असून गाभाऱ्याच्या दोन्ही बाजूला गणपती आहेत. मंदिराचा मंडप मोठा असून त्यात पंचमुखी हनुमानाची मूर्ती आहे. संगम मंदिर आणि आजूबाजूचा परिसर वनखात्याच्या अखत्यारित येत असून येथे वनविभागाचे कर्मचारी तैनात असतात. इथे मुक्कामाला परवानगी नाही. मोहीमेतल्या तिसऱ्या दिवसाची सुरुवात या गिरीदुर्गापासून झाली. यानंतर बघायचा होता एक अत्यल्प परिचित गिरिदुर्ग.

सुखद आठवणींशिवाय काही नेऊ नका... आणि पाऊलखुणांशिवाय काही ठेऊ नका!!!