Friday, May 28, 2010

संत रामदास स्वामी आणि छत्रपती शिवाजी महाराज... - I

Iसध्या शिवाजी महाराजांच्या विषयी लिहिलेला इतिहास समाजातील काही गटांना अप्रिय आहे.

त्यातूनच मग

समर्थ रामदास स्वामी यांनी शिवाजी महाराजांना काही उपदेश केलाच नव्हता, त्यांची कधीही भेट झाली नव्हती, दादोजी कोंडदेव हे महाराजांचे गुरु नव्हतेच, यांसारख्या कल्पना त्यांच्या सुपीक डोक्यातून बाहेर पडू लागल्या...


आपण संत रामदास स्वामी आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या संबधी काही लिखाण पाहू...

रामदास स्वामी यांनी वेळोवेळी शिवाजी महाराजांना स्वराज्य स्थापनेसाठी मदत केली आहे...

१६४९ साली छत्रपती आणि समर्थांची भेट झाली, त्यावेळी महाराजांनी समर्थांना, काही उपदेश करावा अशी विनंती केली.
शिवछत्रपतींनी पहिल्या भेटीतच समर्थांकडून अनुग्रह घेतला.
ह्यावेळी समर्थांनी शिवाजी महाराजांना राजधर्म नावाचे मौलिक प्रकरण सांगितले...

आधी मनुष्य ओळखावे । योग्य पाहुनी काम सांगावे ।
निकामी तरी ठेवावे । येकीकडे ।।१।।
पाहोनी समजोनी कार्य करणे । तेणे कदापी न येणे उणे ।
कार्यकर्त्यांच्या गुणे । कार्यभाग होतो ।।२।।
कार्यकर्ता प्रयात्नी जाड । काहीएक असला हेकांड ।
तरी समर्थपणे पोट वाड । केले पाहिजे ।।३।।
अमर्याद फितवेखोर । यांचा करावा संहार ।
शोधिला पाहिजे विचार । यथातथ्य ।।४।।
मनुष्ये राजी राखणे । हीच भाग्याची लक्षणे ।
कठिणपणे दूरी धरणे । काही येक ।।५।।
समयी मनुष्य कामा येते । याकारणे सोशिजेते ।
न्यायची नसता मग ते । सहजची खोटे ।।६।।
न्यायासिमा उल्लंघू नये । उल्लंघिता होतो अपाय ।
न्याय नसता उपाय । होईल कैचा ।।७।।
उपाधीस कंटाळला । तो भाग्यावाचून चेवला ।
समयी धीर सांडिला । तोही खोटा ।।८।।
संकटी कंटाळो नये । करावे अत्यंत उपाये ।
तरी मग पाहता काय । उणे आहे ।।९।।
बंद बांधावे नेटके । जेणेकरिता चतुर तुके ।
ताबे न होता फिके । समुदाय होती ।।१०।।
धुरेने युद्धासी जाणे । ऐसी नव्हे ती राजकारणे ।
धुराच करून सोडणे । कितेक लोक ।।११।।
उदंड मुंडे असावी । सर्वही एक न करावी ।
वेगळाली कामे घ्यावी । सावधपणे ।।१२।।
मोहरा पेटला अभिमाना । मग तो जीवाचे पाहेना ।
मोहरे मेळवून नाना । वरी चेपटे करी ।।१३।।
देखोन व्याघ्राचा चपेटा । मेंढरे पळती बारा वाटा ।
मस्त जाला रेडा मोठा । तो काय करावा ।।१४।।
रायांनी करावे राजकर्म । क्षत्री करावे क्षात्रधर्म ।
ब्राह्मणी करावे स्वधर्म । नाना प्रकारे ।।१५।।
तुरंग शास्त्र आणि स्वार । पहिलाच पहावा विचार ।
निवडुनी जाता थोर थोर । शत्रू पळती ।।१६।।
ऐशा प्रपंचाचा विवेक । स्वल्प बोलिलो काही येक ।
येका मनोगते स्वामी सेवक । असता बरे ।।१७।।

संत तुकाराम महाराज यांनी १६५० सालच्या जानेवारी महिन्यात देह ठेवला. त्यापूर्वी त्यांनी महाराजांना पत्र लिहिले होते. त्यात ते म्हणतात.

रामदास स्वामी । सोयरा सज्जन । त्यासी तनमन । अर्पि बापा ।।
मारुती अवतार । स्वामी प्रकटला । उपदेश केला । तुजलागी ।।

या अभंगात समर्थांनी शिवाजी महाराजांना उपदेश दिल्याचा उल्लेख संत तुकाराम महाराज करतात. त्यामुळे इ.स. १६४९ च्या भेटीमधेच शिवरायांनी अनुग्रह घेतला हे स्पष्ट होते.

शिवाजी महाराजांनी संत तुकाराम यांचा आशीर्वाद मागितला असता ते महाराज शिवाजी महाराजांना म्हणतात -


तुझी भेट घेणे काय हो मागणे । आशेचे ही शून्य केले तेणे ।।१।।
निराशेचा गाव दिधला आम्हासी । प्रकृती-भावाशी सोडीयेले ।।२।।
पतिव्रता मन पतीशीच भेटो । तैसे आम्ही विठोमाजी नांदो ।।३।।
विश्व हे विठ्ठल दुजे नाही काही । दुखणे तुझेही तुजमाजी ।।४।।
बहुतांची वृत्ती चाळावली जेंव्हा । रामदास्य तेव्हा घडे केवी ।।५।।
सद्गुरू श्रीराम-दासाचे भाषण । तेथे घाली मन चालू नको ।।६।।
तुका म्हणे बापा चातुर्य सागरा । भक्ती एक थारा भाविकासी ।।७।।

या श्लोकामध्ये तुकाराम महाराजांनी शिवाजी महाराजांना समर्थांची कास धरावी असे सांगितले आहे...


विवेके करावे कार्यसाधन ।
जाणार नरतनू हे जाणोन ।
पूढिल भविष्यार्थी मन ।
हाटोची नये ।।१।।

चालू नये असन्मार्गी ।
त्यता बाणल्या अंगी ।
घुवीर कृपा ते प्रसंगी ।
दास महात्म्य वाढवी ।।२।।

जनीनाथ आणि दिनकर ।
नित्य करिती संचार ।
घालिताती येरझार ।
लाविले भ्रमण जगदिशे ।।३।।

दिमाया मूळ भवानी ।
हे सकल ब्रम्हांडांची स्वामिनी ।
येकान्ती विवेक करोनी ।
इष्ट योजना करावी ।।४।।

या श्लोकातील Bold केलेले अक्षर घेतले तर 'विजापूरचा सरदार निघाला आहे' असे वाक्य तयार होते, ही बातमी दिल्यावर "येकान्ती विवेक करोनी । इष्ट योजना करावी ।।" असेही समर्थ लिहितात.

"विजापूरचा सरदार निघाला आहे" हे संकेतिक भाषेत समर्थांनी शिवरायांना सांगितले यावरून ते स्वराज्यासाठी, पर्यायाने शिवरायांसाठी राजकीय हालचाली ही करत होते हे स्पष्ट होते.

त्यावेळचे वातावरण अत्यंत प्रतिकूल होते. त्यामुळे समर्थ काळजी पूर्वक हालचाली करत होते. त्यामुळे समर्थ आणि शिवराय यांच्या भेटीचे पुरावे कमीत कमी असावेत याकडे त्यांनी लक्ष दिले होते.

जाते स्थळ ते सांगेना । सांगितले तरी तेथे जाईना ।
आपुली स्तिथी अनुमाना । येवो ची नेदी ।।
लोकी केले ते चुकवी । लोकी भावले ते उलथवी ।
लोकी तर्किले ते दावी । निर्फळ करुनी ।।
एवं कल्पिता काल्पेना । तर्कीताही तर्केना ।
कदापी भविता भावेना । योगेश्वर ।।

म्हणजे कोठेही जाताना सांगून जावू नये, अथवा सांगितल्यास त्या ठिकाणी जाऊ नये. आपल्याबद्दलची खरी माहिती गुप्त ठेवावी. कोणी काही निष्कर्ष काढल्यास तो निष्फळ ठरवावा...

राजकीय हालचाली अश्याच कराव्या लागतात, अथवा त्या असफल होऊ शकतात.

याचा अर्थ असा की आपल्या कार्याचा दुसऱ्याला अंदाज येऊ नये व आपल्याबद्दल कुणी विशिष्ठ मत तयार करून घेऊ नये याची काळजी स्वतः समर्थ घेतात.

शिवाजी महाराज तर आपल्या मावळ्यांना सुचना देतात की "प्रत्येक दगडाखाली विंचू आहे असे समजून दगड उचलावा" अशा बिकट परिस्तिथीत समर्थ आणि शिवराय यांनी आपल्या भेटीचे कागदपत्र ठेवले असतील असे वाटत नाही.

शिवाजी महाराजांना आग्र्याहून राजगडावर येताना समर्थांच्या मठाचे जे सहकार्य झाले त्याची कागदोपत्री नोंद ठेवली असती तर औरंगजेबाने सगळे मठ जाळून टाकले असते.

एकंदरीत देशस्तिथी पाहिल्यानंतर समर्थ स्वराज्य संस्थापनेसाठी इतके व्याकुळ झाले आहेत की शहाजी राजांच्या जहागिरीत येऊनही तीन वर्षात शिवाजी राजे भेटले नाहीत म्हणून ते अधीर झालेत. तुळजाभवानीला शिवाजी महाराजांसाठी समर्थ इ.स. १६५७ साली प्रार्थना करतात,


'तुझा तू वाढवी राजा । सिघ्र आम्हाचि देखता'

केव्हा एकदा शिवाजी महाराजांना सिंहासनावर बसलेले पाहतोय असे त्यांना इ.स. १६५७ सालीच झाले होते.

यावरून त्यांचे स्वराज्यावरील आणि शिवरायांवरील प्रेमही दिसून येते.

तात्पर्य, शिव-समर्थ भेट इ.स. १६५० साली झाली इ.स. १६८० पर्यंत त्यांनी एकत्र कार्य केले.
शिवाजी महाराजांना समर्थांची जशी मदत झाली त्याच प्रमाणे शिवाजी महाराजांचा राजाश्रय मिळाल्यामुळे समर्थांच्या मठांचा विस्तार झाला आणि ते स्थिर होण्यास मदत झाली.



सौजन्य: "चिंता करितो विश्वाची" लेखक: सुनील चिंचोळकर

1 comment:

  1. सुखकर्ता दुःखहर्ता......ही गणपतीची आरती संपूर्ण महाराष्ट्रात म्हंटली जाते.हि आरती समर्थ रामदास स्वामी यांनी रचली आहे.गणपतीची संकष्टी चतुर्थी करणारा गणेशभक्त प्रत्येक घराघरांत असणारच. देवादिकांसह संतांनी देखील सर्व कार्यात गणपती प्रथम पूजला आहे.भाद्रपद शु. ४ ते भाद्रपद शु.१४ हा गणेशोत्सवाचा कालावधी आहे.प्रचलीत गणेशोत्सवाच्या पूर्वी श्री समर्थ रामदास स्वामींनी हा उत्सव सुरू केल्याची नोंद इतिहासात आहे.

    समर्थे सुंदरमठी गणपती केला !
    दोनी पुरुष सिंदूर वर्ण अर्चिला !!
    सकळ प्रांन्तासी मोहछाव दावीला !
    भाद्रपद माघ पर्यंत !!
    समर्थ रामदास स्वामी हे दासबोधाचे लिखाण करण्याकरिता शिवथरच्या घळीत आले.दहा वर्षाचे शिवथर घळीचे वास्तव्य पूर्ण झाले तेव्हा १६५८ साली समर्थ नाशिकला कुंभमेळ्याला जाण्याकरिता शिवथरच्या घळीतून बाहेर पडले. त्यावेळी आनंद संवत्सर सुरू होते. घळीत असताना त्या॑नी महाराष्ट्रावर  अफजलखान नावाचे एक विघ्न चालुन येत आहे हि बातमी ऐकली. महाराष्ट्रभर  संचार करणाऱ्या समर्थांच्या शिष्यांनी हि वार्ता त्यांच्या कानावर टाकली.त्यावेळी अष्टविनायकांतला पहिला गणपती ज्याचे नाव वक्रतुंड आहे. त्याची स्तुति करून हि प्रार्थना केली.तीच हि गणपतीची सुप्रसिद्ध असणारी आरती.
    या आरतीच्या पहिल्या चरणात अफजलखानाच्या स्वारीचा उल्लेख आपणांस स्पष्ट आढळतो.
    वार्ता विघ्नाची नुरवी पुरवी प्रेम कृपा जयाची !
    हा सुंदरमठ शिवकालीन शिवथर प्रांतात आहे.याचा उल्लेख छ्त्रपती शिवाजी महराजांच्या अस्सल मोडी पत्रात आढळतो.त्याच प्रमाणे श्री समर्थ सेवक कल्याण स्वामी यांच्या पत्रात तसेच श्री समर्थ रामदास स्वामी आणि शिवराय यांच्या मध्ये असणारा दुवा समर्थ शिष्य महाबळेश्वरकर भट यांच्या ही पत्रात आढळतो.तोच हा सुंदरमठ ज्याचे हल्लीचे प्रचलित नाव रामदास पठार असे आहे. शिवकालीन सुंदरमठाशी असणारी सर्व ऐतिहासिक कागद पत्रांचे पुरावे हया स्थानाशी तंतोतंत जुळून येतात. इथेच सन १६७५ साली छ. शिवाजी राजे आणि समर्थ रामदास स्वामी दोघांनी मिळून हा गणेशोत्सव भाद्रपद शु. !!४ ते माघ शु.!! ५ गणेश जयंती पर्यंत पाच महीने साजरा केला. हा गणपती कोणत्याही मंडळाचा राजा नाही तर हा हिंदवी स्वराज्य संस्थापक छ. शिवाजी राजांचा गणपती आहे.
    या गणेशोत्सवाचे पहिले वर्गणीदार राजे शिवछत्रपती आहेत. ज्यांनी त्या साली १२१ खंडी धान्य हया उत्सवाला देणगी दिली . त्याचा उल्लेख इतिहासात खाली दिलेल्या लेखात सापडतो .
    समर्थे शिवराजासी आकारामुष्ठी भिक्षा मागो धाडिली ! शिवराज म्हणे समर्थे माझी परीक्षा मांडली !!
    आकारा आकरी खंडी कोठी पाठविली !
    हनुमान स्वामी मुष्ठी लक्षुनिया!!
    ११ x ११ म्हणजे १२१ एवढे खंडी धान्य राजांनी या उत्सवाला दान दिले. या पाच महीने सुरू असणाऱ्या उत्सवाला भेट देऊन गणपतीचे दर्शन विजयादशमीच्या दिवशी घेतले असे आनंदवनभुवन या समर्थ रचित काव्यात उल्लेखले आहे. हा गणेशोत्सव श्री समर्थ रामदास स्वामींच्या साक्षात्काराचा अनुभव आहे. श्री गणपतीच्या आरतीच्या शेवटच्या चरणात रामदास स्वामींनी गणपतीला अफजलखानाच्या या स्वराज्यावर आलेल्या संकटांपासून शिवाजी राजांना सहीसलामत सोडवावे अशी प्रार्थना केलीली आहे.पहा.....
    दास रामाचा वाट पाहे सदना !
    संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सूरवरवंदना !!
    शिवाजी राजांनी या गणेशोत्सवाला सुंदरमठावर जेव्हा भेट दिली त्यावेळी रामदास स्वामी यांनी १८ वेगवेगळ्या प्रकारची शस्त्र महराजांना प्रसाद भेट दिली आणि महाराजांनी एक पांढरा घोडा समर्थांना दिला.गणपतीची आरती १६५८ ला समर्थांनी प्रार्थनापूर्वक लिहिल्यानंतर समर्थ शिवाजी राजांना राज्याभिषेक होई पर्यंत सन १६७४ पर्यंत थांबले, नंतर १६७५ ला गणेशोत्सव केला आणि १६ सप्टेंबर १६७६ ला सज्जनगडावर वास्तव्यकरिता गेले. हाच महाराष्ट्रातील पहिला गणेशोत्सव जो स्वराज्य निर्माण झाल्यानंतर छ. शिवाजी राजे आणि समर्थ रामदास स्वामी यांनी सुरू केला.
    आज महाराष्ट्रात प्राचीन सार्वजनिक गणेशोत्सवाचे जे पुरावे सापडतात ते हया उत्सवानंतरचे आहेत. हा उत्सव सुंदरमठ रामदास पठारावर पुन्हा नव्याने पाच दिवसाचा सुरू झाला असून या उत्सवातून प्रेरणा घेऊन श्री क्षेत्र शेंदूरमळई हे गुरुकुल येथेही हा उत्सव सुरू झाला आहे. आपण आपल्या सार्वजनिक गणेशोत्सवात ही माहिती जरूर पुरवावी.वरील संशोधन सद्गुरू अरविंदनाथ महाराज यांनी केले असून हया माहितीचे सर्व अधिकार राखीव आहेत. या माहितीचा संबंध कोणत्याही जात, धर्म ,पंथ ,सांप्रदाय ,पक्ष ,संघटना यांच्याशी नाही.
    रामदास पठार - सुंदरमठावर येण्याकरीता महाड-पुणे रस्त्यावर वरंधाघाटात माझेरी जवळ कमानी खालून डाव्या हाताने सरळ पुढे कि.मी. मठाच्या माळावर शेवट पर्यंत डांबरी रस्त्याने यावे.निवास, भोजन व्यवस्था पूर्व सूचना दिल्यास विनामूल्य होऊ शकते.

    ReplyDelete