Sunday, February 26, 2023

विदर्भीय भटकंती – किल्ले महादागड

किल्ले म्हटलं की डोळ्यासमोर येतो तो सह्याद्री. डोळ्यासमोर येतात ते मराठा साम्राज्य आणि छत्रपती शिवाजी महाराज! आपल्या सुदैवाने इतकं सुंदर चित्र सतराव्या शतकात चितारलं गेलं आणि आपलं नशीब म्हणून आपण त्या चित्राचा एक भाग असलेल्या मातीत जन्माला आलो. किल्ला म्हटलं की “महाराजांचा गड” म्हणून आपण जवळ करायला बघतो तळपलेल्या उन्हात, चिंब पावसात, लाल-काळ्या मातीतून किंवा काळ्याकभिन्न कातळावरून...

पण ह्या मराठा साम्राज्याबरोबर अजूनही काही साम्राज्य इतरत्र नांदत होती, जी मराठा साम्राज्याचा भाग होऊन भाग्यवान ठरली नाहीत. विदर्भ हा त्यातलाच भाग. या “गोंड”वनातील किल्ले हे “गोंड” राजाकडे होते, जे मुघलांचे मांडलिक बनून राहिलेले होते. गोंड राजांचा काळ हा तेराव्या शतकापासून सुरू होऊन १७व्या शतकानंतर नागपूरकर भोसल्यांनी घेईपर्यंतचा. या गोंडवनातील किल्ले ही अत्यंत सुंदर आहेत व ह्यातले गिरीदुर्ग प्रकारात मोडणारे किल्ले हे बहुतेककरून चहूबाजूंनी घनदाट अरण्याने वेढले गेल्याने ते वनदुर्ग आहेत. सुदैवाने ते खरंच वनदुर्ग राहिलेले आहेत.

ह्या भटकंतीत नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, वर्धा आणि यवतमाळ असे सात जिल्हे पालथे घालून जवळपास ३७ किल्ल्यांना भेट दिली. त्यातले मोजकेच किल्ले या लेखमालेत मांडणार आहे. त्यातला पहिला लेख हा “महादागड” ह्या वनदुर्गावर.

हा सोप्या श्रेणीतला किल्ला आहे. सहज भटकत जावे आणि किल्ला फिरून यावे. पण यासाठी दोन महत्त्वाचे अडथळे आहेत. ते म्हणजे प्रचंड संख्येने भटकंती प्रेमी असलेल्या पुण्या-मुंबईपासून खूप लांब आहे, नागपूर जिल्ह्यात. आणि दुसरे म्हणजे घनदाट जंगलात हा किल्ला आहे. गंमत म्हणजे हा जंगलाचा भाग पुणे-मुंबईकडून नागपूरकडे जाताना फक्त ३० किलोमीटर आधी अंतरावर आहे. समृद्धी महामार्गाने नागपूरकडे जाताना “सातनवरी” नावाचे ठिकाण “बाजारगाव” च्या पुढे आहे. तिथून डावीकडे हा किल्ला चार किलोमीटर पेक्षा कमी अंतरावर आहे. “सातनवरी” वरून डावीकडे वळून पुढे जाताना “खैरी” गांव लागते. इथे कागद कारखाने आहेत. इथल्या “उत्कर्ष पेपर मिल” च्या पुढे हा रस्ता किल्ल्याच्या पायथ्याशी जातो. ह्या पेपर मिलजवळ पोचलो की गुगल मॅप बंद करायचा. नाही तर आपला वेळ वाया जातो आणि स्थानिकांची मदत घेतल्याशिवाय पुढे नक्की समजत नाही.

कच्चा प्रशस्त रस्ता

गावात पोचल्यावर वस्तीजवळ डांबरी रस्ता संपतो तिथे वडाच्या पारावर नागमूर्तीची स्थापना केलेली आहे. इथे उजवीकडे वस्ती आहे तर समोरचा कच्चा, पण प्रशस्त रस्ता जंगलाकडे जातो. रस्ता तसा चांगला मळलेला आहे पण आपल्याकडचं जंगल आणि इकडचं जंगल ह्याच्यात खूप फरक असल्याने आम्ही मोठ्या कष्टाने गावातल्या दादांना आमच्याबरोबर यायला तयार केले आम्हाला किल्ला दाखवायला.

प-ह्या

एक तर पावणेतीन झालेले होते. भटकंतीचा हा पहिलाच दिवस, पहिलाच गिरीदुर्ग. हा राखीव जंगलाचा भाग. रस्ता चुकून वेळ वाया घालवणे आम्हाला परवडणारे नव्हतेच. ह्या प्रशस्त रस्त्यावरून चालू लागल्यावर अवघ्या दोन मिनिटात एका प-ह्याजवळ पोचलो. स्वच्छ पाण्यात अंग घुसळावे हा झालेला मोह बाजूला ठेवत बूट सुद्धा न भिजवता तो दगडांवरून उड्या मारत पार केला आणि वन खात्याच्या लोखंडी गेट जवळ पोचलो.

बांबूच्या वनात.. अहा अहा...

उजवीकडेची मळलेली पायवाट थेट गडावर जाते. वाटेत बांबूचं अक्षरशः वन आहे. पराकोटाची तटबंदी असेल असं वाटणारा एक गडगा ओलांडून जंगल भागातून किल्ल्याच्या पायवाटेवर चालताना पुढे इथे पूर्वी पायऱ्या असाव्यात अशा मार्गाजवळ येतो. तिथूनच डावीकडे गड स्पष्ट दिसायला लागतो.

तटबंदी

गडाच्या दरवाजात

मोठमोठ्याला खडकांवर तटबंदी दिसायला लागली आणि दोन मिनिटात गडाचा उध्वस्त दरवाजा लागला. दरवाजाचे अवशेष काही शिल्लक नसले तरी उजवीकडच्या शिल्लक तटबंदीमुळे आणि डावीकडच्या बुरुज सदृश्य पण आता शिल्लक नसलेल्या बांधकामामुळे इथेच दरवाजाचे अस्तित्व असणार हे कळून येते. वरती दर्गा असल्याने हिरवी फडकी काही ठिकाणी लावलेली दिसतात.

गडाची शाबूत तटबंदी

दर्गा

गडाची तटबंदी शाबूत आहे, फक्त झाडीत लपून गेलेली आहे. दर्ग्याच्यासमोर एका झाडाखाली हिंदू देवस्थान आहे. तिथे लावलेला ॐ आणि त्रिशूळ यामुळे त्याचे अस्तित्व टिकून आहे. इथे मूळ शंकराचे स्थान होते असं वाचनात आलं होतं, पण सध्या पिंडी काही दिसत नाही.

जुने शंकराचे स्थान जे आता नष्ट होत चालले आहे

अनगड देव

गडमाथा तसा लहानच आहे आणि तटबंदी शाबूत आहे. या माथ्याच्या बऱ्यापैकी मधोमध असलेल्या या दर्ग्याच्या डावीकडून मागच्या बाजूला गेल्यावर काही अनगड देव दिसतात. शेंदूर फासलेल्या देवाजवळ दिवाबत्तीची सोय आहे.

पलीकडे डोळ्यांना सुखावणारं हिरवंगार जंगल

तटबंदी पलीकडे लांबवर पसरलेलं घनदाट हिरवंगार जंगल डोळ्यांना सुखावतं. एकूणच गडाचे स्वरूप बघता, त्यावेळीही इथे राबता नसावा. पण याचं स्थान पाहता टेहळणीच्या दृष्टीने आणि एक लष्करी ठाणं म्हणून याचं महत्त्व नक्कीच जास्त असेल.

गड-देवता

गड-देवता

आल्यामार्गानेच खालपर्यंत आल्यावर जंगलातच एके ठिकाणी एक गणपती जंगल राखतो आहे, हे स्थान जातानाच हेरून ठेवलेलं होतं पण दुसरं स्थान मात्र स्थानिक बरोबर नसेल तर कळूसुद्धा शकणार नाही. इथे गणपती आणि हनुमानाच्या मूर्ती आहेत. गणपतीची मूर्ती ही नेहमीपेक्षा वेगळी आहे, जी उभी आहे आणि त्याचा साईड-व्ह्यू आहे. एका हनुमानासमोर एक नंदीही आहे. म्हणजे शंकराची पिंडी कुठेतरी गायब झालेली असणार हे नक्की.

महाकाली देवस्थान - मांसाच्या नैवेद्याची व्यवस्था

स्थानिकांचा आग्रह मोडवेना, म्हणून “मौजे भुयारी (शिरपूर) धामणा” इथल्या महाकाली देवस्थानालाही भेट दिली. मूळ मंदिर आता अस्तित्व गमावून बसलेले असले, तरी त्यावेळच्या मूर्ती तिथे जतन करून ठेवलेल्या आहेत. या महाकाली देवीला बकरा किंवा कोंबड्याचा नैवेद्य लागत असल्याने त्याची स्वतंत्र सोयही केलेली आहे.

पहिल्या दिवसाच्या भटकंतीची सांगता करून पुढे मुक्कामाला “पार-शिवनी” गाठले. सकाळी बघायचा होता “कुंवारा भीमसेन” हा पेंच अभयारण्य किल्ला.

सुखद आठवणींशिवाय काही नेऊ नका... आणि पाऊलखुणांशिवाय काही ठेऊ नका!!!

4 comments:

  1. Khup chaan 👌👌

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद! :)
      कृपया आपले नांव अभिप्रायाखाली जरूर लिहीत जा.

      Delete
  2. Jabardast Mitra... Khoop sahaj ani sundar reetya Tu amhala gad/kilyanchi mahiti detos ani tujhya bhatkantichya varnanatun apan swatach hey sagla pratyeksha anubhavlyaaarkhach samarthan milata... Ani ashi bhatakani safar karayla protsahan milata.... Lihit raha...

    ReplyDelete