मागच्या लेखात आपण पाच दरवाजे पार करून साक्षात वीर हनुमानाचं डोळे भरून दर्शन घेतलं… आणि तिथेच थांबलो. अर्थात, तो विराम फक्त लेखापुरताच होता, प्रत्यक्षात मात्र पुढची वाटचाल सुरूच होती.
![]() |
| सहाव्या दरवाजाची तटबंदी |
डोळे भरून हनुमानदर्शन घेतल्यावर मग जाणीव झाली, की वर जाणाऱ्या पायऱ्यांच्या मागे उंच आणि मोठी तटबंदी आहे. ही दगडी असून वर ढासळलेल्या भागाकडे पाहिल्यावर हेही लक्षात येतं की, आतमध्ये ही तटबंदी भाजलेल्या विटांची असून मजबुतीसाठी बाहेरील बाजूने दगडी थर लावलेला आहे.
![]() |
| सहावा दरवाजा |
हा दरवाजा उंचीला जास्त नाही आणि दरीच्या टोकाच्या बाजूला आहे. यावरही भाजलेल्या विटांचे बांधकाम आहे. पलीकडे गेल्यावर आतमध्ये असलेले खांब दिसतात, आणि उतारही आहे. बाजूला उंच तटबंदीने संरक्षित आहे.
![]() |
| बालेकिल्ल्याची तटबंदी |
दरवाज्यातून आत आल्यावर उजवीकडे वर बघायचं, इथे सर्वांचे कॅमेरे वर जाणार नाहीत तरच नवल! अहाहा.. काय तटबंदी दिसते इथून, क्या बातच... उंचच उंच दगडी शिळा, वरून पाण्याचे ओघळ येऊन चितारलेली गेलेली सुंदर नक्षी, त्यावर ही अभेद्य दगडी तटबंदी, आणि त्यावर लालबुंद विटांनी साकारलेल्या चर्या, अगदी फुलाच्या पाकळीसारख्या! तीन स्तरात उत्तम केक बनवावा, असा भास इथे बघून होतो.
![]() |
| सातवा दरवाजा |
तटबंदी वर दिसत असली तर इथून किल्ल्यावर जाण्यासाठी रस्ता मात्र ह्या सर्व शिळांना वळसा मारून जातो. उजवीकडे हा दगडी कडा ठेवत पुढे जात राहिल्यास उजवीकडे हा दरवाजा दिसतो. इतर दरवाजाप्रमाणेच हाही दगडी असून वर विटांच्या चर्या आहेत. डावीकडे छोट्याशा बुरुजावर बार्टीझन झाडीमागून डोकावताना दिसतो, तर उजवीकडे वरती अभेद्य बालेकिल्ला.
![]() |
| बुरुज आणि बालेकिल्ल्याला जोडणारा पूल |
दरवाज्यातून पलीकडे आल्यावर चढ आहे. हा चढून वर आल्यावर समोरच एक बुरुज दिसला. ह्या बुरुजाच्या उजवीकडे मागे एक पूल दिसला, ज्याने उजवीकडचा बालेकिल्ला या वाटेला जोडलेला आहे. या पुलावर जायला समोरच्या बुरुजाच्या डावीकडून वळसा मारून वाट आहे.
संरक्षण व्यवस्था अफाट आहे ही. अरुंद वाट डावीकडे तटबंदीपलीकडे दरी. हा बुरुज कितीतरी जणांना थोपवून धरू शकतो.
इथून शत्रू सुटलाच तर बालेकिल्ल्यावर जाण्यासाठी हा पूल ही एकमेव वाट आहे. मुळात पुलापर्यंत पोहोचण्यासाठी बऱ्यापैकी पायऱ्या चढाव्या लागतात. हा सगळा मोकळा भाग आहे, म्हणजे जो बुरुज ओलांडला त्याच्या टप्प्यात हा भागही येतोच. त्यानंतर हा पूल आहे, जो साधारण ३० फूट लांब आहे. सध्या हा लोखंडी असून संरक्षणासाठी दोन्ही बाजूंना रेलिंग लावलेलं आहे, परंतु पूर्वीच्या काळी ही बांधणी कशी असावी, हे कुतूहल नक्की वाटतं.
इतिहासात हा पूल नेमका कधी बांधला, ते कळत नाही, पण सुरक्षिततेच्या दृष्टीने याचं अतिशय महत्त्वाचं स्थान आहे. एक तर हा मार्गही पूर्ण मोकळा आहे, लपायला जराही जागा नाही. कडेला तोल गेल्यास खाली सरळ साठ फूट खोल दरी!
![]() |
| पुलावर जाणाऱ्या पायऱ्या |
![]() |
| आठवा दरवाजा |
बरं, एवढे अडथळे पार करत पुलावर शत्रू पोचलाच तर पुलाच्या पलीकडच्या टोकाला डावीकडे मोठा बुरुज आहे. त्यावर बंदुकीचा मारा करायला जागा आहे. पुलाच्या जराशा उजवीकडे दरवाजा आहे. बुरुज आणि हा दरवाजा यांच्या मध्ये, म्हणजे पुलाच्या समोरच्या टोकाला, तटबंदीवर बार्टीझन आहे. सगळीकडून धुव्वाधार पाऊसच की बंदुकीच्या गोळ्या किंवा बाणांचा... काय शक्यता आहे इथून पुढे जायची??
या सर्व गोष्टींमुळे संरक्षणाच्या दृष्टीने हा सहाजिकच अभेद्य आहे. बंदुकीच्या माऱ्यातून वाचायला जागाच नाही. त्यामुळे "well-disciplined infantry would always prevail… let their numbers be ever so great", हे साधारण "अशा अरुंद आणि उघड्या मार्गांमुळे, मोजक्या सैनिकांनीही प्रचंड सैन्य रोखता येतं" अश्या आशयाचं रॉबर्ट ऑर्मीचं वाक्य अगदी तंतोतंत जुळतं.
नशीब, आम्ही त्या इतिहासात नव्हतो. आणि "हरीतात्या" असते तर त्यांनी इतिहास वर्तमान बनवून डोळ्यासमोर उभा केलानी असता आणि मग आमची खैर नव्हती...
"अरे शत्रू शेवटी आलाच त्या बुरुजाआडून, पण आम्ही पण भले बहाद्दर बसलेलो बार्टीझन मध्ये बंदुका घेऊन लपून, पण महाराज कुठे? तर स्वतः त्या बुरुजावर छाती काढून उभे.. केला आम्ही मारा सगळीकडून शत्रूवर.. गेला गनीम टप-टप करत सगळा दरीत..." काय बहार आली असती हे ऐकायला..
पण भानावर आलो, ना हरितात्या होते, ना शत्रू आणि ना महाराज.. आम्ही भटके म्हणून इथे आलो होतो. सहज चालत, फोटो काढत पूल पार केला.
![]() |
| छोटे मित्र |
या दरवाजाच्या पलीकडे समोरच धान्यकोठार आहे, पण आधी न बघता दरवाजा पार केल्यावर लोकांशी गप्पा मारत बसलो. चार-पाच हिंदी शब्दांपलीकडे त्यांचं हिंदी जात नव्हतं, आणि तामिळ बाबत मी तर ठार अशिक्षित! पण लहान, गोड मुलांबरोबर छान गप्पा झाल्या. फोटोत मागे जे दिसतंय ना, तेच. नंतर ते कोठार पाहिलं, पण फोटो काढायचं लक्षातच राहिलं नाही. राहिना का.. धान्यकोठार पाहिलं तरी.
![]() |
| नववा दरवाजा |
यापुढे वर अजूनही अवशेष-वास्तू आहेत. ते बघण्यासाठी जाताना हा शेवटचा, नववा दरवाजा लागतो. हाही दरवाजा दगडी असून वर भाजलेल्या विटांचे बांधकाम आहे. मात्र यावरची नक्षी अप्रतिम आहे. डावीकडे वरती बार्टीझन आहे, उजवीकडेही कदाचित आधी असावं, पण आता शिल्लक नाही.
या दरवाजाच्या आतल्या खांबांवर मात्र नक्षीकाम कोरलेलं आहे. यातील बरीचशी नक्षी कमळ किंवा फुलांची आहे, तर दोन खांबांवर चक्क कोदंडधारी राम आणि लक्ष्मण आहेत. दरवाजाच्या मागच्या तटबंदीत मोठमोठ्या जंग्या आहेत, ज्या आतून दिसतात. दरवाज्यात येताना मात्र त्या लक्षात आल्या नव्हत्या.
![]() |
| काही अवशेष |
या माथ्यावर पाण्याच्या टाक्या आणि अजूनही काही वास्तू आहेत, जसे धान्यकोठार, चौकी, खजिन्याची जागा. याबरोबर राजसदरही आहे.
![]() |
| राजसदर |
ही राजसदर तुबाकी कृष्णप्पा नायक या राजाने बांधली, असं नमूद केलेलं आहे. ही वास्तू मोठी आहे. हिला १५ खांब आहेत आणि त्यात कमानी आहेत.
![]() |
| जैन चौकी |
या वास्तूला "जैन चौकी" म्हणतात. असं का? याचं कारण मला माहिती नाही. पण ही वास्तू मोठी, म्हणजे राजसदरेपेक्षा प्रशस्त आहे. हिला ४५ खांब आहेत. आजूबाजूला झाडी मात्र खूप वाढलेली होती.
![]() |
| रंगनाथ मंदिर |
वाटेतले अवशेष पाहत येत असलो, तरी बघायचं होतं, हे मंदिर! म्हणजे रंगनाथ मंदिर. हे मंदिर द्रविड शैलीत बांधलेलं आहे. अतिशय देखणं आहे. चहूबाजूंनी सुंदर कोरीव काम केलेलं आहे. आणि या सुंदरतेचा कळस म्हणजे शब्दशः "कळस"च! या मंदिराचा कळस खूपच सुंदर आणि घुमटाकार आहे.
खालील मंदिर दगडी बांधकामाचं आहे, परंतु हा घुमटाकार कळस विटांमध्ये बांधलेला आहे. त्यामुळे दोन वेगवेगळे रंग स्पष्ट दिसतात, एक कळसाचा आणि एक खालच्या मंदिराचा. या मंदिराच्या प्रवेशद्वारासमोर छोटासा मंडप चार खांबांवर तोललेला आहे. या मंडपाला तीन बाजूंनी सुंदर पन्हाळीसारखी बांधणी केलेली आहे.
![]() |
| शिलालेख - आंतरजालावरून साभार |
मंदिराबाहेरील पायरीवर एक शिलालेख आहे. सुमारे १३व्या शतकातील असल्याचे संशोधकांनी सांगितले आहे, "जिंजी कुठाई थोलियम कालगम" या संशोधक समूहाने, अरुण देवकुमार, एकमलाई आणि वडीवेल यांच्या मदतीने, या शिलालेखाचं वाचन व अभ्यास केला.
या शिलालेखात "गोविंदन" नावाच्या व्यक्तीचा उल्लेख असून, त्याने देवाची अविरत पूजा केली असल्याचे नमूद आहे. यावरून त्या काळातील धार्मिक परंपरा आणि भक्तीभाव यांची माहिती मिळते.
संशोधकांच्या मते, जिंजी किल्ला परिसरात अजूनही अशा अनेक ऐतिहासिक गोष्टी दडलेल्या असण्याची शक्यता आहे.
![]() |
| झेंड्याचा बुरुज किंवा टेहळणी बुरुज |
मंदिराच्या समोरच अतिशय सुंदर इमारत आहे. ही म्हणजे झेंड्याचा बुरुज, किंवा टेहळणी बुरुज. ही वास्तू दुमजली, किंवा म्हणाल तर तिमजली आहे. सर्वात वर एक गोल बुरुज आहे. आतून वर जायला जिना आहे. या वास्तूवरून मंदिराचा फोटो, मंदिराजवळून वास्तूचा असेल फोटो काढण्यासाठी ४ वेळा तरी चढ-उतार केला असेल.
![]() |
| मंदिर |
या गडमाथ्यावर बरेच अवशेष आहेत. हे एक मंदिरही असंच झाडीत लपलेलं दिसतं. आणि अशा बऱ्याच गोष्टी इथे दडलेल्या आहेत. पाहिजे तो फक्त वेळ, जेणेकरून सगळं शोधता येईल आणि व्यवस्थित पाहता येईल.
आमची गडफेरी इथे पूर्ण झाली होती. म्हणजे, किमान दिसेल ते तरी सगळं पाहून झालं होतं. खाली उतरायला आम्ही सुरुवात केली.
![]() |
| तटबंदी |
![]() |
| बाळरंगनाथ मंदिर |
येता येताना एक गोष्ट मुद्दाम लक्षात ठेवली होती, ती म्हणजे हे बाळरंगनाथ मंदिर. चौथ्या दरवाज्यातून वर आलो की, डावीकडची वाट धरून बालेकिल्ल्याकडे येता येतं. वर येताना हीच वाट पकडली होती, कारण त्यावेळी लक्ष होतं बालेकिल्ल्यावर. पण उजवीकडे थोड्याच अंतरावर हे मंदिर आहे.
हे मंदिर उतरताना बघितलं. हेही पूर्वाभिमुख आहे. पूर्ण वास्तू दगडी आहे, परंतु कळस मात्र दगडी नाही, आणि तो विजयनगर शैलीतील आहे. या मंदिरात तामिळ भाषेतील एक शिलालेख आहे. पण या सुंदर मंदिराच्या गर्भगृहात मात्र कोणतीही मूर्ती नाही. स्थानिक लोक याला शिवमंदिर मानतात.
राहिलेले अवशेष पाहून उतरून पायथ्याशी आलो. लेखमालेत आधी कृष्णगिरी, त्रिचंदी कोट आणि आत्ता राजागिरी म्हणजे राजगड, हे पाहिलं, परंतु प्रत्यक्षात या क्रमाने पाहिलं नव्हतं. तसेच अजूनही काही अवशेष पाहिले, जे लेखमालेत सविस्तर आलेले नाहीत. तसंच काही गोष्टी राहून गेल्या असतील, तर काही बघता आल्या नाहीत. जसं चेन्नागिरी म्हणजे चंद्रयानदुर्ग (सारंगगड), कारण यावर जायला परवानगी नाही.
अर्थातच मन पूर्ण भरलं नाही, रुखरुख लागून राहिलीच. पण "जिंजी" हे नाव जे मनात रुंजी घालत होतं, त्यात काही प्रमाणात समाधान नक्की लाभलं.
जिंजी, किंवा सेंजी, याला स्वराज्याच्या इतिहासात अनन्यसाधारण महत्त्व आहे. शहाजीराजांपासून आपला जिंजीशी संबंध येतो. पुढे दक्षिण दिग्विजयात महाराजांनी हा गड ताब्यात घेतला. रघुनाथ पंत हनुमंते यांची या भागावर त्यांनी नेमणूक केली. यानंतर पुढे राजाराम महाराजांनी, येसूबाईंच्या आज्ञेवरून, हे दक्षिणेतील राजधानीच बनवलं.
यानंतर एक-दोन नाही, तर तब्बल नऊ वर्ष औरंगजेबाचा संपूर्ण जोर इथे आपण रोखून धरला! हे सगळं मी इथे अत्यंत थोडक्यात लिहिलं आहे, पण प्रत्यक्षात या गडाचं स्थान खूप मोठं आहे. स्वराज्यासाठी महाराजांनी याची पुनर्बांधणी केली, ह्याला अधिक सुरक्षित केलं, आणि एवढ्यावर न थांबता या दुर्गसमूहातील दुर्गांना नवीन ओळखही दिली.
याच जिंजीने राजाराम महाराजांचा मुत्सद्दीपणा पाहिला. ह्याच जिंजीने त्यांना कैद झालेलंही पाहिलं आणि त्यांची सुटकाही पाहण्याचं भाग्य जिंजीला लाभलं. तर त्यांच्या एका पत्नीने इथेच इहलोकीचा निरोप घेतलेला पाहण्याचं दुर्दैवही याच जिंजीच्या नशिबी आलं.
इतिहासात अम्मन बहिणींपासूनच्या काळापासून असंख्य घडलेल्या घटना जिंजीने पाहिल्या. जैन वस्ती, पल्लव, नायक, पांडियन, होयसळ, कुरुंब, आदिलशाही, कुतुबशाही, मराठी, फ्रेंच, इंग्रज, पोर्तुगीज, या सगळ्यांना अंगावर खेळावलेला हा दुर्गसमूह. नंतर शेवटी हैदर अलीने जिंकून घेतलान आणि पुढे कहर म्हणजे टिपूने तर जिंकून तो सरळ जाळून टाकलान.
सुदैवानं सध्या पुरातत्त्व खात्याकडे हा दुर्गसमूह असल्याने, किमान इतिहास जपण्याचं कार्य सुरू आहे. युनेस्कोमध्ये नोंद झाल्याने हे कार्य अधिक उत्तम रीतीने चालेल, असं आपण मानूया.
आपल्या दृष्टीने पाहिल्यास, आपल्यासाठी अनन्यसाधारण महत्त्व असलेला हा दुर्गसमूह, जमेल तसा पाहावा, न्याहाळावा, अभ्यासावा, अनुभवावा आणि जपावा सुद्धा. वर्षानुवर्षं, शतकानुशतकं असा हा इतिहास गाजवलेला दुर्गसमूह भविष्यातही तेवढ्याच दिमाखात राहो, इतिहास उलगडून दाखवत राहो हीच सदिच्छा.
![]() |
| सुखद आठवणींशिवाय काही नेऊ नका... आणि पाऊलखुणांशिवाय काही ठेऊ नका!!! |



















No comments:
Post a Comment