Sunday, July 29, 2012

माझी भ्रमंती - किल्ले पन्हाळा ते किल्ले विशाळगड (भाग १)

            अदमासे १६६०, मार्च ची सुरुवात. सिद्धी जौहर, फाजलखान, सिद्दी मसूद, बाजी घोरपडे यांनी पन्हाळ्याला वेढा दिला. फिरंगीही त्यांना मिळाले. तब्बल ४ महिन्यानंतर गंगाधरपंत सिद्दी जौहरकडे महाराजांचे "सपशेल शरणागतीचे" पत्र घेऊन गेले.
            पत्राची शाईपण वाळायची होती, १२ मार्च १६६०, पौर्णिमेच्या रात्री महाराज निघाले, सिद्दीच्या कचाट्यातून सुटून.. वीस कोसांवर असलेल्या विशाळगडाकडे. गजापूरची घोडखिंड आली, तीनशे मावळे त्या खिंडीत गनिमाला अडवून धरायला उभे राहिले. सिद्दी मसूद बाजींच्या सैन्याला भिडला तर आपलेच लोक, सूर्यराव सुर्वे आणि जसवंतराव खाशा महाराजांच्याच मार्गात उभे राहिले.
           लढाईचे वर्णन केवळ अशक्य! महाराज सुर्व्यांची कोंडी फोडून गडावर पोचले आणि तोफ डागली. हातातली ढाल शत्रूच्या वारांनी फुटल्यावरही दोन्ही हातात तलवारी घेऊन लढणा-या बाजीप्रभूंवर शत्रूचा घाव झाला. बाजी पडले... त्यांच्या रक्ताने घोडखिंड पावन झाली...
               महाराजांना विशाळगडाकडे पोचायला ७ प्रहर लागले, म्हणजे २१ तास...
        इतिहासातील सोन्याचे पान ठरलेल्या या घटनेच्या मार्गावर आम्ही ८ जण (गम्मत म्हणूनही मावळे म्हणायचे धाडस मला होत नाहीये.) जाणार होतो. सगळी 'रसद' बरोबर घेऊन, कोणाशीही लुटूपुटूचीही लढाई न लढता, फक्त वाचलेले/ऐकलेले वर्णन कल्पनाशक्तीच्या जोरावर डोळ्यासमोर आणण्यासाठी, शिवराय, बाजीप्रभू अन् मावळे यांना मुजरा करण्यासाठी.. त्या पंढरीची वारी करण्यासाठी!
            भावना खरोखर इतक्या प्रखर असल्या तरी मर्यादा ओळखून असण्यामुळे आम्ही आमच्या level वर तयारी सुरु केली, sack, शिदोरी, नकाशे जय्यत तयारी केली. तारीख ठरली होती, २०-२१-२२ जुलै. पैकी २० ला शुक्रवार होता, हापिसाचे कामकाज डोक्यावर होतेच. जय्यत तयारीचाच भाग म्हणून हापीस-मित्राला आम्ही शुक्रवारी आजारी असल्याचा मेलही टाकायला सांगायला विसरलो नाही.
पन्हाळ्यावरील दाट धुक्यातील बाजींचा पुतळा 
            गुरुवारी रात्री समीर, सुबोध, प्रणव, मी, सुजय (बागड्या), अलोक (अलक्या), उत्कर्ष (उतक्या) आणि सिद्धार्थ असे ८ जण सह्याद्री एक्सप्रेस ने पुण्याहून निघालो. ओझे उतरवून ठेवल्यावर आमच्या कंपार्टमेंट मध्ये एकच माणूस वेगळा सापडला होता त्याला seat adjust करायची विनंती केली. पडत्या फळाची आज्ञा समजून त्याने स्वतःची सुटका करून घेतली. गाडी बरोबर ६ वाजता कोल्हापूरला पोचली. दंतमार्जन वगैरे गाडीतच उरकून घेतलेले असल्याने चहारूपी अमृताचा आस्वाद घेतला आणि "पन्हाळ्याला कुणी आम्हा नेणार का?" असे विचारात वाहनाच्या शोधार्थ निघालो. वडापच्या कृपेने सव्वा ८ वाजता दोन्ही हातात तलवारी घेतलेल्या बाजींच्या पुतळ्याचे दर्शन झाले. आणि पुसाटी बुरुजावरून आम्ही सुरुवात केली. सुरुवात अर्थातच नेहमीपेक्षा वेगळी नव्हती. चाल झपाझप होती. दाट धुके आणि त्यामुळे सुंदर वातावरण असल्याने फोटो अपरिहार्य होतेच.
प्रवासातील पहिला मित्र

            नकाशावरचा पहिला टप्पा होता "मसाई देवीचे पठार". म्हाळुंगे गांव लगेचच गाठून ८:४० ला पठाराच्या दिशेने सुरुवात केली. पठारावर वातावरण अतिशयच सुंदर होते. हलकासा पाऊस, दाऽऽट धुके, हिरवगार गवत... त्यातच अनपेक्षितरित्या एका मित्राने दर्शन दिले. बहुतेक मण्यार असावी. तिनेही मला ४-५ फोटो घेऊ दिले. मग तिला सोडून आम्ही "मसाई देवीच्या" शोधार्थ चालू लागलो. पहिले देऊळ लागले. दुसरेही लागले. तिथे लोकांना पावनखिंड, विशाळगडला चाललो आहोत असे म्हटल्यावर "मग बस ने जायचे कि" असे म्हणून पूर्णपणे मुर्खात काढणारा कटाक्ष टाकला आणि "खोतवाडी" कडे जायचा रस्ता सांगितला.
        "हे कसे काय चालत जाणार पावनखिंडीत" असे प्रश्नार्थक भाव त्यांच्या चेह-यावर तसेच ठेऊन ठेऊन आम्ही निघालो. त्या धुक्यात ५-५० वाटांत चुकीची बरोब्बर पकडली. पण आमचा आमच्यावर पूर्ण विश्वास असल्याने सापडेल त्याला वाट विचारायची ठरलेलेच होते. गाई-गुरांमागे धावणा-या गावक-याला अत्यंत कष्टाने उतक्याने पकडले आणि मग आम्ही कसे भरकटलो, मग परत पन्हाळ्याच्या दिशेलाच कसे लागलो वगैरे वदल्यावर त्याने वाट सांगितली. त्याला मोबदला अपेक्षित होता याची आम्हाला कल्पना नव्हती. त्याने वाट दाखवून, शिव्या घालून आणि खाऊन मोबदला मिळवला. वाट चुकल्याने मात्र अनपेक्षितरीत्या पांडवकालीन (?) लेण्यांचे दर्शन मात्र झाले.
            खोतवाडीच्या दिशेला लागल्यावर थोड्यावेळाने "कुंभारवाडा" लागला. मग खोतवाडी सापडली. दुपारचा एक-दीड वाजून गेला होता. सगळेच दमलो होतो. एका घराच्या बाहेर जरा वाईच टेकलो आणि मागे राहिलेल्या ३ साथीदारांची वाट बघू लागलो. प्रणव दादांनी गोळ्या-चॉकलेट बाहेर काढल्यावर तिथली एक चिमुरडी "गोळी गंऽऽऽ गोळी" हे इतके गोड म्हणाली कि कोणी-ना-कोणीतरी बाकीच्यांना ऐकवून दाखवत होते. जेवणासाठी "ओली नसलेली जागा" एवढ्याच अपेक्षित असलेल्या आम्हाला अनपेक्षित धक्का मिळाला. "गवळी" नावाचा एक इसम भेटला. त्यांनी त्यांच्या घरात जेवायला बसायची व्यवस्था केली. आमच्या बरोबरचा शिधा काढून जेवायला सुरुवात केली. आम्ही चक्क "अॅनाकोंडा" नावाचा इंग्लिश चित्रपट पाहत जेवलो. त्यावर न विचारता चहा, तो पण घरच्या म्हशीच्या दुधाचा... पठारावर भेटलेल्या माणसाच्या एकदम विरुद्ध हा माणूस. देऊ केलेले पैसे घ्यायलाच तयार नाही! वामकुक्षी साठी आम्हालाच वेळ नव्हता म्हणून नाहीतर त्यांने तीही सोय केली असती.
            ते सुख अनुभवून ३ वाजता "केळेवाडीच्या" रस्त्याला लागलो. वेग वाढला. धड डांबरी रस्ताही नाही आणि धड पायवाटही नाही अश्या अत्यंत वाईट, मोठ्ठी खडी (दगडच ते!) आणि चिखल अशा रस्त्यावरून केळेवाडीकडे पावलं पडत होती. त्यातच सुजय (म्हणजे बागडे) साहेबांचा शूज फाटल्याने त्याला वेळ लागत होता आणि अर्थात त्रासही होत होता. तसे कोल्हापूरच्या रेल्वे स्टेशन वर उतरल्या-उतरल्याच सुबोधच्या सॅकचा बंद जखमी झाला होता. मसाईच्या पठारावरून उतरायच्या आधीच समीरच्या सॅकच्या एका बंदाने दम तोडल्याने सुई-दोरा काढावा लागला होता. पण सुईत दोरा ओवायलाच इतका वेळ लागला कि समीरने कशीतरी सॅक वापरण्याजोगी करून टाकली. बगड्याच्या सॅकने तर घरातून निघतानाच मान टाकल्याने दुस-या सॅकचा सहारा घ्यावा लागला होता. आणि त्यातच शूज फाटला... पण तसेच आम्ही केळेवाडीला येऊन पोचलो. त्या दिवसाचे साध्य होते "कापरेवाडी"! ते साध्य करण्यासाठी वाटेत १० जणांना विचारत विचारत चाललो होतो. त्यात मंडलाईवाडी आली, धनगरवाडी पण आली आणि पन्हाळ्यापासून जवळ-जवळ ३० किमी वर कापरेवाडी सापडली आणि तिथली शाळाही सापडली. ५ वाजता आम्ही कधीच शाळेत न जायला मिळाल्यासारखे त्या शाळेत घुसलो.
            नखशिखांत ओले होतो. सॅक चे वजन पाण्याने वाढले होते. अगदी सुरुवातीला चिखल चुकवत-चुकवत Socks मधे पाणी न शिरू द्यायच्या इराद्याने कसरत करत जाणारे आम्ही नंतर वाट्टेल तसे चिखल तुडवत चाललो होतो. एका वाडीतून ८-१० किलो चिखल दुस-या वाडीत पोचव, मग तिथे शूज साफ करून  त्या वाडीतला चिखल पुढच्या वाडीत असे करत-करत कापरेवाडीत पोचलो होतो. त्यामुळे कपडे बदलून स्लीपिंग मॅट शाळेत पसरून बसकण मारली. सर्वांचे वेगवेगळे भाग दुखत होते. पाय आणि सॅकमुळे खांदे common होते. माझी सॅक तर थोडी मोठी असती तर मी त्यात बसू शकलो असतो अशी होती. सर्वांगाला थोडा-थोडा वेळ जमिनीवर टेकू दिले. मग बरे वाटले. गावातल्याच "साळुंखे" नी आमच्या जेवणाची सोय करायचे कबुल केले. सुंदर चहाही प्यायलो. जेवणाचा बेत न्यारा होता. भात, तांदूळाची भाकरी आणि त्या गावात कसलीही भाजी नसताना घरी असलेला कांदा, वांगी आणि ३-४ कडधान्ये मिळून केलेली मस्त भाजी.. आमच्या बरोबर लोणचे होतेच. उत्तम जेवण झाल्यावर सकाळच्या चहाची आणि उरलेल्या भातामुळे फोडणीच्या भाताची व्यवस्था साळुंखेंकडेच लावून ढाराढूर झोपलो.

1 comment:

  1. Khupach sundar lihilas.....!!!
    Tumhi kelela pravas agdi najare samor ubha rahto.. Mast keep blogging.. :)
    Shweta p.

    ReplyDelete