Sunday, July 29, 2012

माझी भ्रमंती - किल्ले पन्हाळा ते किल्ले विशाळगड (भाग २)

            गजर लावला किंवा mobile वर reminder लावला कि 5 मिनिट आधीपासून तो वाजायची वाट बघायची आणि वाजताच बंद करायचा हि नेहमीची सवय. शनिवारी सकाळी सुद्धा हेच, ५:५५ उठून बसलो. मुखशुद्धी करून होतेय तोच चहा हजर झाला. फोडणीचा भात खाऊन आणि फक्कड चहा मारून गडी सज्ज झाले आणि पावणे नऊला दुस-या दिवसाची सुरुवात झाली. पहिले लक्ष होते "आंबेवाडी". अपेक्षेपेक्षा आंबेवाडी लवकरच आली. कळकवाडी पण सापडली. रस्ता तर काय विचारता असा होता. दोन वाड्यांच्या मधे जंगल आणि वाडीत भात-लावणीची कामं चालू असल्याने पूर्ण शूज सहज आत घुसून राहील असा चिखल. मळेवाडी लागली. ह्यानंतर समीरने एकदा साष्टांग नमस्कार घातला. आता पाटेवाडीकडे चालू लागलो. पाटेवाडीही सापडली. शूज ६-६ इंच रुतत होते. जमेल तसा बुटाचा चिखल उतरवत जात होतो. त्यात एक सुंदर प-ह्या लागला. प्रत्येकाच्या शूजबरोबर किलो-दीडकिलो चिखल सहज असेल चोख शूज-socks काढले अन् पाण्यातच बसलो. 

सिद्धार्थच्या रक्ताचा आस्वाद घेत असलेली जळू

जमेल तेवढा चिखल दान करून निघणार इतक्यात सिद्धार्थ "जळू" म्हणून ओरडला. त्याच्या पायाला कधीतरी जळू लागली होती आणि ती रक्त पिऊन टम्म फुगली होती. पोट भरलेले नसल्याने तिचे रक्त-प्राशन चालूच होते. आम्ही पहिल्यांदी कॅमेरा आणि नंतर तंबाखू काढला. बागड्याने तो मळायचा प्रयत्न करून तो जळवेला खाऊ घातला. तिने त्याला काही दाद दिली नाही. मग लायटर काढून तिला चटका दिल्यावर मात्र न राहवून तिने सिद्धार्थचा पाय सोडला. आम्ही मग लगेच स्वतःचे पाय चेक केले. संशयास्पद काहीही आढळले नाही. पाटेवाडी सोडली. जवळ-जवळ साडे बारा वाजले होते. भूका लागल्या होत्या. "सुकामाचा धनगरवाडा" भोजनासाठी fix केला होता. पाऊस अजिबात थांबत नव्हता. सॅकने पाण्याने गच्च ओली झाल्याने पाठीवरचे वजन वाढवले होते. अखेर सगळ्यांनी एका सुंदर पठारावर सॅक खाली टाकल्याच. पाऊसही विश्रांतीच्या मूडमधे दिसत होता. "न पडणा-या" पावसाची आज्ञा मानून भोजनास प्रारंभ केला. उतक्याने पाकाताला रायआवळा आणला होता. पराठे, साध्या पु-या, तिखट-मिठाच्या पु-या, साटोरे, गोड पोळ्या, गुळाच्या पोळ्या असा पंचपक्वान्नाचा बेत केला. सगळे त्यावर तुटून पडले. उतक्याने ओवा-मिश्रित बडीशोप आणली होती, त्याच्या आग्रहाखातर प्रत्येकाने ती घेतली. तेवढ्यात पाचकाची पुडी बाहेर आली. सुबोध आणि सिद्धार्थ ने त्यासाठी थोडी लढाई करून घटकाभर आमचे मनोरंजन केले. सगळ्यांच्या तोंडात आवळ्याचे ते पाचक गेले आणि पुढे कूच केली. थोड्या वेळाने लक्षात आले कि सुकामाचा धनगरवाडाच आत्ता आम्ही सोडून पुढे आलो होतो. आता "म्हसवडे" शोधू लागलो.
            शुक्रवारी आम्हाला चांगली माणसं भेटली. शनिवार मात्र जरा बिनसला होता. तसं आंबेवाडीपासून एक वाटसरू कळकवाडी पर्यंत लाभला होता. नंतर मळेवाडी शोधताना वाटेत एक म्हैसही आमच्या मागे लागली होती पण तिच्या गुराख्याने तिला पिटाळले होते.  पण एकदा कापरेवाडी-आंबेवाडी सोडल्यावर पोरं-बाळं गोळ्या-चॉकलेट मागायला अक्षरशः मागे लागत होती. सुरुवातीला कौतुकाने दिली पण नंतर उपद्रव वाढतच चालला. एक-दोघांनी तर पेनसुद्धा मागून बघितले. लहान पोरंच नव्हे तर शेतात काम करणारे मोठे लोकही गोळ्या-चॉकलेट मागत होते. एकाने तर तुमची "प्यायची" सोय खाली गावात होईल असे सांगून आत्ता काही आहे का "प्यायला" असेही विचारून बघितले.
            मजल-दरमजल करत एका वाडीत येऊन पोचलो. बहुतेक म्हसवडे असावे. साधारण ३ वाजत आले होते. आमच्याकडच्या नकाशावर नसलेल्या ३-४ वाड्या मधे लागून गेल्या होत्या. त्यामुळे प्रत्येक वाडीत पुढचे गांव विचारत जाणे क्रमप्राप्तच होते. या "बहुतेक" म्हसवड्यातल्या एका माणसाने आम्हाला पावनखिंड २० किमी आहे अजून म्हणून सांगितले.. आम्ही चालतच होतो. त्याचा किमी मधला अंदाज चुकत असावा असे मानसिक समाधान करत होतो. आता मात्र एक डांबरी रोड लागला. त्यावरून वाटचाल सुरु झाली. आता पाय दुखायला लागले होते आणि डांबरी रोड वर तर पाय जास्तच दुखतात म्हणून मिळेल तिथे गवतातून, मातीतून जात होतो. दिसणा-या प्रत्येकाला पावनखिंडीचे अंतर विचारत होतो. काहीही अंतर सांगत होते. एका शेळीवाल्या धनगराने मात्र पावनखिंड ४० किमी सांगितल्यावर  सगळ्यांनीच विचार करायला सुरुवात केली. sat-sun तंगड्या वर करून पडायचे सोडून इकडे यायची आपल्यालाच मस्ती हे प्रत्येकजण गमतीत का होईना पण बोलून दाखवू लागला.
        पाण्याने कपडे आणि सॅक चे वजन वाढले होते, सगळ्यांनी सॅक खाली ठेवल्या. बागड्याच्या फाटक्या शूज मुळे तो सर्वात मागे होता. अलक्या आणि उतक्या तसे त्याच्या बरोबर होतेच. चाल मंदावली असली तरी सगळे चालत होते. ४० किमी ऐकल्यावर मात्र धीर सुटायला लागला होता. आधीच सकाळपासून साधारणपणे ३०-३२ किमी अंतर तोडले होते. "पांढरपाणी" गांव काही लागायला तयार नव्हते. आम्ही टेकलो असलो तरी बागड्या मात्र हळू हळू मागून येऊन पुढे गेला.. जेमतेम एका वळणानंतर "वाडी आली रे कोणतीतरी" म्हणून ओरडला. लगेच सगळे उठून चालू लागलो. २००-३०० मीटर वरच घरं दिसायला लागली. १० मिनिटातच उजवीकडे जाणारा डांबरी रोड दिसला आणि चक्क बोर्ड "पावनखिंड ६ किमी"!! तो बोर्ड दिसल्यावर सगळे अत्यानंदाने अक्षरशः ओरडले. मीठ-मोहरी असती तर त्या बोर्डाची नक्की दृष्ट काढली असती. त्यावेळी मात्र त्या उत्साहवर्धक बोर्डाजवळ सगळ्यांनी आपापले फोटो काढून घेतले. ४ वाजून गेले होते. "पांढरपाणी" सापडले होते. म्हसवडे का कोणत्याशा वाडीत आणि नंतर भेटलेल्या चुकीचा रस्ता सांगणा-यांना मनसोक्त शिव्या घालून प्रचंड उत्साहात पावनखिंडीकडे वाटचाल सुरु केली. त्या बोर्डाने एवढा उत्साह आणला कि सगळे नव्या दमाने पावलं टाकायला लागले. पाऊण तासाने साडेपाचच्या सुमारास "पावनखिंड" लिहिलेला बाजीप्रभूंच्या चित्रासहीत एक बोर्ड उजवीकडे बघितला. थोड्याच अंतरावर २ जीप थांबलेल्या दिसल्या. "पावनखिंड" बघायला आलेल्या "पर्यटकांना" फिरवणा-या होत्या त्या.
            नुकतेच पावनखिंड बघून एक कुटुंब येत होते. त्यांनी अजून १६३ पाय-या आहेत असे सांगितले. जवळ-जवळ ३६-३७ किमी दिवसभरात तुडवल्यावर १६३ पाय-यांचे काहीच कौतुक नव्हते. २-४ फोटो काढून पावनखिंडीकडे निघालो. ६ वाजता पोचलो आणि शूज, सॅक सगळे उतरवून बाजींच्या समाधीवर डोके ठेवले.

धन्य जाहलो त्या समाधीवर डोके ठेऊन

            याचसाठी केला होता अट्टाहास.... धन्य जाहलो! वाचलेले, ऐकलेले इतिहासाचे वर्णन डोळ्यासमोरून झरझर सरकत होते. खिंडीत पन्नास एक फूट खोल धबधबा कोसळत होता. सिद्दी मसूद कुठून आला असेल, बाजी कुठून लढत असतील, मावळे कसे गनिमाला कापत असतील.. कल्पनाशक्ती सगळं डोळ्यासमोर आणायचा प्रयत्न करत होती. साधारणपणे १०-१२ तास बाजी लढले होते. आम्ही ते सगळे डोळ्यासमोरून नेले. पावणे सात वाजले होते. दिवस मावळतीला लागला होता. आम्ही पुढच्या गावाच्या दिशेने निघालो. पाय हलत नव्हता, बाजींना कल्पनाशक्तीने का होईना पण त्या कोसळत्या धबधब्याच्या आवाजांत बघायचे होते. जड अंतःकरणाने सहका-यांना निरोप देणारे महाराज बघायचे होते. पण निघालो. "भाततळी" नावाच्या गावात पोहोचलो. बागड्या आणि अलक्याला पण "जळू" ने रक्तदान करायला लावले होते. गावाच्या पाटीलांचे घर सापडले. शाळेच्या नवीन चाललेल्या बांधकामामुळे तिथे राहायची सोय होईल असे त्यांनी सांगितले. आम्ही शाळेत पोचल्या-पोचल्या "कुठे जळू नाही ना हो चिकटली राया" म्हणून सगळे चेक केले. नाही. कपडे बदलून खाद्यपदार्थ आणि पाणी आणण्यासाठी मी आणि प्रणव बाहेर पडणार इतक्यात सगळ्यांना माझ्या डाव्या पायावर रक्त दिसले. जळू रक्त पिऊन पडून गेली होती. मला पत्ताच लागला नव्हता!
            पाटीलांकडे जेवणाची व्यवस्था होण्याची चिन्ह नसल्याने त्यांच्या दुकानातून फरसाण विकत घेतले आणि पाण्याच्या बाटल्यात फुकट पाणी मिळवले. कोणीतरी कांदा आणलाच होता, मस्तपैकी भेळ केली. थोडी शिदोरी शिल्लक होतीच. भरपेट जेवलो आणि स्लीपिंग बॅग, मॅट पसरल्या. मी आडवा पडलो मात्र आणि एक जळू माझ्या पॅट वरून वर सरकत होती. तिची विल्हेवाट लावली. बाबासाहेब पुरंदरेंचे "शिवचरित्र" बागड्याचे ब-यापैकी तोंडपाठ होते. त्याने पावनखिंडीचा भाग म्हणून दाखवला. नंतर मात्र गाढ झोप लागली. मधेच जाग येत होती. बाहेर सोसाट्याच्या वारा होता. क्षणभरही वारा आणि पाऊस थांबत नव्हता. वाळत घातलेल्या जर्किन आणि कपड्यांची चिंता डोकावत होती पण कुणीही उठण्याच्या मनस्थितीतही नव्हते. २ दिवसांत अदमासे ६५ किमी अंतर तुडवले होते. सर्वांना शांत झोप लागली.
             रविवारी फक्त विशाळगड बघायचा होता. आमच्या दृष्टीने "ट्रेक" संपला होता कारण पुढचा प्रवास संपूर्ण डांबरी रस्ता असल्याने बस, जीप जे मिळेल त्या वाहनाने करायचा होता. ९ ची पहिली बस होती. सगळ्यांना साडेआठलाच बस आहे म्हणून सांगितल्याने थोडा अतिरिक्त वेळ मिळाला होता. सगळे समान आवरले . बसनेही फार वाट पाहायला लावली नाही. बसमध्ये घुसून विशाळगडाच्या वाटेला लागलो. कंडक्टरच्या जिभेवर सरस्वती नाचत होती. Stop च्या पुढे गेल्यावर थांबवण्यासाठी कोणीतरी सांगितल्याने ***** अशी कचकचीत आईवरून शिवी त्याला घालून तेवढ्यावरच न थांबता "त्या मुर्खासारखे आणखी कोणी उतरायचे शिल्लक आहे का?" या अर्थाचे जे वाक्य बोलला त्यात कर्ता-कर्म-क्रियापद म्हणून एकेका नातेवाईकावरून शिवी होती. गांव अनुभवत साधारण तासाभरात १० च्या सुमारास विशाळगडाच्या पायथ्याशी पोचलो. विशाळगड चढायला १५-२० मिनिटंच लागतात असे कळले होते. उतक्याचा पाय प्रचंड दुखत असल्याने तो खालीच थांबणार होता, त्याच्या गुडघ्याजवळची शीर सरकली होती. वाटलं होतं तशी चढाई वगैरे काहीच करायची नव्हती. सरकारी कृपेने वरपर्यंत लोखंडी शिडीच होती. विशाळगडावर पोचलो मात्र आणि सुंदर भेळ खाल्ल्यावर शेवटचा शेंगदाणा नेमका खवट निघावा तसे झाले. विशाळगडाच्या आजूबाजूला सुंदर वातावरण असताना गडावर मात्र घाण होती.
             असो... सगळेच परत फिरलो, बसचीही वाट बघत बसलो नाही. वडापने मलकापूरला गेलो तिथून कोल्हापूर आणि मग पुणे. शिवाजीमहाराजांसाठी महत्वाचा ऐतिहासिक गड यापलीकडे विशाळगडाची आठवण काढवत नव्हती. सगळे मन व्यापले होते ते पावनखिंडीने... बाजीप्रभू, फुलाजीप्रभू आणि प्राण आपल्या राजासाठी प्राण पणास लावणा-या त्या मावळ्यांनी... मन अजूनही पावनखिंडीतच होतं...
            "हरितात्या" जर आम्हाला पावनखिंडीत भेटले असते तर त्यांनी लढाईचे वर्णन केले असते... "अरे हे बाजीप्रभू महाराजांना म्हणाले कि 'लाख मेले तरी चालतील पण लाखांचा पोशिंदा वाचला पाहिजे.. असे अनेक बाजी निर्माण होतील, महाराज नाही! थांबू नका, असे विशाळगडावर जा आणि विजयाची तोफ डागा. आम्ही या गनिमाला घोडखिंडीतून पुढे येऊ देत नाही.. महाराजांना हा अखेरचा मुजरा' आमच्या डोळ्यात पाणी होते, आम्ही महाराजांना मुजरा घातला आणि काय... तो सिद्दी फुल्या फुल्या आलाच अंगावर. आम्ही लढत होतो. गनीम मरत होता. बाजीची ढाल फुटली, ते दोन्ही हातात तलवारी घेऊन लढत होते. विजय समीप आला, पण घात झाला. गनिमाचा वार बाजींना लागला. आम्ही बाजींना उचलायला धावलो आणि काय सांगू तूला.. बाजी उठले आणि तलवारी सपासप चालू लागल्या. महाराजांच्या तोफेचा आवाज ऐकला आणि मगच बाजींनी प्राण सोडला..." पुराव्याने शाबित करेन!!!

1 comment: