Thursday, December 27, 2012

हडसर (पर्वतगड) -निमगिरी-चावंड (प्रसन्नगड) I

"शनिवारी काय करतोयस?" सुबोधच्या प्रश्नावरून काहीतरी बेत शिजला असावा याची कल्पना आलीच. "हडसर-निमगिरी-चावंड मारायचाय".
"मी नक्की!" मी.
        प्रणव, निखिल, सुबोध, समीर आणि मी. आनंद पण in झाल्याने ६ जण आणि ३ गाड्या. २ दिवसाचा ट्रेक असल्याने थोडी तयारी करावी लागणार होती. डाळ-तांदूळ, गोळ्या-बिस्किटं, चिवडा, Maggie पाकिटं आणि माझी, आनंदची संकष्टी असल्याने बटाट्याचा चिवडा वगैरे खाऊ, emergencyची औषधे, अंथरून पांघरून, जेवण बनवण्यासाठी साहित्य ई.ई. तयारी सगळ्यांनी मिळून केली.
        शनिवारी ९ च्या आधी न उठणारा मी सव्वा ५ ला शनिवार वाड्याजवळ आनंदची वाट बघत होतो. नाशिक फाट्याजवळ समीर आणि प्रणव येऊन मिळाले. मोशी फाट्याजवळ सुबोध, निखिल. एकदा पेट्रोल भरायला थांबलो आणि मग थेट नारायणगांव. हात थंडीने बधीर झाले होते, गाडीच्या गरम सायलेन्सरला हात धरून ठेवला असता तरी जाणीव झाली नसती. अर्थात मिसळ-चहाला पर्यायाच नव्हता. मिसळ संपता-संपता कधीतरी चवीची जाणीव झाली, तोपर्यंत चवीकडे लक्षच गेले नव्हते. मिसळीनंतर चहा नाही घेतला तर foul धरला जातो, त्यामुळे तो ओघाओघाने झालाच. उदरंभरणं झाल्यावर जुन्नरच्या दिशेला लागलो. डाव्या बाजूला किल्ले शिवनेरी आम्हाला जुन्नर जवळ आल्याचे सांगू लागला. त्याची ख्याली-खुशाली तिथूनच पुसून महाराजांच्या पुतळ्याला मुजरा करून उजवीकडच्या रस्त्याला लागलो.
        पुण्यापासून साधारण ११० किमीवर हडसर गांव लागले. रस्ता पण ठीक ठाक होता. सव्वा १० वाजले होते. गावकऱ्यांना वाट विचारून गडाकडे कुच केली. डाव्या बाजूला हडसर काळ्या दगडाची निधडी छाती काढून दाखवत होता. आम्हीही डोक्यावर येत चाललेल्या सूर्याच्या उन्हात वाट काढत होतो. सुरुवातीलाच असलेल्या देवळाला वळसा घालून गुरं चारायला आलेल्या गावकऱ्यांकडून पायवाटेची खात्री करून घेतली आणि उगाचच इकडचे-तिकडचे फोटो काढत एका खड्या कातळाशी पोचलो. मालक (सुबोध), निखिल आणि आनंद यायचे असल्याने थोडी विश्रांती घेतली. कॅमेरांना फोटो काढावेसे वाटत होते, आम्ही त्यांना मदत केली. समोरचा काळाकभिन्न खडक आमच्याकडे बघत होता, त्याला "मस्ती" म्हणून आव्हान आम्ही देणार नव्हतो. कातळात लोखंडी पहारीचे काही तुकडे ठोकलेले होते. दुसरी कोणतीही वाट नाही ह्याची खात्री झाल्यावर त्या कातळाचा अंदाज घ्यायला सुरुवात केली. त्यावर पाय देण्यासाठी ठराविक अंतरावर खाचा मारलेल्या होत्या. दोरीशिवाय चढणे अशक्य नसले तरी उतरणे नक्की अवघड असणार होते.

        कोणत्याही ट्रेक ला जायचे, तेही "पर्यटनस्थळ" प्रकारात न मोडणाऱ्या, म्हणजे नीट माहिती ही घ्यावीच लागते. हडसर च्या माहितीत मात्र हा खडा कातळ नवीनच होता. ढाक-भैरीची आठवण झाली नसती तरच नवल. उतरल्यावर त्यावर चर्चाही होणारच होती, इथे दोर, बांबू, काठ्या काहीही नव्हते. विचार-विनिमय झाल्यावर प्रयत्न करायचे ठरले. प्रत्येक पावलागणिक अंदाज घेतला जात होता. पहारीचे तुकडे आणि पाय ठेवायला खाचा अगदी योग्य प्रमाणात होत्या. माझ्यासारख्या कमी उंचीच्या माणसालाही अशक्य कॅटेगरीतल्या नव्हत्या. फक्त प्रयत्न थोडे जास्ती लागणार होते. हाताची पकड मजबूत असल्याशिवाय पाय उचलणे मूर्खपणाचे ठरले असते. कातळ ८५ अंशात चढायचा होता. तो पार झाल्यावर गुहा लागली. लगेच कॅमेरे सरसावले गेले. खालून येणाऱ्यांचे फोटो काढत त्यांना direction देत होतो. आम्ही हुशार असल्याने आमच्या बॅगा खाली गावातच एका घरी ठेवल्या होत्या, नाहीतर हा कातळ चढणे शक्यच नव्हते. निखीलानंद मात्र कातळावर येण्यासाठी confident वाटत नव्हते. आमच्याकडे दोर वगैरे काही नव्हते, मग निखिल गाड्यांकडे परत गेला आणि आम्ही पुढचा रस्ता बघायला लागलो. अजून एक कातळ आमच्यासमोर उभा होता पण तो कमी उंच आणि ५०-६० अंशातच होता. तो चढून गेल्यावर मात्र हनुमानाचे देऊळ, २-४ पाण्याची छोटी टाकी दिसली. एका देऊळ सदृश जागेत बैल किंवा तत्सम प्राण्याच्या हाडांचा सापळाहि दिसला. वरच्या बाजूला टेकडीवजा जागेवर गुरे दिसली आणि "खड्या कातळाबद्दल" काही का नव्हते वाचले ते लक्षात आले. गुरं होती त्याअर्थी सरळ चालत येण्याजोगी दुसरी वाटही होती. लगेच शोधकार्य सुरु झाले, खालच्या बाजूला एक ग्रुप त्या वाटेच्या दिशेने जातानाही दिसला पण ती वाट फार लांबची वाटत होती. जरा वेळाने सोप्या आणि लांबच्या वाटेपेक्षा जवळची आणि कठीण वाट बरी वाटली. मग पुनःश्च त्या कातळाकडे नाघालो. सोप्या आणि ६० अंशातल्या त्या कातळावरून उतरताना माझ्या कमरेच्या पट्ट्याला अडकवलेल्या कव्हर मधून कॅमेरा पडताना पहिला आणि तो गवतात कसा अदृश्य होतो हे बघण्यापलीकडे मी काहीही हालचाल केली नाही. तसा जर प्रयत्न केला असता तर ८५ अंशातला तो खडक उतरण्याचे कष्ट वाचले असते अन् उरलेल्या ४ जणांना मला खांद्यावरून खाली न्यावे लागले असते. एक-एक करून शांतपणे दुसराही खडक एकमेकांना direction देत उतरलो, मग मात्र कॅमेराकडे धाव घेतली. त्यातले cell पडून गेले होते आणि त्यावरचे कव्हरही गायब होते. सुदैवाने कॅमेरा आणि लेन्सचेही तुकडे झाले नव्हते ह्यात समाधान मानून झपझप हडसर उतरलो. १२:४५ झाले होते. बोअरिंग शोधून डोक्यावर पाणी मारून घेतले. दुसरे पाणी उपलब्ध असल्याने ह्या पाण्यावर "पिण्यास अयोग्य" असा शेरा मारून जेवणाची तयारी करू लागलो. तेव्हा संध्याकाळनंतर कोणते पाणी प्यावे लागणार आहे याची कल्पना नव्हती.
        पराठे वगैरे नाशवंत पदार्थांवर ताव मारला, विहिरीचे सुंदर पाणी प्यायलो. वामकुक्षी घेण्यास वेळ नव्हता म्हणून सावलीत १० मिनिटं बसून निमगिरीच्या दिशेने गाड्या हाकलल्या.
        रस्ता प्रचंड खराब होता आणि शेवटपर्यंत खराबच होत गेला. १३ किमी वर निमगिरीचा पायथा लागला. खूप वेळ शिल्लक असल्याने निमगिरी मारून चावंड वर मुक्काम करू असे विचार आम्हा वीरांच्या मनात आले, म्हणजे जड sack वर न्यायला नकोत खाली उतरल्यावर परत घेऊ असाही विचार होता. पण एक तर निमिगिरीवर जायला आणि उतरायला किती वेळ लागेल हेही माहित नव्हते. समजा, रात्र पडायच्या आत खाली आलो असतो तरी जेवण झाल्याशिवाय चावंडवर उजेडात जाणे शक्य होणारच नव्हते. Head-torch आणि चंद्राच्या प्रकाशात चावंडवर गेलोही असतो तरी वर राहायला जागा आहे कि नाही याची शाश्वती नव्हती. सरतेशेवटी sack चे ओझे वर न्यायचे नंतर वेळ आणि शक्ती यावर पुढचा बेत करायचा असे ठरले. गाड्या व्यवस्थित रस्त्याच्या बाजूला लाऊन चढाईला सुरुवात केली. उन अजिबात कमी झाले नव्हते. एका गावकरी मुलाने मार्ग दाखवला आणि झपझप पावले पडू लागली. सर्वात पुढे समीर होता आणि त्याच्या मागे सुबोध. अचानक सुबोध थांबला, समीर एका सापाजवळून पुढे गेला होता. लगेचच P510, SX40 वगैरे बाहेर आले. 
 तो छोटा अजगर असावा. नाईलाजाने त्याला गुडबाय करून पुढे चालू लागलो. सकाळपासून जरासुद्धा उन फुकट घालवलेले नव्हते. वाटेवर एखादेही सावलीचे ठिकाण नव्हते. sack चे ओझे होतेच. पुढे समीर, प्रणव, मध्ये मी, आनंद आणि मागे सुबोघ, निखिल असे चालत होतो. सावली सापडल्यावर थांबू असे मनाशी ठरवत चाललो होतो. शेवटी निमगिरी डोंगरांच्या बेचक्यात सावली दिसली. उजवीकडे किल्ल्यावर जाणाऱ्या पायऱ्याही दिसल्या. १०-१५ मिनिटं सगळ्यांनी विश्रांती घेतली, Energel घालून पाणीही प्यायलो आणि परत सुरुवात केली. "पायऱ्या" हाच धोपटमार्ग असणार हा विचार पक्का असल्याने लगेचच उंच-उंच पायऱ्या चढायला सुरुवात केली. दमछाक करणाऱ्या पायऱ्या असल्या तरी अरुंद आणि धोकादायक नव्हत्या. एक भाग मात्र अवघड लागला, तो अवघड झाला होता तो पाय टिकू न देणाऱ्या सुक्या गवतामुळे आणि पाठीवरील sack मुळे. त्यात उंचीचा प्रश्न येत असल्याने मी मला सोयीस्कर वाट बघत होतो. त्यातच अडकलो आणि sack सह तो भाग पार करता येणार नाही अशी खात्री झाली. sack पुढे देऊन मी पलीकडे पोचलो. उतरताना कसरत होणार होती. पायऱ्यांचा टप्पा संपला आणि बाजूच्या निमगिरीच्या जुळ्या डोंगरावर जाण्याचा रस्ता नि पायऱ्या दिसल्या. तिकडे काहीच बघण्यासारखे नसल्याने जाणारच नव्हतो परंतु ज्या बेचक्यात सावलीसाठी बसलो होतो तिथून वर येणारी पायवाट दिसली. पायऱ्यांच्या पहिल्या टप्प्यापेक्षा बरी दिसत्ये असा विचार करून उतरतानासाठी तीच निश्चित केली. पायऱ्यांचा दुसरा टप्पा पार करून वर पोचलो.
क्रमशः

1 comment:

  1. नक्की किती "अंश" हे मोजत बसण्यापेक्ष्या जर सगळ्या गोष्टींकडे नीट लक्ष्य दिल असत तर कदाचित कॅमेराच्या बाबतीत असं झालं नसतं !

    ReplyDelete