Thursday, December 27, 2012

हडसर (पर्वतगड) -निमगिरी-चावंड (प्रसन्नगड) II

        सह्याद्रीला औरंगजेब का घाबरत होता त्याचे उदाहरण सह्याद्री देत होता. गडाच्या पाठीमागे असलेला परिसर चारही बाजूनी डोंगरांनी घेरलेला होता. ज्याच्या ताब्यात किल्ले, महाराष्ट्र त्याचा हे काही चुकीचे नव्हते. कोणत्याही गडावर पोचलो कि महाराज, त्यांचे जीवाला जीव देणारा मावळे, हेर यांच्याबरोबर गडांची ठिकाणे ठरवणारे, हेरणारे पथक यांची आठवण निघतेच निघते. कौतुक करायला शब्द पुरत नाहीत.
        गडावर तर पोचलो होतो. आता काम बाकी होते ते मुक्कामाची, जेवणाची सोय करण्याजोगे ठिकाण शोधण्याचे. गडावर बुरुज, बालेकिल्ला, माची, सदर, अंबरखाना, दारूगोळा-कोठार काहीही नाहीये. पण ३ गुहा आहेत. अगदी ५०० sq. ft. च्या 1RKआहेत. ;) पैकी २ गुहात पाणी साचलेले, अपुरी जागा, थोडक्यात राहण्यास अयोग्य. अर्थात तिसऱ्या गुहेतही फारशी चांगली परिस्तिथी नव्हती पण राहण्यासारखी जागा वाटत होती. त्यात प्रकाश मारण्यावर एक बादली दिसली. Hall मध्ये गुरे राहून गेल्याचे अवशेषही होते. कदाचित कुणी गुराखी दावणीला गुरे बांधून इथे ठेवत असावा, तशी सोय दिसत होती. संपूर्ण गडाला प्रदक्षिणा मारून झाली. पाण्याची ४-५ टाकी दिसली. २ टाक्यातले पाणी शुद्ध करून पिण्यायोग्य होते. शेकोटी आणि चुलीसाठी मुबलक जळण होते. गडावर Open-ceiling देवळाशेजारी सुबोध आणि माष्टर शेफ समीर चूल मांडत होते. गुहेमध्ये शिरून मी पाण्याची बादली हस्तगत केलीच होती, तिथे कुण्या परोपकारी ट्रेकर/गावकऱ्याने ठेवलेली काडेपेटी  अन् रॉकेलसहित "भुत्या" (बाटलीत रॉकेल आणि तयार केलेली चिंध्यांची वात घालून केलेला दिवा), केरसुणी या वस्तू ठेवल्या होत्या. त्यांचा मान राखून त्या वस्तू वापरासाठी घेतल्या. रॉकेल आम्हीही आणले होते पण हि रेडीमेड वस्तू नक्कीच उपयोगाला येणार होती. सुबोध आणि माष्टर शेफनी चूल पेटवून चहासाठी आधणही ठेवले होते. सुबोधनी त्याच्यासाठी दूध घेतल्यावर आम्ही चहारूपी अमृत प्यायलो. अंधार पडत चालला होता. सुंदर चांदणे पडले होते. पोर्णिमा होऊन तीनच दिवस झाल्याने चांदोबाची वाट बघत होतो. आमच्या कुकनी पेशल टोमॅटो सूप बनवले. गरम-गरम सूप पोटात गेल्यावर शेफनी खिचडीही केली. एकदम मस्त. मग अर्थातच गप्पा. एव्हाना चांदोबांनीही आम्हाला पहिले होते. शेकोटी साठी आधीच हेरून ठेवलेली लाकडं गोळा केली. अपेक्षेपेक्षा थंडी कमी जाणवत होती, पण तरीही तारांगणाखाली किल्ल्यावर, चंद्रप्रकाशात शेकोटीची मजा काही औरच! शिवाय गुहेत जागा मिळाली नसल्याने बाहेरच झोपत होतो. आम्ही अतिक्रमण केले असे वाटून एखाद्या स्थानिक श्वापदाला राग येऊन आमची विचारपूस करण्यास ते येऊ नये यासाठीही शेकोटी उपयोगी पडणार होती.


        झोपायला ११ वाजलेच पण सुंदर झोप लागली. सगळेच दमले होते त्यामुळे काही permanent भोंग्यांबरोबरच बाकीचे temporary भोंगेही चालू होते.
        शेकोटी विझली होती. कोणत्याही प्रकारच्या श्वापदाने आमची चौकशी करण्याचा त्रास घेतला नव्हता थंडीत रविवारी सकाळी १० च्या आधी पांघरुणातून तोंडही बाहेर काढायचे कष्ट न घेणारेसुद्धा अशा वातावरणात लवकर उठतात. आम्ही ६लाच उठून बसलो होतो. सूर्यनारायणाच्या आधी उठून त्याचेच स्वागत करण्याचा योग फार कमी वेळा येत असतो. ;) सगळ्यांनी आपापली तोंडं घुसळून घेतली. उगवत्या सूर्यनारायणाच्या साक्षीने विधी आटपून घेतले. चूल पेटवली, चहा!! सूर्योदयाच्या वेळी चुलीवर केलेला चहा. मस्तच... समीर, सुबोध, प्रणव, निखिल ने गरम-गरम मॅगी , मी आणि आनंदने उपासाकारणे बटाट्याचा चिवडा नि केळ्याचे वेफर्स...
        अंघोळीची गोळी घेतली. बाटल्या भरून घेतल्या, क्लोरिनचे २-२ थेंब जलशुद्धीप्रीत्यर्थं त्यात टाकले. केरसुणी, भूत्या, बादली ई. साहित्य देवळात नीट आडोशाला ठेवले. महाराजांचा जयजयकार करून "निमगिरी" उतरायला लागलो.
        पायऱ्यांचा पहिला टप्पा झाला. आलेल्या रस्त्याने उतरणार नव्हतोच, पायऱ्या-मार्ग सोडून दिला आणि दोन डोंगरांच्या मधल्या बेचक्यातून उतरायला लागलो. समीर-प्रणव पुढे, मी-आनंद मधे आणि सुबोघ-निखिल मागे. उन फुकट घालवायचेच नाही असे ठरवलेले असल्यासारखे पूर्णपणे सावली-विरहित वाटेवरून उतरत होतो. पुढच्या आणि मागच्या दोन्ही जोडगोळ्यांचा मेळ राखत पुढे जात होतो. अचानक दगड पडत असल्याचा आवाज आला. आमच्या वाटेवरच वरून कड्याचे दगड पडत होते. समीर-प्रणव पुढे होते, त्यांच्या आणि आमच्यामधून उन्हाने तापून तडकलेले दगडाचे तुकडे धडधडत खाली निघून गेले. त्याबाजूला लक्ष ठेवत पटापट पावले पुढे टाकत होतो. मधेच मागच्या जोडगोळीला direction देत होतो. अखेर गाड्या लावलेल्या देवळाशी पोचलो. Energelयुक्त पाण्याची अख्खी बाटली सगळ्यांनी मिळून घशाखाली उतरवली. गाड्या चालू करणार तोच माझ्या गाडीची डिकी उघडी असल्याचे लक्षात आले. कुलूप तोडलेले होते. गाडीचे कागद सोडून toolkit वगैरे गायब होते. गाडीचे कागद आणि पेट्रोल शिल्लक होते हे उपकार समजून घेऊन "चावंड" च्या दिशेने निघालो.
        वाटेत "नाणेघाट" आम्हाला खुणावत होता पण तो करून मग चावंडसाठी वेळ पुरणार नव्हता. चावंडची दिशा पकडली. तलावाला वळसा घालून ३० एक किमीच्या खराब रस्त्यानंतर चावंड दिसला. एका घराजवळ गाड्या लावल्या. गावातल्याच एका घरात बॅगा सुपूर्द करून पाण्याच्या २-३ बाटल्या बरोबर ठेवून ११:५५ च्या मुहूर्तावर चावंड चढायला प्रारंभ केला. मुबलक उपलब्ध असलेल्या उन्हाचा उपभोग घेतच होतो. वर पाणी आहे कि नाही याची कल्पना नसल्याने पाणी जपून वापरत होतो. 

        जवळ-जवळ ३०-४० मिनिटांनी सावली मिळाली. दगडातल्या अत्यंत अरुंद, एक-एक पाउल मावेल अश्या पायऱ्या, त्याशेजारी ग्रील म्हणून लावलेले आणि आता मोडून पडलेले लोखंडाचे तुकडे दिसले. पायऱ्यांना लागून कातळावर मजबूत लोखंडाची तार बांधलेली होती. तारेला धरून त्या पायऱ्यांनी वर निघालो. ""जंबुरका " जातीची एक तोफ वरती पुरून ठेवलेली आहे, ती सापडली (जातीपातीतून तोफेचीही सुटका नाही तर!!!) पायऱ्या रुंद होत गेल्या. शेवटी-शेवटी तर ८-१० फूट आडव्या पायऱ्या होत्या. वर पोचताच दगडात कोरलेल्या गणरायाने आमचे स्वागत केले. २ किल्ल्यानंतर ह्यावर प्रथम गडाचा दरवाजा दिसला. जरावेळ सावलीत बसल्यावर फ्रेश वाटले. समीर-प्रणव पुढे गेलेच होते. मी आणि आनंदने स्पीड वाढवला, वर जाणाऱ्या मंदिराच्या पायवाटेने निघालो. मंदिरात पोचलो. देवाची ख्याली-खुशाली विचारून घेतली. आनंद-निखिल-सुबोध मागे होते. मी प्रणव-समीर ला शोधून काढले. आम्ही तिघे मिळून "सात टाकी सांगा कुणी पहिली..." करत हिंडू लागलो. ह्या गडावर ७ टाकी आहेत असे गावकऱ्यांनी सांगितले होते.
        शनिवार-रविवार २ दिवस सुट्टी मिळत असताना घरी तंगड्या वर करून पिक्चर बघत लोळत पडायचे सोडून मी, समीर आणि प्रणव खांद्यापर्यंत वाढलेल्या गवतातून हे नसते धंदे करत हिंडत होतो. असते एकेकाला हौस (कि खाज?)...
        वेळेचे महत्व लक्षात घेऊन दरवाजाकडे परत फिरलो, सगळे वाटच बघत होते. आम्ही उगाचच वर काहीतरी लय भारी बघितलं आणि ह्यांनी ते miss केलं असं भासवायचा प्रयत्न करून बघितला.
        पुनःश्च गणरायाला नमस्कार करून त्याचा निरोप घेतला आणि पायऱ्या उतरायला सुरुवात केली. आळीपाळीने फोटो काढून घेतले. चढायला लागलेल्या पेक्षा निम्म्या वेळात खाली आलो सुद्धा. बॅगा ठेवलेल्या घरातल्या काकांना चिवड्याची पुडी देऊन थोडं ओझं कमी केलं आणि समाधान मिळवलं. जवळच बोरिंग होतं त्याखाली डोकं घातलं. ते थंड झाल्यावर बाटल्या भरून घेतल्या, पाणी प्यायले आणि जुन्नरच्या दिशेने रवाना झालो. वाटेत थांबण्याचे कारणच नव्हते. जुन्नरच्या हॉटेलात थांबलो. त्यापुढचा stop direct पुरोहित मधे चहासाठी. नंतर थेट पुणे.
        किल्ले मुळातच आडवळणाचे not well-known, non-popular वगैरे निवडलेले होते. समीरमुळे आधीच well-planned असलेला ट्रेक सगळ्यांच्या साथीने सुंदर झाला. सिमेंटच्या जंगलापासून दूऽऽऽर चांदण्यांच्या छपराखाली शांत वातावरणात एक रात्र किल्ल्यावर अनुभवायला मिळाली. प्रत्येक ट्रेक मधे खूप काही शिकायला मिळते, ज्ञानात भर पडते, चुका समजतात. त्या होऊ नयेत यासाठी काय काळजी घ्यावी हेही समजते. "पन्हाळगड ते विशाळगड" सारख्या ट्रेक मधून आपण कुठे आहोत हे लक्षात येते. सोमवार ते शुक्रवार सरकत्या खुर्चीत, एसी मधे बसल्यानंतर अश्या ट्रेकमुळे आपली जागा कळते. प्रत्येक ट्रेक मधे महाराज, मावळे, इतिहास डोळ्यासमोर येतो. कधी उंच-उंच कडे, खडे कातळ तर कधी छोटासाच पण दुर्गम किल्ला.. हा सह्याद्री, आपल्याला आपल्या खुजेपणाची जाणीव करून देतो आणि इतिहासासमोर, महाराजांसमोर, मावळ्यांसमोर आपणहूनच आपण नतमस्तक होतो.....

No comments:

Post a Comment