Wednesday, August 31, 2016

किल्ले सोनगिरी आणि सोंडाई - II

४ वाजले होते, सोंडेवाडी गवत पोचलो. सोनगिरी उतरण्यातच सगळा वेळ निघून गेला होता त्यामुळे अंधार पडायला थोडाच वेळ शिल्लक होता. तसाही सकाळपासून सूर्य दिसलाच नव्हता. सोंडाई खूप लहान असल्याने तासाभरात वर पोचणे अपेक्षित होते. पण आता वाट चुकणे परवडणारे नव्हते. माहिती वाचलेली असली तरी रिस्क नको म्हणून वाटाड्या घ्यावे असे सर्वांच्याच मनात होते. त्यातून सोंडेवाडीत एकूणच कोणी वाट सांगेल असे वाटत नव्हते. कारण वाटाड्या पाहिजे का असे विचारत एक म्हतारबुआ आले. दारूचा वास येतंच होता. त्यांचा मुलगाही तेच विचारत आला, दारूचा भपकारा घेऊनच. त्याचा १०-१२ वर्षाच्या मुलाच्या चेहऱ्यावरही तोच प्रश्न दिसत होता, मात्र त्याने प्यायलेली दिसत नव्हती एवढंच.. तेवढ्यात एक गृप गडावरून खाली येताना दिसला, तेही सगळे भिजले होते. त्यांच्यातल्या मुलींना कपडे बदलायला जागा देण्याचेही ते म्हातारा आणि मुलगा पैसे मागत होते. एकंदरीतच गावकरी पैसे काढू दिसत होते. गाडीवर लक्ष ठेवण्याचेही ते पैसे मागू लागले. त्या गृपने वर वाट चुकण्याची जराशी शक्यता असल्याचे संगीतलनी. सव्वा चार झालेच होते. नाईलाज होता, वाटाड्या म्हणून त्या माणसाला बरोबर घ्यावे लागले. त्याचा १०-१२ वर्षाचा पोरगाही बरोबर आला.
कातळात खोदलेली २ पाण्याची जोडटाकं

गावातून जी धोपटवाट गडाकडे जाण्यासाठी निघते, ती वाट तशीच पुढे चांगेवाडीला जाते. तिथे एका ठिकाणी गडाकडे जाण्यासाठी उजवीकडे वळावे लागते... चुकण्याची ही पहिली आणि सुरुवात केल्यापासून ५ मिनिटावरची जागा. तिथून उजवीकडे वळल्यावर १० मिनिटांत समोर, उजवी आणि डावीकडे परत वाटा लागतात. धोपट वाट सरळ जाते, पण गडाकडे जाण्यासाठी डावीकडे वळावे. तिथे एका झाडावर तसा बोर्डही आहे. ही चुकण्याची दुसरी जागा. गावापासून जेमतेम १० मिनिटात ह्या दोन्ही जागांवर न चुकता गडाकडे लागले की पुढे मात्र चुकण्यासारख्या जागा नाहीत. वाट रुळलेली आहे. गावाची सोंडाई देवीच गडावर असल्याने गावकरी नेमाने जात असावेत. दसऱ्याच्या दरम्याने उत्सवही असतो वरती. वर एक पठार लागले जिथे वावर्ली गावातून येणारा रस्ता मिळतो. इथून वर जाणाऱ्या पायऱ्या दुसऱ्या पठाराकडे घेऊन जातात. इथे कातळात खोदलेली २ पाण्याची जोडटाकं आहेत. शेजारूनच वर जाणाऱ्या पायऱ्याही लागल्या. त्या चढून गेल्यावर रॉकपॅच आहे. त्यात चढण्यासाठी व्यवस्थित खोबणी आहेत, त्याला शेंदुरही लागलेला आहे. इथून पुढे चप्पल/बूट काढून पुढे जावे, गावकऱ्यांची तशी श्रद्धा आहे. दारू डोक्यात असूनही त्याने ते न विसरता सांगितलेन. तो पॅच चढून गेल्यावर डाव्या बाजूस एक सुकलेल टाक आहेतर उजव्या बाजूला गड माथ्यावर जाण्यासाठी लोखंडी शिडी आहे. पूर्वी हाही रॉकपॅच चढून जावे लागत असे परंतु नंतर तो ढासळला आणि शिडी इथे बसवली गेली. शिडी चढल्यावर उजव्या बाजूला पाण्याचं टाकं आहे, त्यात कोरलेले २ दगडी खांबही आहेत. ह्या सगळ्या टप्प्यात आमचे काही गडी सावकाशपणे आले, उंचीचीही भीती होती आणि थोडे नाही म्हटलं तरी थकलेलेही होतोच. पण सुरक्षा महत्वाची होती.

रॉकपॅच


लोखंडी शिडी

पाण्याच्या टाक्यावरून पुढे चढून आले की लगेच सोंडाई देवीच्या मूर्ती आहेत. घंटा, समई वगैरेही आहेच. गडमाथा आला होता. बाकी ह्याही गडावर काही नाही. पलीकडे एक दरवाजा आहे पण पावसाळ्यात तिथे जाता येणार नव्हते. प्रयत्न करून पहावा तर तसेही पायात चपला/बूट काहीही नव्हते म्हणून परत फिरलो. देवीला नमस्कार करून दारू पिऊन इथे कोणी येणे चांगले नाहीहे आडून सुचवल्यावर आमची देवी चांगली आहे, पिऊन आलेले चालतेहे उत्तर आले :D मुकाट्याने शिडी, रॉकपॅच परत सावधपणे, इथे पाय ठेव, तिकडे जोर देऊ नको वगैरे करत उतरलो. बुटातले पाणी काढून टाकले, मोजेही पिळून घेतले, ते पायांत सरकवून उतरणीला लागलो. लहान धबधबे आमचे पाय धूत होते. वाट सोपी होती. खुणा लक्षात ठेवत पायथ्याशी आलो. संजुभाई गाडीजवळच थांबले होते. आम्हाला बघून त्यांना हायसं वाटलं कारण म्हातारा-म्हातारीने त्यांना चांगलंच सतावलं होतं. गाडीकडे लक्ष ठेवण्याचे पैसे मागत वर गाडी फोडण्याचीही भाषा त्यांच्या तोंडी होती. संजूभाईचे आकारमान बघता प्रत्यक्षात ते शक्य झाले नसते पण तरीही ही भाषा तोंडी असणे चांगले हिमतीचे होते, कदाचित दारू ती हिम्मत देत असावी. पैशासाठी गावकरी किती सरावलेले आहेत हे दिसत होते. कदाचित सगळे तसे नसतीलही पण ह्या कुटुंबाला आवरायला मात्र कोणीच येत नव्हते. त्यामुळे गावच बदनाम झाले. ह्या किल्ल्यावर वाटाड्याची काहीच गरज नाही पण पहिल्या २ चुका होण्याच्या जागा लक्षात ठेवाव्यात.

संध्याकाळी ७ वाजता दुपाराजे जेवण हाणताना

दुपारचे जेवण-खाण काहीच झाले नव्हते. उडूप्याच्या इडल्यांवरच तग धरून होतो आणि खाकरा. गावातून लवकर सटकायचं होतं. ओलेतेच गाडीत बसलो. वाटेत मोरबे धरणाचा जलाशय लागतो त्या ठिकाणी गाडी थांबली. पोळ्या, ठेचा, सॉस, पराठा, चटणी सगळे बाहेर आले. गाडीच्या बॉनेटवरच त्याचा सगळ्यांनी अक्षरशः फडशा पडला. सॉस, चटणी चाटून पुसून साफ! सुकामेवाही उडवला. फक्त चहासाठी ब्रेक घ्यायचा ठरवून गाडी दामटली. चौकला जाऊन हायवेला जाणे बरे पडले असते असे वाटायला लागले कारण हालगावाकडून खोपोलीकडे जाणारा हा रस्ता खरोखरच हालहाल करणारा होता. सफारी होती म्हणून तग धरला, लहान-सहान गाड्यांचे ते काम नव्हतेच. सरळ घाटात येऊन चहा-वडापावच्या गाडीजवळ येऊन थांबलो. तो बंदच करत होता पण सुदैवाने आमची तहान भागवण्यापुरता थांबला. मग मात्र सुसाट लागलो. (पुणे-मुंबई एक्सप्रेस वे वर हल्ली ६० चा वेगही सुसाटच म्हणावा लागतो.) आकुर्डीत भाईंच्या घरी चहा झाला आणि आशिष कडे पोचलो. माझी सुझुकी वाटच बघत होती, तिच्या बरोबर घरी परत आलो तेव्हा साडे अकरा वाजून गेले होते.
जवळ जवळ १४-१५ तास वागवत असलेले ओले चिंब कपडे बदलले आणि मस्त पांघरुणात शिरलो. एक आठवडा कसाबसा ढकलायचा आणि पुढच्या विकेंडला रत्नागिरीला माझ्या घरी गणपती माझी वाट बघतोय ह्या विचारानेच पटकन झोप लागली!!!

No comments:

Post a Comment