Wednesday, March 14, 2018

रसाळगड, सुमारगड आणि महिपतगड - I


सुमारगड

काही गडांची नावं कायम एकत्रच घेतली जातात. अलंग-मदन-कुलंग, साल्हेर-सालोटा, मुल्हेर-मोरा तसंच हेही, रसाळ-सुमार-महिपतगड. हे नाव ऐकून एखाद दोन वर्ष झाली असतील तेव्हा जमले नाही, तेव्हापासून योगही आला नव्हता. गेल्या महिन्यात एका भटक्यांच्या भेटीत तिथे जायचं वगैरे बोलणही झालं होतं पण तसं काही नियोजन झाले नाही. कर्मधर्मसंयोगाने एका व्हाट्सअप ग्रुप वर 1 pdf  मिळाली. “Pune Venturers” नावाच्या ग्रुपचा प्लॅन  होता 10-11 मार्चला. आता दोन गोष्टी समोर आल्या. एक तर त्यात कोणीच ओळखीचे नव्हते, माझ्यासाठी पूर्ण ग्रुपच नवीन होता आणि दुसरे म्हणजे घरून परवानगी. एक तर हा ट्रेक करायचाच होता. त्यामुळे ओळखी-अनोळखी हा प्रश्न निकालात निघाला. पण महत्त्वाचं होतं घरून परवानगी. ती पण नशिबाने मिळाली. लगेचच confirmation कळवले. शेवटची एकच सीट शिल्लक होती माझ्या नशिबाने. होळीला मला घरी जायचे असल्याने आगाऊ रक्कमही त्यांना देणं शक्य नव्हतं. Online transfer option  त्यांच्याकडे नव्हता, पण त्यांनी विश्वासावर माझी जागा नक्की करून ठेवलंनी. दोन दिवस पाठीवरच वागवावं लागणार या हिशोबाने सामान बांधले. शुक्रवारी रात्री सव्वानऊला सारसबाग जवळून गाडीत बसलो. गाडीत माझ्याबरोबर अजून दोन-चार जण होते, अजून तरी  मी कोणालाच ओळखत नव्हतो. सगळे माझ्यापेक्षा बर्‍यापैकी मोठे लोक होते, वयाने आणि अनुभवाने पण. मग एकमेकांना गोळा करत गाडी university road, चिंचवड असं करत हिंजवडीतून ताम्हिणीला लागली. झोपेचा लपंडाव चालू होता. माणगांव-महाड-पोलादपूर सोडून कशेडी घाट उतरला आणि खेडला आलो. रत्नागिरी जिल्ह्यात यायला मिळण्याचा हा सलग दुसरा विकांत. पूर्ण काळोखी रात्र असल्याने रस्ता फारच भयाण वाटत होता त्यात डांबरी रस्ता संपला आणि कच्चा मातीचा रस्ता चालू झाला. डोंगर पोखरूनच ह्या नवीन रस्त्याचे काम चालू असल्याने खाली फक्त लाल माती. एका बाजूला कडा, तर दुसऱ्या बाजूला दरी. रस्त्याला पाट्या नाहीतच. बाजूला पट्ट्या मारलेल्या नाहीत. कडेला गेले तर गच्छंतीच. मस्त घाट बांधून काढत होते. कच्चा रस्ता सुरु व्हायच्या आधी पाट्या लागल्या होत्या, त्यातून रस्त्याला फाटा असा नव्हताच त्यामुळे हा रस्ता सरळ नक्कीच वाडी-बेलदार या गावात जातो हे खात्रीशीर होते. फक्त रस्ता जाण्यायोग्य वाटत नव्हता. आमच्या ग्रुपमधले एक-दोन जण त्यांच्या खाजगी नॅनो गाडीने रात्रीच तिथे पोहोचले असल्याने गाडी तिथपर्यंत जाते हे माहिती होते. किंबहुना त्या भरवशावरच निघालो होतो. वाटेत बोर्ड नव्हतेच आणि मध्यरात्र उलटून गेलेली असल्यामुळे माणसेही दिसत नव्हती (तशीही इथे दिवसाही दिसण्याची शक्यता कमीच!) कोणाला विचारण्याचा प्रश्नच नव्हता. मोबाईलवरचा google map आणि काल गेलेली नॅनो गाडी यांच्या भरवशावर चाललो होतो. काही किलोमीटर झाले असतील आणि शंका यायला लागली. एक तर त्या रस्त्याने नॅनो गाडी वर चढू शकेल अशी शक्यता वाटत नव्हती. ड्रायव्हरही मनातून थोडा घाबरलेला समजत होता. पूर्ण यू-टर्न असणारी वळणं, मध्येच खडा चढाव, दरी अशातून ते गाव सापडत नव्हतं. एक तर गाडी वळवायला जागाही दिसत नव्हती. आमची १७ सीटर बर्‍यापैकी मोठी बस असल्यामुळे तिला जागाही जास्ती लागणार होती. अखेरीस एका ठिकाणी गाडी उभी असलेली दिसली, नॅनो नव्हती ही. पण रस्ता संपला होता. पुढे सरळ शेतच होतं.

वाडी-बेलदारला येणारा वळणावळणाचा कच्चा रस्ता

गाईड सीताराम जाधव

आम्ही चार जण उतरलो आणि शेजारी असलेल्या घरात गेलो. तिथे गेल्यावर आमचे आधीचे आलेले दोन जण ओसरीवर झोपलेले दिसले. जीवात जीव आला. तिथे सीताराम जाधव भेटणार होते. शेजारच्या घरातून एक व्यक्ती आली आणि आम्ही सगळ्यांनी मिळून सीताराम जाधवना उठवलं. आता सगळे लोकं आपले सामान घेऊन त्या अंगणात येऊन बसले. झोपण्याला काही अर्थच नव्हता. सरळ आवरायला घेतलं. तोंड धुतलं. ग्रुपच्या लीडर लोकांनी घरातून आणलेला शिधा घेऊन उपमा करण्यास सुरुवात केली. आम्ही आपापली सकाळची कामे आटपून त्यांच्या मदतीला गेलो. चुलीवरच चहा ठेवला गेला. सगळ्यांनी चहा घेतला आणि साडेसहा वाजता सुमारगडाकडे वाटचाल चालू केली. तोपर्यंत माहितीच नव्हते की नक्की पहिल्यांदी कुठे जायचे आहे. शक्यतो हा ट्रेक  रसाळगडला सुरु करुन सुमार वरून महिपतगडला संपवतात. परंतु आमच्या ग्रुपचा प्लॅन वेगळा होता. आम्ही 18 जण होतो, त्यातले तीन जण पंचाहत्तरीच्या आसपासचे. पाच-सहा जण साठ-पासष्ठच्या दरम्यानचे आणि बरेचसे ३०-४० च्या दरम्यानचे होते. एकच मुलगी होती, ती चौदा वर्षाची. त्यामुळे प्लॅन थोडा वेगळा होता. सोबतीला सीताराम जाधव आमचे गाईड म्हणून असल्याने वाट शोधावी लागणार नव्हती. त्यांच्या घरातून निघून शेतं ओलांडल्यावर एक पठार लागले. डाव्या बाजूला लांबवर वाडी-बेलदार दिसत होते तर उजव्या बाजूला काल रात्री आम्ही चढून आलेला घाट. वाडी-जैतापूर हे गावही दिसत होते. वाडी-बेलदार गावातल्या लोकांना काहीही आणायचे असेल तर ह्या जैतापुरात चालत जावे लागते, अगदी बस मिळवण्यासाठी सुद्धा. त्या पठारावरून चालत गेल्यावर आम्ही जंगलात घुसलो. काही थोडक्या खुणा लक्षात ठेवत पुढे निघालो, वाटेत एका धनगराचे झाप लागले. पुढे परत जंगलच. अर्थात आम्ही काही विचार न करता फक्त चालत होतो, वाट सीताराम जाधव दाखवत होते. सगळे बरोबर आहेत ना याची खात्री मध्ये मध्ये केली जात होती. साठ-पासष्टीच्या पुढचे तरुणसुद्धा जोमाने चालत होते. आता एक यु-टर्न लागला जिथे रसाळगडकडून येणारी वाट मिळत होती. गुरांना जाण्यास प्रतिबंध म्हणून वाटेत काठ्या टाकून ठेवलेल्या आहेत. ही वाट उजवीकडे रसाळगडाकडे जाते, तर डावीकडे सुमारगडाकडे. आम्ही डावीकडून वरच्या बाजूला सुमारगडाकडे चाललो. वाडी बेलदार मधून इथे यायला आम्हाला साधारण तासभर पुरला होता. आता खडा चढ चालू झाला होता. परत गुरांनी जाऊ नये यासाठी बेडं टाकलेलं दिसलं. ते ओलांडून पुढे गेलो आणि मग वळसा घेत गेलेल्या वाटेवरून सुमारगडाचे सुंदर दर्शन झाले. या जंगलात बरेचसे वन्यप्राणी आहेत त्यात बिबट्याही आहे. थोड्याच अंतरावर आम्हाला बिबट्याच्या पायाचे ठसे त्याची खात्री देऊन गेले. आमच्याबरोबर सिताराम जाधव असल्यामुळेच अर्थात ते कळले होते, नाही तर त्यावर पाय देऊन आम्ही पुढे गेलो असतो. लाल मातीत ते ठळक ठसे छान नक्षी उमटवून होते. एक छोटासा रॉक पॅच लागला. मागच्या बाजूला दृश्य फारच छान होते.

बिबट्याच्या पायाचे ठसे

समोर वाट संपली असे वाटणारा एक काळा-कभिन्न कातळकडा आला. इथे क्षणभर विश्रांती घेतल्यावर त्याच्या डावीकडून वळसा मारुन पुढे निघालो. आता धोकादायक वाट चालू झाली. एक भुयार लागले त्यात बराच कचरा होता. आतमध्ये जाण्यास काही वाव नव्हता पण ते भुयार आपण गडावर आलो आहोत अशी निशाणी ठेवून गेले. डावीकडे दरीच तर उजवीकडे कडा धरूनच पुढे पुढे जात राहायचे. वाटेत एका धोकादायक ठिकाणी एक मजबूत झाड चांगला आधार देऊन जाते किंबहुना त्या झाडामुळेच पुढे सहज जाता येते नाहीतर कदाचित दोऱ्या बांधाव्या लागल्या असत्या. आमच्याकडे दोऱ्या होत्याच गरजेला. ही वाट अतिशय खडतर आहे. पुढे उजव्या बाजूला कातळात अजून एक भुयार दिसले. हे भुयार म्हणजे पाण्याच्या टाकीकडे जाणारा रस्ता होता कारण आतमध्ये पाणी होतेच. घाणही बरीच होती. ती आत मध्ये राहणाऱ्या वटवाघळांनी केलेली होती. आत वटवाघळं उलटी लटकलेली दिसत होती. पुढे निघालो आणि एक कठीण अशी जागा आली. जिथे अतिशय लहान जागा होती पुढे सरकण्यासाठी. दगडाकडे तोंड करूनच अशा वाटेवरुन पुढे जायचे असते, दरीकडे कधीही तोंड करू नये. आपले वजन दगडाकडे झुकवून सरकत-सरकत पुढे जायचे. मी बारीक असल्याने मला ते सोपे गेले. काहीजणांना थोडी कसरत करावी लागली. पुढे जाऊन मग बाकीच्यांना आधार देत पुढे येण्यास मदत केली. ह्या भानगडीत मी सगळ्यात शेवटी राहिलो होतो माझ्याबरोबर राहुल होता. आता उजवीकडे आणखीन एक भुयार दिसले. हे कोरडे होते. पुन्हा मी बारीक असल्याचा फायदा घेऊन आत मध्ये घुसलो. पुढे “L” शेपमध्ये भुयार उजवीकडे वळत होते. उजवीकडे वळल्यावर मात्र पुढे पाणी दिसले, तिथे जाणे धोक्याचे होते आणि काही विशेषही बघण्यासारखे नव्हते. मागे फिरलो आणि रांगत-रांगत परत भुयाराच्या बाहेर आलो.

धोकादायक वाट

तोपर्यंत सगळी मंडळी पुढे जाऊन वरती उजवीकडे वळण घेऊन जवळजवळच गडावर पोचत होती. इथे एक प्रचंड कठीण असा रॉक पॅच आहे. पण आता एका लोखंडी शिडी लाऊन हा मार्ग सोपा केला आहे. शिडी फार पक्की नसली तरी आपले काम चोख करते. आमचे गाईड मात्र इथेच थांबले. कधीतरी ह्या शिडीवरून पडल्याने त्यांच्या मनात भीती बसली होती. इथपर्यंत खडतर वाटेवरून पायात नुसत्या स्लीपर घालून लीलया आलेले ते सोप्या शिडीला मात्र भ्यायले होते. ह्या शिडीवरून आम्ही वर आलो. पुढे वाट चिंचोळी असली तरी रेलिंग बांधलेले आहे. आता वरती डावीकडे कडा आणि उजवीकडे दरी अशी वाट आहे. खडकात सतीची शिळा ठेवली आहे. थोडं पुढे गेल्यावर अजून एक गुहा आहे, त्यात काही निरांजन वगैरे ठेवलेले दिसते पण आतमध्ये देव नाही. आता गडाची तटबंदी चालू झालेली होती.


सतीची शिळा आणि मी

गडावर पोचल्यावर वाट डावीकडे जाते तिथून सुरुवात करावी. सुरुवातीलाच समोरच दोन मोठ्या टाक्या दिसतात. टाक्यांच्या आधीच एक मंदिरासारखी रचना आहेत त्यात काही काही देव एकत्र करून ठेवलेले आहेत. तिथे शंकराची पिंड आहे, त्यातल्या साळुंका गायब आहेत. ह्या टाक्यांच्या डावीकडे गुहेत शंकराचे मंदिर आहे, त्यात अजूनही मूर्ती आहेत, बहुतेक भोलाईदेवीची मुर्तीही असावी. लगेचच पुढे टाक्यांच्या पलीकडे भुयारात दोन खांबी टाके आहे. हे पाणी पिण्यायोग्य अतिशय सुंदर आहे. पाणी पिऊन मागे असलेल्या गुहेत परत आलो. महाशिवरात्रीचा उत्सव होऊन गेल्यामुळे मंदिर सजवलेले होते. पिंडीच्या मागे काही आकृत्या रेखाटलेल्या आहेत. समया, घंटा, अभिषेकपात्रही आहे. पूजेचं सर्व साहीत्य आहे, तसंच कळशी, हंडा, ताट-वाट्या असे बरेच साहित्य आहे. डावीकडून पुढे गेल्यावर एक मंडपाचा सांगाडा उभारलेला आहे. हा उत्सवासाठी उभारलेला असावा. गडाच्या अवशेषांवरच हे बांधकाम आहे. अजून एक चौथरा इथे दिसतो. समोरच एक कोठार असावे, तेथेही भुयारात एक पाण्याचे टाके आहे. उजवीकडे वरच्या बाजूला एक चौथरा आणि त्यावर ध्वज दिसतो. आधी तिथे न जाता जवळचे अवशेष बघून घ्यावेत. याच परिसरात आणखी एक टाके आहे त्यातही पाणी पिणे योग्य दिसले. पालापाचोळा बऱ्यापैकी त्यात असला तरी पाणी स्वच्छ दिसत होते. डावीकडून आपली गडफेरी चालू ठेवावी. पुढे अजून एक चौथरा आहे त्याला वळसा मारल्यावर उजवीकडे पाण्याचे एक खांबी टाके आहे. पाणी पिण्यायोग्य वाटले नाही. वळसा मारून वर गेल्यावर गडाचे सर्वोच्च टोक लागते. अवशेष अजून काहीही नाहीत. इथून आपल्याला खालच्या बाजूला पाण्याची टाकी मंदिर वगैरे नजारा दिसतो. पलीकडे बघितल्यावर मधु-मकरंदगड दिसतात तसेच महिपतगड दिसतो.

सुमारगडावरची पाण्याची टाकी

आल्या वाटेने परत निघायचे आणि जीथं वर चढलो त्याच ठिकाणी अजून एक पाण्याचे टाके आहे तेही बघायचे. हे एक खांबी टाके आहे. त्याच्याच वरच्या बाजूला दोन तीन खोल्या आहेत, पण त्यात आज जाण्यासाठी मार्ग व्यवस्थित राहिलेला नाही. सगळे खाली उतरत असल्यामुळे मी पटकन त्यावर नजर टाकून परतीला लागलो. आल्या वाटेने गड उतरायला सुरुवात केली सगळ्यात पुढे नामजोशी काका होते मागे वळून बघितल्यावर सुमारगड छान दिसत होता. पुन्हा रसाळगडाची वाट लागली आणि तिकडे न जाता उजवीकडच्या वाटेने निघालो. आता ऊन वाढलं होतं. रस्ता चुकण्याची शक्यता वाटत नव्हती. आमचे गाईड जरी मागे असले तरी समोरची पायवाट धरून आम्ही उतरणीला लागलो. मध्ये खूप अंतर पडल्याचे लक्षात आलं आणि आम्ही वाट बघत थांबलो. सुमारे २-३ ठिकाणी मिळून अर्धा-पाऊण तास वाट बघितली. सगळे लोक परत आले. डावीकडे ती घाटवाट ठेवत उजवीकडे दिसत असलेल्या सीताराम जाधव यांच्या घरी परत आलो होतो. सगळेच थकले होते. सुमारे साडेअकरा वाजले होते. एक-एक करत सगळे परत आले.

No comments:

Post a Comment