Sunday, January 12, 2020

किल्ले चांदवड आणि मेसणा

राजधेर-कोळधेर बघून राजधेरवाडीतल्या त्या खोलीत फारच चांगली झोप लागली. ती अत्यंत गरजेची झोप झाल्यावर मात्र आदल्या दिवशी सारखा सुरुवातीला झालेला उशीर टाळून त्या दिवशी सुरुवात मात्र साडेसहाला केली. अजून तांबडं फुटलं नव्हतं, इतक्या लवकर सुरुवात करूनही आमच्या बरोबरच्या म्होरक्या मामांनी मात्र “थोडी लवकर सुरुवात केली असती तर कदाचित बिबट्या बघायला मिळाला असता” असं ऐकवलंनी. किमान मला तरी उलट ती वेळ टळून गेल्याचं बरंच वाटलं.
दिवसाची सुरुवात करून प्रथम दर्शन घेतलं इंद्राईचं! ज्याच्या नावातच साक्षात इंद्राचा उल्लेख आहे, असा विस्तारानेही प्रचंड किल्ला. ह्या किल्ल्यावर काय नाही? कातळकोरीव गुहा, पायऱ्या. नुसत्याच “कातळकोरीव पायऱ्या” म्हणणे म्हणजे त्या कारागिरांचा अपमानच ठरेल, अशी चक्क बाजूने २० फूट उंचीचा कातळ कोरून घडवलेल्या तो पायऱ्यांचा महामार्गच. शिलालेख, पाण्याची टाकी, तळघरे, नक्षीदार खांबांवर तोललेली सलग २० गुहा दालने, तलाव, शिवमंदिर... हुssश्श! असा अवशेष  समृद्ध किल्ला पाहिल्यावर वरून जे दृश्य दिसते त्याला तोड नाही. लांबवर दिसते चांदवड शहर, त्याच्या अलीकडे दिसतात ते तीन पूर्ण आणि एक अर्धवट कापलेला वाटणारा अर्धा, असे साडे तीन डोंगर, म्हणजेच साडेतीन रोडगा!
चांदवड आणि साडेतीन रोडगा नावांची व्युत्पत्ती मनोरंजक आहे, जी आधीपासूनच प्रसिद्ध असली तरी इथे उल्लेख केल्याशिवाय राहवत नाही. अगस्ति ऋषींच्या वास्तव्याने पावन झालेले हे चांदवड गाव. एकदा स्वतःसाठी भाजलेल्या चार रोडग्यांवर तूप घेण्यासाठी ते या गावात तूप मागत फिरले. तूप कोणीही न दिल्याने चार पैकी अर्धा रोडगा गाईला खायला घालून, उरलेले साडेतीन रोडगे त्यांनी फेकून दिलंनी आणि गावाला चांडाळनगरी असा शाप देऊन निघून गेले. ते साडेतीन रोडगे म्हणजेच साडेतीन रोडगा डोंगर आणि ते चांडाळ नगरी वरून अपभ्रंश होत झालेले चांदवड! याविषयी आणखी एक अख्यायिका म्हणजे इथे असलेल्या वडांच्या झाडाची ख्याती चंद्रापर्यंत पोचलेली आहे, असे चांदवड. चांडाळपूर, चंद्रपूर आणि चांदवड काही म्हणा, पण या गावचा आणि चंद्राचा काही संबंध आहे नक्की, कारण इथल्या डोंगरावर असलेले चंद्रेश्वराचे मंदिर.

चांदवड किल्ला तलावाजवळून
इंद्राई वरून चांदवडकडे निघालो तेव्हा आकर्षण होते ते चांदवड वरच्या कातळटप्पा म्हणजे Rock Patchचे. राजधेर प्रमाणे इथेही शिडी आहे, पण ती अपुरी आहे. एकूण ४० पैकी शेवटचा २५ फूट कडा मात्र क्लाइंबिंग करून चढावा लागतो, पण हे राहिलं पुढचं. चांदवडला डोंगरावर जिथे चंद्रेश्वराचे मंदिर आहे तो पठाराचा सगळा भाग ही चांदवडच्या किल्ल्याची माची. या माचीवर जायला आता चंद्रेश्वर मंदिरापर्यंत सरळ गाड्यांसाठी डांबरी रस्ता आहे. याच रस्त्याने आम्ही वाटेत असणाऱ्या तलावापर्यंत गेलो. तलावाजवळ गाडी लावली आणि चांदवडच्या त्या कातळकड्याकडे पाहिले.
आपण उभे असलेले पठार, पुढे थोडासा चढ, मग परत बहुतेक सपाटी, परत थोडा चढ सरळ कातळाला जाउन भिडलेला आणि पुढे अभेद्य काळाकभिन्न कडा. दुपारचा बरोबर एक वाजला होता, सूर्य डोक्यावर होता. सरळ चढायला सुरुवात केली. एका दमात सगळे चढ चढून वरच्या छोट्या पठारावर वीस मिनिटात पोचलो.
  
टांकसाळ आणि मागे चांदवड किल्ला
समोरच एक मोठा वाड्याचा भक्कम चौथरा, खुपशा ढासळलेल्या पण त्यातही काही तग धरून असलेल्या भिंती, त्यातच मजबूत बांधणीची दरवाजाची कमान असे एका मोठ्या इमारतीचे अवशेष दिसतात. हीच ती चांदवडची प्रसिद्ध टांकसाळ! खूपशा किल्ल्यांवर गुप्तधनाच्या आशेने लोकांनी प्रचंड खोदाखोद करून ठेवलेली आहेच, ही इमारत म्हणजे तर चक्क टांकसाळ. साक्षात नाणी पाडण्याचा कारखानाच! इथे तर खोदकाम म्हणजे विचारता सोय नाही, जागोजागी खोदकाम...  चक्क भुयारं वाटावीत एवढाले मोठे खड्डे करून ठेवलंनी आहेत. जमीन तर सोडाच, भिंतीही उकरून ठेवलंनी आहेत.
ही टांकसाळ इसवी सन १७७२ मध्ये थोरल्या माधवराव पेशवे यांच्या आज्ञेने तुकोजी होळकर यांच्या कारकीर्दीत सुरू करण्यात आली. त्यात शुद्ध चांदीचा “चांदोरी” रुपया पाडला जात असे त्याला “चांदवडी तुर्रा” म्हटले जाते. हा रुपया अगदी पेशवाई नंतरच्या कालखंडातही वापरात होता. तो त्या टांकसाळेत दरमहा एक लाख एवढ्या प्रमाणात पाडण्यात येत असे. टांकसाळ ही या किल्ल्याची एक ओळखच. टांकसाळी सगळीकडे बांधल्या जात नसत, त्यामुळे हिचे वर्णन न चुकता करणे गरजेचे ठरते. तर ही टांकसाळ बराच वेळ खर्चून पाहून घेतली. काही भाग भाजीव विटांत, तर काही दगडात बांधून काढलेला आहे. या इमारतीत खूप खोल्या असाव्यात, तसेच दरवाजे आणि खिडक्याही.

डावीकडे शिडी, मध्ये वरती शिलालेख आणि उजवीकडे गुहा आणि टाके
 टांकसाळ मागे ठेवून कातळकड्याकडे निघालो. जिथून गडावर प्रवेश करायचा तो टप्पा गडाच्या उजव्या बाजूला आहे, त्यामुळे थोडे उजव्या हाताने चालत, वाटेत अजून बरेच वाड्याचे अवशेष पहात त्याच्या बरोबर खाली येऊन पोचलो. इथे काही गुहा आहेत. डाव्या बाजूला वर जाण्यासाठी ती १५ फुटी शिडी आहे. गुहांच्या अजून उजव्या बाजूला गेल्यास पाण्याचे कोरडे टाके आहे आणि काही अंतर राखून वरच्या बाजूला एक गुहा किंवा टाके आहे. इथेच डावीकडे वरती भिंतीवर फारसी भाषेतला शिलालेखही आहे. दोन दिवसात चार किल्ल्यांवर मिळून दिसलेला हा तिसरा शिलालेख. इतरांप्रमाणे हाही अलावर्दीखानाने किल्ला जिंकून घेतल्याचा आहे. यात हा किल्ला १४ मार्च १६३६ साली जिंकून घेतल्याचा उल्लेख आहे. पण खरंतर हे गुहा, टाके आणि शिलालेख हे सगळे अवशेष निवांतपणे आम्ही उतरताना बघितले, कारण एकतर दोन वाजले होते, सूर्य पलीकडे असल्याने पुरेसा उजेड त्यावर पडला नव्हता आणि प्रथम उत्सुकता होती ती कातळटप्पा चढून जाण्याची.

चांदवड कातळटप्पा
 जाधव मामांनी तो टप्पा चढून दोर लावलानी. मग आम्ही पाच जण एकेक करत सांभाळून तो चढून गेलो. हा टप्पा चढून गेल्यावर गडावर जायचा मार्ग, म्हणजे आपण ज्याने जाणारे तो सध्याचा मार्ग, दिसायला लागतो. कारण गडाचा हा मूळ प्रवेशमार्ग नाही. तो अजून उजव्या बाजूला, साधारण शिलालेख पहिला त्या बाजूला होता, जो इंग्रजांनी पेशवाई संपल्यानंतर किल्ल्यांची जी नासाधून चालवलंनी, त्यात उध्वस्थ केला.

सध्याच्या प्रवेशमार्गावरच्या पायऱ्या आणि जवळचे टाके
 कातळकोरीव पायऱ्या जिथे दिसतात, तिथे उजव्या बाजूला गुहा आहेत. त्या पहारेकर्‍यांच्या देवड्या असाव्यात. तर डावीकडे एक पाण्याचे टाके दिसते. पायर्‍या चढून गेल्यावर आपण थोड्या सपाटीवर येतो. आपल्याला येथे चौथरा आणि वाड्याचे अवशेष दिसतात.

उतारावरचे लपलेले खांब टाके

जोडटाके
नेहमीप्रमाणे प्रदक्षिणा मार्गाने गडफेरीस सुरुवात केली. कातळात खालच्या बाजूला बऱ्यापैकी बुजत आलेलं पाण्याचे टाकं दिसलं. जवळच खालच्या बाजूला एक खांब टाकं आहे, यातलं पाणी पिण्यायोग्य नाही. थोड्या वरच्या बाजूस असलेल्या जोड टाक्यातील पाणी मात्र पिण्यायोग्य वाटलं. इथे जवळच एक गोमुख ठेवलेले आहे. तिकडे डाव्या हातास एक बुरूज आहे त्याला ढालकिणीचा बुरूज म्हणतात.
  
डोळ्यांना सुखावणारा हिरवागार तलाव
 नंतर ह्या पुढच्या, म्हणजे गडाच्या शेवटच्या व सर्वोच्च टप्प्यावर, म्हणजे पठारावर, आम्ही पोचलो तेव्हा वातावरण स्वच्छ होते. तिथेच राजवाड्याचा चौथरा आहे. बऱ्यापैकी उध्वस्त असलेला हा चौथरा आहे. दगडी खांबांचे नक्षीदार दगड इतस्ततः पसरलेले दिसतात. एक गोलाकार भोक असलेला एक भग्न दगडही इथे दिसला. तिथे हिरव्यागार पाण्याचे तळे दिसले, त्यात बाजूबाजूने खूप शेवाळे धरलेले आहे. पण तीन वाजून गेले असल्याने ते हिरवंगार पाणी डोळ्यांना सुखावत होतं.

सुंदर दृष्य चांदवड वरून
 इथून जो लांबवरचा परिसर दिसतो तो काय वर्णू? आपण ज्या बाजूने गडावर प्रवेश केला त्या बाजूला तर अप्रतिम दृश्य दिसले. समोरच साडेतीन रोडग्यांचे डोंगर, त्याच्या डाव्या बाजूला आपल्याला खालपासून वर येतानाच खुणावत असलेल्या एक डोंगर, ज्याच्या टोकावर एक शिवमंदिर आहे. हे रासलिंग महादेव मंदिर. साडेतीन रोडग्यांच्यामागे अजस्त्र पसरलेला इंद्राईच्या किल्ला, त्याच्या उजवीकडून डोकावणारा राजधेर, कोळधेर मात्र इंद्राईच्या मागे लपलेला असल्याने तो दिसला नाही. फक्त त्याच दिशेला नव्हे तर चहूबाजूला अत्यंत अप्रतिम दृश्य आम्हाला दिसले. टेहळणीच्या दृष्टीने तर हा किल्ला अगदी मोक्याच्या जागी होता.

गडावरचा मित्र, शिक्रा
 हे दृश्य पाहून परतीला लागलो, तर खाली पायाजवळच गवतात एक ससाणा पक्षाची आठवण व्हावी असा भेदक डोळ्यांचा पक्षी बसलेला होता. बहुतेक शिक्रा नावाचा हा पक्षी आहे. त्याच्या पायात एखादे भक्ष असावे. आमच्याकडे नजर रोखून बघत होता. त्याच्या धीटपणामुळे त्याचे खूप फोटो आम्ही काढून त्याच्या जवळूनच परतीच्या वाटेला लागलो. वाटेत एक अजून कातळकोरीव खांब टाके लागले. पाणी तरी इतकेच थंडगार आणि अप्रतिम!

खांबटाक्यात डोकावून निरीक्षण करणारा आमच्या सह्यमित्र

चांदवड वरून टांकसाळ आणि मागे सुंदर दृष्य
 साडे तीन वाजून गेले होते, सूर्यबिंब मावळतीकडे कलले होते. परतीच्या मार्गावर सूर्यकिरण झळाळत होते. Rock Patch जवळ सगळे आलो. एकेक करून तो पॅच उतरला. खाली परत येताना काही राहिलेले चौथरे आणि अवशेष बघून घेतले. गाडी जवळून तलावाच्या मागे डोंगर आणि मागून मावळतीचा सूर्य, असे दृश्य डोळ्यात आणि कॅमेरात साठवून घेतल्यावर चंद्रेश्वराचे दर्शन घेतले. जुने काळ्या पाषाणातील अप्रतिम मंदिर, सिमेंटचे लेप लावून, पांढर्‍या रंगात कितीही चांगले करायचा जीर्णोद्धार नावाखाली प्रयत्न केला असला तरी माझ्यासारख्याला ते विद्रुपच दिसते. त्या मंदिराची नक्षी, त्यातुन डोकावणारे विविध देव, नर्तक, पशुपक्षी केविलवाण्या नजरेने आपल्याकडे पहात आहेत, असा भास होतो. त्या नवीन रंगात मढवलेल्या जुन्या कोरीव कलाकृती पेक्षा एक पायाखाली आलेला, बेवारशी कोणी लक्ष न दिल्याने, रंग न लाभलेला नक्षीदार दगड मात्र नजरेला नजर देत जुन्या काळाची सौंदर्याची साक्ष देत असल्यासारखा वाटला.
गाडी घेऊन परतीच्या प्रवासात, वाटेवरच अहिल्याबाई होळकर यांनी १७४० मध्ये जीर्णोध्दार केलेल्या रेणुकामातेच्या मंदिराला भेट देऊन देवीचे दर्शन घेतले. दिवसभराची भटकंती पूर्ण झाली होती. रात्रीचे जेवण करुन मुक्कामाला गेलो ते मेसणखेडे गावात.
मेसणखेडे गाव तसे आडवाटेवरचं गाव. चांदवडवरून मनमाडकडे जाताना, वाटेत डाव्या हाताला शिंगवे गावाकडे जाणारा रस्ता लागतो, तिथूनच शिंगवे गाव ओलांडून मेसणखेड्यात जायचे. शिंगवे गावात शिरताना मात्र उजव्या हाताला डोंगरावर एक मंदिर दिसले. जीर्णोद्धार केलेले, वर छान लाईट वगैरे असलेले दत्ताचे मंदिर आहे. अंधार झाल्याने रस्ता शोधत शोधत कच्च्या-पक्क्या रस्त्याने शिंगवे गाव ओलांडून निघालो. आधी एक ग्रामस्थ भेटले, नंतर ते मेसणखेडे गाव आणि तिथले हनुमान मंदिरही मिळाले. निवाऱ्याची सोय झाली. यातले एक गावकरी, बिभीषण, सकाळी हा किल्ला दाखवायलाही तयार झाले. थंडीचा चटका दोन दिवसांपूर्वीच सोसून झाल्याने मंदिराच्या आतमध्ये तंबू लावला. फार वेळ न लावता त्यात स्लीपिंग बॅग घेऊन गुडुप झालो.
ठरलेल्या वेळेत सकाळी उठून तयार झालो. हनुमानाचे दर्शन घेऊन मंदिराच्या आजूबाजूला असलेले काही देवही बघितले. बाजूलाच एका कठड्यावर एक दगडी घोडा आणि त्यावर एक बसलेले जोडपे असे शिल्प आहे. मूळ काळ्या दगडातल्या शिल्पाला नंतर रंग दिलेला आहे. दुसऱ्या कठड्यावर दगडी वाघ आणि त्यावर देवी, असेही एक शिल्प आहे. आसपास दोन-चार वीरगळीही ठेवलेल्या आहेत. आवराआवरी करुन सरळ बिभीषण यांना बरोबर घेऊन गडाकडे निघालो. गावापासून किल्ल्याकडे जाताना वाटेत शेवटची वस्ती लागते. दहा मिनिटातच आम्हाला मेसण्याचे दर्शन झाले.

मेसणा किल्ला
 वरवर पाहता नुसताच डोंगर वाटावा असा हा किल्ला आहे. किल्ल्याचा डोंगर समोर ठेवून उजवीकडच्या बाजूला जाण्यासाठी चढाई सुरु करायची. डोंगर डाव्या हाताला ठेवत एकदम उजवीकडच्या टप्प्याला आम्ही येऊन पोचलो. तिथून गडावर जायला वाट काट्याकुट्यातून, झाडीतून जाते. खालून निघाल्यापासून अवघ्या अर्ध्या तासात आम्ही कातळकोरीव पायऱ्या पर्यंत येउन पोचलो होतो. एके ठिकाणी उजव्या बाजूला एक भुयार दिसले. पूर्वी त्यात जाता येत असं बिभीषण यांनी सांगितलंनी. पण सध्या तिथे खूपच गाळ दिसला. ते बहुतांशी बुजलेल्या अवस्थेत असून, अशा रीतीने ते बंद होऊन जाणार आहे. काही मिनिटांतच तटबंदीचे अवशेष दिसले. सगळीकडे खुपच झाडी वाढल्याने हे अवशेष त्यात लपून गेले आहेत. दगडांच्या लांब घडीव तुकड्यांनी ही तटबंदी बांधलेली आहे.

गडावरची टाकी
 गडाच्या पठारावर यायला फार वेळ लागत नाही. इकडे गावातले लोक त्यांचे पशुधन घेऊन येतात आणि काही दिवसासाठी चरण्यासाठी इथेच सोडतात. उजव्या बाजूने पठारावर शिरताना एक जोड टाके दिसले. त्यातले एक पूर्णपणे बुजलेले आहे, तर दुसऱ्यात चांगले पाणी आहे. त्यापुढे आणखी एक जोड टाके दिसले, त्यातही गाळ भरलेला आहे. जवळपास अजून एक टाके दिसले, त्यातही फक्त गाळ आणि इतर वनस्पती होत्या. एके ठिकाणी मात्र पाण्याची टाकी खोदण्याची सुरुवात करून अर्धवट सोडलेले दिसले. कदाचित तो कातळ मनासारखा मिळाला नसावा.

अर्धवट सोडलेले टाके
पठारावर इतर काही अवशेष नसल्याने सरळ गडाच्या सर्वोच्च माथ्यावर गेलो. इथे एका पीराचे थडगे आहे. खरंतर नविनच एका दगडाचाच पांढरा रंग आणि शेजारी हिरवा झेंडा लावून हे स्थान बनवलेले दिसत आहे. असो... इथून नजारा मात्र सुंदरच दिसतो. चहुबाजूला डोंगरच डोंगर, एका बाजूला चांदवड किल्ला, हे अप्रतिम दृश्य साठवून अर्ध्यातासातच खाली उतरलो.
अगदी सकाळी साडेनऊलाच परतीचा प्रवास चालू केला. एवढ्या कमी वेळात एक आडवाटेवरचा अत्यल्प-परिचित असा किल्ला मात्र पदरात पाडून घेतला होता. वर्षाचा समारोप असा आधीच्या आठवड्यात वैदर्भीय आणि आत्ता या पंचरत्नांनी असा दमदार झाला होता.

सुखद आठवणींशिवाय काही नेऊ नका... आणि पाऊलखुणांशिवाय काही ठेऊ नका... !!!

6 comments:

  1. मी आणि मी बायको तुमचे ब्लॉग वाचत असतो. आमचं तेरकिंग जाणं होत नाही पण आम्ही पूर्ण अनुभवत असतो.
    थांक यू.

    ReplyDelete
  2. सुंदर प्रवास वर्णन.फोटो छान आहेत.असेच ब्लॉग लिहीत रहा.

    ReplyDelete