Sunday, April 12, 2020

किल्ले चंद्रगड आणि कोंढवी

याआधीच्या मोरगिरी वरच्या ब्लॉगची सुरुवातच "जावळीतला चंद्रगड पाहिला होता" अशी केली होती. पण त्यावर लिहायचं मात्र राहूनच गेलं होतं की. तर डिसेंबरच्या सुरुवातीला म्हणजे अगदी एक तारखेलाच जावळीच्या खोऱ्यातला हा किल्ला बघायचा ठरला. या किल्ल्याविषयी तशी उत्सुकता जास्त होती, कारण एक तर आम्ही काढलेल्या माहितीत हा प्रचंड घसाऱ्याचा किल्ला आहे असं सरळ सरळ म्हटलेलं होतं आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याचे स्थान! जावळीचे खोरे....
जावळीचं खोरं हे शब्दच लहानपणापासून ज्याला शिवाजी महाराजांच्या इतिहासाची काही ओळख आहे त्याच्या डोक्यात कायमच बसलेले असतात. इतिहासातल्या काही महत्त्वाच्या घटनांपैकी एक म्हणजे अफजलखानाचा वध. ह्या अफजलखानाला सुद्धा मुद्दामहूनच जावळीच्या खोऱ्यात शिवाजी महाराजांनी इथे म्हणजे साक्षात मृत्यूच्या दाढेत ओढून आणलंनी होतं आणि याच जावळीच्या खोऱ्याचे त्याधीचे अधिपती, सम्राट होते ते चंद्राराव मोरे. त्यांनी तर चक्क महाराजांनाच सूचनावजा धमकी दिलेली होती “येता जावळी, जाता गोवळी”. हे सगळं पहिल्यापासूनच ऐकून असलेल्या आम्हाला हे प्रचंड घनदाट जंगल कसं असेल, तिथे प्रत्यक्षात काय असेल अशी उत्सुकता कशी नसणार? त्यामुळे प्रत्यक्ष या खोर्‍यात घुसून हा किल्ला बघायचा म्हणजे जणू काही आपण काहीतरी मोठं साहस करायला चाललोय अशी एक धारणा मनात होती. अर्थात प्रत्यक्षात तसं काही असणार नव्हतंच. ना आपण शिवकाळात आहोत, ना तिकडे चंद्रराव मोरे किंवा इतर लोक आहेत.
तसं याचं नियोजन ठरल्यापासून जे चार जण ठरले होते त्यातला भूषण रद्द झाला, पण विराग तयार झाला. नंतर तोही रद्द झाला. असं शेवटपर्यंत नक्की कोण आहे आणि कोण नाही हेच माहिती नव्हतं. ३० नोव्हेंबरला रात्री साडे अकराच्या दरम्यान वडगाव पुलाजवळ मी विनीतला जॉईन झालो. ह्या किल्ल्याच्या पायथ्याचे गाव आहे ढवळगाव. तर या चंद्रगड उर्फ ढवळगडला जाण्यासाठी आम्हाला महाबळेश्वर मार्गे आंबेनळी घाटातून खाली कोकणात उतरायचे होते. साडे अकराला सिंहगडरोड पासून निघाल्यावर आंबेनळी घाट ओलांडायचा ती वेळ म्हणजे मध्यरात्रीची. काय मजा येते अशा मध्यरात्री त्या घाटातून जायला... चहूबाजूला दाट जंगल. सगळं जावळीचाच भाग. विनीत जरी गाडी चालवत होता तरी बाकी आम्ही झोपलो नव्हतो. अशी मजा थोडीच परत मिळणार होती J 
महाबळेश्वर सोडल्यानंतर रस्ता ओलसर दिसायला लागला. ह्यावेळी चक्क डिसेंबर महिन्यात थोडा पाऊस पडून गेला होता. महाबळेश्वर मधून पोलादपूरकडे जाणाऱ्या रस्त्यावर एके ठिकाणी उजवीकडे फाटा जातो, तो उमरठ मार्गे ढवळे गावात जातो. ढवळे गावात किंवा त्याच्या आधीच कुठेतरी मंदिर होते जिथे आम्हाला मुक्काम करायचा होता. पण वाटेतले उमरठ गाव हे नरवीर तानाजी मालुसरे यांचे गाव.
तानाजी मालुसरे समाधी
आम्ही उमरठे गावात पोचलो तिथे तानाजी मालुसरे यांचे स्मारक आहे. ह्या स्मारकाजवळ पोचलो ती वेळ लक्षात घेतली. पुढे तसेही मंदिराचे नेमके ठिकाण माहिती नव्हते आणि गावातला रस्ता, अंतर, वस्ती ह्या गोष्टी लक्षात घेता राहण्यासाठी हे स्मारक-स्थळ आम्हाला चांगलंच वाटलं. अर्थात नाही म्हणायला थोडी थंडी होतीच. तसे ते थंडीचे दिवस होते. त्यामुळे बाहेर तंबूत चार जण आणि एकाने गाडीतच झोपायचं ठरलं. यावेळी गाडीत मी झोपलो. स्मारक स्वच्छ ठेवलेले दिसत होते. झाडलोट करून, तंबू टाकून रात्रीचा मुक्काम झाला. नेहमीप्रमाणे तसं सकाळ व्हायच्या आधीच आम्ही उठलो आणि आमच्या महत्त्वाच्या कामासाठी जागा शोधायला लागलो. आता गंमत अशी की आजूबाजूला खूप वस्ती आणि लोकांची शेतं. कुठे अशी जागाच दिसेना, सगळं स्वच्छ. पण सरतेशेवटी थोडसं आत जाऊन जागा शोधून काढली आणि आम्ही हलकं झालो. तोंड वगैरे धुवून ढवळे गावाकडे निघालो.
ढवळे गावात पोचलो. तिथे शाळेजवळ गाडी लावायला मस्त जागा मिळाली. ह्या गडावर जायचं म्हणजे वाटाड्या बरोबर हवाच. कारण कुठल्याही जंगलातल्या वाटेने आणि त्यातून अपरिचित वाटेने उगाचच वाटाड्या नसताना जायचं धाडस करण्यात काही अर्थ नसतो. एक तर अशा दाट जंगलात तिथलं वन्यजीवन आपल्याला परिचयाचं नसतं, त्यातून वाट चुकल्यावर आपला वेळही वाया जातो आणि जीवालाही धोका. त्यातून हे तर जावळीचं खोरं. पप्पू कदम हे वाटाड्या म्हणून आमच्याबरोबर यायला तयार झाले. पण त्यांना शोधून, घेऊन निघेपर्यंत आठ वाजत आले होते. खऱ्या चढाईच्या रस्त्यापर्यंत पोचायला तसा वेळच आहे. त्याच्या आधी शेतातून वाट काढत, शेलारवाडी ओलांडून जंगलात मग घुसावं लागतं.
चंद्रगड दर्शन
जवळपास सव्वा आठच्या सुमारास चंद्रगडने आम्हाला पहिलं दर्शन दिलंन. इथे खरं गाव संपून ट्रेकची सुरुवात होते. याच ठिकाणाच्या इथे वाट चुकायची पहिली आणि मोठी शक्यता आहे. इथे एका ठिकाणी समोरची पायवाट सोडून उजवीकडे वळावं लागतं, जे माहिती नसल्यास कळूच शकत नाही. तर तिथून आम्ही योग्य वाटेने झाडीत शिरलो. इथून मात्र मोकळं आकाश दिसणं दुरापास्तच होतं, पूर्ण दाड जंगलच. साधारण १५-२० मिनिटांनी आम्हाला एका झाडावर “ॐ नमः शिवाय” अशी पाटी लिहिलेली दिसली. गावकऱ्यांनी अश्या पाट्या मध्ये मध्ये लिहिलेल्या आहेत, ज्या आपल्याला आपण बरोबर वाटेवर आहोत याची खात्री देतात.
ॐ नमः शिवाय
त्यानंतर अवघ्या पाच मिनिटातच आम्ही ओढ्या जवळ पोचलो. आता दाट झाडी संपली होती, आमची थोडीशी दमछाक झाली होती. इथे आम्ही पहिली विश्रांती घ्यायला थांबलो. इथे एक मोठा ओढा आहे जो आता कोरडा झाला होता. कुठे कुठे खड्ड्यात पाणी शिल्लक होतं. इथपर्यंत आलो, हा तसं म्हटलं तर पहिला टप्पा. गावातून निघाल्यानंतर इथपर्यंत यायला साधारणपणे अर्धा तास लागला होता नंतर आम्हाला आमचं बूड टेकायला मिळालं होतं.
चंद्रगड दर्शन फलक
इथून गडाच्या दिशेने बघितलं तर पूर्ण जंगल आणि झाडी दिसते. गडाचं तसं दर्शनही होत नाही. मात्र इथे ढवळे गावाच्या ग्रामस्थांनी “चंद्रगड दर्शन” नावाचा फलक लिहून ठेवलेला आहे.
म्हसोबाच्या खिंडीला समांतर जागा
पण आता तर प्रसिद्ध खडा चढ चालू होणार होता आणि आता सावली ही आमची साथ सोडणार होती. मोठे वृक्ष नसले तरी झाडी मात्र प्रचंड होती. गवतही सुकलेलं होतं, वाढलेलं होतं. खारवी, इतर गवत आणि झाडी ह्यातून वाट काढत-काढत ओढ्यापासून म्हसोबाच्या खिंडीत यायला साधारणपणे पाऊण तास लागला होता.
खडा चढ
चांगलीच दमछाक झाली होती. ऊन काही कमी होत नव्हतं. कमी कसं होईल? आता तर फक्त साडे नऊ झाले होते. खरं तसं म्हटलं तर ही म्हसोबाची खिंड नव्हे. म्हसोबाच्या खिंडीत आपण जातच नाही. त्याला समांतर अशा ठिकाणी ट्रॅव्हर्स मारून आपण आलेलो असतो. खडा चढ मात्र काही संपलेला नसतो.
झाडांची चौकी
साधारण दहा मिनिटातच आम्ही एका ठिकाणी पोचलो जिथे दोन झाडं होती आणि त्यामुळे टेकायला थोडीशी सावली पण मिळाली होती. यालाच बहुतेक झाडांची चौकी म्हणतात. फक्त डोकं घुसवून मेंदू जरा गारव्यात घेता येईल एवढीच सावली. तेवढीच का होईना, पण सावली मिळण्याचे हे एकमेव ठिकाण. त्यानंतर परत खडा चढ आमची वाट बघतच होता. त्यातून सुकलेले गवत, त्याच्यावरून पाय घसरत होते. त्यामुळे हे गवत सोडून जिथे कातळाचा भाग मिळेल तेवढ्यावरच पाय ठेवून पुढे जाणे सोयीस्कर होते. मागे वळून पाहिलं तर आपण कितीतरी उंची गाठल्याचं दिसत होतंच. प्रचंड मोठी मोठी वाटणारी झाडं लहान दिसायला लागली होती.
पायऱ्या
पावणे दहा वाजले होते पायर्‍या दिसल्या. कातळकोरीव पायऱ्या दिसल्यावर एक प्रकारचा दिलासाच मिळतो जणू काही. आता आपण गडावर आलोच अगदी ही सुखद भावना फक्त. गड माथ्यावर नसलो तरी आता तो काही फार दूर नव्हता. पण समोरच्या त्या पायऱ्यांवर मात्र गवत आलेलं होतं. पाय सटकायची खूपच भीती होती.
गाव सोडल्यानंतर दोन तास होत आले होते आता आम्ही साधारणपणे खिंडीत पोचलो होतो म्हणजे तिच्या वरच्या भागात आम्ही होतो. पण आता जागा मोकळी होती. खडा चढ संपला होता आणि आता समोर चंद्रगड तर मागच्या बाजूला एक तसाच डोंगर याच्या मध्ये आलो होतो. इथे कातळटप्पा लागतो. हा टप्पा पार करून आपण जवळजवळ गडाच्या माथ्यावर पोचतो.

गडमाथा
इथून अप्रतिम दृश्य दिसते. आपण खूप उंचीवर असल्यामुळे आजूबाजूला रौद्र वाटणारे डोंगर-कडे चहूबाजूने आपल्याला दिसतात. त्यातून आकाशही जवळजवळ निरभ्र होतं, मध्येच काही ढग डोकावत होते. असं एकूण दृश्य खूपच छान होतं. इथे थोडं थोडं फोटोसेशन केलं.
नंदी आणि पिंड
इथे जागा प्रशस्त अशी नाहीये आणि समोर लगेचच अवशेष दिसायला लागतात. एक खोदलेला दगड, त्याच्या पुढेच एक नंदी. तिथे गावकऱ्यांनी आणून ठेवलेल्या काही घंटा पडलेल्या आहेत आणि “ॐ नमः शिवाय” लिहिलेली पाटीही आहे. त्याच्यासमोरच एका खोदलेल्या कातळामध्ये मध्ये एक शिवपिंडी ठेवलेली आहे. हा ढवळेश्वर महादेव. आपण या ठिकाणी ट्रेक म्हणून येतो पण अशा ठिकाणच्या देवांचे भाविक मात्र काहीही उत्तम प्रतीचे बूट वगैरे साधनं नसताना महाशिवरात्री वगैरेसारख्या ठिकाणी इथे फक्त भक्तिभव म्हणून येतात. ही शिवपिंडीची मूळ जागा असेल असं वाटत नाही. ते पाण्याचे टाकं वाटतं कदाचित नंतर कधीतरी शिवपिंडी तिथे ठेवली गेली असेल.ढवळेश्वर महादेव” यावरूनच या गडाचं नाव ढवळगड होतं. महाराजांनी गड जिंकल्यानंतर त्याचं नाव चंद्रगड ठेवलं. एका ठिकाणी या किल्ल्याचे नाव “गहनगड” असं ठेवल्याचं नमूद केलेलं आहे.
लपलेलं टाकं
बालेकिल्ल्याकडे
इथून पुढे चालायला लागल्यावर डावीकडे खालच्या बाजूला झाडीमध्ये लपलेलं एक पाण्याचं टाकं दिसतं, जिथे आपल्याला जाणं शक्य नाही, जे वरूनच बघायला लागतं. गडाच्या माथ्यावर तसा मोठा, रुंद परिसर नाहीच. एका सरळ रेषेत हा गडाचा माथा पसरलेला आहे. त्यामुळे आलो तसेच पुढे पुढे चालत गेल्यावर समोरच उंच असा रस्ता बालेकिल्ल्याकडे जाताना दिसतो.
कातळकोरीव टाकं
हा टप्पा चढून गेला की जणू आपण बालेकिल्ल्याच्या दरवाजातून वर येतो. आजुबाजुला थोडी तटबंदी आणि काही अवशेष दिसतात. चहूबाजूला सह्याद्री आपल्याला भरभरून दर्शन देत असतो. इथे पुन्हा कातळकोरीव पाण्याचं टाकं आहे, त्यात पाणी होतं. मात्र हे पिण्यायोग्य वाटलं नाही किंवा आमच्याकडे पुरेसं पाणी असल्यामुळे आम्ही त्या दृष्टीने बघितलं नाही.
कमळजा देवी आणि पिंड
इथे आपण एका चौथर्‍याच्या मागच्या बाजूने त्यावर प्रवेश करतो. वळून पाहिल्यावर त्याच्यावर ठेवलेली कमळजा देवीची मूर्ती दिसली. त्याच्या शेजारी एक शंकराची पिंड आहे. त्यावर साळुंखा नाहीये पण मध्यभागी असलेल्या गोल भागात एक दगड आहे. मला तरी तो दगड तो मूळ पिंडीचा भाग वाटलाच नाही उलट तो बहुतेक तोफेचा गोळा असावा असं वाटलं.
पुढे चालल्यावर अजून काही अवशेष आणि चौथरा दिसतो. हे अवशेष जवळच आहेत पण बहुतेक सगळे अवशेष हे वाढलेल्या गवतामुळे थोडेसे दडलेले होते. डावीकडच्या बाजूने काही तटबंदी शिल्लक होती. तसंच पुढे पुढे चालत गेल्यावर आपण गडाच्या शेवटच्या टोकावर येतो. इथून बघायला गेलं तर गड संपल्यासारखा वाटला पण एक चिंचोळी वाट खाली उतरताना दिसली. तिथून आम्ही खाली गेलो. इथे टेकायला थोडीशी सावली मिळाली. हे मात्र गडाचं शेवटचं टोक आहे.


गडाचं शेवटचं टोक आणि तटबंदी, टाकं
इथपर्यंत असलेले गडावरचे सगळे अवशेष बघून झाले होते. गड एका सरळ रेषेत आहे त्यामुळे येता येता वाटेवरच सगळे अवशेष बघायला मिळाले होते. आता हे टाक आणि इथे असलेले अवशेष बघायच्या आधी आम्ही पोटपुजा करायचे ठरवले. घेऊन आलेलं सगळं सामान बाहेर पडलं. लाडू, पराठे, चिवडा, चकली जे जे काही आणलं होतं ते सगळं बाहेर आलं. कारण जरी सव्वा दहाच वाजले होते तरी साधारणपणे आठला सुरुवात केलेला हा गड चांगलाच दमछाक करणारा आणि खडा चढ असल्यामुळे प्रचंड भूक लागली होती.

सह्याद्री
पोटपूजा झाल्यानंतर मग फोटोसाठी अँगल दिसायला लागले. या शेवटच्या टोकावर काही तटबंदी भक्कम दिसते तर त्याला लागुनच आतील बाजूला टाकं आहे. ह्यात पाणी भरलेलं होतं आणि पिण्यायोग्यही आहे. ह्या टाक्याच्या पुढेही एक टाकं आहे, त्यातही पाणी होतं पण ते पिण्यायोग्य नाही. इथे जाताना जरा सांभाळूनच. तिथल्या टाक्यांचे फोटो काढून झाले, टाक्यांबरोबर फोटो काढून झाले. इथून जो सह्याद्री दिसतो ते सह्याद्रिचा कणखर रूपच.
Drone View
परतीच्या प्रवासाला लागलो. अवशेष तर बघून झाले होते त्यामुळे आता बाकी होतं फक्त फोटोसेशन. त्यात प्रवीणनी ड्रोन आणलं होतं. मग काय ड्रोन वरून एरियल फोटो शूट, व्हिडिओ शूट केलं.
झपाझप गड उतरायला लागलो. उतरणे काय सोपे आणि आरामदायी नाहीच आहे उलट ओढ्यापर्यंतचा सगळा भाग घसाऱ्याचा आहे. त्यामुळे खूप सांभाळून उतरायला लागतो.


ओढ्यात पसरलेला मी
येताना परत त्या ओढ्याच्या जागी छोटीशी विश्रांती घेतली. विश्रांती म्हणजे नुसते बसलो नाही तर पसरलोच अगदी.
पावणे बाराला उतरायला सुरुवात केली आणि जिथून आम्हाला पहिल्यांदी चंद्रगड दर्शन झालेलं होतं तिथपर्यंत यायला चक्क दीड वाजत आला होता. म्हणजे उतरायला सुद्धा आम्ही जवळजवळ पावणेदोन तास घेतले होते.
जावळीच्या खोऱ्यातून आम्ही बाहेर पडलो होतो
याच गावात तानाजी मालुसरे यांचे समाधी होती ती बघितल्याशिवाय आम्ही कसं बाहेर पडू? त्या समाधीच्या समोरच गावकर्‍यांचा कुठलातरी एक सण-उत्सव चालला होता. उत्सव म्हणजे काय तर चक्क Bull-Fight. लोक बैलाला आपल्या अंगावर घेत होते आणि त्याच्या पासून वाचवून घेऊन पळत होते. समाधी मात्र जिर्णोद्धाराचं काम चालू असल्यामुळे तशी बघण्याच्या अवस्थेत नव्हती. जसं मिळालं तसंच दर्शन घेतलं.
दुपारचे तीन वाजले होते अर्थातच आम्ही एवढ्यावरच समाधान मानून पुण्याकडे परत निघणार नव्हतो. आम्हाला बघायचा होता कोंढवीचा.
चंद्रगड बघितल्यानंतर ढवळे गावातून उमरठ्यापर्यंत आम्ही आलोच होतो, त्या उमरठ्या पुन्हा पोलादपूर मार्गावर गेल्यानंतर पोलादपूर वरून डावीकडे वळलो. हा रस्ता पुढे कशेडी घाट मार्गे खेड कडे जातो. ह्या रस्त्याला लागायचं आणि साधारण पाचेक किलोमीटरच्या अंतरावर डावीकडे कोंढवी नावाच्या गावात हा रस्ता जातो. वाटेत धामणदेवी नावाचं गाव आहे. हे कोंढवी गाव किल्ल्याचे पायथ्याचे गाव आहे.
कोंढवी गावात खाली किल्ल्याची माहिती विचारली आणि आता गाडीच सरळ किल्ल्याच्या माथ्यावर जाते हे कळलं. मग काय सरळ गाडी घेऊनच किल्ल्यावर पोहोचलो. चढाई करावीच लागली नाही.
आधी वाचलेल्या माहितीप्रमाणे या गडाचे गडपण दाखवणारे तसे अवशेष म्हणजे तटबंदी, दरवाजा, तोफा काहीही ह्या गडावर नाही. त्यातून आम्ही आधी वाचल्याप्रमाणे बघायला गेलो तर वस्तू ज्या ठिकाणी आहेत असं वाचलं होतं, त्या ठिकाणावर आता नाहीयेत. बर्‍यापैकी वस्तू गावकऱ्यांनी मंदिराजवळ आणून ठेवलेल्या आहेत.

भैरवनाथ मंदिर
आम्ही आमची गाडी सरळ मंदिराजवळ जाऊन लावली. हे दिसणारे मंदिर जीर्णोद्धार केल्यानंतरचे आहे पण मूळ मंदिर प्राचीन असून त्या मंदिराचे काही दगड आसपास ठेवण्यात आलेले आहेत.
या मंदिरावर “श्री भैरवनाथ मंदिर, आठगाव, कोंढवी” असे लिहिलेला फलक आहे. कोंढवी, तळ्याची वाडी, फणसकोंड, गांजण, खडपी, धामणदेवी कातली, खडकवणे व गोलदरा अशा आजूबाजूच्या वसलेल्या आठ गावांचे श्रद्धास्थान, म्हणून हे आठगाव कोंढवी मंदिर. हे मंदिर राहण्यासाठी अतिशय चांगलं आहे. परंतु सध्या ते कुलूप लावून बंद केलेले असते.
वाचलेल्या माहितीनुसार आम्हाला काही नक्षीदार दगड, वीरगळ अशा गोष्टी शोधायच्या होत्या. त्याप्रमाणे मंदिराला प्रदक्षिणा मार्गे फेरी मारली तेव्हा मंदिराच्या पलीकडे तो कोरडा तलाव दिसला. त्याच्या शेजारी एक नंदीची मूर्ती ठेवलेली आहे तसेच शेजारी शंकराची पिंडही आहे. अजूनही काही अवशेष तिथे दडलेले असावेत, ते शोधायचा प्रयत्न केला. पण त्या प्रचंड वाढलेल्या गवतात अजून काही सापडले नाही.

कोरडा तलाव आणि चाफा
मात्र त्या कोरड्या तलावाच्या शेजारी चाफ्याचं झाड दिसलं. ही तशी महत्त्वाची खूण आहे. त्यामुळे कमीत कमी आम्ही योग्य ठिकाणीच अवशेष शोधत होतो याची आम्हाला खात्री झाली. या तलावाच्या दुसर्‍या बाजूला एक वडाचे झाड आहे.
तुळशी वृंदावन, पिंड
मंदिराच्या समोरच आपल्याला काही जुने दगड, मूर्ती दिसतात. त्यात एक नव्याने बांधलेलं तुळशीवृंदावनही आहे. त्याच्या शेजारी असलेली शंकराची पिंड सुंदर आहे. अतिशय छान नक्षीदार असलेली ही पिंड एका चौरंगासारखी आहे. मध्यभागी एक कमळ ही कोरलेलं आहे.
हनुमान मंदिर
यानंतर परत फिरून गावातून मंदिराकडे येणाऱ्या रस्त्यावर थोडं मागच्या बाजूला गेलो. तिकडे मारुतीचे मंदिर. त्या मंदिरात जाणाऱ्या वाटेवर जुन्या अवशेषांचे काही भाग दिसत होते. ते वाड्याचे अवशेष वाटत होते. या मार्गावर जुन्या पायऱ्यांचे काही अवशेषही आहेत. इथे एक मूर्ती हनुमंताची आहे तर त्याच्या शेजारची छोटी मूर्तीही हनुमंता सारखीच वाटते.
नवनाथ मंदिरातल्या शाडूच्या मूर्ती
भैरवनाथ मंदिराच्या मागच्या बाजूला रस्त्याच्या विरुद्ध दिशेस नवनाथांचे मंदिर आहे. याच्या आत मध्ये नवनाथांच्या शाडूच्या मूर्ती आहेत. या पैकी आठ मूर्ती अतिशय सुस्थितीत असून एक मूर्ती भग्न झालेली दिसते. कदाचित त्यामुळेच त्याला कुलूप लावून बंद केलेले आहे. हे मंदिर ही पुरातन आहे. हे मंदिर मुस्लिम स्थापत्य शैलीचे आहे.
नक्षीदार दगड
आजूबाजूला फिरल्यावर आपल्याला अजूनही काही अवशेष बघायला मिळतात. त्याच्यातच एक अतिशय सुंदर असे कोरीव काम केलेला दगड बघायला मिळतो.
या मंदिराच्या आजूबाजूला दिसणारा परिसर आणि या गडाचे स्थान लक्षात घेतले तर कोकणात उतरणारा कशेडी घाटाचा मार्ग आणि परिसर यावर लक्ष ठेवण्यासाठी हा किल्ला नक्कीच महत्वाची कामगिरी बजावत असावा.


स्वच्छ पाण्यात डुंबणारे आम्ही
गडाच्या वरपर्यंत गाडी आल्यामुळे आमचा खूप वेळ वाचला होता. किल्ल्याचे अवशेष बघायला अर्धा तास पुरतो. साडेचारच वाजले होते, त्यामुळे वाटेत हेरून ठेवलेल्या एका नदीच्या किनारी आम्ही गेलो. आधीच पाण्यात डुंबायची हौस, त्यात समोर स्वच्छ पाणी. मग काय? झाली अंघोळ.
एका दिवसात जावळीच्या खोऱ्यातला चांगलीच दमछाक करणारा चंद्रगड उर्फ ढवळगड आणि त्याच्याबरोबर अत्यंत सोपा, कारण वरपर्यंत गाडी जाणारा कोंढवीचा किल्ला पदरात पाडून घेतला होता. नरवीर तानाजी मालुसरे यांची समाधीही बघायला मिळाली आणि स्मारकही. श्रमपरिहार म्हणून स्वच्छ पाण्यात डुंबायला मिळालं. अजून काय पाहिजे होतं आम्हाला...

सुखद आठवणींशिवाय काही नेऊ नका आणि पाऊलखुणांशिवाय काही ठेऊ नका...
.

8 comments:

  1. Lockdown च्या काळात वाचायला पुस्तक,पेपर मिळत नाही.त्यामुळे तुझा ब्लॉग म्हणजे पर्वणीच!सुंदर वर्णन केले आहे.

    ReplyDelete
  2. चांगलं सुटसुटीत वर्णन... मस्त

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद, तुमची थाप नक्कीच उत्साह वाढवते. चूक असेल कुठे तर नक्की सुधारायची संधी द्या. 😊😊

      Delete
  3. तपशीलवार लेखन आणि त्यांना फोटोंची सुरेख जोड. उत्तम ब्लॉग.

    ReplyDelete
  4. धन्यवाद अमित 😊😊
    पण "तुम्ही"?

    ReplyDelete
  5. मस्तच👌👌,चंद्रगड हा नेमका दिसायला लहान आहे पण चढाई करताना सगळयांची दमछाक होते.

    ReplyDelete