Tuesday, April 30, 2024

भैरवगड ते भैरवगड - II

समोरच्या गवळदेवकडे बघून आवंढा गिळला. पण आधी त्या सॅकचं कण्हणं थांबवणं गरजेचं होतं. नाहीतर मग पुढे माझ्यावरच कण्हायची वेळ आली असती. 🙈 मग त्या बंदाला गोंजारून थोडं शांत केलं. पठार बऱ्यापैकी उतरलो.

समोर घनचक्कर आणि गवळदेव यांना जोडणाऱ्या खिंडीतून गवळदेवकडे जाणारी वाट थोडी थोडी दिसायला लागली. खिंडीतून पलीकडे गवळदेवच्या बाजूला असलेल्या दाट गवतात शेळ्या पण दिसल्या. आम्ही जसं खाली उतरायला लागलो आणि शेळ्या जवळ यायला लागल्या, तेव्हा कळलं, की त्या शेळ्या नसून गाई-गुरं आहेत, ते गवत नसून झुडपं आहेत आणि आम्ही गाढव 🤣 शांतपणे त्या गुरांना घनचक्करची वाट मोकळी करून दिली आणि त्यांनी आम्हाला गवळदेवची. एकमेकांना क्रॉस करून एक्सचेंज ऑफरमध्ये आम्ही गवळदेव डोंगरावर टेकलो आणि त्या घनचक्कर वर.

गवळदेववरून घनचक्करची मागची बाजू

टेकलो म्हणजे काय, तर फक्त डोंगराला लागलो. अजून गवळदेव टोक लांबच होतं. पायातल्या गोळ्याने परत आपली उपस्थिती दाखवलीन. "मी आहे, आहे अजून, गेलो नाहीये" हे उगाच ओरडून सांगतानाच, वर जाणारी वाट खड्या चढाईची नसून, फेरी मारत लांबची असली, तरी थोडी हळूहळू चढत जाणारी आहे कळलं. त्यामुळे पोटातला गोळा हळूहळू कमी झाला. एकदा मागे घनचक्करकडे बघितलं. आम्हाला घनचक्करची ही बाजू फक्त इथे आल्यावरच दिसणं शक्य होतं. निळ्या आभाळाखाली तो हिरवा घनचक्कर आणि इकडून दिसत असलेला त्याच्या मागच्या बाजूचा हा काळा कातळकडा. बऱ्याच वेळाने असं मागे वळून पाहिल्यावर फार छान वाटतं. एवढं आलो आपण याने हुरुप येतो.

डोक्यावरचं ऊन मात्र तो हुरूप बाजूला सारायचा फार प्रयत्न करत होतं. झालं होतं काय, की काल जो पाऊस पडून गेला होता, त्याने इकडच्या आकाशातलं ढगातलं पाणीच संपून गेलं होतं. सूर्याला त्याचे किरण अडवणारं कोणीच आभाळात नसल्याने, उंच अशा या डोंगर माथ्यावर तो प्रखरपणे आपली किरण फेकत होता. व्ह्यू मिळण्यासाठी म्हणून हे वातावरण उत्तम असलं, तरी ढगातलं पाणी संपवून, ते ऊन आता अंगातलं पाणी ओढून, बहुतेक आता सूर्याला अर्घ्य देत असावं. पण त्यातही मध्ये सुंदर झाडी, लहान-मोठे गारगोटीचे दगड, त्या उष्णतेतही सूर्याच्या नाकावर? किरणांवर म्हणू, टिच्चून जिवंत असलेला पाण्याचा झरा आमचं मन गार करून गेला.

उन्हापुढे आधी हात टेकले, मग आपोआप पाठ टेकली गेली

पण पायातला गोळा होताच, जो मात्र ती चाल अजूनच मंदावत होता. तशीच पावलं ओढत ओढत, ती बॅग सांभाळत एका झाडीत थांबलो. घनचक्कर माथ्यापासून बरोबर दोन तास झाले होते इथवर. टळटळीत उन्हातून ती पठारावरची आणि गवळदेवची ही पायवाट एवढा वेळ तुडवल्यावर सगळ्यांनीच उन्हापुढे हात टेकले. हाताबरोबरच मग पाठीवरच्या पिशव्या आणि हळूहळू पाठही टेकली गेली. थोडावेळ थांबलो. पायातल्या गोळ्याला विश्रांती देऊन मग मीही पाठ टेकली. तब्बल दीड तासाचं ऊन आम्ही डोक्यावर घ्यायचं सोडून वाया घालवलं.

तीन वाजून गेले. मुक्काम गवळदेवच्या पठारावरच करायचा असल्याने रात्री अंधार पडायच्या आत पायथ्याला गावात उतरायचं वगैरे नव्हतं. पण गवळदेव माथा आजच बघून घ्यावा आणि उद्या ते चढाचढीच काम टाळावं, असा ठराव मांडता मांडताच संमत झाला. आता घनचक्करचा उतार जरी उतरला असला तरी इथवर येताना चढ चढत आलं आहोतच आणि समोरच आता माथा दिसतोय, वेळही आहेच, तर वर पोचून तिथला नजरा का नको बघायला?

गवळदेव माथा.jpg

समोरच्या माथ्याला भिडलो. आता माथ्यावर पोचणार, तोच लक्षात आलं की, अरे हा तर माथा नाही पण, लहानसं पठार आहे. माथा त्याच्या पलीकडे, जरासाच वर. चला त्या टेकड्यावर लागलो, पण परत तेच... माथ्यावर पोचूच आता म्हणता म्हणता लक्षात यायचं, की हे तर लहान पठार किंवा टप्पा. माथा तर तो पलीकडे दिसतोय. असं झालं ना परत परत २-३ वेळा. का हा गवळदेव परीक्षा घेतोय हे समजलच नाही. पण आला एकदाचा खरा शिखरमाथा. आम्ही पोचलो होतो, महाराष्ट्रातल्या उंचीने तिसऱ्या क्रमांकाच्या शिखरावर.. गवळदेव माथा!!!

गवळदेव म्हणजे गवळ्यांचा देव, गुराख्यांचा देव. कोकणात सिंधुदुर्गात गवळदेवाचा फार मोठा उत्सव असतो. आता आम्ही जिथे आलेलो, तिथे असा उत्सव वगैरे नसतो, पण अर्थ तोच. गुरख्यांचा देव. मग तो इथे का? तर भैरवगडपासून कात्राबाईपर्यंत ह्या जोडलेल्या डोंगर रांगेवर, बराचसा पठार भाग आहे. हा भाग ह्या गवळदेव व घनचक्कर डोंगरांच्या माचीवर खूप आहे आणि त्यामुळेच गुराखी अर्थात गवळ्यांची इथला उपलब्ध चारा म्हणजे पर्वणीच ना.. त्यांच्या रक्षणासाठी खास त्यांचा रक्षणकर्ता - गवळदेव!

गवळदेव वरून व्ह्यू

गवळदेवाला नमस्कार करून या सर्वोच्च माथ्यावरून सभोवतालचा परिसर डोळ्यात भरून घेतला. घनचक्कर वरून दिसलेल्या अफाट दृश्याची उजळणी झाली. त्यात मागच्या बाजूला आता कुंजरगड उर्फ कोंबडा, कलाडगड, हरिश्चंद्रगड हेही बघायला मिळाले. सगळं वेळेत चाललं होतं. साडेचार वाजलेले, निवांत खाली उतरायला सुरुवात केली. दुपारच्या विश्रांतीनंतर पायातला गोळा जणू विरघळून गेला होता.

मुक्काम

मुक्काम करण्यासाठी सुंदरसं ठिकाण निवडलं. छोटासा पाण्याचा ओहोळ आणि जवळच गवळ्यांनीच करून ठेवलेलं तात्पुरतं आसऱ्याचं ठिकाण. झापं उडून गेलेली असली तरी जागा मोक्याची निवडून ठेवलेली मिळाली ना, आणि आमच्याकडे आमचे तंबू होतेच की छप्पर म्हणून. तंबू ठोकले. सरपण गोळा केलं. चुलीची जागा मांडलेलीच होती. रात्री निवांत गप्पा, सोबत सूप, पापड, बिर्याणी असा जंगी बेत होता.

सकाळ

सकाळ

सकाळ

घरात असतो तेव्हा सात वाजून गेले, तरी लोळत पडून अंथरुणातून बाहेर यायची इच्छा होत नाही. पण डोंगरावर पहाटेच सगळे तंबूच्या बाहेर. सूर्य नंतर येतो. मग सकाळी आन्हिकं उरकल्यावर चहा-मॅगी खाऊन सगळे गडी तयार. आता सगळे गडी म्हणजे गंमतच आहे. नाना सगळ्यात मोठे तरी सगळ्यांच्या पुढे, प्रमोदना तर मी पहिल्यांदाच भेटत होतो. ते तर आधीच कोणती तरी भटकंती करून आलेले, शेडबाळे सर रद्द झाल्याने वाइल्ड कार्ड एन्ट्री मिळवलेले. मनीष चक्क दोन दिवसांची सुट्टी काढून आलेले. विनीत म्हणजे या भटकंतीचा नियोजक, आमचे वाटाडे मामा आणि गंमत म्हणजे चालक म्हणून आलेले पण खंदे भटके लालासो. यांची गंमत वेगळीच, ती नंतर सांगतो.

कात्राबाई

दगडांची खूण आणि मागे गवळदेव

दगडांची खूण

सध्या ते तंबू वगैरे सगळं आवरून, कॅम्पसाईट व्यवस्थित पाहून, कात्राबाई कडे निघालो. पुढे इथे येणाऱ्या भटक्यांसाठी सरपणाची सोय म्हणून जवळचे कागद, पुठ्ठे हे तिथेच चुलीजवळ छपराखाली ठेवले. गवळदेव सोडलं. कात्राबाईच्या रस्त्याची वाट मळलेली आहे, ही चुकायला होणार नव्हती. त्यातून वाटेत गुराख्यांनी दगडावर दगड ठेवून मध्ये मध्ये खुणा करून ठेवलेल्या आहेतच.

आजोबा, करांडा आणि कात्राबाई तिघांनी मिळून व्यापलेला Landspace

आजूबाजूचा परिसर दिसण्यासाठी अगदी शिखराच्या टोकावरच असायला पाहिजे असं काही नव्हतं. निसर्ग प्रसन्न होता. केव्हाही नजर फिरवावी, सगळीकडे सह्याद्री देखावे नुसते वाटत होता. आपण आपल्याला पाहिजे तो घ्यावा बघायला. आजोबा, करांडा आणि कात्राबाई तिघांनी मिळून अख्खा Landspace व्यापलेला दिसला.

कात्राबाई आणि जाणारी वाट

थोड्याच वेळात कात्राबाईने दर्शन दिलेन ते उजवीकडे रतनगड वगैरे साथीला घेऊनच. कात्राबाईचा पसारा सुद्धा अफाट आहे. खिंड आणि जाणारी वाट एकदा पाहून अंदाज घेतला. खिंडीपर्यंत तरी फार चढाई वगैरे दिसली नाही.

गुरांनीही साथ दिली

गुरांना निरोप दिला

सकाळच्या उन्हाचा त्रास होत नव्हता. वाटेत मध्ये-मध्ये थोडी झाडी लागली. त्यात गुरांनीही आम्हाला साथ दिली. "कशाला नको ती कटकट आम्ही निवांत चरत असताना" अशा काहीशा भावनेनेही असेल पण त्यांनी आम्हाला पुढे जाऊ दिलं. त्यानंतर त्या वाटेवर एक सुंदरच झाड लागलं. त्याच्या सावलीत आम्ही थांबलो, तर गुरंही थांबली. "तुम्ही आमच्या मागे नको, एकदाचे पुढे जा काय ते, आमच्या मध्ये मध्ये येऊ नका" असं तर सांगत नसावेत? आम्ही त्यांचं ऐकलं, त्यांना निरोप दिला आणि तिथेच सोडून पुढे गेलो.

कात्राबाई खिंडीतील देव

इथे एक वाट कुमशेत गावात उतरते, एक वाट वर कात्राबाई माथ्यावर जाते, तर एक रतनगड किल्ल्याकडे. आम्ही खिंडीत असलेल्या देवांना नमस्कार करून कात्राबाई माथ्याकडे निघालो. वाट मळलेलीच आहे. इथेही वाटेत दगडांची लहानशी चळत मांडून ठेवलेली होती. ह्या सगळ्या गोष्टी आपण बरोबर वाटेवर आहोत याची खात्री करून देतात.

कात्राबाई माथा - मागे रतनगड, खुट्टा आणि कळसुबाई रांग

कात्राबाई माथा गाठायला फार वेळ लागत नाही खिंडीतून. अर्ध्या पाऊण तासात निवांत वर पोचलो. इथे माथ्यावरही दगडांची रास करून ठेवलेली आहे. काल पेक्षा वातावरणात आज फरक होता. थोडी अस्पष्टता होती, तरीही सुंदर परिसर दिसला. आता वेळ असल्याने फक्त भटकायचं होतं. तसंही हा किल्ला वगैरे नसल्याने अवशेष वगैरे ठराविक गोष्टींचे शोधकार्य नव्हतं.

कात्राबाईवरून मागे लागुनच करांडा आणि पलीकडे आपले नांव सार्थ करत डोकं वर काढणारा आजोबा

ज्या बाजूने आलो, ती घनचक्कर, गवळदेव आणि भैरवगडाची बाजू

हुंदडत सगळा माथा पालथा घातला. कात्राबाई माथा हा प्रचंड परिसर आहे. एका बाजूला आजोबा डोकं वर काढून होता, तर दुसरीकडे रतनगड, खुट्टा वगैरे. पाठीमागे आम्ही आलेले गवळदेव, घनचक्कर आम्हाला हात करत होते. तब्बल दीड तास फक्त कात्राबाईच्या डोक्यावर फिरत होतो आम्ही. मग मात्र झपाझप उतरतीची वाट धरली.

खाली ओढा आणि Pool दिसला

आता डोक्यातले विचार बदलले. मध्ये उगाचच काही जाणीव होत होती म्हणून खालच्या बाजूला तोंड करून भटक्यांचा ठराविक "A O", तर कधी मध्येच कोकणी "उ हूं" असे आवाज काढत होतो. अर्थात आमच्या ग्रुप मधलं पुढे कोणीच नव्हतं. सगळे मागूनच येत होते, पण उगाच एक जाणीव. तेवढ्यात पुढे खाली एक ओढा दिसला आणि त्याचं पाणी पुढे जाऊन मिनी Pool.मन तर इथेच भिजायला लागलं होतं, औपचारिकता पूर्ण करायला फक्त तिथे पोचायचं होतं. तसाही एक वाजून गेल्याने सर्वानुमते खादंती ब्रेक घ्यायचा ठरला. शेजारी पाणी असणाऱ्या ठिकाणापेक्षा अजून छान ते काय? छान सावलीत सगळं सामान ठेवलं. पाणी म्हटल्यावर कपडे घाबरतात अंगावर राहायला. ते आपसूकच बाजूला झाले. आता पाण्यात शिरणारच तेवढ्यात....

कसं होतं, आमची गाडी आम्हाला शिरपुंजे गावात सोडून कुमशेत गावात पोचणं अपेक्षित होतं आम्हाला परत घ्यायला. जे काम करण्यासाठी चालक हवा होता आणि लालासो आमच्याबरोबर चालक म्हणून आले होते. पण त्यांनाही भटकंतीची आवड, त्यामुळे ते ट्रेक करत आमच्याबरोबर गवळदेववर आले होते. आता ते हाडाचे भटके आहेत हे तर कळून चुकलं होतं, त्यामुळे आम्हालाही आनंद झाला होता ते बरोबर असल्यानं. पण गाडी? ती कशी आपोआप येणार मग कुमशेतला? गवळदेव वरून पुढचा प्रवास कात्राबाईकडे सुरू केल्यावर पुढे वाटाड्याची गरज नव्हती. वाटाड्या मामांनाही त्यांच्या शिरपुंजे गावात परत जायचं होतं, मग हे लालासो आणि वाटाडे मामा परत उलटं फिरून शिरपुंजे गावाकडे रवाना झाले होते आणि आम्ही कात्राबाईकडे मोर्चा वळवला होता. पण तरीही हे समजत नव्हतं, की आता आमच्यासाठी तर पुढचं अंतर कमीच आहे. तेव्हा कात्राबाईवर पोचून उतरून किती वेळ वाट बघायची यांची कुमशेत गावात? म्हणजे वेळ वाया जाणार ना? कारण ते ट्रेकला आले नसते, तर आमच्या आधी गाडी घेऊन पोचले असते गावात. पण आता रिव्हर्स, म्हणजे गवळदेव उतरणे, घनचक्कर चढणे, अगदीच माथ्यावर जायचं जरी टाळलं तरी पूर्ण वळसा मारून आणि भैरवगड खिंडीतून उतरून शिरपूरच्या गावात उतरणे हे करायला हवंच ना? आणि त्यानंतर मग गाडी घेऊन कुमशेत. पण मला जे इंट्युशन येत होतं कात्राबाई उतरताना, त्यामुळे या ओढ्यापर्यंत पोहोचल्यावर सुद्धा मी विशेष अश्या आवाजाचा पुकारा करत होतोच आणि काय सांगू? कुमशेत गावाच्या बाजूने आला ना प्रतिसाद.... शब्दशः फक्त आनंदाने उडी नाही मारली पाण्यात. कारण पाण्याचे कुंड खोल नव्हतं 😁 पण ओरडलोच! माझा आवाज ऐकून त्याला खालून प्रतिसाद जो दिलेला होता, तो लालासोनी. आम्ही गवळदेवला त्यांना सोडून, कात्राबाई करून इथवर येईपर्यंत हा माणूस गवळदेव वरून घनचक्कर, भैरवगड खिंड, शिरपुंजे गावात उतरून गाडी घेऊन ती कुमशेतला घेऊन आला होता. बरं ती गाडी कुमशेतला खाली लावून, तिथेच न थांबता आम्ही हाका मारत असलेला आवाज जिथे पोहोचेल, तिथपर्यंत ऑलरेडी चढून आला होता....

पाण्यात खेळ.jpg

मग काय, लवकरच आमच्या ओढ्यापर्यंत ते चढून आले. चेष्टा नाही. ह्यात आम्ही जेव्हा ही भटकंती केली, तेव्हा घनचक्करला शिड्या वगैरे लावलेल्या नव्हत्या, ज्या नंतर लावून हा रस्ता सोपा केलाय आणि कमी वेळाचा झाला आहे म्हणे. तर लालासो चढून आल्यावर मग सगळ्यांनीच सुंदर जलपरी म्हणून डुंबण्याचा आनंद घेतला. खादंती झाली आणि मळलेल्या पायवाटेवरून झपझप कुमशेत गावात पोचलो, ते सुद्धा ३च्या आधी. लालासोंनी अगदी शेवटच्या घरापर्यंत गाडी आणून लावलेली होती त्याचा आनंद वेगळाच, कारण आमची मानसिक तयारी होती अजून चालायला लागणार गाडीपर्यंत पोचायला अशी.

कुमशेत गावातून मागे कात्राबाई रांग

गाडीत सगळे बसले. नाना तर मागे हौद्यात जाऊन आडवेच झाले. या सगळ्या आनंदात लालासोंनी गाडी अशी हाणली त्या कच्च्यावरून, की एकदम "ढांम्"... या आनंदात रस्त्यावरच्या उंचवट्याकडे लक्ष गेलं नाही आणि सगळ्यांना उंचवटा लक्षात येईपर्यंत आधी डोक्याला आणि मग पार्श्वभागाला जाणवला. बसलेले सगळे चक्क जागेवर उडून परत सीटवर आपटले. आमचं सोडा, पण नाना तर मागे झोपले होते. ते सर्वांगाने आडव्या स्थितीतच फुटभर हवेत उडून परत खाली. सरळ गाडी थांबवली. सगळ्यांनी आपापली सगळी हाडं, अवयव जागेवर असल्याची खात्री करून कुमशेत सोडलं.

कोथळेचा भैरवगड

आता खरंतर मूळ नियोजन इथून तडक घरी परतायचं एवढंच होतं. पण विनीतच्या डोक्यातून एक किडा आला, की इथूनच जवळच कोथळेचा भैरवगड आहे, तो बघून जायचं का? आता असला किडा आम्ही सोडणार कसा? गाडी लगेच तिकडे वळवली. तरी चार वाजून गेले होते. आता वेळ नाही असं जरी नसलं, तरी निवांतपणा न केला तरच किल्ला पाहून होईल, असं मनात घेतल्याने त्याप्रमाणे किल्ल्याकडे निघालो.

वाटेतले देव

आता इथे येणाऱ्या सर्वांचीच ही परतायची वेळ होती, त्यामुळे आम्हाला खाली परत येणारेच लोक भेटत होते. चढत फक्त आम्हीच होतो. सुरुवात केल्यापासून थोड्याच अंतरावर अनगड देवांची ठाणी लागली. दगडावर कोरलेला देव, मग दगडांना शेंदूर फासून त्रिशूलधारी देव, यानंतर जंगलातलं जाडजूड वेली, मोठे बुंधे असलेली झाडं असं वैभव न्याहाळत वाटचाल चालू झाली.

पहिली शिडी

अर्ध्या तासातच शिड्यांपाशी आलो. इथे जुनी शिडी तशीच ठेवून जरा मोठी अशी नवीन शिडी ही बसवलेली आहे. वर पोचतानाच किल्ला म्हटल्यावर ओळखीची नजर अवशेष शोधू लागली. पाण्याची टाकी, पायऱ्या, असं बघत पुढच्या शिडी जवळ आलो. मग वर माथाच की.

गडावरील देव

पाण्याची टाकी

पाण्याची टाकी

आधी देवदर्शन घेतलं. मग टाकी बघायला लागलो. या किल्ल्यावर बाकी काहीच अवशेष नाहीत. बुरुज, दरवाजा, तोफा वगैरे. थोडक्यात एक गड पदरात पाडून गाडी जवळ आलो.

कात्राबाई उतरताना Cherry on the Top Swimming Pool.jpg

"भैरवगड ते कात्राबाई" या ऐवजी "भैरवगड ते भैरवगड" असा भैरवाला वाहून घेतल्यासारखा ट्रेक सुफळ संपूर्ण झाला. एका क्षणी पावसामुळे रद्द करावा लागतो की काय? असं होत असलेला हा ट्रेक या दोन भैरवांसोबत महाराष्ट्रातलं तीन आणि चार क्रमांकाचे शिखर चढून पाहून पूर्ण झाला. त्यात गवळदेववर मुक्काम, सगळ्याच शिखर माथ्यावरून अप्रतिम नजारे याने साज चढला. दोन दिवसाचा सगळा शीण त्या पाण्यातल्या डुंबण्यानी गेला, हे तर "Cherry on the Top" नाही का....

सुखद आठवणींशिवाय काही नेऊ नका... आणि पाऊलखुणांशिवाय काही ठेऊ नका!!!

4 comments:

  1. खूपच सुंदर माहिती व फोटो नावही माहीती नसलेले गडकिल्ले पाहू शकतो आहे तुम्ही प्रत्यक्ष पहाता व मलाही पाहायला मिळतात धन्यवाद

    ReplyDelete
  2. खूप छान लिहिलंय ओंकार जी

    ReplyDelete
  3. अप्रतिम ब्लॉग👌👌

    ReplyDelete