Saturday, June 15, 2024

किल्ले रवळ्या-जवळ्या

"रवळ्या-जवळ्या" ही नांवं ऐकून बरीच वर्षं झालेली. तेव्हा "अहि-मही" अशी राक्षसाची जोडी माहिती होती. पण ही किल्ल्यांची जोडी पहिल्यांदाच ऐकलेली. नंतर "चंदन-वंदन", "कांचन-मंचन", "अंकाई-टंकाई" अश्या जोडगोळ्या ऐकल्या आणि भेटही दिली गेली. हे रवळ्या-जवळ्या मात्र हुलकावणी देत होते. एक तर नाशकातले किल्ले पुण्याहून जाऊन पहायचे म्हणजे पटकन उठलं आणि गेलं असं होतं नाही. वेळ आणि पैसे, असा विचार करता खरं तर एकदिवसीय भटकंती परवडतही नाही. पण एकच दिवस होता आणि ह्यांचं नियोजन ठरलं. मग त्यात बदल केला नाही. एक दिवस तर एक दिवस... राहून जाण्यापेक्षा हे बरं.

"चंदन-वंदन", "कांचन-मंचन", "अंकाई-टंकाई" ह्या जोड्या म्हणजे अगदी जोड-किल्लेच आहेत. "रवळ्या-जवळ्या" ह्यांना जोड किल्ले म्हणायचं की नाही त्यावर चर्चा होऊ शकते. कारण हे इतर जोड्यांसारखे तेवढे जोडलेले नाहीत. पण एकाच पठारावर आहेत, म्हणजे दोन्ही किल्ल्यांचा पायथा, हा एक मुख्य डोंगर म्हणता येईल. दोन मदारी असलेला उंट कसा असतो, तसं काहीसं 😄

ही नांवं रांगडी वाटतात, मराठा साम्राज्याला शोभणारी. बादशाहनामा ग्रंथात ह्यांचा उल्लेख रांगडेपणा पार बाजूला राहील असा, अगदीच पिचकवणी म्हणजे रोला-जोला ह्या नावाने आहे. ह्यात मजा नाही. असो... पण हे किल्ले अलावर्दीखानाने जिंकून घेतले. शिवाजी महाराजांच्या काळात परत स्वराज्यात आले जे महाबतखानाने जिंकून स्वराज्यातून ओढून घेतले. त्याआधी दिलेरखानानेही प्रयत्न केला होतान, पण तो मोरोपंतांच्या सैन्याने हाणून पाडला होता. महाबतखानाकडून मात्र शिरस्त्याप्रमाणे पेशवेकाळात ते स्वराज्यात आले आणि नंतर इंग्रजांकडे जाऊन इतिहासात किल्लेपण संपुष्टात आलं. इंग्रजांनी इतर ठिकाणाप्रमाणे इथेही सगळ्यात आधी तोफा लावून पायऱ्या उध्वस्त केल्या.

ह्या जोडगोळीला भेट द्यायची आणि पूर्ण किल्ले फिरायचे, म्हणजे पूर्ण दिवस हाताशी हवा. मग आमच्या नेहमीच्या पद्धतीने, म्हणजे पुण्यातून रात्री निघायचं, पायथ्याला अपरात्री (की पहाटे?) ३-४ ला पोचायचं आणि थोडक्यात विश्रांती घेऊन, उजडतानाच आयुधं घेऊन तयार व्हायचं असा साधा प्लॅन. ठरलेलं सामान, offline downloaded maps, खादंतीची पुरेशी व्यवस्था असं सगळं नेहमीप्रमाणे जमा करून पुण्यातून मी चिंचवडला पोचलो आणि सगळे मिळून नाशकाकडे गाडी हाणली. ह्या जोडगोळीचं पायथ्याचं ठिकाण हे मुळाणे बारी उर्फ बाबापूर खिंड. वास्तविक मुळाणे आणि बाबापूर ही खरी पायथ्याशी गावं. आणि ह्या गावांना जोडणाऱ्या डोंगरमार्गात असलेली खिंड हे चढाईची सुरुवात करण्याचं ठिकाण.

मुळाणे बारी उर्फ बाबापूर खिंड

इथे आम्ही पहाटे ३:३० वाजता पोचलो. ह्याच खिंडीतून एका बाजूला मार्कंड्या आहे, तर दुसऱ्या बाजूला ही रवळ्या-जवळ्या, नाही, to be exact जवळ्या-रवळ्या, if taken in order! इथे खिंडीत वनखात्याने विसाव्यासाठी बांधकाम केलेलं आहे. अर्थात हे रवळ्या-जवळ्यासाठी नाही बरं. इकडे फक्त खास भटके येतात, पर्यटक नाही. पर्यटक जाणार बारीच्या दुसऱ्या बाजूला असलेल्या मार्कंड्यावर. मग खातीरदारी पण जिकडे ओढा जास्ती त्यासाठीच असणार! पण आपल्याला काय फरक पडतो 😉 खिंडीत गाडी लावली. जवळच हनुमान आमच्यासाठी आधार म्हणून सिद्ध होतेच. त्यामुळे काळजी कसली करायची? वेळ न दवडता पथाऱ्या पसरल्या आणि गुडूप झालो.

२-२:३० तास पाठ टेकली आणि उजडायच्या आत उठलो पण परत. ह्यावेळी कोणतीही रहदारी नसताना काय सुंदर दिसते ही जागा... प्रसन्न वाटतं. छानसा काळोख, खिंडीतून पलीकडे चमचमतं गांव, शांतपणा जणू "हे सारं काही आत्ता तुमचंच आहे, घ्या लुटून आनंद, जग जागं व्यायाच्या आधी" अशीच जाणीव करून देत असतो. ६:३० च्या आत आवरून सिद्ध झालो.

पाठीशी मार्कंड्या

पायथ्याच्या हनुमंताला नमस्कार करून चढाईला सुरुवात केली. एकदा सुरुवात केल्यावर आमच्या पाठीशी मार्कंड्या उभा राहिला. शब्दशः पाठीशी उभा राहिला, कारण तीच खिंड ही मार्कंड्याच्या चढाईचीही सुरुवात आहे. आम्ही पूर्वेकडे तोंड करून निघालेलो असल्याने समोरचा जवळ्यापेक्षा मागचा मार्कंड्याच सोनेरी किरणांच्या उन्हात न्हाऊन निघालेला, बघण्यासारखा दिसत होता. त्यावेळी तर माझी मार्कंड्या भेटही झालेली नव्हती आणि मार्कंड्याचं असं रूपडं तसंही त्यावर गेल्यावर दिसणार नव्हतं. मग जिथवर आलो होतो त्या पठारावरूनच फोटो घेतले. त्या मार्कंड्याच्या प्रचंड परिसराच्या तुलनेत मी पण काही कमी नाहीये बरं का... असं सांगत जणू जवळ्या आपल्या सावलीने मार्कंड्याला झाकू पाहत होता. त्या सह्याद्रीच्या राकट भांडणात आपण कशाला पडा? आम्ही आपलं त्यांच्या ह्या लुटुपटूच्या लढाईकडे सरळ दुर्लक्ष केलं. आपल्याला काय दोघेही सारखेच, नाही का?

पाठारामागे डोकावणारा जवळ्या

ताठ मान करून उभा जवळ्या

विस्तीर्ण पठार आपली घडी हळू हळू उलगडत असतानाच मागून हळूच जवळ्याने डोकावून बघितलंन. ह्या किल्ल्याच्या वाटेला लागलो आणि काही वेळातच पठार सोडून वर किल्ल्याकडे मोर्चा वळवला.

किल्ल्याच्या पोटातलं भुयार

किल्ल्याच्या वाटेवर एक भुयार आहे. काहीही गरज नसताना उगाचच त्या भुयारात जाऊन आलो. म्हणजे तसं आम्ही नेहमीच प्रत्येक गोष्ट उत्साहाने बघतोच, अर्थात धोका नसेल तरच. ह्यापुढे कड्याजवळूनच चिंचोळी वाट वरच्या बाजूला जाते. वाटवरून वर येता येता उजव्या बाजूला रवळ्या दिसत राहिला.

पलीकडे रवळ्या आणि धोडप

कातळटप्पा

इथल्या कातळटप्प्यावर तटबंदीचे अवशेष आहेत. कातळतप्पा तसा फार अवघड नाही. पण दोर असल्यास उत्तम. आम्ही तर ठरवूनच दोर नेलेला होता आणि तोही तिथेच ठेवण्यासाठी. तो लावला आणि पटकन वर चढून आलो. वारा प्रचंड होता. वातावरणही चांगलं असल्याने पलीकडे रवळ्या आणि त्याच्या मागे आपल्या खास आकारात लक्ष वेधून घेत धोडप, असं चित्र निसर्गाने मांडून ठेवलं होतंन.

बाबापूर खिंड उर्फ मुळाणेबारी, मार्कंड्या आणि वणीचा डोंगर-किल्ला

सगळ्यात आधी किल्ल्याचा माथा गाठला. वाटेवर कारवीतून वाट काढावी लागली, नक्की कोणत्या दिशेने चाललोय ह्याचा अंदाज बांधत. पण पोचलो एकदाचं! ज्या बाजूने चढाईला सुरुवात केली ती बाबापूर खिंड उर्फ मुळाणेबारीकडे नजर टाकली. पूर्ण मार्कंड्या आता उन्हात चमकत होता. मस्तकावर मार्कंडेय ऋषींचं मंदिर मोठ्या दिमाखात मिरवत होता. त्याच्या पलीकडे "इकडे पण लक्ष असुद्या बरं, साडेतीन शक्तीपिठातलं एक असं महत्व आहे माझं. साक्षात देवी सप्तशृंगी वास करते" असा वणीचा डोंगर-किल्ला. चाहुबाजूचं दृश्य बघत बसावं असं ते ठिकाण. ह्या बाजूला ही अध्यात्मिक स्थानं, तर मागच्या बाजूला भौगोलिक विविधता दर्शवणारे रवळ्या आणि धोडप रांग.

पाण्याची टाकी

मन भरलं आणि पावलं सवयीने गड फिरवू लागली. ह्या गडावर किल्लेपण दर्शवणारे अवशेष म्हणजे थोडके शिल्लक तटबंदीचे दगड आणि पाण्याची टाकी.

फोटोसाठी परत चढाई.. हाय काय, नाय काय!

गडफेरी करून परत कातळटप्प्यावर आलो. येताना दोर लावलेला असल्याने उतरताना त्रासच नव्हता. त्यात अजून काही जणंही आमच्या नंतर आलेले त्यांनी त्यांचाही दोर लावलेला होता. त्यामुळे कठीण काही राहिलंच नव्हतं. उलट खाली उतरल्यावर फक्त फोटोसाठी परत अर्ध्यात चढलो. आता ऊन चांगलंच चढायला लागलं होतं. दिवस हिवाळ्याचे असले तरी ११ वाजून गेल्याने सूर्य त्याप्रमाणेच काम चालू ठेवणार ना.. मोर्चा रवळ्याकडे वळवला.

तिवारी वस्ती आणि पाणवठा

ह्या पठारावर तिवारी लोकांची वस्ती आहे. ते मोसमी मुक्कामी असतात, इतर वेळी नाशकात स्थलांतरित झालेले आहेत. जवळ्याकडून रवळ्याकडे जाताना हे वस्तीतले लोक भेटतीलच. जवळ्या उतरायला सुरुवात केली. वाटेत त्यांची घरं लागली आणि लहानश्या पाणवठ्यावर काही लोकही दिसली. सरळ किल्ल्याच्या वाटेला लागलो. आता इथे वस्ती आहे म्हणजे त्यांची शेती किंवा जमीन असणारच. तसं कुंपणही दिसलं. रस्ता तिथूनच जातो. एक बेडं ओलांडून चालत राहिलो. गवत फार वाढलेलं असल्याने बरोबर जात आहोत ना, हा विचारही येऊन गेला. पण किल्ला समोरच होता, फार फरक पडणार नव्हता, जरा इकडे तिकडे झालो वाटेवर तरी. हळू हळू चढ लागला आणि मागे वळून पाहिल्यावर मार्कंड्या आणि वणीच्या जोडीला जवळ्याही आला.

वाटेवरच किल्ल्याच्या पोटातली पाण्याची टाकी

उध्वस्त पायऱ्या लागल्या आणि डोंगराच्या मागचं किल्लेपण समोर आलं. काही वेळातच पाण्याची टाकी पण दिसली. उन्हं डोक्यावर होतीच. बाटल्यात पाणी भरून घेतलं.

कातळटप्पा

पुढे कातळतप्पा आला. मूळ पायऱ्या आता शिल्लक नव्हत्या, तर त्यांचे उरलेले अवशेष समोर होते. त्या जरी तुटलेल्या असल्या तरी आपल्यासारख्यांना त्यावरून जायला पुरेश्या होत्या. पुढे असलेल्या पायऱ्या मात्र बऱ्यापैकी शिल्लक होत्या. पायऱ्या चढून एका छोट्याश्या फोडलेल्या कातळातूनच रस्ता वर जातो.

दरवाजा आणि शिलालेख

दरवाजाची सध्याची अवस्था

इथे एक शिलालेख आहे. तो फारसी/अरेबिकमध्ये असल्याने मी गप इमानेइतबारे फक्त फोटो काढला.

बुरुज

वर पोचलो आणि समोर एक बुरुज बघायला मिळाला. चला, आधीच्या किल्ल्यापेक्षा इथे जास्ती अवशेष पाहायला मिळत होते.

जवळ्या, मार्कंड्या आणि वणीचा डोंगर-किल्ला

धोडप रांग

आजूबाजूचा परिसर आता ईथुनही न्याहाळला. फक्त आता उन्हामुळे सकाळच्या इतका तो प्रसन्न न वाटता रुक्ष भासला.

जोड-टाकी आणि विश्रांतीसाठी सावली

अजून काही टाकी

त्यात वरती सावलीला झाडीच नव्हती. म्हणजे अजूनच रखरखाट. अवशेष पाहत पाहत पाण्याच्या टाक्यांजवळ आलो. इथे मात्र मस्त एक झाड आपली सावली जणू अमच्यासाठीच पसरून बसलेलं असावं असं वाटलं. इथे निवांत बसून थोडी विश्रांती घेतली. दुसरी जागाच कुठे होती तशी टेकायला सावलीची.. विश्रांती नंतर आजूबाजूला काही पाण्याची टाकी शोधून शोधून पाहिली. अवस्था फार चांगली दिसली नाही. गवत वाढलेलं, गाळ साचलेला आणि सफाई नसल्याने वरून मातीही पडलेली. त्यामुळे पाणी पिण्यालायक राहिलेलं नाही बऱ्याच टाक्यातलं.

दरवाजातून खालचं दृश्य

डोंगराच्या पोटातल्या गुहा

ह्या गडावर एवढेच अवशेष आहेत. त्यामुळे इथे विश्रांती घेऊन परतीचा प्रवास चालू केला. आलो त्याच वाटेवरून परत खाली उतरायला सुरुवात केली. आता पठारापर्यन्त जाताना आलेल्या वाटेनेही जाता येऊ शकत होतं, पण तसं जायचंच नव्हतं आम्हाला. मध्येच आलेली वाट सोडली आणि डावीकडची वाट पकडली. ह्या बाजूला काही गुहा कोरलेल्या आहेत. उन्हाने तापलो होतो आम्ही. त्यात आमच्याकडे निवांत वेळ होता. दुपारचे २ वाजले होते. आता काय इथून पठारावर आणि तिथूनही खाली उतरायचंच होतं. चढ लागणार नव्हता आणि दमछाक होईल असाही काही टप्पा नव्हता पुढे. सगळे निवांत पडले. चक्क १ तास तिथेच काढला आम्ही. निघाल्यावर मग मात्र २० मिनिटांत पठारावर आलो.

पठारावरून रवळ्या

पाण्याची कुंड

त्यातही आलेल्या वाटेने न जाता जवळ्याला प्रदक्षिणा मारायची असं ठरलेलं होतं. त्यामुळे आता जवळ्याला डावीकडे ठेवत जरा लांबचा रस्ता घेतला. ह्या बाजूला प्यायच्या पाण्याचं कुंड, शेजारी दगडी द्रोण हेही आहे. पाणी पिऊन भरूनही घेतलं. निवांत असल्याने वाटेत भेटलेल्या लोकांशी गप्पाही मारता आल्या. काही समाधी सदृश्य बांधकामही दिसलं.

समाधी आणि वास्तू

समाधी आणि वास्तू

खरं तर इतस्ततः पसरलेले घडीव दगड, मजबूत समाध्या अश्या गोष्टी पाहता, ह्या इथे कश्या आल्या हाही प्रश्न मनात येतच होता. अश्या गोष्टी काहीही आखणी न करता इकडे तिकडे उगाच थोडीच बांधल्या जातात? म्हणजे एक तर मूळ जागा दुसरीकडे तरी असावी आणि कशाही प्रकारे त्यांना इथवर आणलं गेलं असावं. किंवा इथेच त्यांची मूळ जागा असेल, पण आजूबाजूची जागा त्याला सुसंगत दिसत नव्हती. काहीतरी अभ्यास गरजेचा आहे ह्यावर. काही दगड तर मंदिराचे वाटले. एकूणच ह्या वास्तू पाहता, इथेच काहीतरी मोठे बांधकाम आणि आखणी करून बांधणी केलेली असणार हीच शक्यता वाटते. सध्या मात्र त्याचं मूळ स्वरूप उघड करण्यासाठी अभ्यास आणि कदाचित त्याला अनुसरून सफाई गरजेची आहे.

ह्या बाजूने त्या पठाराची दुसरी बाजूही बघता आली. जवळ्याचीही इकडून दिसणारी बाजू पाहता येत होती. भेटलेल्या गावकऱ्यांशी बोलत, नवनवीन झाडंही बघत, आम्ही निवांत चाललेलो. मध्ये मध्ये तर चक्क चरायला सोडलेल्या गुरांशीही जरा चर्चा झाली. म्हणजे त्यांना समजेना की आम्हाला कुठे जायचंय आणि आम्हाला समजेना की त्यांना कुठे यायचंय. मग नजरो ही नजरोमे बात हुई आणि आपापल्या वाटेने दुसऱ्याला त्रास न देता गेलो.

ना अनपेक्षित वळण, ना कहानीमे ट्विस्ट, ना काही विशेष घटना... साधं सरळ नियोजन, साधी सरळ भटकंती आणि साधे सरळ अनुभव... असा पद्धतशीर पण निवांत, पूर्ण अवशेषांसह पण त्याचाच आनंद घेत अशी ही जोडकिल्ल्यांची भेट वेळेत संध्याकाळी संपली. अर्थात रात्रीचा प्रवास, अपरात्री ठरलेल्या ठिकाणी पोचून एकांतात चांदण्यांच्या छपराखाली मुक्काम, उजाडायच्या आधी उठून शांतता आणि अपरिचित ठिकाणाचा अनुभव, Whole वावर is our, असंच वाटावं अश्या ठिकाणी पहाटेचा गरम चहा! भटकंती समृद्ध होतेच की...

नाशकातल्या भेट देण्याचा राहिलेल्या किल्ल्यांच्या यादीतील दोन किल्ले कमी झाले आणि तेवढ्याच मापाचं समाधान खात्यात जमा झालं!

सुखद आठवणींशिवाय काही नेऊ नका... आणि पाऊलखुणांशिवाय काही ठेऊ नका!!!

5 comments:

  1. ओंकार, खूप छान लिहिले आहेस .जणू तुझ्याबरोबर माझीही भटकंती झाली असेच वाटले.मस्तच

    ReplyDelete
  2. खूपच छान.. व्यवस्थित इत्थंभूत माहिती.. मस्त!

    - विशाल गाडीलकर, 9326995236

    ReplyDelete
  3. फारच सुंदर लेखन ! मस्त झालाय ब्लॉग!

    ReplyDelete