Thursday, December 27, 2012

हडसर (पर्वतगड) -निमगिरी-चावंड (प्रसन्नगड) II

        सह्याद्रीला औरंगजेब का घाबरत होता त्याचे उदाहरण सह्याद्री देत होता. गडाच्या पाठीमागे असलेला परिसर चारही बाजूनी डोंगरांनी घेरलेला होता. ज्याच्या ताब्यात किल्ले, महाराष्ट्र त्याचा हे काही चुकीचे नव्हते. कोणत्याही गडावर पोचलो कि महाराज, त्यांचे जीवाला जीव देणारा मावळे, हेर यांच्याबरोबर गडांची ठिकाणे ठरवणारे, हेरणारे पथक यांची आठवण निघतेच निघते. कौतुक करायला शब्द पुरत नाहीत.
        गडावर तर पोचलो होतो. आता काम बाकी होते ते मुक्कामाची, जेवणाची सोय करण्याजोगे ठिकाण शोधण्याचे. गडावर बुरुज, बालेकिल्ला, माची, सदर, अंबरखाना, दारूगोळा-कोठार काहीही नाहीये. पण ३ गुहा आहेत. अगदी ५०० sq. ft. च्या 1RKआहेत. ;) पैकी २ गुहात पाणी साचलेले, अपुरी जागा, थोडक्यात राहण्यास अयोग्य. अर्थात तिसऱ्या गुहेतही फारशी चांगली परिस्तिथी नव्हती पण राहण्यासारखी जागा वाटत होती. त्यात प्रकाश मारण्यावर एक बादली दिसली. Hall मध्ये गुरे राहून गेल्याचे अवशेषही होते. कदाचित कुणी गुराखी दावणीला गुरे बांधून इथे ठेवत असावा, तशी सोय दिसत होती. संपूर्ण गडाला प्रदक्षिणा मारून झाली. पाण्याची ४-५ टाकी दिसली. २ टाक्यातले पाणी शुद्ध करून पिण्यायोग्य होते. शेकोटी आणि चुलीसाठी मुबलक जळण होते. गडावर Open-ceiling देवळाशेजारी सुबोध आणि माष्टर शेफ समीर चूल मांडत होते. गुहेमध्ये शिरून मी पाण्याची बादली हस्तगत केलीच होती, तिथे कुण्या परोपकारी ट्रेकर/गावकऱ्याने ठेवलेली काडेपेटी  अन् रॉकेलसहित "भुत्या" (बाटलीत रॉकेल आणि तयार केलेली चिंध्यांची वात घालून केलेला दिवा), केरसुणी या वस्तू ठेवल्या होत्या. त्यांचा मान राखून त्या वस्तू वापरासाठी घेतल्या. रॉकेल आम्हीही आणले होते पण हि रेडीमेड वस्तू नक्कीच उपयोगाला येणार होती. सुबोध आणि माष्टर शेफनी चूल पेटवून चहासाठी आधणही ठेवले होते. सुबोधनी त्याच्यासाठी दूध घेतल्यावर आम्ही चहारूपी अमृत प्यायलो. अंधार पडत चालला होता. सुंदर चांदणे पडले होते. पोर्णिमा होऊन तीनच दिवस झाल्याने चांदोबाची वाट बघत होतो. आमच्या कुकनी पेशल टोमॅटो सूप बनवले. गरम-गरम सूप पोटात गेल्यावर शेफनी खिचडीही केली. एकदम मस्त. मग अर्थातच गप्पा. एव्हाना चांदोबांनीही आम्हाला पहिले होते. शेकोटी साठी आधीच हेरून ठेवलेली लाकडं गोळा केली. अपेक्षेपेक्षा थंडी कमी जाणवत होती, पण तरीही तारांगणाखाली किल्ल्यावर, चंद्रप्रकाशात शेकोटीची मजा काही औरच! शिवाय गुहेत जागा मिळाली नसल्याने बाहेरच झोपत होतो. आम्ही अतिक्रमण केले असे वाटून एखाद्या स्थानिक श्वापदाला राग येऊन आमची विचारपूस करण्यास ते येऊ नये यासाठीही शेकोटी उपयोगी पडणार होती.


        झोपायला ११ वाजलेच पण सुंदर झोप लागली. सगळेच दमले होते त्यामुळे काही permanent भोंग्यांबरोबरच बाकीचे temporary भोंगेही चालू होते.
        शेकोटी विझली होती. कोणत्याही प्रकारच्या श्वापदाने आमची चौकशी करण्याचा त्रास घेतला नव्हता थंडीत रविवारी सकाळी १० च्या आधी पांघरुणातून तोंडही बाहेर काढायचे कष्ट न घेणारेसुद्धा अशा वातावरणात लवकर उठतात. आम्ही ६लाच उठून बसलो होतो. सूर्यनारायणाच्या आधी उठून त्याचेच स्वागत करण्याचा योग फार कमी वेळा येत असतो. ;) सगळ्यांनी आपापली तोंडं घुसळून घेतली. उगवत्या सूर्यनारायणाच्या साक्षीने विधी आटपून घेतले. चूल पेटवली, चहा!! सूर्योदयाच्या वेळी चुलीवर केलेला चहा. मस्तच... समीर, सुबोध, प्रणव, निखिल ने गरम-गरम मॅगी , मी आणि आनंदने उपासाकारणे बटाट्याचा चिवडा नि केळ्याचे वेफर्स...
        अंघोळीची गोळी घेतली. बाटल्या भरून घेतल्या, क्लोरिनचे २-२ थेंब जलशुद्धीप्रीत्यर्थं त्यात टाकले. केरसुणी, भूत्या, बादली ई. साहित्य देवळात नीट आडोशाला ठेवले. महाराजांचा जयजयकार करून "निमगिरी" उतरायला लागलो.
        पायऱ्यांचा पहिला टप्पा झाला. आलेल्या रस्त्याने उतरणार नव्हतोच, पायऱ्या-मार्ग सोडून दिला आणि दोन डोंगरांच्या मधल्या बेचक्यातून उतरायला लागलो. समीर-प्रणव पुढे, मी-आनंद मधे आणि सुबोघ-निखिल मागे. उन फुकट घालवायचेच नाही असे ठरवलेले असल्यासारखे पूर्णपणे सावली-विरहित वाटेवरून उतरत होतो. पुढच्या आणि मागच्या दोन्ही जोडगोळ्यांचा मेळ राखत पुढे जात होतो. अचानक दगड पडत असल्याचा आवाज आला. आमच्या वाटेवरच वरून कड्याचे दगड पडत होते. समीर-प्रणव पुढे होते, त्यांच्या आणि आमच्यामधून उन्हाने तापून तडकलेले दगडाचे तुकडे धडधडत खाली निघून गेले. त्याबाजूला लक्ष ठेवत पटापट पावले पुढे टाकत होतो. मधेच मागच्या जोडगोळीला direction देत होतो. अखेर गाड्या लावलेल्या देवळाशी पोचलो. Energelयुक्त पाण्याची अख्खी बाटली सगळ्यांनी मिळून घशाखाली उतरवली. गाड्या चालू करणार तोच माझ्या गाडीची डिकी उघडी असल्याचे लक्षात आले. कुलूप तोडलेले होते. गाडीचे कागद सोडून toolkit वगैरे गायब होते. गाडीचे कागद आणि पेट्रोल शिल्लक होते हे उपकार समजून घेऊन "चावंड" च्या दिशेने निघालो.
        वाटेत "नाणेघाट" आम्हाला खुणावत होता पण तो करून मग चावंडसाठी वेळ पुरणार नव्हता. चावंडची दिशा पकडली. तलावाला वळसा घालून ३० एक किमीच्या खराब रस्त्यानंतर चावंड दिसला. एका घराजवळ गाड्या लावल्या. गावातल्याच एका घरात बॅगा सुपूर्द करून पाण्याच्या २-३ बाटल्या बरोबर ठेवून ११:५५ च्या मुहूर्तावर चावंड चढायला प्रारंभ केला. मुबलक उपलब्ध असलेल्या उन्हाचा उपभोग घेतच होतो. वर पाणी आहे कि नाही याची कल्पना नसल्याने पाणी जपून वापरत होतो. 

        जवळ-जवळ ३०-४० मिनिटांनी सावली मिळाली. दगडातल्या अत्यंत अरुंद, एक-एक पाउल मावेल अश्या पायऱ्या, त्याशेजारी ग्रील म्हणून लावलेले आणि आता मोडून पडलेले लोखंडाचे तुकडे दिसले. पायऱ्यांना लागून कातळावर मजबूत लोखंडाची तार बांधलेली होती. तारेला धरून त्या पायऱ्यांनी वर निघालो. ""जंबुरका " जातीची एक तोफ वरती पुरून ठेवलेली आहे, ती सापडली (जातीपातीतून तोफेचीही सुटका नाही तर!!!) पायऱ्या रुंद होत गेल्या. शेवटी-शेवटी तर ८-१० फूट आडव्या पायऱ्या होत्या. वर पोचताच दगडात कोरलेल्या गणरायाने आमचे स्वागत केले. २ किल्ल्यानंतर ह्यावर प्रथम गडाचा दरवाजा दिसला. जरावेळ सावलीत बसल्यावर फ्रेश वाटले. समीर-प्रणव पुढे गेलेच होते. मी आणि आनंदने स्पीड वाढवला, वर जाणाऱ्या मंदिराच्या पायवाटेने निघालो. मंदिरात पोचलो. देवाची ख्याली-खुशाली विचारून घेतली. आनंद-निखिल-सुबोध मागे होते. मी प्रणव-समीर ला शोधून काढले. आम्ही तिघे मिळून "सात टाकी सांगा कुणी पहिली..." करत हिंडू लागलो. ह्या गडावर ७ टाकी आहेत असे गावकऱ्यांनी सांगितले होते.
        शनिवार-रविवार २ दिवस सुट्टी मिळत असताना घरी तंगड्या वर करून पिक्चर बघत लोळत पडायचे सोडून मी, समीर आणि प्रणव खांद्यापर्यंत वाढलेल्या गवतातून हे नसते धंदे करत हिंडत होतो. असते एकेकाला हौस (कि खाज?)...
        वेळेचे महत्व लक्षात घेऊन दरवाजाकडे परत फिरलो, सगळे वाटच बघत होते. आम्ही उगाचच वर काहीतरी लय भारी बघितलं आणि ह्यांनी ते miss केलं असं भासवायचा प्रयत्न करून बघितला.
        पुनःश्च गणरायाला नमस्कार करून त्याचा निरोप घेतला आणि पायऱ्या उतरायला सुरुवात केली. आळीपाळीने फोटो काढून घेतले. चढायला लागलेल्या पेक्षा निम्म्या वेळात खाली आलो सुद्धा. बॅगा ठेवलेल्या घरातल्या काकांना चिवड्याची पुडी देऊन थोडं ओझं कमी केलं आणि समाधान मिळवलं. जवळच बोरिंग होतं त्याखाली डोकं घातलं. ते थंड झाल्यावर बाटल्या भरून घेतल्या, पाणी प्यायले आणि जुन्नरच्या दिशेने रवाना झालो. वाटेत थांबण्याचे कारणच नव्हते. जुन्नरच्या हॉटेलात थांबलो. त्यापुढचा stop direct पुरोहित मधे चहासाठी. नंतर थेट पुणे.
        किल्ले मुळातच आडवळणाचे not well-known, non-popular वगैरे निवडलेले होते. समीरमुळे आधीच well-planned असलेला ट्रेक सगळ्यांच्या साथीने सुंदर झाला. सिमेंटच्या जंगलापासून दूऽऽऽर चांदण्यांच्या छपराखाली शांत वातावरणात एक रात्र किल्ल्यावर अनुभवायला मिळाली. प्रत्येक ट्रेक मधे खूप काही शिकायला मिळते, ज्ञानात भर पडते, चुका समजतात. त्या होऊ नयेत यासाठी काय काळजी घ्यावी हेही समजते. "पन्हाळगड ते विशाळगड" सारख्या ट्रेक मधून आपण कुठे आहोत हे लक्षात येते. सोमवार ते शुक्रवार सरकत्या खुर्चीत, एसी मधे बसल्यानंतर अश्या ट्रेकमुळे आपली जागा कळते. प्रत्येक ट्रेक मधे महाराज, मावळे, इतिहास डोळ्यासमोर येतो. कधी उंच-उंच कडे, खडे कातळ तर कधी छोटासाच पण दुर्गम किल्ला.. हा सह्याद्री, आपल्याला आपल्या खुजेपणाची जाणीव करून देतो आणि इतिहासासमोर, महाराजांसमोर, मावळ्यांसमोर आपणहूनच आपण नतमस्तक होतो.....

हडसर (पर्वतगड) -निमगिरी-चावंड (प्रसन्नगड) I

"शनिवारी काय करतोयस?" सुबोधच्या प्रश्नावरून काहीतरी बेत शिजला असावा याची कल्पना आलीच. "हडसर-निमगिरी-चावंड मारायचाय".
"मी नक्की!" मी.
        प्रणव, निखिल, सुबोध, समीर आणि मी. आनंद पण in झाल्याने ६ जण आणि ३ गाड्या. २ दिवसाचा ट्रेक असल्याने थोडी तयारी करावी लागणार होती. डाळ-तांदूळ, गोळ्या-बिस्किटं, चिवडा, Maggie पाकिटं आणि माझी, आनंदची संकष्टी असल्याने बटाट्याचा चिवडा वगैरे खाऊ, emergencyची औषधे, अंथरून पांघरून, जेवण बनवण्यासाठी साहित्य ई.ई. तयारी सगळ्यांनी मिळून केली.
        शनिवारी ९ च्या आधी न उठणारा मी सव्वा ५ ला शनिवार वाड्याजवळ आनंदची वाट बघत होतो. नाशिक फाट्याजवळ समीर आणि प्रणव येऊन मिळाले. मोशी फाट्याजवळ सुबोध, निखिल. एकदा पेट्रोल भरायला थांबलो आणि मग थेट नारायणगांव. हात थंडीने बधीर झाले होते, गाडीच्या गरम सायलेन्सरला हात धरून ठेवला असता तरी जाणीव झाली नसती. अर्थात मिसळ-चहाला पर्यायाच नव्हता. मिसळ संपता-संपता कधीतरी चवीची जाणीव झाली, तोपर्यंत चवीकडे लक्षच गेले नव्हते. मिसळीनंतर चहा नाही घेतला तर foul धरला जातो, त्यामुळे तो ओघाओघाने झालाच. उदरंभरणं झाल्यावर जुन्नरच्या दिशेला लागलो. डाव्या बाजूला किल्ले शिवनेरी आम्हाला जुन्नर जवळ आल्याचे सांगू लागला. त्याची ख्याली-खुशाली तिथूनच पुसून महाराजांच्या पुतळ्याला मुजरा करून उजवीकडच्या रस्त्याला लागलो.
        पुण्यापासून साधारण ११० किमीवर हडसर गांव लागले. रस्ता पण ठीक ठाक होता. सव्वा १० वाजले होते. गावकऱ्यांना वाट विचारून गडाकडे कुच केली. डाव्या बाजूला हडसर काळ्या दगडाची निधडी छाती काढून दाखवत होता. आम्हीही डोक्यावर येत चाललेल्या सूर्याच्या उन्हात वाट काढत होतो. सुरुवातीलाच असलेल्या देवळाला वळसा घालून गुरं चारायला आलेल्या गावकऱ्यांकडून पायवाटेची खात्री करून घेतली आणि उगाचच इकडचे-तिकडचे फोटो काढत एका खड्या कातळाशी पोचलो. मालक (सुबोध), निखिल आणि आनंद यायचे असल्याने थोडी विश्रांती घेतली. कॅमेरांना फोटो काढावेसे वाटत होते, आम्ही त्यांना मदत केली. समोरचा काळाकभिन्न खडक आमच्याकडे बघत होता, त्याला "मस्ती" म्हणून आव्हान आम्ही देणार नव्हतो. कातळात लोखंडी पहारीचे काही तुकडे ठोकलेले होते. दुसरी कोणतीही वाट नाही ह्याची खात्री झाल्यावर त्या कातळाचा अंदाज घ्यायला सुरुवात केली. त्यावर पाय देण्यासाठी ठराविक अंतरावर खाचा मारलेल्या होत्या. दोरीशिवाय चढणे अशक्य नसले तरी उतरणे नक्की अवघड असणार होते.

        कोणत्याही ट्रेक ला जायचे, तेही "पर्यटनस्थळ" प्रकारात न मोडणाऱ्या, म्हणजे नीट माहिती ही घ्यावीच लागते. हडसर च्या माहितीत मात्र हा खडा कातळ नवीनच होता. ढाक-भैरीची आठवण झाली नसती तरच नवल. उतरल्यावर त्यावर चर्चाही होणारच होती, इथे दोर, बांबू, काठ्या काहीही नव्हते. विचार-विनिमय झाल्यावर प्रयत्न करायचे ठरले. प्रत्येक पावलागणिक अंदाज घेतला जात होता. पहारीचे तुकडे आणि पाय ठेवायला खाचा अगदी योग्य प्रमाणात होत्या. माझ्यासारख्या कमी उंचीच्या माणसालाही अशक्य कॅटेगरीतल्या नव्हत्या. फक्त प्रयत्न थोडे जास्ती लागणार होते. हाताची पकड मजबूत असल्याशिवाय पाय उचलणे मूर्खपणाचे ठरले असते. कातळ ८५ अंशात चढायचा होता. तो पार झाल्यावर गुहा लागली. लगेच कॅमेरे सरसावले गेले. खालून येणाऱ्यांचे फोटो काढत त्यांना direction देत होतो. आम्ही हुशार असल्याने आमच्या बॅगा खाली गावातच एका घरी ठेवल्या होत्या, नाहीतर हा कातळ चढणे शक्यच नव्हते. निखीलानंद मात्र कातळावर येण्यासाठी confident वाटत नव्हते. आमच्याकडे दोर वगैरे काही नव्हते, मग निखिल गाड्यांकडे परत गेला आणि आम्ही पुढचा रस्ता बघायला लागलो. अजून एक कातळ आमच्यासमोर उभा होता पण तो कमी उंच आणि ५०-६० अंशातच होता. तो चढून गेल्यावर मात्र हनुमानाचे देऊळ, २-४ पाण्याची छोटी टाकी दिसली. एका देऊळ सदृश जागेत बैल किंवा तत्सम प्राण्याच्या हाडांचा सापळाहि दिसला. वरच्या बाजूला टेकडीवजा जागेवर गुरे दिसली आणि "खड्या कातळाबद्दल" काही का नव्हते वाचले ते लक्षात आले. गुरं होती त्याअर्थी सरळ चालत येण्याजोगी दुसरी वाटही होती. लगेच शोधकार्य सुरु झाले, खालच्या बाजूला एक ग्रुप त्या वाटेच्या दिशेने जातानाही दिसला पण ती वाट फार लांबची वाटत होती. जरा वेळाने सोप्या आणि लांबच्या वाटेपेक्षा जवळची आणि कठीण वाट बरी वाटली. मग पुनःश्च त्या कातळाकडे नाघालो. सोप्या आणि ६० अंशातल्या त्या कातळावरून उतरताना माझ्या कमरेच्या पट्ट्याला अडकवलेल्या कव्हर मधून कॅमेरा पडताना पहिला आणि तो गवतात कसा अदृश्य होतो हे बघण्यापलीकडे मी काहीही हालचाल केली नाही. तसा जर प्रयत्न केला असता तर ८५ अंशातला तो खडक उतरण्याचे कष्ट वाचले असते अन् उरलेल्या ४ जणांना मला खांद्यावरून खाली न्यावे लागले असते. एक-एक करून शांतपणे दुसराही खडक एकमेकांना direction देत उतरलो, मग मात्र कॅमेराकडे धाव घेतली. त्यातले cell पडून गेले होते आणि त्यावरचे कव्हरही गायब होते. सुदैवाने कॅमेरा आणि लेन्सचेही तुकडे झाले नव्हते ह्यात समाधान मानून झपझप हडसर उतरलो. १२:४५ झाले होते. बोअरिंग शोधून डोक्यावर पाणी मारून घेतले. दुसरे पाणी उपलब्ध असल्याने ह्या पाण्यावर "पिण्यास अयोग्य" असा शेरा मारून जेवणाची तयारी करू लागलो. तेव्हा संध्याकाळनंतर कोणते पाणी प्यावे लागणार आहे याची कल्पना नव्हती.
        पराठे वगैरे नाशवंत पदार्थांवर ताव मारला, विहिरीचे सुंदर पाणी प्यायलो. वामकुक्षी घेण्यास वेळ नव्हता म्हणून सावलीत १० मिनिटं बसून निमगिरीच्या दिशेने गाड्या हाकलल्या.
        रस्ता प्रचंड खराब होता आणि शेवटपर्यंत खराबच होत गेला. १३ किमी वर निमगिरीचा पायथा लागला. खूप वेळ शिल्लक असल्याने निमगिरी मारून चावंड वर मुक्काम करू असे विचार आम्हा वीरांच्या मनात आले, म्हणजे जड sack वर न्यायला नकोत खाली उतरल्यावर परत घेऊ असाही विचार होता. पण एक तर निमिगिरीवर जायला आणि उतरायला किती वेळ लागेल हेही माहित नव्हते. समजा, रात्र पडायच्या आत खाली आलो असतो तरी जेवण झाल्याशिवाय चावंडवर उजेडात जाणे शक्य होणारच नव्हते. Head-torch आणि चंद्राच्या प्रकाशात चावंडवर गेलोही असतो तरी वर राहायला जागा आहे कि नाही याची शाश्वती नव्हती. सरतेशेवटी sack चे ओझे वर न्यायचे नंतर वेळ आणि शक्ती यावर पुढचा बेत करायचा असे ठरले. गाड्या व्यवस्थित रस्त्याच्या बाजूला लाऊन चढाईला सुरुवात केली. उन अजिबात कमी झाले नव्हते. एका गावकरी मुलाने मार्ग दाखवला आणि झपझप पावले पडू लागली. सर्वात पुढे समीर होता आणि त्याच्या मागे सुबोध. अचानक सुबोध थांबला, समीर एका सापाजवळून पुढे गेला होता. लगेचच P510, SX40 वगैरे बाहेर आले. 
 तो छोटा अजगर असावा. नाईलाजाने त्याला गुडबाय करून पुढे चालू लागलो. सकाळपासून जरासुद्धा उन फुकट घालवलेले नव्हते. वाटेवर एखादेही सावलीचे ठिकाण नव्हते. sack चे ओझे होतेच. पुढे समीर, प्रणव, मध्ये मी, आनंद आणि मागे सुबोघ, निखिल असे चालत होतो. सावली सापडल्यावर थांबू असे मनाशी ठरवत चाललो होतो. शेवटी निमगिरी डोंगरांच्या बेचक्यात सावली दिसली. उजवीकडे किल्ल्यावर जाणाऱ्या पायऱ्याही दिसल्या. १०-१५ मिनिटं सगळ्यांनी विश्रांती घेतली, Energel घालून पाणीही प्यायलो आणि परत सुरुवात केली. "पायऱ्या" हाच धोपटमार्ग असणार हा विचार पक्का असल्याने लगेचच उंच-उंच पायऱ्या चढायला सुरुवात केली. दमछाक करणाऱ्या पायऱ्या असल्या तरी अरुंद आणि धोकादायक नव्हत्या. एक भाग मात्र अवघड लागला, तो अवघड झाला होता तो पाय टिकू न देणाऱ्या सुक्या गवतामुळे आणि पाठीवरील sack मुळे. त्यात उंचीचा प्रश्न येत असल्याने मी मला सोयीस्कर वाट बघत होतो. त्यातच अडकलो आणि sack सह तो भाग पार करता येणार नाही अशी खात्री झाली. sack पुढे देऊन मी पलीकडे पोचलो. उतरताना कसरत होणार होती. पायऱ्यांचा टप्पा संपला आणि बाजूच्या निमगिरीच्या जुळ्या डोंगरावर जाण्याचा रस्ता नि पायऱ्या दिसल्या. तिकडे काहीच बघण्यासारखे नसल्याने जाणारच नव्हतो परंतु ज्या बेचक्यात सावलीसाठी बसलो होतो तिथून वर येणारी पायवाट दिसली. पायऱ्यांच्या पहिल्या टप्प्यापेक्षा बरी दिसत्ये असा विचार करून उतरतानासाठी तीच निश्चित केली. पायऱ्यांचा दुसरा टप्पा पार करून वर पोचलो.
क्रमशः

Saturday, December 22, 2012

स्मारक

कोकणातली माडा-पोफळींनी भरलेली बाग. आबुराव आणि बाबुराव दुपारचे जेवण करून चंची काढून तंबाखू मळत आहेत. समोर "संध्याकाळ", "कोंकण टाईम्स" वगैरे पेपर पडलेत.

आ.रा. (सुपारी कातरत): बाब्या, ह्ये पायलं का फेपरात?
बा.रा.: मंग तर, त्याशिवाय दिवस सुरु होत नाय आपला.
आ.रा.: चित्र नव्हं, वाचत बी जा जरा.
बा.रा.: काय हाय? त्ये होय.. शेजारच्या वाडीतून परवा लोकांना घेऊन जात होते मुंबैला, ऱ्हायाला, खायला बी देनार व्हते, (अंगठा तोंडाकडे नेत, हळू आवाजात) ह्याची पण सोय व्हती. म्हने कोनाच्या तरी मागनं "मीलालीच पायजे" एवडच वरडायचं.
आ.रा.: पल्याडच्या वाडीतली पण मुंबैला गेली व्हती, कसल्याश्या पार्कात हुभं ऱ्हायाचं व्हतं आळीपाळीनं कशाभोवती. (ओठांच्या मागे तंबाखूची गोळी सारत आ.रा. बोलले.)
बा.रा.: फुकटची मानसं निस्ती. त्ये मारू देत, ह्ये ऐकलं का? त्यो पोष्टातला गन्या सांगत व्हता, पेपरात आलंय कि इंदू मिल वर बाबासाहेबांचं कायसं बांधनार हायेत, आणि शाहू मिल वर शाहू म्हराजांचं.
आ.रा.: कायसं न्हाय रे, स्मारक. म्हायत्ये मला. (एक पिचकारी आ.रा. बोलले) मोठ्या लोकांचं बांधतात तसं. लय पैशे देऊन मोठ्ठा पुतळा करतात.
बा.रा.: मंग?
आ.रा.: मंग काय? कधीतरी लोक जातात तिथं, त्याची पूजा-बिजा करतात, हार घालतात. लय मोठी मानसं ती.
बा.रा.: आपन जायचं का बगायला?
आ.रा.: पैशे काय झाडाला लागले व्हय हिथं?
बा.रा.: वेडा का काय? (तोंडातला ऐवज पचकन थुंकत) फुकट! पल्याडच्या वाडीतली लोकं फुकट जातात कोकण रेल्वेनं. लय लोकं जातात, आरडा-ओरडा करायचा मंग ऐशीतबी मिलते जागा.
आ.रा.: ऐशी? मंग आपल्या हिथंच करू कि तसलं.. मिल हाये का आपल्या गावात?
बा.रा.: ठेल्ये बा नं. माळावर जागा हाय पाटलाच्या घराशेजारी, पन कोन जात न्हाय तिकडं म्हापुरुष येतो म्हने रातच्याला. म्या पन बगीतलाय दिवा लागलेला.
आ.रा.: लय ब्येस, सकाळच्याला नसतोय न तो, तेवाच जाऊ आनी. घाबर्तो कशाला? "घड्याळ" बरोब्बर वेळ दाखवत असताना घाबरायचं व्हय... शालेतले "एरकुंडवार" मास्तर गेले बग गुदस्ताला, त्यांचंच बांदू.
बा.रा.: अल्याड-पल्याडच्या वाडीतली सगळीच पोरं शिकत व्हती कि त्यांच्याकडं, लय पोरं येतील.
आ.रा.: ह्यातली शिकलेली पोरं मुंबैला पन हायेत, ती बी येतील. पण पैका?
बा.रा.: अरे मास्तरांनी शिकवलेली बरीच पोरं निळा, हिरवा, भगवा अन् काळा-पांडरा कोट घालून फिरतात. शिरीमंत हायेत ती. त्यांनी नाय दिला पैका तर चार-चौगात लाज जाईल त्यांची. देतीलच ते.
आ.रा.: चालल, जागाबी पडूनच हाये निस्ती. गावात रस्ते बी न्हायीत, फोन बी चालत न्हाईत. पुतळा ठेवला कि मंत्री आनु बोलावून हिथं. शेमकारांचा बन्या हाये नवं का मंत्रालयात... रस्ते व्हतील आनी फोन बी चालू व्हतील.
बा.रा.: उद्या फेपरला बातमी द्यायची मंग... "सोनवाडीत माननीय एरकुंडवार मास्तरांचे स्मारक झालेच पाहिजे" आनी त्यापायी सर्वांनी मुंबैला जायचे मोर्चा घेऊन. अल्याड-पल्याडच्या वाडीतली पोरं येतील सगली फुकटात जायचं मुंबैला म्हनून.
आ.रा.: होय होय, आत्ताच वेल हाये, गंगा व्हायला लागली कि हात धून घ्यायचे असतात.
बा.रा.: कोन म्हनतं सरकारकडं पैका नाय, स्मारकं बांधायला पैका हाय. कोन म्हनतं जमीन नाय.. हट्... मुंबैला पन जमीन हाय स्मारकासाठी फुकट वाटायला.... सगलं मीलतं, फकस्त पाटीवर मदतीचा "हात" हवा.

तोंडात तंबाखूची नवीन गोळी भरत आ.रा. आणि बा.रा. शिंपणं काढायला निघून गेले.

Monday, August 6, 2012

Kille Malhargad (AKA Kille Soneri)

Fort:
Kille Malhargad (AKA Kille Soneri)
किल्ले मल्हारगड उर्फ किल्ले सोनेरी

Difficulty:
Very Easy (शुरू होते हि खतम होने वाला ;))

What is there to see:
The fort is still in good condition.
Temples of Lord Shiv & Khandoba (Malhar)
2 wells (dry)
2 water tanks (no water inside)
There is Panse wada at Soneri Village.

How to reach:
Fort is about 30-35 KM from Pune.
There are 2 ways:
1. Pune - Hadapsar - (Take right) Dive Ghat - Saswad - (take left) Soneri Village
2. Pune - Hadapsar - (Take right) Dive Ghat - Zendewadi

Notes & points:
Carry your food along with you. No food & drinkable water available on fort.
Need just 30 minutes to reach on top of fort & about 45 min to see whole fort.
(Photo-session takes time ;))

History:

Snaps:

Wednesday, August 1, 2012

तिस-या फाळणीच्या दिशेने...

"तिस-या फाळणीच्या दिशेने!" आजच्या म.टा. मध्ये हा लेख आलाय.
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/15300939.cms

गेल्या काही दिवसांपासून आसामशी संबंधित ज्या काही बातम्या समोर येत आहेत त्याबाबत हा लेख आहे.
त्यातील काही मुद्दे:
१. कोकराझार जिल्ह्यातील बोडो आदिवासी व मुस्लिम समुदाय यांच्यातील संघर्षात कालच्या ६ आणि १९ जुलै रोजी दोन अल्पसंख्याक व्यक्तींची हत्या करण्यात आली. त्यास प्रत्युत्तर म्हणून २० जुलै रोजी ' बोडो लिबरेशन टायगर्स ' च्या चार माजी सदस्यांना निर्घृणपणे मारण्यात आले
२. गोसाई गावाच्या सरहद्दीत हावरियापेठ हे एक गाव आहे. या गावात कालिमाता मंदिराच्या परिसरात घुसखोरांनी मदरशासाठी बेकायदेशीर प्रसाधनगृह बांधण्याचा जबरदस्तीने प्रयत्न केला. याच्या विरोधात दोन बंगाली तरुणांच्या नेतृत्वाखाली गावकरी एकत्र आले. या तरुणांची हत्या झाली.
३. यानंतर तीन महिन्यांपूर्वी , बाजारात झालेल्या छोट्या वादंगातून गोसाई गावात बोडो आदिवासींची घरे जाळण्यात आली. या घटनांमागे ' मुस्लिम युनायटेड लिबरेशन फ्रंट ऑफ आसाम ' ( एमयूएलएफए) व ' ऑल मायनॉरिटी स्टुडंस् युनियन ' ( एएम्एसयू) या मूलतत्त्ववादी संघटनांचा हात आहे.
शिवाय ' ऑल बोडोलँड मायनॉरिटी स्टुडंस् युनियन ' ( एएम्एसयू) ही संघटना दंगलीमागील मुख्य दोषी असल्याचे अधिकृत सूत्रांचे मत आहे.
४. कोकराझार येथील घटनेत फकिराग्राम येथील वनखात्याच्या जमिनीवर घुसखोरांनी आक्रमण केले व त्यावर इदगाहचा नामफलकही लावला. एबीएमएसयू या संघटनेने मुस्लिम समुदायास जमवून स्थानिक लोकांविरुद्ध आंदोलन सुरू केले.
५. १९७१नंतर आसाममध्ये प्रचंड प्रमाणात बांगलादेशातून घुसखोरी झाली.
६. एच. के. बोरपूजारी हे एक नामवंत इतिहासतज्ज्ञ. त्यांनी १९९८मध्ये ' नॉर्थ इस्ट इंडिया : प्रॉब्लेम्स , पॉलिसिज अँड प्रॉस्पेक्ट्स ' या पुस्तकात पुराव्यानिशी हे सिद्ध केले आहे की बांगलादेशी घुसखोरांनी बोडोलँडमधील बोडोंच्या जमिनी व वनजमिनी बळकावण्याची पद्धतशीर योजना केली असून बोडो व घुसखोरांमधील तणावाचे ते एक मुख्य कारण आहे. आसाममधील वाढती बेरोजगारीही , घुसखोरांनी स्थानिकांच्या उद्योगधंद्यावर मिळवलेल्या कबजामुळे निर्माण झाल्याचा त्यांनी निष्कर्ष काढला आहे. राज्य सरकार व केंद्र सरकारला ही समस्या सोडविण्याची इच्छाशक्ती नाही ; याचे कारण त्यांचे राजकीय हितसंबंध आड येतात.
७. सिल्हेट जिल्हा यापूर्वीच आसामपासून वेगळा झाला आहे


सगळे मुद्दे म.टा. मधले Copy-Paste केले आहेत. दुर्दैवाने ह्या भागाच्या इतिहासाची काहीच माहिती नव्हती आणि नाहीये.
वरील मुद्द्यावरून खूप प्रश्न समोर येतात, अर्थात उत्तरांसहित...

१. जर सगळे मुसलमान अतिरेकी नाहीत हे रडगाणे सरकार कायम गात असले तर घुसखोरीत सगळी नावे मुसलमानांची कशी येतात?
उत्तर: "सगळे मुसलमान अतिरेकी नाहीत" हे जरी खरे असले तरी "सगळे अतिरेकी मुसलमान आहेत" हेही १०० टक्के खरे आहे.
२. पाकिस्तान बरोबर जे काही शांततापूर्ण बोलणीच्या नावाची फालतुगिरी चालते त्याला अर्थ काय? आत्तापर्यंतची फलनिष्पत्ती काय?
उत्तर: अर्थातच काही नसावी. असलीच जर, तर एवढेच म्हणावे लागेल कि शांततापूर्ण मार्गाने त्यांना पूर्ण भारत भेट देण्याऐवजी काश्मीर आणि आसाम पुरतेच थांबू दिले आहे. पण हे अर्थातच वाईटातून चांगले शोधण्यासारखे आहे.
३. आपल्याकडे यासाठी काही उत्तर नाही का?
उत्तर:
   i. आसाम आणि काश्मीर मध्ये घुसलेल्या मुसलमानांपुढे हात जोडून उभे राहायचे, "चले जाव" चे बोर्ड घेऊन, अहिंसेच्या मार्गाने त्यांना तिथून बाहेर पडण्यास सांगायचे. त्यांनी हल्ला/गोळीबार केला तर घाबरून न पळता, गोळ्या खाऊन मरायचे. (मला गांधीजींची जी अहिंसा माहिती आहे, त्यानुसार हाच मार्ग त्यांच्या तत्त्वातून निघतो.)
   ii. "स्वसंरक्षणात्मक शस्त्र हातात घेणे हे अहिंसेच्या (गांधीजींच्या नव्हे!) धोरणातच येते असे मानून किमान आपली भूमी त्यांच्या अतिक्रमणातून सोडवणे.
४. "‘अखंड भारत’गांधींनाच नकोसा!: प्रा. शेषराव मोरे, १७ जून २०१२, लोकरंग"  ह्या लेखाबद्दल फेसबुकवरील "KCBC" नावाच्या ग्रुप वर चर्चा झाली होती काही दिवसांपूर्वी. लेखात मोरेंनी असा तर्क मांडला होता कि गांधीजीनी जाणून-बुजून भारताच्या फायद्यासाठी देशाची फाळणी केली आणि पाकिस्तान/बांगलादेश निर्माण होऊ दिले कारण त्यामुळे उरलेला "अखंड" भारत सुखात राहू शकेल.
अर्थात त्या लेखात, सरदार पटेल, आंबेडकर, नरहर कुरुंदकर यांची मतेही दिली आहेत. मोरेंनी मांडलेल्या तर्कानुसार आता आसाम वेगळा करू. उरलेला भारत सुखात राहील. पण त्यामुळे उद्या अरुणाचल प्रदेश वगैरेवर सुद्धा पाणी सोडावे लागेल का?
उत्तर: कदाचित होय. "फाळणी" हे उत्तर मानले तर ते खिरापत वाटण्यासारखेच होईल. एकामागून एक भूमी जात राहील.
५. १९७१ पासून आसाम मध्ये प्रचंड घुसखोरी झाली. बोरपूजारी यांनी १९९८ मध्ये पुराव्यासहित घुसखोरी आणि दुष्परिणाम सिद्ध केले आहेत (म.टा. च्या बातमीवरून. पुस्तक वाचनात आले नाही.) तरीही त्यावर काही उपाय का योजला गेला नाही?
उत्तर: उत्तरही त्यांनीच दिले आहे. " राजकीय हितसंबंध"! मुसलमानांचे लांगुलचालन राजकारण्यांकडून कायमच होत आलेले आहे, हे काही नवीन नाही.
६. सुप्रीम कोर्टाने रद्द केलेला आय्.एम्.डी.टी. कायदा , काँग्रेस पुन्हा एकदा मागील दाराने आणण्याचा प्रयत्न करीत आहे. काय आहे हा कायदा? त्यावर बंदी का आणली सुप्रीम कोर्टाने? आणि कॉंग्रेस तो परत आणायचा प्रयत्न करत आहे... का?
उत्तर: कायद्याच्या माहितीसाठी:
http://en.wikipedia.org/wiki/Illegal_Migrants_%28Determination_by_Tribunal%29_Act_%28IMDT%29
बाकी, कॉंग्रेस आणि त्यांचे धोरण यावर बोलण्यात काही अर्थ नाही.

मुद्दा खूप मोठा आहे, त्यावर चर्चेलाही अधिक वाव आहेच. पण त्याने काहीही निष्पन्न होणार नाही, सर्वांना इतिहास आणि परिस्तिथी समजण्यापलीकडे.

** मुसलमान शब्दाबद्दल कोणालाही आक्षेप असल्यास लाखो अतिरेकी आणि दहशतवादी यांमध्ये ५ हिंदू अथवा दुसऱ्या धर्माचे लोक दाखवून द्यावेत. शब्द मागे घ्यायला तयार आहे.

Sunday, July 29, 2012

माझी भ्रमंती - किल्ले पन्हाळा ते किल्ले विशाळगड (भाग २)

            गजर लावला किंवा mobile वर reminder लावला कि 5 मिनिट आधीपासून तो वाजायची वाट बघायची आणि वाजताच बंद करायचा हि नेहमीची सवय. शनिवारी सकाळी सुद्धा हेच, ५:५५ उठून बसलो. मुखशुद्धी करून होतेय तोच चहा हजर झाला. फोडणीचा भात खाऊन आणि फक्कड चहा मारून गडी सज्ज झाले आणि पावणे नऊला दुस-या दिवसाची सुरुवात झाली. पहिले लक्ष होते "आंबेवाडी". अपेक्षेपेक्षा आंबेवाडी लवकरच आली. कळकवाडी पण सापडली. रस्ता तर काय विचारता असा होता. दोन वाड्यांच्या मधे जंगल आणि वाडीत भात-लावणीची कामं चालू असल्याने पूर्ण शूज सहज आत घुसून राहील असा चिखल. मळेवाडी लागली. ह्यानंतर समीरने एकदा साष्टांग नमस्कार घातला. आता पाटेवाडीकडे चालू लागलो. पाटेवाडीही सापडली. शूज ६-६ इंच रुतत होते. जमेल तसा बुटाचा चिखल उतरवत जात होतो. त्यात एक सुंदर प-ह्या लागला. प्रत्येकाच्या शूजबरोबर किलो-दीडकिलो चिखल सहज असेल चोख शूज-socks काढले अन् पाण्यातच बसलो. 

सिद्धार्थच्या रक्ताचा आस्वाद घेत असलेली जळू

जमेल तेवढा चिखल दान करून निघणार इतक्यात सिद्धार्थ "जळू" म्हणून ओरडला. त्याच्या पायाला कधीतरी जळू लागली होती आणि ती रक्त पिऊन टम्म फुगली होती. पोट भरलेले नसल्याने तिचे रक्त-प्राशन चालूच होते. आम्ही पहिल्यांदी कॅमेरा आणि नंतर तंबाखू काढला. बागड्याने तो मळायचा प्रयत्न करून तो जळवेला खाऊ घातला. तिने त्याला काही दाद दिली नाही. मग लायटर काढून तिला चटका दिल्यावर मात्र न राहवून तिने सिद्धार्थचा पाय सोडला. आम्ही मग लगेच स्वतःचे पाय चेक केले. संशयास्पद काहीही आढळले नाही. पाटेवाडी सोडली. जवळ-जवळ साडे बारा वाजले होते. भूका लागल्या होत्या. "सुकामाचा धनगरवाडा" भोजनासाठी fix केला होता. पाऊस अजिबात थांबत नव्हता. सॅकने पाण्याने गच्च ओली झाल्याने पाठीवरचे वजन वाढवले होते. अखेर सगळ्यांनी एका सुंदर पठारावर सॅक खाली टाकल्याच. पाऊसही विश्रांतीच्या मूडमधे दिसत होता. "न पडणा-या" पावसाची आज्ञा मानून भोजनास प्रारंभ केला. उतक्याने पाकाताला रायआवळा आणला होता. पराठे, साध्या पु-या, तिखट-मिठाच्या पु-या, साटोरे, गोड पोळ्या, गुळाच्या पोळ्या असा पंचपक्वान्नाचा बेत केला. सगळे त्यावर तुटून पडले. उतक्याने ओवा-मिश्रित बडीशोप आणली होती, त्याच्या आग्रहाखातर प्रत्येकाने ती घेतली. तेवढ्यात पाचकाची पुडी बाहेर आली. सुबोध आणि सिद्धार्थ ने त्यासाठी थोडी लढाई करून घटकाभर आमचे मनोरंजन केले. सगळ्यांच्या तोंडात आवळ्याचे ते पाचक गेले आणि पुढे कूच केली. थोड्या वेळाने लक्षात आले कि सुकामाचा धनगरवाडाच आत्ता आम्ही सोडून पुढे आलो होतो. आता "म्हसवडे" शोधू लागलो.
            शुक्रवारी आम्हाला चांगली माणसं भेटली. शनिवार मात्र जरा बिनसला होता. तसं आंबेवाडीपासून एक वाटसरू कळकवाडी पर्यंत लाभला होता. नंतर मळेवाडी शोधताना वाटेत एक म्हैसही आमच्या मागे लागली होती पण तिच्या गुराख्याने तिला पिटाळले होते.  पण एकदा कापरेवाडी-आंबेवाडी सोडल्यावर पोरं-बाळं गोळ्या-चॉकलेट मागायला अक्षरशः मागे लागत होती. सुरुवातीला कौतुकाने दिली पण नंतर उपद्रव वाढतच चालला. एक-दोघांनी तर पेनसुद्धा मागून बघितले. लहान पोरंच नव्हे तर शेतात काम करणारे मोठे लोकही गोळ्या-चॉकलेट मागत होते. एकाने तर तुमची "प्यायची" सोय खाली गावात होईल असे सांगून आत्ता काही आहे का "प्यायला" असेही विचारून बघितले.
            मजल-दरमजल करत एका वाडीत येऊन पोचलो. बहुतेक म्हसवडे असावे. साधारण ३ वाजत आले होते. आमच्याकडच्या नकाशावर नसलेल्या ३-४ वाड्या मधे लागून गेल्या होत्या. त्यामुळे प्रत्येक वाडीत पुढचे गांव विचारत जाणे क्रमप्राप्तच होते. या "बहुतेक" म्हसवड्यातल्या एका माणसाने आम्हाला पावनखिंड २० किमी आहे अजून म्हणून सांगितले.. आम्ही चालतच होतो. त्याचा किमी मधला अंदाज चुकत असावा असे मानसिक समाधान करत होतो. आता मात्र एक डांबरी रोड लागला. त्यावरून वाटचाल सुरु झाली. आता पाय दुखायला लागले होते आणि डांबरी रोड वर तर पाय जास्तच दुखतात म्हणून मिळेल तिथे गवतातून, मातीतून जात होतो. दिसणा-या प्रत्येकाला पावनखिंडीचे अंतर विचारत होतो. काहीही अंतर सांगत होते. एका शेळीवाल्या धनगराने मात्र पावनखिंड ४० किमी सांगितल्यावर  सगळ्यांनीच विचार करायला सुरुवात केली. sat-sun तंगड्या वर करून पडायचे सोडून इकडे यायची आपल्यालाच मस्ती हे प्रत्येकजण गमतीत का होईना पण बोलून दाखवू लागला.
        पाण्याने कपडे आणि सॅक चे वजन वाढले होते, सगळ्यांनी सॅक खाली ठेवल्या. बागड्याच्या फाटक्या शूज मुळे तो सर्वात मागे होता. अलक्या आणि उतक्या तसे त्याच्या बरोबर होतेच. चाल मंदावली असली तरी सगळे चालत होते. ४० किमी ऐकल्यावर मात्र धीर सुटायला लागला होता. आधीच सकाळपासून साधारणपणे ३०-३२ किमी अंतर तोडले होते. "पांढरपाणी" गांव काही लागायला तयार नव्हते. आम्ही टेकलो असलो तरी बागड्या मात्र हळू हळू मागून येऊन पुढे गेला.. जेमतेम एका वळणानंतर "वाडी आली रे कोणतीतरी" म्हणून ओरडला. लगेच सगळे उठून चालू लागलो. २००-३०० मीटर वरच घरं दिसायला लागली. १० मिनिटातच उजवीकडे जाणारा डांबरी रोड दिसला आणि चक्क बोर्ड "पावनखिंड ६ किमी"!! तो बोर्ड दिसल्यावर सगळे अत्यानंदाने अक्षरशः ओरडले. मीठ-मोहरी असती तर त्या बोर्डाची नक्की दृष्ट काढली असती. त्यावेळी मात्र त्या उत्साहवर्धक बोर्डाजवळ सगळ्यांनी आपापले फोटो काढून घेतले. ४ वाजून गेले होते. "पांढरपाणी" सापडले होते. म्हसवडे का कोणत्याशा वाडीत आणि नंतर भेटलेल्या चुकीचा रस्ता सांगणा-यांना मनसोक्त शिव्या घालून प्रचंड उत्साहात पावनखिंडीकडे वाटचाल सुरु केली. त्या बोर्डाने एवढा उत्साह आणला कि सगळे नव्या दमाने पावलं टाकायला लागले. पाऊण तासाने साडेपाचच्या सुमारास "पावनखिंड" लिहिलेला बाजीप्रभूंच्या चित्रासहीत एक बोर्ड उजवीकडे बघितला. थोड्याच अंतरावर २ जीप थांबलेल्या दिसल्या. "पावनखिंड" बघायला आलेल्या "पर्यटकांना" फिरवणा-या होत्या त्या.
            नुकतेच पावनखिंड बघून एक कुटुंब येत होते. त्यांनी अजून १६३ पाय-या आहेत असे सांगितले. जवळ-जवळ ३६-३७ किमी दिवसभरात तुडवल्यावर १६३ पाय-यांचे काहीच कौतुक नव्हते. २-४ फोटो काढून पावनखिंडीकडे निघालो. ६ वाजता पोचलो आणि शूज, सॅक सगळे उतरवून बाजींच्या समाधीवर डोके ठेवले.

धन्य जाहलो त्या समाधीवर डोके ठेऊन

            याचसाठी केला होता अट्टाहास.... धन्य जाहलो! वाचलेले, ऐकलेले इतिहासाचे वर्णन डोळ्यासमोरून झरझर सरकत होते. खिंडीत पन्नास एक फूट खोल धबधबा कोसळत होता. सिद्दी मसूद कुठून आला असेल, बाजी कुठून लढत असतील, मावळे कसे गनिमाला कापत असतील.. कल्पनाशक्ती सगळं डोळ्यासमोर आणायचा प्रयत्न करत होती. साधारणपणे १०-१२ तास बाजी लढले होते. आम्ही ते सगळे डोळ्यासमोरून नेले. पावणे सात वाजले होते. दिवस मावळतीला लागला होता. आम्ही पुढच्या गावाच्या दिशेने निघालो. पाय हलत नव्हता, बाजींना कल्पनाशक्तीने का होईना पण त्या कोसळत्या धबधब्याच्या आवाजांत बघायचे होते. जड अंतःकरणाने सहका-यांना निरोप देणारे महाराज बघायचे होते. पण निघालो. "भाततळी" नावाच्या गावात पोहोचलो. बागड्या आणि अलक्याला पण "जळू" ने रक्तदान करायला लावले होते. गावाच्या पाटीलांचे घर सापडले. शाळेच्या नवीन चाललेल्या बांधकामामुळे तिथे राहायची सोय होईल असे त्यांनी सांगितले. आम्ही शाळेत पोचल्या-पोचल्या "कुठे जळू नाही ना हो चिकटली राया" म्हणून सगळे चेक केले. नाही. कपडे बदलून खाद्यपदार्थ आणि पाणी आणण्यासाठी मी आणि प्रणव बाहेर पडणार इतक्यात सगळ्यांना माझ्या डाव्या पायावर रक्त दिसले. जळू रक्त पिऊन पडून गेली होती. मला पत्ताच लागला नव्हता!
            पाटीलांकडे जेवणाची व्यवस्था होण्याची चिन्ह नसल्याने त्यांच्या दुकानातून फरसाण विकत घेतले आणि पाण्याच्या बाटल्यात फुकट पाणी मिळवले. कोणीतरी कांदा आणलाच होता, मस्तपैकी भेळ केली. थोडी शिदोरी शिल्लक होतीच. भरपेट जेवलो आणि स्लीपिंग बॅग, मॅट पसरल्या. मी आडवा पडलो मात्र आणि एक जळू माझ्या पॅट वरून वर सरकत होती. तिची विल्हेवाट लावली. बाबासाहेब पुरंदरेंचे "शिवचरित्र" बागड्याचे ब-यापैकी तोंडपाठ होते. त्याने पावनखिंडीचा भाग म्हणून दाखवला. नंतर मात्र गाढ झोप लागली. मधेच जाग येत होती. बाहेर सोसाट्याच्या वारा होता. क्षणभरही वारा आणि पाऊस थांबत नव्हता. वाळत घातलेल्या जर्किन आणि कपड्यांची चिंता डोकावत होती पण कुणीही उठण्याच्या मनस्थितीतही नव्हते. २ दिवसांत अदमासे ६५ किमी अंतर तुडवले होते. सर्वांना शांत झोप लागली.
             रविवारी फक्त विशाळगड बघायचा होता. आमच्या दृष्टीने "ट्रेक" संपला होता कारण पुढचा प्रवास संपूर्ण डांबरी रस्ता असल्याने बस, जीप जे मिळेल त्या वाहनाने करायचा होता. ९ ची पहिली बस होती. सगळ्यांना साडेआठलाच बस आहे म्हणून सांगितल्याने थोडा अतिरिक्त वेळ मिळाला होता. सगळे समान आवरले . बसनेही फार वाट पाहायला लावली नाही. बसमध्ये घुसून विशाळगडाच्या वाटेला लागलो. कंडक्टरच्या जिभेवर सरस्वती नाचत होती. Stop च्या पुढे गेल्यावर थांबवण्यासाठी कोणीतरी सांगितल्याने ***** अशी कचकचीत आईवरून शिवी त्याला घालून तेवढ्यावरच न थांबता "त्या मुर्खासारखे आणखी कोणी उतरायचे शिल्लक आहे का?" या अर्थाचे जे वाक्य बोलला त्यात कर्ता-कर्म-क्रियापद म्हणून एकेका नातेवाईकावरून शिवी होती. गांव अनुभवत साधारण तासाभरात १० च्या सुमारास विशाळगडाच्या पायथ्याशी पोचलो. विशाळगड चढायला १५-२० मिनिटंच लागतात असे कळले होते. उतक्याचा पाय प्रचंड दुखत असल्याने तो खालीच थांबणार होता, त्याच्या गुडघ्याजवळची शीर सरकली होती. वाटलं होतं तशी चढाई वगैरे काहीच करायची नव्हती. सरकारी कृपेने वरपर्यंत लोखंडी शिडीच होती. विशाळगडावर पोचलो मात्र आणि सुंदर भेळ खाल्ल्यावर शेवटचा शेंगदाणा नेमका खवट निघावा तसे झाले. विशाळगडाच्या आजूबाजूला सुंदर वातावरण असताना गडावर मात्र घाण होती.
             असो... सगळेच परत फिरलो, बसचीही वाट बघत बसलो नाही. वडापने मलकापूरला गेलो तिथून कोल्हापूर आणि मग पुणे. शिवाजीमहाराजांसाठी महत्वाचा ऐतिहासिक गड यापलीकडे विशाळगडाची आठवण काढवत नव्हती. सगळे मन व्यापले होते ते पावनखिंडीने... बाजीप्रभू, फुलाजीप्रभू आणि प्राण आपल्या राजासाठी प्राण पणास लावणा-या त्या मावळ्यांनी... मन अजूनही पावनखिंडीतच होतं...
            "हरितात्या" जर आम्हाला पावनखिंडीत भेटले असते तर त्यांनी लढाईचे वर्णन केले असते... "अरे हे बाजीप्रभू महाराजांना म्हणाले कि 'लाख मेले तरी चालतील पण लाखांचा पोशिंदा वाचला पाहिजे.. असे अनेक बाजी निर्माण होतील, महाराज नाही! थांबू नका, असे विशाळगडावर जा आणि विजयाची तोफ डागा. आम्ही या गनिमाला घोडखिंडीतून पुढे येऊ देत नाही.. महाराजांना हा अखेरचा मुजरा' आमच्या डोळ्यात पाणी होते, आम्ही महाराजांना मुजरा घातला आणि काय... तो सिद्दी फुल्या फुल्या आलाच अंगावर. आम्ही लढत होतो. गनीम मरत होता. बाजीची ढाल फुटली, ते दोन्ही हातात तलवारी घेऊन लढत होते. विजय समीप आला, पण घात झाला. गनिमाचा वार बाजींना लागला. आम्ही बाजींना उचलायला धावलो आणि काय सांगू तूला.. बाजी उठले आणि तलवारी सपासप चालू लागल्या. महाराजांच्या तोफेचा आवाज ऐकला आणि मगच बाजींनी प्राण सोडला..." पुराव्याने शाबित करेन!!!

माझी भ्रमंती - किल्ले पन्हाळा ते किल्ले विशाळगड (भाग १)

            अदमासे १६६०, मार्च ची सुरुवात. सिद्धी जौहर, फाजलखान, सिद्दी मसूद, बाजी घोरपडे यांनी पन्हाळ्याला वेढा दिला. फिरंगीही त्यांना मिळाले. तब्बल ४ महिन्यानंतर गंगाधरपंत सिद्दी जौहरकडे महाराजांचे "सपशेल शरणागतीचे" पत्र घेऊन गेले.
            पत्राची शाईपण वाळायची होती, १२ मार्च १६६०, पौर्णिमेच्या रात्री महाराज निघाले, सिद्दीच्या कचाट्यातून सुटून.. वीस कोसांवर असलेल्या विशाळगडाकडे. गजापूरची घोडखिंड आली, तीनशे मावळे त्या खिंडीत गनिमाला अडवून धरायला उभे राहिले. सिद्दी मसूद बाजींच्या सैन्याला भिडला तर आपलेच लोक, सूर्यराव सुर्वे आणि जसवंतराव खाशा महाराजांच्याच मार्गात उभे राहिले.
           लढाईचे वर्णन केवळ अशक्य! महाराज सुर्व्यांची कोंडी फोडून गडावर पोचले आणि तोफ डागली. हातातली ढाल शत्रूच्या वारांनी फुटल्यावरही दोन्ही हातात तलवारी घेऊन लढणा-या बाजीप्रभूंवर शत्रूचा घाव झाला. बाजी पडले... त्यांच्या रक्ताने घोडखिंड पावन झाली...
               महाराजांना विशाळगडाकडे पोचायला ७ प्रहर लागले, म्हणजे २१ तास...
        इतिहासातील सोन्याचे पान ठरलेल्या या घटनेच्या मार्गावर आम्ही ८ जण (गम्मत म्हणूनही मावळे म्हणायचे धाडस मला होत नाहीये.) जाणार होतो. सगळी 'रसद' बरोबर घेऊन, कोणाशीही लुटूपुटूचीही लढाई न लढता, फक्त वाचलेले/ऐकलेले वर्णन कल्पनाशक्तीच्या जोरावर डोळ्यासमोर आणण्यासाठी, शिवराय, बाजीप्रभू अन् मावळे यांना मुजरा करण्यासाठी.. त्या पंढरीची वारी करण्यासाठी!
            भावना खरोखर इतक्या प्रखर असल्या तरी मर्यादा ओळखून असण्यामुळे आम्ही आमच्या level वर तयारी सुरु केली, sack, शिदोरी, नकाशे जय्यत तयारी केली. तारीख ठरली होती, २०-२१-२२ जुलै. पैकी २० ला शुक्रवार होता, हापिसाचे कामकाज डोक्यावर होतेच. जय्यत तयारीचाच भाग म्हणून हापीस-मित्राला आम्ही शुक्रवारी आजारी असल्याचा मेलही टाकायला सांगायला विसरलो नाही.
पन्हाळ्यावरील दाट धुक्यातील बाजींचा पुतळा 
            गुरुवारी रात्री समीर, सुबोध, प्रणव, मी, सुजय (बागड्या), अलोक (अलक्या), उत्कर्ष (उतक्या) आणि सिद्धार्थ असे ८ जण सह्याद्री एक्सप्रेस ने पुण्याहून निघालो. ओझे उतरवून ठेवल्यावर आमच्या कंपार्टमेंट मध्ये एकच माणूस वेगळा सापडला होता त्याला seat adjust करायची विनंती केली. पडत्या फळाची आज्ञा समजून त्याने स्वतःची सुटका करून घेतली. गाडी बरोबर ६ वाजता कोल्हापूरला पोचली. दंतमार्जन वगैरे गाडीतच उरकून घेतलेले असल्याने चहारूपी अमृताचा आस्वाद घेतला आणि "पन्हाळ्याला कुणी आम्हा नेणार का?" असे विचारात वाहनाच्या शोधार्थ निघालो. वडापच्या कृपेने सव्वा ८ वाजता दोन्ही हातात तलवारी घेतलेल्या बाजींच्या पुतळ्याचे दर्शन झाले. आणि पुसाटी बुरुजावरून आम्ही सुरुवात केली. सुरुवात अर्थातच नेहमीपेक्षा वेगळी नव्हती. चाल झपाझप होती. दाट धुके आणि त्यामुळे सुंदर वातावरण असल्याने फोटो अपरिहार्य होतेच.
प्रवासातील पहिला मित्र

            नकाशावरचा पहिला टप्पा होता "मसाई देवीचे पठार". म्हाळुंगे गांव लगेचच गाठून ८:४० ला पठाराच्या दिशेने सुरुवात केली. पठारावर वातावरण अतिशयच सुंदर होते. हलकासा पाऊस, दाऽऽट धुके, हिरवगार गवत... त्यातच अनपेक्षितरित्या एका मित्राने दर्शन दिले. बहुतेक मण्यार असावी. तिनेही मला ४-५ फोटो घेऊ दिले. मग तिला सोडून आम्ही "मसाई देवीच्या" शोधार्थ चालू लागलो. पहिले देऊळ लागले. दुसरेही लागले. तिथे लोकांना पावनखिंड, विशाळगडला चाललो आहोत असे म्हटल्यावर "मग बस ने जायचे कि" असे म्हणून पूर्णपणे मुर्खात काढणारा कटाक्ष टाकला आणि "खोतवाडी" कडे जायचा रस्ता सांगितला.
        "हे कसे काय चालत जाणार पावनखिंडीत" असे प्रश्नार्थक भाव त्यांच्या चेह-यावर तसेच ठेऊन ठेऊन आम्ही निघालो. त्या धुक्यात ५-५० वाटांत चुकीची बरोब्बर पकडली. पण आमचा आमच्यावर पूर्ण विश्वास असल्याने सापडेल त्याला वाट विचारायची ठरलेलेच होते. गाई-गुरांमागे धावणा-या गावक-याला अत्यंत कष्टाने उतक्याने पकडले आणि मग आम्ही कसे भरकटलो, मग परत पन्हाळ्याच्या दिशेलाच कसे लागलो वगैरे वदल्यावर त्याने वाट सांगितली. त्याला मोबदला अपेक्षित होता याची आम्हाला कल्पना नव्हती. त्याने वाट दाखवून, शिव्या घालून आणि खाऊन मोबदला मिळवला. वाट चुकल्याने मात्र अनपेक्षितरीत्या पांडवकालीन (?) लेण्यांचे दर्शन मात्र झाले.
            खोतवाडीच्या दिशेला लागल्यावर थोड्यावेळाने "कुंभारवाडा" लागला. मग खोतवाडी सापडली. दुपारचा एक-दीड वाजून गेला होता. सगळेच दमलो होतो. एका घराच्या बाहेर जरा वाईच टेकलो आणि मागे राहिलेल्या ३ साथीदारांची वाट बघू लागलो. प्रणव दादांनी गोळ्या-चॉकलेट बाहेर काढल्यावर तिथली एक चिमुरडी "गोळी गंऽऽऽ गोळी" हे इतके गोड म्हणाली कि कोणी-ना-कोणीतरी बाकीच्यांना ऐकवून दाखवत होते. जेवणासाठी "ओली नसलेली जागा" एवढ्याच अपेक्षित असलेल्या आम्हाला अनपेक्षित धक्का मिळाला. "गवळी" नावाचा एक इसम भेटला. त्यांनी त्यांच्या घरात जेवायला बसायची व्यवस्था केली. आमच्या बरोबरचा शिधा काढून जेवायला सुरुवात केली. आम्ही चक्क "अॅनाकोंडा" नावाचा इंग्लिश चित्रपट पाहत जेवलो. त्यावर न विचारता चहा, तो पण घरच्या म्हशीच्या दुधाचा... पठारावर भेटलेल्या माणसाच्या एकदम विरुद्ध हा माणूस. देऊ केलेले पैसे घ्यायलाच तयार नाही! वामकुक्षी साठी आम्हालाच वेळ नव्हता म्हणून नाहीतर त्यांने तीही सोय केली असती.
            ते सुख अनुभवून ३ वाजता "केळेवाडीच्या" रस्त्याला लागलो. वेग वाढला. धड डांबरी रस्ताही नाही आणि धड पायवाटही नाही अश्या अत्यंत वाईट, मोठ्ठी खडी (दगडच ते!) आणि चिखल अशा रस्त्यावरून केळेवाडीकडे पावलं पडत होती. त्यातच सुजय (म्हणजे बागडे) साहेबांचा शूज फाटल्याने त्याला वेळ लागत होता आणि अर्थात त्रासही होत होता. तसे कोल्हापूरच्या रेल्वे स्टेशन वर उतरल्या-उतरल्याच सुबोधच्या सॅकचा बंद जखमी झाला होता. मसाईच्या पठारावरून उतरायच्या आधीच समीरच्या सॅकच्या एका बंदाने दम तोडल्याने सुई-दोरा काढावा लागला होता. पण सुईत दोरा ओवायलाच इतका वेळ लागला कि समीरने कशीतरी सॅक वापरण्याजोगी करून टाकली. बगड्याच्या सॅकने तर घरातून निघतानाच मान टाकल्याने दुस-या सॅकचा सहारा घ्यावा लागला होता. आणि त्यातच शूज फाटला... पण तसेच आम्ही केळेवाडीला येऊन पोचलो. त्या दिवसाचे साध्य होते "कापरेवाडी"! ते साध्य करण्यासाठी वाटेत १० जणांना विचारत विचारत चाललो होतो. त्यात मंडलाईवाडी आली, धनगरवाडी पण आली आणि पन्हाळ्यापासून जवळ-जवळ ३० किमी वर कापरेवाडी सापडली आणि तिथली शाळाही सापडली. ५ वाजता आम्ही कधीच शाळेत न जायला मिळाल्यासारखे त्या शाळेत घुसलो.
            नखशिखांत ओले होतो. सॅक चे वजन पाण्याने वाढले होते. अगदी सुरुवातीला चिखल चुकवत-चुकवत Socks मधे पाणी न शिरू द्यायच्या इराद्याने कसरत करत जाणारे आम्ही नंतर वाट्टेल तसे चिखल तुडवत चाललो होतो. एका वाडीतून ८-१० किलो चिखल दुस-या वाडीत पोचव, मग तिथे शूज साफ करून  त्या वाडीतला चिखल पुढच्या वाडीत असे करत-करत कापरेवाडीत पोचलो होतो. त्यामुळे कपडे बदलून स्लीपिंग मॅट शाळेत पसरून बसकण मारली. सर्वांचे वेगवेगळे भाग दुखत होते. पाय आणि सॅकमुळे खांदे common होते. माझी सॅक तर थोडी मोठी असती तर मी त्यात बसू शकलो असतो अशी होती. सर्वांगाला थोडा-थोडा वेळ जमिनीवर टेकू दिले. मग बरे वाटले. गावातल्याच "साळुंखे" नी आमच्या जेवणाची सोय करायचे कबुल केले. सुंदर चहाही प्यायलो. जेवणाचा बेत न्यारा होता. भात, तांदूळाची भाकरी आणि त्या गावात कसलीही भाजी नसताना घरी असलेला कांदा, वांगी आणि ३-४ कडधान्ये मिळून केलेली मस्त भाजी.. आमच्या बरोबर लोणचे होतेच. उत्तम जेवण झाल्यावर सकाळच्या चहाची आणि उरलेल्या भातामुळे फोडणीच्या भाताची व्यवस्था साळुंखेंकडेच लावून ढाराढूर झोपलो.

Monday, May 14, 2012

माझी भ्रमंती - किल्ले वासोटा ( भाग 2 )


        जोशात चढत होतो. घनदाट जंगल सूर्यकिरणांना जमिनीपर्यंत पोचू देत नव्हते. ते आमच्या फायद्याचेच होते. पण मधे मधे विरळ झाडीतून ऊन, मग सावली असे करत करत, झाडं, प्रकार, आकार बघत बघत एखादा तरी प्राणी दिसण्याच्या अपेक्षेने वेगात चाललो होतो. हळू हळू ग्रुप्स विरळ होत गेले, लोका-लोकांमधलं अंतर कमी-जास्त व्हायला लागलं.
        पायात शूज घालून आलेला हा माझा दुसराच ट्रेक. पहिला अनुभव फारसा चांगला नव्हता. त्यातून ऊन वाढत होतं. आदल्या दिवशी पाऊस पडून गेल्याने आर्द्रता होतीच, आता पाठीवरची मोठी sack, त्यातले 3.5-4 लिटर पाणी, अन्न, extra चे कपडे, चादर, बुटांच्या धास्तीने "बरोबर असाव्यात" म्हणून घेतलेल्या चप्पल, सवयीनुसार घेतलेल्या ३-४ पिशव्या असा लवाजमा याने त्याच्या वजनाची जाणीव करून द्यायला सुरुवात केली. त्यातच सपाटी संपली आणि उभ्या चढाला सुरुवात झाली. एखाद्याला मागे टाकत होतो तर एखादा पुढे जात होता. "जरा थांबू" असा विचार पुढे ढकलत-ढकलत एकदा थांबलोच. बसलो नाही पण जरा विश्रांती झाली. मिनिटभरात पुढे सरकलो. पण सगळ्यांचाच वेग मंदावला होता. काही जण मात्र नजरेच्या टप्प्यात नव्हते. प्रणव त्यांच्यातच होता. मधून मधून त्यांना गाठत परत मागे पडत होतो. Experience trekkers आणि माझ्यातले अंतर मीटर-मीटर मधे समजू लागले होते. मग मात्र एकदा एका ठिकाणी बसलोच. ट्रेक ला सुरुवात केल्यापासून पहिल्यांदा पाणी प्यायले. ५ मिनिटं हललोच नाही, मग परत निघालो. आमच्या ४ जणांच्या ग्रुप पैकी प्रणव पुढे गेलेलाच होता. मी मध्येच होतो आणि विशाल मागे होता. आर्चिस बहुधा पुढेच असावा. १२-१५ वयाच्या पोरी पटपट जात होत्या, त्यांचे आई-बाबा थोड्या फार अंतराने होतेच. आपण अगदीच "हे" आहोत असे वाटून जात होते. अजून २-२ मिनिटांचे २ Halt घेतले आणि प्रणव वगैरे पुढे थांबलेले वीर आमची वाट बघत असलेले दिसले.. थोड्याच वेळात मागचे सगळे आले. आम्ही १५-२० मिनिट थांबलो असू, परत सुरुवात केली. नागेश्वराच्या देवळाकडे जाणा-या रस्त्याच्या इथे आल्यावर परत थांबलो. ग्रुप मधल्या एक काकूंना शक्य न झाल्याने युवाशक्ती वाला एक जण Forest Office पर्यंत परत सोडायला गेल्याचे समजले. आता मात्र झाडी संपली आणि ऊन भाजून काढू लागले. टोक दिसत होते. डोळ्यांनीच अंतराचा अंदाज घेत होतो. जवळ आल्याचे सगळेच जण स्वतःच्या मनाला समजावत होते. सगळ्यांनी एकमेकांना सांगायला सुरुवात केली. कडा टप्प्यात आला आणि जोर परत वाढला. फोटो मात्र मधे मधे मी काढताच होतो. दूरवर आम्ही जे backwater पार करून आलो ते दिसले आणि बरं वाटलं. शेवटच्या टप्प्यात पाय-या लागल्या आणि २ मिनिटांत वरच्या हनुमान मंदिराजवळ पोचलो. बाहेरूनच नमस्कार केला. बसलो. आमच्याकडचं पाणी बरंच शिल्लक होतं. बाकीच्यांनी त्यांचं जवळ-जवळ संपवलं होतं. जवळच्या टाक्यातल्या पाण्याने टोपी भिजवली, डोकं आणि तोंड धुवून घेतले. परत गेल्यावर बामणोलीतल्या हॉटेल मधल्या कोल्ड्रिंक च्या सगळ्या बाटल्या सगळे मिळून संपवून टाकतील अशी चर्चा करत सावली शोधू लागलो. आता जेवायचे होते. ब-याच सावल्या occupy झाल्याने आम्ही थोड्या अंतरावरच्या शंकराच्या देवळात बसकण मारली. शूज काढल्यावर पायांनी मला Thank you म्हटल्यासारखे वाटले. एकमेकांचे डबे हादडले आणि refresh झालो. गडावरचे २-३ point बघितले. आम्ही वेळेत होतो. त्यामुळे युवाशक्ती वाल्यांनी जरा माहिती वगैरे सांगितली.
        आता उतरायला सुरुवात करायची. प्रणव आणि मी मिळून ठरवलेला आता झपाझप उतरायचे असा बेत तडीस जाणार नाही असा इशारा झाला, "चला, सगळ्या मुली पुढे"! मग परत मागून चाललो. हळूच १-२ मुलींना overtake केले. १०-१५ मुली मागे पडल्यावर मात्र "थांबा" अशी आज्ञा झाली. मुकाट्याने रस्ता देऊन थांबलो. परत मुली पुढे. मग प्रमाणिकपणे त्यांच्या मागून जात असतानाच पाऊस आला. पायात ट्रेक चे नसलेले WoodLand, यामुळे साष्टांग नमस्काराची धास्ती होतीच. त्यातून ओले आणि सुट्टे झालेले दगड-गोटे, सुटी माती आणि जोडीला WoodLand, मला धास्ती वाटत असलेला त्यांचा प्रयत्न मी मोठ्या प्रयासाने हाणून पाडला. मग मात्र ऊन पाऊस याचा आनंद घेत मारुती-गणपती च्या मंदिराजवळ आलो. थांबायची आज्ञा झाली. तेवढ्यात नुकतंच मेलेलं एक फुलपाखरू सापडलं. सकाळीही तिथेच अजून एक सापडलं होतं म्हणून त्या दोघांची समाधी बांधून टोप्या काढून मी आणि प्रणव ने श्रद्धांजली वाहिली. परत सुरुवात केली आणि प्रणवला करवंद आणि तोरणं देत, मी खात backwater जवळ येऊन पोचलो.

        पाऊस सुंदरच दिसत होता. त्यातून लांब दिसत असलेला वासोटा किल्ला आम्ही किती चाललो याची जाणीव करून देत होता. बोटी आमची वाट बघत असूनही "सगळे येईपर्यंत Stop" मुळे आम्ही भिजतच थांबलो होतो. अखेर सगळे पोचले आणि बोटी सुटल्या. पहिली बोट पुढे निघून गेली. मागची मागे राहिली. मधे आमच्या २ बोटी तू पुढे कि मी, करत चालल्या होत्या. आमचा बोटवाला पुढच्याला overtake करायला बघत होता, पण पुढचा दाद देत नव्हता. मग "overtake करू देत नाहीस काय?" म्हणून आमच्या बोटवाल्याने पुढच्याला आपली बोट टेकवलीन.
        मग मात्र आमच्या बोटीतले काका घाबरले नी नको नको करायला लागले. "तुमच्याकडे life-jacket पण नसेल" वगैरे वाक्य मारून बोटीवाल्याच्या तोंडावर "हे काय आता नवीन" असे भाव आणले. तो बिचारा Accelerator च्या screw ला पायाचा अंगठा लाऊन बोट हाकत  होता. काकांच्या प्रश्नांनी बोटीचा वेग कमी केला. ६ च्या सुमारास बामणोली किना-यावर सगळे उतरलो.तिथे बामणोली  Premiere League चालू होती. आम्ही ४ जण हॉटेलात जाऊन मिसळीची Order देऊन बसलो, बाकीचे कपडे बदलत राहिले.
        १-१ मिसळ हाणली आणि सकाळची चर्चा आठवली. कोल्ड्रिंक कोणीही घेत नव्हते, पावसांत भिजून वा-याने थंडी लागलेली होती. आम्ही अजून एक मिसळ मागवली आणि चहा घशाखाली ओतून घसा गरम करून घेतला. नव्याने घेतलेल्या मिसळीत वरतीच एक खराब बटाटा निघाला. आम्ही ओरडून हॉटेलवाल्या मामांना ते सांगितले. पण उपयोग शून्य!! (हॉटेलवाला सरपंच आहे हे २ वर्षापूर्वी मी गेलो होतो त्यामुळे मला माहित होते. आणि तिथला आर आर आबांबरोबरचा त्यांचा फोटो त्याची खात्री देत होता.) पहिल्या मिसळीतून असे २-३ बटाटे गेलेसुद्धा असतील पण तेव्हा लक्ष नव्हते, आत्ता दिसला. मग चमच्यात तो बटाटा घेऊन मी तडक counter गाठलं. तिथे अंधार. मामांना ओरडूनच विचारलं "काय आहे हे?".. "खराब आहे का बटाटा" किंवा "Sorry हां, ए... बदलून दे रे मिसळ" अशी काहीतरी अपेक्षा असताना त्यांनी प्रश्नातला जीवच घालवला. ते म्हणाले "कांदा आहे तो, काय झालं त्याला?" आता बटाट्याची अख्खी फोड समोर असताना त्याला ते "कांदा" काय म्हणाले म्हणून त्यांच्या शेजारी असलेल्या त्यांच्या मुलीकडे मी आशेने बघून चमच्यातला बटाटा पुढे केला. तिने तर तीर्थरूपांची लाज काढली... "कांदा कसला, कढीपत्ता आहे तो!" आता मात्र हद्द झाली होती, चांगला सुपारीपेक्षा मोठ्ठ्या बटाट्याच्या फोडिला "कढीपत्ता"??? मी सांगितले तिला तसे चोख. आणि विजयी मुद्रेने ग्रुप कडे पहिले तर तिने मागून माझी विकेटच उडवली, "हो कढीपत्ताच तर आहे, सकाळी केल्ये न मिसळ"!!!!!!! --इति कन्यका. मी गार. मुकाट्याने मिसळ घेऊन मी टेबलावर. पण अंगातरी रग गेली नव्हती. तो बटाटा ताटलीत काढून ठेवला. मिसळ खाल्ली आणि ताटली न्यायला आलेल्या मामांना विचारले "बघा, हा कांदा आहे का?" तर मामा आम्हालाच "हा काय कांदा आहे, ए, कुजका बटाटा कोणी आणला रे?" म्हणून तो बटाटा टाकून न देता हातात घेऊन परत गेले.... हरे राम!!!!!! मिसळ खाऊन आमचा वडा झाला कि त्यांचा तेच कळले नाही... 
        नंतर पावणे आठ - आठ ला जेवायला परत त्यांच्याकडेच. आपल्याकडच्या जेवणाची मामांना कल्पना असावी. त्यांनी हातांनी काहीच वाढले नाही. बफे ठेवला होता. आम्ही लायनीत ताट घेऊन... पापड घेतला, न भाजलेली पोळी घेतली, भाजीही घेतली (अंधार होता म्हणून बरे होते), पुढच्या पातेल्याला मात्र थांबलो, ती कढी आहे कि वरण तेच कळेना, समोर बघीतले तर सरपंच मालकांची मुलगी, "Veg Mix आहे ते!". पुन्हा विकेट, वरण/कढी सदृश पदार्थ "Veg Mix"?? मुकाट्याने घेऊन टेबलावर आलो, त्यांना त्रास नको म्हणून पाण्याचे ग्लासही घेऊन आलो. मागून मामा प्लास्टिक चे ग्लास घेऊन हजार! आम्ही पाणी ओतून तोंडाला लावणार ते स्टील चं ग्लास, तर मामानी चपळाईने त्यात बोटं घालून ती ग्लासं उचलली आणि प्लास्टिकची ठेवली. त्यात पाणी ओतलं. माझ्या पायांवर काय पडायला लागलं म्हणून बघतो तर तेवढ्यात विशाल ने त्याचं ग्लास उचललं तर उत्पन्न झालेल्या गंगेचा उगम कळला. आता त्या ग्लास ला भोक होते आणि टेबलचा उतार माझ्या दिशेला, नशिबाचा गुण!!!
        जेवण झाले आणि थोड्या वेळाने Campfire करायचे ठरले. पाऊस पडल्याने लाकडं सुकी नव्हती त्यामुळे Fire चं बारगळलंच होतं. राठोड साहेब केहाच झोपले होते. मग सगळ्यांना बळंच धरून Introduction साठी बसवले. त्यानंतर दमशरास नावाचा खेळ चालू झाला. "हुकुमत कि जंग", "हावडा ब्रीज पण लटकी हुई लाश", "मेरी बीबी ट्रक ड्रायव्हर के साथ भाग गयी" असले पिक्चर त्यांनी सांगितले आणि ओळखलेही. मी, प्रणव आणि आर्चिस ने एकमेकांकडे पहिले, आम्ही एकाच जातीचे असल्याचे लक्षात आले आणि हळूच अंधाराचा फायदा घेऊन काढता पाय घेतला. गप्पा मारून आम्ही झोपलो.
        सकाळी ५:३० ला उठून मी आणि प्रणव तयार. सगळे उठले आणि ७:३० ला चहा मारून १२:३० ला नारायण पेठेत परत...
        खूप जण ग्रुप मधे होते, एकमेकांच्या ओळखीचे होते, आम्हीच तसे वेगळे होतो, कोणाला लक्षात येण्यासारखे नव्हतो, पण "युवाशक्ती" मधल्या एकाच्या नक्की लक्षात राहू, कारण आम्ही त्यांना एक बोर्ड दाखवला होता आणि चर्चेत आणला होता...
"बाबांची शान....
   दादांचा मान...
    करून दाखवल..."
(दाखव'ल' वर अनुस्वार नाहीये हे हेरलं असेलच!)

माझी भ्रमंती - किल्ले वासोटा ( भाग १ )

        मंगळवारी संध्याकाळी प्रणव चा मेसेज आला कि शनिवार-रविवारी वासोटा ट्रेक आहे, Organized by "युवाशक्ती". त्यावेळेपर्यंत फिक्स असलेला weekend चा program विनाविचार रद्द झाला आणि आदल्या दिवशी "शनिवारी 'काकस्पर्श' ला कोण येणार?" हा मित्रांना टाकलेला मेसेज सोयीस्कररीत्या बाजूला सारून "शनी-रविवारी वासोट्याला कोण येणार?" असा मेसेज टाकला. २-३ "नाही जमणार, या शनिवारी....." असे मेसेज आल्यावर बुधवारी सकाळी आमचे मित्र विशाल राठोड यांनी होकार भरला.
        २ दिवसांचा ट्रेक असल्याने झोपण्या/जेवण्या-खाण्याची व्यवस्था वगैरेची चौकशी आणि चर्चा करण्यासाठी Cowboy प्रणव मराठे यांना call केला. २ दिवसांत १० calls झाले त्यावर. माझ्याकडे sleeping bag नाही, trek-sack, trek-shoes नाहीत अश्या काही मुद्द्यांना चर्चेत घेतले. प्रणवकडच्या sleeping bag ने एक प्रश्न सुटला. Sack चा प्रश्न सिद्धेश च्या sack ने सोडवला. माझा Camera तितकासा effective नाही म्हणून "त्याहून ब-या" पण SLR नको, अश्या Camera ची व्यवस्था सचिन मुळे झाली.
        शुक्रवारी हापिसातून वेळेवर निघण्यात यश मिळवले, माफक प्रमाणात जेवून घेतले. रात्री ११ ला "युवाशक्ती" च्या कार्यालयात जायचे होते. राठोड साहेबांना १०:२० ला बालगंधर्व वरून घेऊन आलो आणि बरोब्बर ११ ला युवाशक्ती, नारायणपेठ, पुणे येथे पोचलो. दिलेल्या वेळेत पोचायचा गुन्हा याही वेळी घडला. मग थोडावेळ निरीक्षण केले. माझ्या ओळखीचा फक्त प्रणव आणि विशाल. १२:०५ ला युवाशक्ती ची बस आली आणि आम्ही वेळेवर आलो म्हणून पटकन सर्वांच्या आधी रुमाल टाकून चांगली जागा पटकवावी हा मनसुबा "आधी मुली जातील बस मधे" या हुकुमाने उधळला गेला. गाडी सुरु झाली आणि "प्रौढ-प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावतंस, सिंहासनाधिश्वर राजाधिराज महाराज, छत्रपती शिवाजी महाराज कि..... जय!", "हर हर.. महादेव!" अश्या घोषणा देऊन नारायण पेठेतून निघालो. "गोब्राह्मण प्रतिपालक" वगळला जाण्याची आधीच आलेली शंका सत्यात उतरली आणि त्या संबंधी विचारातच bag वगैरे adjust करून बसलो.
        आमच्या मागच्या सीट वर बसलेल्या मुलीचा आवाज माझ्यासारखाच मोठा होता. ती तिच्या मैत्रिणींना "तुम्ही काहीतरी बोला ना" असं मधे मधे सांगून, त्यांना बोलायची संधी न देता बडबड करत होती. आता मला जांभया यायला लागल्या होत्या, पण त्या मुलीच्या आवाजापुढे माझ्या जांभयांनी दिलेले संकेत मेंदू पर्यंत पोचून परत जात होते. मग शेवटी "शेजारच्या घरात ठणाणा करत लावलेला रेडीओ आपल्यासाठीच लावलाय" असं समजून वैताग घालवण्याचा पुलं च्या तत्वाचा वापर करून त्या मुलीच्या बोलण्यात रस घेऊ लागलो.
        ती लहानपणी पुण्यात कुठे रहात होती, तिच्या घरासमोर गाण्याच्या तालावर गणपतीत कारंजे कसे उडायचे, ते ती घरातून कसे बघायची, तिला कुठली गाणी आवडतात, ती  FM किती तास ऐकू शकते, तिला फाष्ट गाणीच आवडत होती तरीही आत्ता-आत्ता ती शांत गाणीही ऐकायला लागली आहे... हि आणि अशी अनेक माहिती मला मिळाली. तेवढ्यात खेड-शिवापूर चा टोल नाका आला आणि गाडी चहा प्यायला थांबली. कानांना आणि पायांना थोडा आराम मिळावा म्हणून खाली उतरलो. झोप लागण्याची शक्यताच मावळल्याने मोठ्या जोमाने माहिती-ग्रहणासाठी चहा मारला.
        आम्ही चहा पीत असताना ड्रायव्हर ने गाडी चालू करण्याचा २-३ वेळा प्रयत्न केला आणि गाडीचा मेंटेनंस नीट ठेवलेला नाही आणि गाडीला starting-problem आहे हे काही थोड्या लोकांच्या लक्षात आले. आम्ही गाडीत बसलो आणि गाडी आणखी बडबड लगेच सुरु झाली.
    आता त्या मुलीला कोणते पिक्चर आवडतात/नावडतात, कोणते नट-नटी आवडतात/नावडतात हे वर्णन आणि कारणासकट मला माहित झाले. ती एकदा तिच्या मैत्रीण आणि आज्जीबरोबर (होय, आज्जीच) हॉरर पिक्चर ला मल्टीप्लेक्स ला गेलेली, तेव्हा काय गम्मत झाली ते सांगू लागली, मीही सरसाहून बसलो.पिक्चर हाउसफुल होता आणि ते ४थ्या रांगेत बसले होते. १-२ वेळा ती आणि तिची मैत्रीण किंचाळली आणि आज्जी शांतच, हे ऐकून आधीच उत्पन्न झालेली चिंता आणखीनच वाढली. पण तिची आज्जी घाबरत नसल्याने ती ओरडली नाही हे update कळले आणि चिंता मिटली.
        भूतकाळातून हळू हळू ती वर्तमानकाळाकडे वळू लागली. तिचा गेल्या २ दिवसांचा कार्यक्रम नीट ऐकला. तिची बहिण, तिची admission, त्याची तयारी आणि त्रास अशी Family Info मिळाली. कसलेतरी बिल भरायचा शेवटचा दिवस उलटून गेलाय हे तिला आणि मला एकदम समजले.
        अश्या तिच्या सवयी आणि shopping विषयी आवडी-निवडी ऐकण्यात दंग असताना तिच्या मैत्रिणीने तिला shopping मधे काय आवडते ते सांगण्याचा प्रयत्न केला, अर्थातच तो फुकट गेला. बहुधा बाकीच्या आधीच झोपल्या असाव्यात.
        काहीही असेल पण जरा शांतता निर्माण झाली आणि जरा डुलकी लागली. मग सात-याच्या नाना चौकात उजवीकडे जायचे असताना ड्रायव्हर ने गाडी चुकून पुढे नेली आणि सगळ्यांना जाग आली. मग मागे घेऊन गाडी सरळ रस्त्याला लागली आणि मग मी सात-याचे वर्णन ऐकू लागलो. घाटात गाडी चढेनाशी झाली आणि नीट मार्गाला लागल्यावर ड्रायव्हर ने handbrake चा कसा वापर केला वगैरे ऐकू लागलो. पण श्रोता कोणीच नसल्याने १-२ वाक्यातच ते समजून घ्यावे लागले. बामणोली येईपर्यंत थोडा-थोडा झोपलो.
    ४:१५ ला बामणोली आले. ६:३० ला परत उठायचे असल्याने मी आणि प्रणव ने न झोपण्याचा निर्णय घेतला आणि गप्पा मारत बसलो. ८ ला न्याहारी वगैरे करून ८:१५ ला होडीत बसलो. कोयना backwater cross करून ९:१५ ला पलीकडे पोचलो. त्या दरम्याने बोटवाल्याने त्याचे नांव, तो रोज किती फे-या मारतो, लागणारे डिझेल, खर्च ई.ई. माहिती मला दिली.
        आम्ही ५० जण होतो त्यामुळे अजून ३ बोटी येत होत्या. त्यांची वाट बघत विश्रांती घेतली. तसंही बोटीच्या मशीनच्या आवाजाने कानाला विश्रांती मिळालेली नव्हतीच. बोटीवाल्या दादांनी आधीच दूरवरून वासोटा किल्ला दाखवला होताच, आता त्याच्याकडे कूच केली.

        आमच्या बोटीतल्या २ काकांकडे SLR होता, त्यांनी प्रत्येकी पन्नास पाऊणशे फोटो काढले होतेच, ते त्यांनी चालू ठेवले. 
सगळ्यांनी आपापले ग्रुप करून चालायला सुरुवात केली. मी, विशाल, प्रणव आणि त्याचा मित्र आर्चिस असा आमचा ग्रुप झाला होता. मी पण थोडे फोटोस घेत चाललो होतो. १-२ गवे पाणी प्यायला आलेले बघितले आणि मैदान सोडून आम्ही actual जंगलात प्रवेश केला. थोड्या वेळात Forest Office आले. तिथे युवाशक्ती वाले नेहमीचेच असल्याने परवानगी वगैरे लगेच मिळाली. आणि प्राणी दिसला तर त्याला घाबरवू नका, काय करा आणि काय नको या सूचना घेत जंगलात शिरू लागलो. लगेचच इथे गणपती आणि मारुती एकाच मंदिरात आपापली जागा शेअर करून राहतात, त्यांना क्यामेरात घेतले. 
तिथल्या प-ह्याचे काहीतरी काम चालू होते. काही जणांनी त्यांच्या रिकाम्या बाटल्या जवळच्या झ-यात भरून घेतल्या आणि चढायला सुरुवात केली.
आता मात्र कुठे थांबायचे नव्हते.
क्रमशः

Friday, March 23, 2012

विलेक्शन 'राज'कारण...

अंक  १:
स्थळ: दरबार (वि.सू.: हे हॉटेल चे नांव नाही)

पात्रे:
मुख्य-मंत्री: सर्व मंत्र्यांमधले मुख्य असे जे ते. मुख्यमंत्री पदाचा येथे काही संबंध नाही.
मत्री: इतर किडूक-मिडूक साथीदार.

मुख्य-मंत्री: काय खबर आहे राज्यात?

मंत्री: सगळे लोक "विलेक्शन, विलेक्शन" म्हणून ओरडत आहेत. कदाचित सगळ्यांना कसलातरी विलेक्शन आनंद झालेला असावा.

मु.म.: आनंद कसला? अरे तो पलीकडच्या "सेने"तला "आनंद कि काय? तो म्हणे आपल्या मित्र राष्ट्रात येतोय, त्याबद्दल काही ऐकले का? आणि मंत्र्यांनो, विलेक्शन आनंद वगैरे काही नाही, ते "इलेक्शन" आहे...
आज रात्रीच "बसू", बैठकीत काय ते ठरवू आणि पुढील डावपेच आखू.

मंत्री: "बैठकीत" काय झाले हे काही आठवत नाही, तरी आता मात्र आपल्याला चांगला चान्स आहे, गेल्यावेळी शेजारच्या बागेतले "साहेब" म्हणत होते कि त्यांच्याकडच्या बागेतील काही कमळांची "रेल्वे इंजिनाने" घुसून नासधूस केली आणि त्यात संरक्षण मंडळातल्या लोकांचे "धनुष्य-बाण" ही मोडले. यावेळी पण तसेच काही झाले तर उत्तम!

मु.म.: पण यावेळी दुसरे प्रॉब्लेम आहेत, खेळ-खेळ म्हणताना त्यात घोळ झालाय, आणि त्यामुळे लोक नाखुश आहेत. अर्थात त्यांना आपण दंड सुनावला आहे, पण तरीही योग्य वेळी बाहेर काढावेच लागेल त्यांना. राज्यातील महागाई वाढत असून तेलाचेही भाव चांगलेच वधारले आहेत. लोक नाराज आहेत आणि त्यातून आपल्याला  आपल्या मनाप्रमाणे थोडेच वागता येते? एका बाजूने परदेशी मॅडम ओरडतात. जनतेच्या बाजूने पांढ-या टोपी वाल्यांची एक टीम मध्ये फार गोंधळ घालून गेली. त्यांना आवरता आवरता नाकी-नऊ आले. त्यात योग-साधना वगैरे करणा-यांनी मध्ये अलोम-विलोम करायला सुरुवात केली. अर्थात त्यांच्या नाकी दम आणायला फार कष्ट पडले नाहीत. पण लक्ष ठेऊन असायला हवे.
बरे, मित्र-राष्ट्रातील काकासाहेब आणि दादांकडून काय बातमी आहे?

मंत्री: काकासाहेब बरेच पेशन्स ठेऊन असतात. पण दादांचे वागणे काही ठीक दिसत नाही, काकासाहेब त्यांना वेळोवेळी सांभाळून घेत असतात. त्यामुळे तिकडून अपेक्षित यश येईल असे वाटते. "नाशिक" तीर्थक्षेत्री परिस्तिथी फारशी अनुकूल नाही. काकासाहेब त्यांच्या मुख्य प्रधानाकडून अपेक्षा बाळगून आहेत, त्यांच्या "भूजां"मध्ये फार "बळ" आहे असे म्हणतात. परंतु सध्या रेल्वे चा जमाना आहे. इंजिन एकच असले तरी मोजक्या डब्यांनीशी बरेच रस्ते काबीज केले होते त्यांनी. डबेही वाढत आहेत, परंतु सगळा भार इंजिनावर आहे.

मु.म.: हम्म.. एक तर आम्ही राज्यात नवीन आहोत, "आदर्श" लोकांची गच्छंती झाल्यावर राजधानीतून अचानक आमची बोळवण झाली.
बरं, पुण्य-नगरीतून काय खबर?

मंत्री: तिकडून परिस्तिथी चांगली असल्याची बातमी आहे. तो परिसर आणि शेजारील प्रदेशावर काका आणि दादा चांगलाच वाचक बाळगून आहेत. जागोजागी रेल्वे घुसत आहे, तसेच धनुष्य-बाण धारी संरक्षक फार नसले
तरी साहेब कमळं लावून बाग फुलवायचा प्रयत्न करत आहेत. त्यातून पुण्य-नगरीत देव-धर्म करणारी बरीच मंडळी असल्याने कमळांना चांगली मागणी आहे. इंजिनाला आपल्यात काहीच स्वारस्य नाही, नाहीतर रेल्वे घुसवून कमळे चिरडून इंजिन हाताच्या इशा-यावर नाचवले असते. पण इंजिनाच्या ड्रायवर चे मनसुबे वेगळेच दिसतात. तरी धनुष्य-बाणांचा मारा इंजिनावर होत राहिला तर आपल्याला फायदा आहे.

मु.म.: आपल्या "उत्तर" दिशेला असलेल्या "प्रदेशा"तील हत्तीवाल्या सरदारणीनीने देव-धर्म करणा-या मंडळींपैकी एकाला हाताशी धरून वेगळाच गेम खेळला होता, तसा काही धोका वगैरे?

मंत्री: नाही, परंतु दुसरा एक धोका जाणवतो... दादांच्या राज्यातील पगडीवाल्या माणसाच्या मदतीने काही भुरट्या चोरांनी पुण्य-नगरीतील एका "महाला"त रात्री गोंधळ घातला. कसलातरी पुतळा चोराला म्हणे, त्यानेही दादांनी रोष ओढवून घेतलाय. दादांची हि दादागिरी आवाक्या बाहेर जातेय हे लक्षात घेऊन काकासाहेबांनी योग्य हालचाली केल्याने वातावरण निवळलं आहे.

मु.म.: मुंबा-नगरीत चांगलं चाललंय, मॅडमनी चांगलं सांभाळलंय!

मंत्री: नाही! आपल्या कुंडलीत म्हणे धनुष्यापासून धोका आहे. त्यांच्याकडे बाण बरेच आहेत. तसंच इथे रेल्वे पण जोरात चालते, त्यामुळे इंजिन पण कुठून-कसे घुसेल काही नेम नाही. त्यातच धनुष्य-बाण धारी सेनेतल्या साहेबांना अचानक काहीतरी "आठवले" आणि त्यांनी एक "निळा" दाढीवाला शिपाई बरोबर घेतलाय, तो काय बडबडतो ते कळत नाही पण म्हणे बागेतली कमळं पुरी पडत नसल्याने हा शिपाई "आठवाल्याची" बातमी आहे.
परंतु त्यात फारसा धोका दिसत नाही.

मु.म.: ते बघून घेऊ हो, पण माझ्या मॅडमना सगळीकडे लक्ष द्यावं लागतं त्याचेही टेन्शन आहे मला. उत्तरेकडील प्रदेशात हत्तीदल जोरात आहे. गेले अनेक वर्ष हत्ती-दलाला धोका नाही.हत्ती-दलाच्या सरदारणीनीने तर तश्या प्रतीकृतीपण जागोजागी उभ्या केल्या आहेत.

मंत्री: आपलं राजधानी वरचं प्रेम जगजाहीर आहे. तसं काकासाहेबांनीही घड्याळाबरोबर राजधानीकडे लक्ष ठेवलं होतं, पण त्यांची डाळ न शिजल्यानं लगेच स्थानिक पातळीवर लक्ष केंद्रित केलं, आपल्यालाही मुंबपुरीसकट
पुण्यनगरी, विदर्भ  आणि नाशिक तीर्थक्षेत्री लक्ष ठेवावे लागणार आहे.

मु.म.: हो, त्यासंबंधीही योग्य पावले उचलली गेली आहेत, तन-मन-धनाने प्रयत्न चालू आहेत. तशी आपला धनाने भरलेला राजधानीतून पाठवलेला एक पेटारा लुटला गेल्याची बातमी विदर्भातून आल्ये, पण आपापल्या
परीने प्रयत्न चालू आहेत. "उच्च" म्हणजे "हाय" स्तरावरच्या कमांड कडून आदेश आलाय....

मंत्री: ह्या, असल्या "आदेश" चा काही उपयोग होत नसतो, मध्ये नाही का असाच "पैठणी" वाला आदेश एका सेनेकडून लढला होता. काय उपयोग झाला?

मु.म.: तसला नाही हो, हा आदेश म्हणजे ऑर्डर. त्याप्रमाणे गल्ल्या-गल्ल्यातून कामं चालू झाली आहेत, कंत्राटदारांना ऑर्डरी गेल्या आहेत. माझे एक तर मराठी चांगले नाही त्यामुळे तुम्ही पण प्रत्येक घर, बिल्डिंगा,
सोसायट्या यातून चौकशी चालू करा. मागणी प्रमाणे कोणाला दिवे, फरश्या, बाकडी, पाण्याचे पाईप वगैरे पाठवून द्या, बुजुर्ग मंडळींना देव-दर्शन घडवून आणा. प्रत्येक कामामागे आपलाच "हात" आहे याची लोकांना कल्पना येऊ द्या. लोकांना वाटलं पाहिजे कि हा "हात" धरल्याशिवाय तरणोपाय नाही...
चला लागा तयारीला..

अंक २:
स्थळ: दरबार (यावेळी मात्र हॉटेल कम बियर बार)

मंत्री: यावेळी गणितं चुकल्येत सर. स्थानिक पातळीवर चांगलेच दुर्लक्ष झालेले दिसतेय. पुण्य-नगरीतही काही ठिकाणी घात झालाय. सोसायट्या, बिल्डिंगा मध्ये आपण पाईप, फारश्या पोचवल्या ख-या, पण त्या पाईप पाई
चांगलाच पैसा गेला, आणि परतावा पण फारसा नाही. ठराविक ठिकाणी अजूनही लोकांना कमळंच पाहिजेत. मुंबापुरी आणि नाशिक तीर्थक्षेत्री बोंबाबोंब झाल्ये. इकडे तर आपला "हात" धरून जायच्या ऐवजी लोकांनी सेनेच्या सरदाराचे धनुष्य धरणे पसंत केल्ये. रेल्वे तर फारच जोरात चालल्ये. आपल्याला कुठेच ठाण मांडून बसता आले नाहीये, उलट रेल्वेने कमळांवर न जाता त्यांना ठाण मांडू दिलेय. बागेतल्या निळ्या फुलांकडून खूप अपेक्षा असताना मात्र कमळेचा जास्त फुलून आल्याचं दिसतंय. धनुष्य-बाण घेऊन मुख्य सरदार खूप फोटो काढत आहेत.

मु.म.: आपण योग्य निर्णय घेतले होते, मॅडमनी योग्य वेळी "खेळात" गेम करणा-या माणसाला बाहेर काढले होते. पांढरी-टोपी गँगला पण गप्प केले होते, प्राणायाम करणा-या योगींना श्वास घेणे कठीण केले होते. तरी
असे का झाले याचे आश्चर्य वाटते.

मत्री: त्यात आश्चर्य काय? तिकडे उत्तरेकडील प्रदेशात नाही का, हत्ती दलावर केवढा विश्वास होता त्यांच्या सरदारणीनीचा, पण काय झाले? लोकांना ओबड-धोबड हत्ती पेक्षा "सायकल" ची सीट जास्त "मुलायम" वाटली
ना... अचानक सायकली अंगावर आल्याने हत्तींनाही पळावे लागले...

मु.म.: पुण्य-नगरीत मात्र अजूनही आपण आब राखून आहोत. मित्र-राष्ट्राच्या मदतीने का होईना! तसे तुमचे म्हणणेही बरोबर आहे, अजूनही काही सोसायट्यातले समान तसेच पडून आहे. पण ते चालायचेच, प्रयत्नांना
यश मिळाले. विकास कामांमागे आपलाच "हात" आहे असे वाटल्याने म्हणा किंवा काकासाहेब आणि दादांच्या प्रभावाने म्हणा, आपली स्तिथी चांगली आहे.

मंत्री: हो, हे बरोबर पण तरीही पगडीवाल्यांना आपल्या कर्तुत्वाची फळं भोगावी लागलीच. "महालात" आपले कर्तुत्व दाखवून आपली "लाल" करण्याचा प्रयत्न अंगाशी आला. आणि इथेही रेल्वेने जेरीस आणले, पण वाचलो.

मु.म.: तीर्थक्षेत्री मात्र पार वाट लागली. काकासाहेबांच्या प्रधानाच्या भुजांमधलं बळ कमी पडलं, तिथे रेल्वे चांगलीच घुसली. आत्ताच आलेल्या बातमीनुसार गणितं काही नीट जुळली नाही म्हणा किंवा कमळांनी तोंडं वळवली म्हणा, पण रेल्वेला कमळांची माळ पडली. निळी फुलं तर पार कोमेजून गेली. धनुष्यातले बाण म्यान झाले. "भुजां" मधलं "बळ" गेलं, लोकांना "हात" धरावासा वाटला नाही. आणि प्रथमच नवीन "राज"सत्ता स्थापन झाली!!!

मु.म.-मंत्री: अजब तुझे सरकार, उद्धवा अजब तुझे सरकार!!!!